१६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई बोरीबंदर ते ठाणे ही पहिली रेल्वेगाडी धावली, त्या घटनेला नुकतीच १६० वर्षे झाली.आज रेल्वे ही भारताच्या नागरीकरणात व अर्थकरणात अतिमहत्त्वाची भूमिका बजावत आहे. परंतु स्वातंत्र्यपूर्व ब्रिटिशकाळात भारतीय रेल्वेच्या पायाभरणीत नाना जगन्नाथ शंकरशेट अग्रेसर होते. त्यांचे यासंदर्भातले कार्य आजच्या पिढीला ज्ञात होणे जरुरीचे आहे.
भारतात लोहमार्गाची योजना पद्धतशीर रीतीने आखून तो सुरू करण्याचे अर्थात मुंबई ते ठाणे हा २० मैलांचा पहिलावहिला लोहमार्ग जनतेसाठी खुला करण्याचे भाग्य मुंबई नगरीच्या वाटय़ाला आले, या गोष्टीला कितीतरी महत्त्व आहे. कारण नाना जगन्नाथ शंकरशेट यांच्यासारखे लोक कल्याणासाठी सुज्ञ मराठी नेते या शहरात होते. रेल्वे कंपनीची स्थापना झाली व कंपन्यांचा या देशातील कारभार चालवण्यासाठी एक वजनदार, कर्तव्यदक्ष व सर्व परीने समर्थ असे डायरेक्टर बोर्ड नेमण्यात आले.
या डायरेक्टर बोर्डात नाना शंकरशेट यांचे स्थान विशेष महत्त्वाचे होते. कारण आरंभापासून लोहमार्गाची योजना नावारूपाला यावी, ती जनतेच्या त्याचप्रमाणे सरकारच्या गळी उतरावी, यासाठी ते उत्साहपूर्वक झटत होते. आपल्या देशी व परदेशी मित्रांशी तसेच सरकारशी सहकार्यासाठी त्यांचे प्रयत्न अहर्निश चालू होते. मुंबईत जी. आय. पी. रेल्वे कंपनीचे डायरेक्टर बोर्ड स्थापन झाले व त्याच्याकडे स्थानिक रेल्वे कंपनीचा कारभार सोपवण्यात आला. यावरून या बोर्डाचे अधिकारक्षेत्र समजून येईल. आज रेल्वे कंपन्यांच्या मोठमोठाल्या व भव्य इमारती आपणास दिसत आहेत. परंतु कंपनीच्या कामकाजास सुरुवात झाली, तेव्हा निरनिराळ्या अधिका-यांना व विशेषत: इंग्लंडहून भारतात लोहमार्गाची आखणी करण्यासाठी आलेल्या इंजिनीयर्सना आपापल्या कचे-या थाटण्यासाठी जागेची अडचण भासू लागली. त्या काळात म्हणजे १८५० साली या रेल्वे कंपनीची एक महत्त्वाची कचेरी नाना शंकरशेट यांच्या ठाकूरद्वार येथील वाडय़ात थाटण्यात आली. यावरून या अभिनव उपक्रमाशी नाना शंकरशेट हे किती एकजीव होऊन राहिले होते, याची सहज कल्पना करता येण्यासारखी आहे.
मुंबई ते ठाणे या लोहमार्गाची आखणी व इतर कामे पूर्ण झाल्यावर हा मार्ग तयार करण्याची सुरुवात ३१ ऑक्टोबर १८५० रोजी शीव येथे करण्यात आली. त्या दिवशी सकाळी पहिली कुदळ मारून व मातीची पहिली टोपली भरून ती बाजूला टाकण्याचा समारंभ राज्यपालांच्या मंत्रिमंडळातील एक प्रमुख मंत्री जे. पी. विलोघबी यांच्या हस्ते झाला. हा समारंभ जाहीर स्वरूपाचा नव्हता. कंपन्यांचे डायरेक्टर नाना शंकरशेट, कस्त्रेटजी जमशेटजी तसेच इतर बडे अधिकारी त्या वेळी हजर होते. हा पहिला लोहमार्ग तयार करण्याची जबाबदारी शिरावर घेण्यासाठी त्या काळी कोणीही भारतीय कंत्राटदार किंवा कंपनी पुढे आली नाही. ती कौशल्यपूर्वक पार पाडण्यासाठी विलायतेतील ‘मेसर्स फॅवील अॅण्ड फाबलर’ ही कंपनी पुढे आली व ठरलेल्या मुदतीत त्या परदेशी कंपनीने एतद्देशीय कामगारांच्या मदतीने ही जबाबदारी यशस्वी रीतीने पार पाडून दाखवली. विलायतेत प्रसिद्धी पावलेले बुद्धिमान व आपल्या कामात तरबेज, असे स्थापत्यशास्र्ज्ञ जेम्स बर्कले यांची मुख्य इंजिनीअर या नात्याने कंपनीकडून नेमणूक करण्यात आलेली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई ते ठाणे लोहमार्ग तयार झाला व त्याचे समारंभपूर्वक उद्घाटन करण्याचा दिवस उजाडला.
