विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांना अडगळीत टाकण्याचा अध्याय सुरू झाला असून शुक्रवारी जाहीर केलेल्या सहा प्रवक्त्यांमध्ये चार ज्येष्ठ नेत्यांना डच्चू दिला आहे.
मुंबई– विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांना अडगळीत टाकण्याचा अध्याय सुरू झाला असून शुक्रवारी जाहीर केलेल्या सहा प्रवक्त्यांमध्ये चार ज्येष्ठ नेत्यांना डच्चू दिला आहे. ‘सामना’चे कार्यकारी संपादक व खासदार संजय राऊत यांना प्रवक्तेपदावरून डच्चू दिल्याने त्यांचे शिवसेनेतील स्थान कमी झाल्याची सुरुवात मानण्यात येत आहे. तर रामदास कदम यांच्या लुडबुडीने विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे अस्वस्थ आहेत. हा सर्व घटनाक्रम पाहता शिवसेनेत अंतर्गत संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
निवडणुकीनंतर गोंधळात अडकलेल्या शिवसेनेने पक्षांतर्गत बदलाची सुरुवात केली असून त्याचा पहिला अध्याय प्रवक्त्यांच्या निवडीने सुरू झाला आहे. पूर्वीच्या सहा प्रवक्त्यांपैकी नीलम गो-हे आणि विजय शिवतारे यांना पुन्हा संधी दिली असून चौघांना डच्चू दिला आहे. खासदार राऊत यांची उचलबांगडी धक्कादायक मानली जात आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर राऊत यांनी केलेल्या अनेक उलटसुलट वक्तव्यामुळेच शिवसेना-भाजपामधील दरी वाढत गेली. ‘सामना’च्या अनेक अग्रलेखांतून पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका करण्यात आली. तेव्हा राऊत यांच्या लेखनावर नजर ठेवण्याची जबाबदारी ‘सामना’चे विश्वस्त लीलाधर डाके आणि सुभाष देसाई यांच्यावर सोपवली होती. त्याच वेळी राऊत यांच्या शिवसेनेतील स्थानाला उतरती कळा लागल्याची चर्चा होती. निवडणुकीनंतर राऊत यांचे लिखाण आणि प्रसार माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियांमुळे शिवसेना-भाजपातील दरी वाढली. त्यामुळे शिवसेनेला सत्तेपासून दूर राहावे लागले, असाही पद्धतशीर प्रचार केला गेला. त्यामुळेच त्यांची प्रवक्तेपदावरून उचलबांगडी केल्याचे बोलले जाते. मनोहर जोशी यांना पक्षाने कधीच अडगळीत टाकले होते. मनसेतून शिवसेनेत आलेल्या श्वेता परुळेकर यांना प्रवक्तेपदी नेमून त्यांचे पुनर्वसन केले. मात्र त्यांची कामगिरी सुमार राहिली. त्यामुळे त्यांना नारळ देण्यात आला. भाजपातून शिवसेनेत आलेल्या मनीषा कायंदे यांना त्यांच्या जागी संधी दिली आहे. सुभाष देसाई यांचीही प्रवक्तेपदाची कामगिरी सुमार होती. त्यामुळे पक्षाची भूमिका मांडण्यासाठी नवीन चेहऱ्यांना संधी दिली. त्यात खासदार अरविंद सावंत, अरविंद भोसले, अभिनेते अमोल कोल्हे, मनीषा कायंदे यांचा प्रवक्त्यांमध्ये नव्याने समावेश करण्यात आला आहे.
शिवसेनेला विरोधी बाकावर बसावे लागले असून अनेक ज्येष्ठांना डावलून एकनाथ शिंदे यांची वर्णी विरोधी पक्षनेतेपदावर लागली आहे. त्यामुळे शिवसेना विधिमंडळ पक्षातही खदखद सुरू आहे. त्यातच विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते आणि सध्याचे विधान परिषदेचे आमदार रामदास कदम यांच्या लुडबुडीमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ झाले आहेत.
विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केला. त्यात रामदास कदम घुसले. या दौ-यानंतर शिंदे यांनी शिवालयात पत्रकार परिषद घेतली. विरोधी पक्षनेते म्हणून एकनाथ शिंदे मुख्य आसनावर बसणे अपेक्षित होते. मात्र कदम यांनी मुख्य आसनाचा ताबा घेतला आणि पत्रकारांना माहिती द्यायला सुरुवात केली. यावेळी शिंदे यांची चुळबूळ सुरू होती.
शिंदे यांनी शुक्रवारी नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यातही कदम घुसले. पाहणीनंतर नाशिक येथे शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. पत्रकारांनी प्रश्न विचारायला सुरू करण्यापूर्वीचकदम यांनी शिंदे यांच्यासमोर विविध चॅनेल्सचे माइक आपल्यापुढे खेचून घेतले आणि माहिती सांगायला सुरुवात केली. कदम यांच्या लुडबुडीने शिंदे कमालीचे अस्वस्थ झाले असून ते याबाबत पक्षश्रेष्ठींकडे गा-हाणे मांडणार असल्याचे समजते.
आज माननीय नारायण राणे हवे होते . ते मुख्यमंत्री तर असतेच व एक सक्षम नेता व दूरदृष्टी असलेला खमक्या नेता लोकांना हवा होता . महाराष्ट्राचे दुर्दैव .