अउदिवाळी.. अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करण्याचा संदेश देणा-या या सणाची खासियत काही औरच.. दारासमोरची रांगोळी, आकाशकंदील, फराळ आणि फटाक्यांसह दिवाळीच्या चार दिवसांमध्ये उत्साह द्विगुणीत होतो. मात्र फटाक्यांच्या वापरामुळे आता प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे फटाक्यांवर बंदी आणावी का, याबाबत ‘प्रहार’ने वाचकांच्या प्रतिक्रिया मागवल्या. दिवाळी आणि फटाके हे समीकरण एकमेकांशी घट्ट असल्याने फटाक्यांशिवाय दिवाळी साजरीच होऊ शकत नाही, हे सत्य असले तरीही आता प्रदूषणाची समस्या पाहता दिवाळीत फटाक्यांचा अट्टहास नको, अशी कबुली वाचकांनी दिली. वाढत्या महागाईचे लोण सर्वत्र पसरले असले तरीही दिवाळी साजरी करण्यात कोणीही आखडता हात घेणार नाही, हेदेखील स्पष्ट केले. मात्र फटाक्यांच्या रूपाने पैसा जाळण्यापेक्षा याच पैशातून समाजोपयोगी कार्य करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
साधु-संत येति घरा, तोचि दिवाळी दसरा
केवळ दिवाळीच नव्हे तर कोणतेही भारतीय सण साजरे करण्यासाठी फटाक्यांचा आधार घ्यावा, असे धर्मशास्त्रात अधोरेखित करण्यात आलेले नाही. फटाक्यांमुळे आपल्याकडे असलेल्या संपत्तीचे केवळ ज्वलन केले जाते, असेच म्हणावे लागेल. शोभेची दारू हे काही जीवनावश्यक वस्तू नाही, त्यामुळे सर्व प्रकारच्या फटाक्यांवर संपूर्णपणे बंदी घालायला हवी. त्यामुळे मोठया आवाजाचे, छोटया आवाजाचे असा काही प्रश्न उरणार नाही. फटाक्यांवर वापरला जाणारा पैसा अन्य चांगल्या कामांकरता वापरता येणे सहज शक्य आहे. लहान मुलांच्या मनावर पालकांनी, शिक्षकांनी लहानपणापासून प्रदूषणाचे घातक परिणाम बिंबवायला हवेत. आपल्या घरकुलात माणसांचा आप्तस्वकियांचा वावर असावा, या हेतूने प्रत्येक भारतीय सण साजरा होतो. हे मूळ उद्दिष्ट अबाधित राहावे, याचा खटाटोप करण्यासाठी सर्वानी पुढाकार घ्यावा. – विवेक जुवेकर, मुलुंड
फटाक्यांवर बंदी असावी
संपूर्ण देशभरात दिवाळी हा सण मोठया धूमधडाक्यात साजरा होतो. अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल करणा-याचा संदेश देणा-या या सणाच्या नावातच प्रसन्नता आहे. पूर्वी विकासाच्या पल्ल्याआड दडलेल्या भारतात जेव्हा वीज ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती, तेव्हापासून सर्वत्र प्रकाश यावा, या हेतूखातर सर्वत्र दिवे, आकाशकंदील लावले जात. कालांतराने प्रकाश तेजोमय दिसावा म्हणून फटाके फोडण्याची प्रथा रूढ झाली. नंतर जल्लोषाच्या नावाखातर मोठमोठया आवाजात फुटणारे फटाके, सुतळी बॉम्ब यांचा धुमाकूळ सुरू झाला. रात्री-अपरात्रीही फटाके फोडल्यामुळे आवाजाचा सर्वसामान्यांना त्रास जाणवू लागला. आजचे चित्र तर त्याहूनही भयानक आहे. आजची दिवाळी ही धूमधडाका करणा-या फटाक्यांमध्ये केली जाते. त्यामुळे फटाक्यांचा मूळ उद्देश मागे सरला गेल्याचे भानच कोणाला उरले नाही. मोठे फटाके फोडल्याने मोठा आनंद मिळतो, असा दृढ समज यामागे असावा. गेल्या दोन-तीन वर्षापासून आवाजी फटाके कमी झाले असून आकाशात सप्तरंगाची उधळण करणा-या ध्वनीविरहित फटाक्यांची मागणी वाढली आहे, पण त्या फटाक्यांमुळे कानठळ्या बसत नसल्या तरी वायुप्रदूषण प्रचंड वाढत आहे. नाक, डोळे, घसा आणि फुप्फुसांना त्याचा त्रास सोसावा लागतो. नुकतीच घरगुती शोभेची दारू तयार करताना झालेली दुर्घटना किंवा या अगोदर फटाक्यांमुळे झालेल्या दुर्घटनांमुळे झालेली जीवितहानी, वित्तहानी फटाक्यांचे दुष्परिणामच ठळकपणे अधोरेखित करतात. मुळात दिवाळीचा खरा आनंद हा फटाकेमुक्त दिवाळी साजरी करूनच मिळवायला हवा. यासाठी धनिप्रदूषण, वायुप्रदूषण करणा-या फटाके उत्पादनावर बंदी घालणेच योग्य ठरेल.- दीपक गुंडये, वरळी
कर्कश्श-मोठया आवाजातील फटाक्यांवर बंदीच हवी!