१६ एप्रिल १८५३ या दिवसाचे महत्त्व कोणत्या शब्दांत वर्णन करावे? ‘टेलिग्राफ अॅण्ड कुरियर’ या तत्कालीन वृत्तपत्राचा बातमीदार उद्घाटनाच्या समारंभाच्या हकिकतीचे वर्णन करताना म्हणतो, शनिवार ता. १६ एप्रिल १८५३ रोजी पश्चिम भारतातील लोकांना जो विजय समारंभ पाहिला, त्याची तुलना आम्ही (इंग्रजांनी) संपादिलेल्या कोणत्याही विजयाशी करता येणार नाही. प्रासी, असई आदी ठिकाणच्या रणभूमीवर आम्ही जे विजय मिळविले, ते ऐतिहासिक विजय कालांतराने विसरले जातील. परंतु मुंबई ते ठाणे हा पहिला लोहमार्ग सुरू करून जी अभूतपूर्व सुधारणा भारतात घडवून आणण्यात आली ती चिरस्मरणीय होऊन राहील.
मुंबईतील नागरिकांनी तो दिवस सणवाराप्रमाणे पाळला. त्या दिवशी सर्व कचे-यांना रजा देण्यात आली होती. शहरभर आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरलेले होते. ज्या गाडीला अनेक डबे जोडलेले आहेत, अशी गाडी वाफेच्या इंजिनाच्या सहाय्याने भरधाव सुरू व्हायची होती व एकाच वेळी शेकडो लोकांना सुखाने प्रवास करता या वयाचा होता! केवढी ही आश्चर्याची घटना होती! आज या गोष्टीचे कोणाला आश्चर्य वाटणार आहे! परंतु त्या काळी ही घटना नव्या नवलाईची व आश्चर्याची वाटत होती. वाफेच्या इंजिनाच्या सहाय्याने चालणारी अगिनगाडी हे त्या काळातील एक अभूतपूर्व महान आश्चर्य होते. ते प्रत्यक्ष पाहून डोळ्यांचे पारणे फेडण्यासाठी त्या दिवशी बोरीबंदर ते ठाणे या लोहमार्गावर दुतर्फा हजारो स्री-पुरुषांचे थवे दाटीवाटीने उभे होते. ही पहिली गाडी बोरीबंदर स्टेशनातून शनिवारी दुपारी साडेतीन वाजता सुटावयाची होती. गाडीला अठरा डबे व तीन इंजिनं जोडण्यात आली होती. गाडीत पाचशे-निवडक पाहुणे मंडळींची बसण्याची सोय करण्यात आली. नाना जगन्नाथ शंकरशेट यांच्यासमवेत आगगाडीचा हा पहिला प्रवास ज्यांना घडला ते खरोखर धन्य होते.
(कै. पु. बा. कुलकर्णीलिखित नाना शंकरशेट यांच्या चरित्रावर आधारित )
मुंबईचे शिल्पकार व भारतीय रेल्वेचे जनक नामदार नाना जगन्नाथ शंकरशेट यांचे योग्य ते स्मारक होण्यासाठी नामदार जगन्नाथ शंकरशेट स्मारक समिती कार्यरत आहे. या समितीचे अध्यक्ष सुरेंद्र वि. शंकरशेट असून, नामदार नाना जगन्नाथ शंकरशेट यांचे ते खापरपणतू आहेत. या संबंधात अधिक माहितीसाठी ९८२०३८०८५३ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करू शकता.
थान्क्स फोर थे इंफोमाथोन
THANKS FOR THIS INFORMATION.