दिवाळी म्हटली म्हणजे कंदील, रांगोळी, फराळ व फटाके, परंतु मोठया कर्कश्श आवाजाच्या फटाक्याने लहान, ज्येष्ठ माणसांना त्यापासून बहिरेपणा येऊ शकतो. तसेच आजारी रुग्ण, विद्यार्थी यांनाही त्याचा त्रास होतो, परंतु माणसांप्रमाणे पशु-पक्ष्यांनाही फटाक्यांच्या मोठया आवाजाचा त्रास होतो. तरी अशा मोठया फटाक्यांवर बंदी घालावी, जेणेकरून धूर व वायुप्रदूषणही होणार नाही. त्यामुळे दमा, खोकला व त्वचेलाही विकार होऊ शकतो. तरी सर्वानी प्रदूषणमुक्त दिवाळीचा आवाज होणार नाही याची दक्षता घेऊन आपला सण साजरा करा. सर्वाना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्या – सुभाष वाघवणकर, जोगेश्वरी
फटाकेबंदी नको
दीपावली हा प्रकाशाचा सण आहे. देव हा जीवनाचा प्रकाश आहे. जो त्याला अनुसरतो म्हणजे सत्याने वागतो, नीतीने चालतो तो अंधारात चालणार नाही, त्याच्या जवळ जीवनाचा प्रकाश राहील. दीपावली सत्याचा, विजयाचा सण आहे. अशा मंगल, पवित्र सणाच्या दिवशी फटाकेबंदी करू नये, असे माझे मत आहे. बंदी केल्यास चोरटया मार्गाने, अनीतीने फटाके शिरण्याचा संभव असतो. फटाक्यांच्या आतषबाजीने सर्वाना आनंद होतो. फटाके आनंद द्विगुणीत करण्याचे धार्मिक प्रतीक आहे. ८० डेसिबलपेक्षा कमी आवाजाचे फटाके वापरल्यास त्रास होण्याचा संभव कमी असतो व वायुप्रदूषण व ध्वनिप्रदूषण कमी प्रमाणात होऊ शकते. जनतेला योग्य मार्ग दाखवून प्रबोधन करावे. बंदी मात्र करू नये..! – एस. बी. पोकलेकर, नागपाडा
फटाकेमुक्त दिवाळी अशक्य!
दिवसेंदिवस दिवाळीचे स्वरूप बदलत चालले आहे. सर्वत्र दिवाळी म्हणजेच फटाके असे चित्र दिसते. दिवाळीला घरात गोड पदार्थ, लाडू, करंज्या असणे आवश्यक असते, तसेच संध्याकाळी फटाके फुटल्याशिवाय त्या फराळाला चव येत नाही. मात्र पूर्वी आनंद द्विगुणीत करण्यासाठी फटाक्यांची आतषबाजी होत होती व त्यातही अनार, जमीनचक्र, लवंगी फटाके, फुलझडी व एखाद दुसरा छोटा बॉम्ब, बस्स एवढेच वाजवले जात होते. हा आनंदाचा कार्यक्रम संध्याकाळी मोठया धूमधडाक्यात साजरा व्हायचा. मोठेपणाचा त्यात लवलेशही नसायचा. मात्र आता फटाक्यांच्या आतषबाजीत खूपच वाढ झालेली आहे. फटाक्यांमध्येही नवनवीन प्रकारचे फटाके आले आहेत. पूर्वी लवंगी फटाक्यांची छोटी माळ असायची, आता लवंगीच्या दुपटी-तिपटीने वाढ होऊन माळपण खूप लांबलचक झालेली आहे. साधारणपणे २० ते २५ मिनिटे वाजतच राहते. त्याच्या आवाजानेच आसपासच्या परिसरातील लोकांच्या कानठळ्या बसतात. आज आपण फटाक्यांसाठी भरमसाठ पैसा खर्च करत असतो. पैशाची राखरांगोळी होत असते. फटाके म्हणजे क्षणिक समाधान व मोठेपणाचे लक्षण, तुमच्या सांपत्तीक संस्कृतीचे दर्शन, त्यांचे प्रदर्शनच फटाक्यांच्या माध्यमातून जनतेसमोर येत असते. फटाके फोडून पैशाची नासाडी करण्यापेक्षा त्याच पैशातून दीनदुबळ्यांना मदत करण्यासाठी तसेच भुकेलेल्यांना अन्नाच घास भरवण्यासाठी उपयोग झाला तर त्यांच्या आनंदाला पारावार राहणार नाही व त्यांना खरा दिवाळीचा आनंद भोगता येईल, तो तुमच्यामुळे आणि ते आनंदित झाल्यावर आपल्याला केवढे तरी मानसिक समाधान मिळेल. त्याच फटाक्यांच्या पैशातून हिताची कामे करून घरात आनंदाची दिवाळी साजरी करावी! – लक्ष्मण टिकार, मालाड
बंदीमुळे चिरीमिरीला मिळते संधी
आपल्या प्रत्येक सणात उत्साह ओसंडून वाहत असतो. परिस्थिती नसताना गरिबातला गरीब भले ऋण काढणार, पण हा सण साजरा करणार. मात्र असे असले तरी अंथरूण पाहून पाय पसरणे हिताचे होईल. आवश्यक तेवढा खर्च करून अनावश्यक खर्च टाळता येणार नाही का? केवळ फटाके फोडून दिवाळी साजरी करण्यापेक्षा रंगरंगोटी, फराळवाटप, मुलांना नवीन कपडे करण्यासाठी खर्च करा. आपल्या सणाची इतरांना गोडी लागेल हे लक्षात ठेवा. संस्कृती जपताना त्याला विकृती डसणार नाही याचेही भान ठेवा. फटाकेबंदी, दारूबंदी, गुटखाबंदीतून काही साध्य होणार नाही. उलट बंदीमुळे ‘चिरीमिरी’ला संधी मिळते. त्यापेक्षा आपणच अतिउत्साहीपणाला आवर घालून वागायला हवे. – आनंदराव खराडे, विक्रोळी
फटाक्यांवर बंदी आणू नये
सणासुदीच्या दिवसात महागाईच्या नावाने बोटे मोडली जातात. तरीही सामान्यजन सण-उत्सव साजरे करतात. महागाईचा परिणाम दिवाळीवर होईल असे वाटत नाही. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतलेल्या चाचणीत अनेक कंपन्यांचे फटाके आवाज प्रदूषण करणारे आहेत, असा निर्वाळा दिला आहे. ‘आवाजा’वर फटाक्यांची किंमत ठरवावी, पण फटाक्यांवर बंदी आणू नये. फटाक्यांमुळेच सणांचा आनंद द्विगुणीत होतो. ग्रामीण भागात शुभकार्य असले तर बंदुकीचे बार उडवले जात. यामागे वातावरणनिर्मिती हा हेतू असे. मुंबई शहरात बंदुकीचे बार उडवण्याएवढी जागाच शिल्लक नाही. सध्या एका फुटावर ४०० माणसे सामावलेली आहेत, हिंदूंचे सर्वच सण पर्यावरण, निसर्गाशी नाते असलेले आहेत. म्हणून पर्यावरणाच्या नावाखाली सणांवर गंडांतर आणू नका. आमचे सण आम्हाला मनसोक्त साजरे करू द्यावेत. दिवाळीत वाजणा-या फटाक्यांवर बंदी आणू नका.- महादेव गोळवसकर, घाटकोपर
मोठया फटाक्यांवर बंदी आणावी
सणसूद असो वा अन्य कोणता उत्साहाचा कार्यक्रम, वाद्ये वाजवून, फटाके फोडून आपल्या आनंदात इतरांना सहभागी करून घेण्याची रीत आपल्याकडे पूर्वीपासून आहे. सण साजरा करताना उत्सवाचा अतिरेक होतोय, याचे भान येण्याचे शहाणपण माणसाला नक्कीच आहे. पण यामुळे वाढणा-या दुष्परिणामांवर उपाय शोधून ते अंमलात आणण्याची तसदी माणूस नावाच्या प्राण्याकडून घेतली जात नाही. मुंबईतील घनदाट, गर्दीच्या वस्त्या, त्यात वृद्ध, आजारी (रुग्ण) माणसे, बालके, स्त्रिया, तिन्ही पाळीत काम करणारे कामगार या सर्वाचा विचार न करता प्रचंड आवाजाचे फटाके लावले जातात. दिवाळीच्या धुमाळीत बिघडणारे आरोग्य, फटाक्यांच्या आवाजाने वाढणारा मानसिक ताण याकडे सर्रास दुर्लक्ष होते. असे फटाके फोडण्याऐवजी आकाशात उंच जाऊन फुटणारे व नाना रंगांची उधळण करून मनाला आनंद देणारे फटाके फोडावेत. फटाके फोडण्याचा आनंद उपभोगायचा असेल तर मोठया फटाक्यांपेक्षा ध्वनिविरहित, कमी धूर असणा-यांना प्राधान्य असावे. किंबहुना हेच फटाके फोडावेत, असा सल्ला द्यावासा वाटतो. मात्र फटाक्यांवर खर्च करून पैशाचा अपव्यय करण्यापेक्षा त्या पैशातून समाजोपयोगी कार्य करणे चांगले.- मनमोहन रोगे, ठाणे
नकोत हे फटाके
फटाके वाजवल्याशिवाय दिवाळी साजरी केल्यासारखे वाटत नाही, त्यामुळे फटाक्यांची विक्री जोरात होते. किंबहुना फटाक्यांशिवाय दिवाळी हे समीकरण पचवणे समाजाला कठीण होऊन बसले आहे. फटाक्यांमुळे होणा-या प्रदूषणावर याआधीही कित्येक पर्यावरणप्रेमी संस्थांनी टाहो फोडून त्याचे दूष्परिणाम समोर आणले आहेत. पण सर्व प्रयत्न निर्थक. फटाक्यांमुळे होणा-या अपघातांकडे कानाडोळा करत फटाके फोडण्याचा आनंद लुटला जातो. फटाक्यावर नियंत्रण आणणे कठीण बाब असून धार्मिक सणामध्ये ढवळाढवळ किंवा हस्तक्षेप, असा शासनावर आरोप होण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु नागरिकांमध्ये फटाक्यांमुळे होणा-या वाईट परिणामांबाबत जागृती करणे नितांत गरजेचे आहे. यासाठी सर्वाना विश्वासात घेऊन फटाक्यांविरोधात कायदा झाला पाहिजे. तसेच शालेय स्तरापासून प्रदूषणाबाबत जागृती करण्यास पुढाकार घेतला पाहिजे. हा उपक्रम कित्येक शाळांमध्ये समाजसेवी संस्थांमार्फत सुरू आहे, अशा सामाजिक संस्थांना सरकारने प्रोत्साहन द्यावे.– हरीश बडेकर, मुंबई
फटाक्यांचा वापर टाळावा
भारतात सण आणि उत्सवाची परंपरा प्राचीन काळापासून अबाधित आहे. येथे प्रत्येक सणाचे एक आगळेवेगळे महत्त्व आहे. सणांचा राजा असलेल्या दिवाळी सणात तर उत्साहाला उधाण येते. दिवाळी सण हा वर्षातून एकदाच येतो. चार दिवसांचा पाहुणा असलेला हा सण जल्लोषात साजरा करण्यासाठी फटाक्यांची आतषबाजी हवीच. फटाके फोडून आम्ही आनंद साजरा करावयाचा नाही, मग कसा करायचा, असा एक सूर असतो. त्यामुळे फटाक्यांमुळे होणा-या दुष्परिणामांकडे डोळेझाक केली जाते. हे फटाके अनेकांना आंधळे-बहिरे करून तर कोणाचा जीव घेऊन दिवाळी चिरस्मरणी करतात. शारीरिक इजांच्या जोडीलाच हवासुद्धा प्रदूषित होणे ही चिंता दिवसेंदिवस वाढतच आहे. हे धोके टाळायचे असतील तर सरकारी फतव्यांची वाट कशाला बघायची? पर्यावरणतज्ज्ञ, सामाजिक संस्था, प्रसारमाध्यमे सतत प्रबोधन करतच असतात. त्यांच्यामध्ये सामान्य नागरिक या नात्याने आपणही सहभागी होऊया आणि क्षणिक आनंदापेक्षा जीवनभर पुरणा-या आनंदाचा अनुभव घेऊया. ज्या तन्मयतेने संस्कृतीरक्षणाची भाषा आज होत आहे, तीच तन्मयता आणि धडपड पर्यावरणाच्या बचावासाठी होणे गरजेचे आहे.- नारायण तळकटकर, कळवा.
‘ई मेल’द्वारा आलेली पत्रे..
पर्यावरणाला बाधा नको
दिवाळी सण म्हटला की, फटाके आलेच. त्यांच्याशिवाय दिवाळी साजरी करणे, ही कल्पनाच मनाला न पटणारी आहे. पण वाढत्या प्रदूषणाचा विचार केला असता दिवाळी फटाक्यांशिवाय साजरी करण्याशिवाय पर्याय नाही. सणाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आवाजविरहित फटाके वाजवून पर्यावरणपूरक सण साजरे करणे ही काळाची गरज आहे. फटाक्यांमुळे नेमका कोणता आनंद मिळतो हे ब-याच जणांना शब्दात सांगता येत नाही. ज्या फटाक्यांच्या आवाजाने आपण आनंद उपभोगतो, क्षणभराच्या उजेडाने हुरळून जातो तोच क्षणभराचा आवाज व प्रकाश अनेकांचे आयुष्य उजाड करू शकतो, याचे भान असावे. फटाक्यांमुळे हवेत कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, कार्बन-मोनॉक्साइड, फॉस्फरस यांसारखे विषारी वायू पसरल्याने हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. परिणामी, श्वसन, घसा, फुप्फुस व दमा यांचे विकार वाढतात. कर्णकर्कश्श आवाजामुळे लहान बालकांच्या कानांचे पडदे फाटून बहिरेपणा, तर डोळयांवर फटाका उडाल्यास डोळय़ांना इजा पोहोचून अंधपणा येण्याची शक्यता असते. वृद्ध व आजारी रुग्णांनाही याचा त्रास सहन करावा लागत असून विषारी धुरामुळे मोकळा श्वास घेणे मुश्कील होत आहे. पक्षी आवाजाने घरटयातून उडून जातील, फुलबाजांच्या तापलेल्या तारांवर पाय पडून छोटया मुलांना इजा होण्याची शक्यता असते. रॉकेटसारखा फटाका आगीस निमंत्रण देण्याची शक्यता असल्याने वित्तहानी व जीवितहानी टाळण्यासाठी फटाक्यांचे दुष्परिणाम पाहता ते फोडणे धोकादायकच आहे. वास्तविक आनंद देण्याने वाढतो, वाढल्याने तो पसरतो. म्हणूनच शहरातील वाढती गर्दी व वस्त्या पाहता, आता पर्यावरणाला बाधा न आणता त्याचे रक्षण करत, शांततामय दिवाळी साजरी करणे ही काळाची गरज आहे. मोठा आवाज करणारे फटाके वाजवण्याची मानसिकता बदलली पाहिजे.- पांडुरंग भाबल, भाडुंप
पर्यावरणाचा -हास रोखा
दीपावलीचे पावित्र्य, महत्त्व, धार्मिक परंपरा लक्षात घेता पर्यावरणाची गंभीर समस्या निर्माण करणा-या घटना, बाबी, कृती टाळल्या पाहिजेत. आवाज करणा-या फटाक्यांमुळे प्रदूषणाबरोबर विविध विकारांनी जर्जर असणा-या रुग्णांना त्रास तर होतोच, पण त्याचबरोबर फटाके लावताना निष्काळजीपणामुळे अनेकांना जीवनाला मुकावे लागते. फटाके लावणा-यांना स्थळ, काळ, वेळेचेही भान नसते. रात्री एक-दोन वाजताही फटाके वाजवले जातात. त्यामुळे सर्वाना ध्वनिप्रदूषणापासून मोकळा श्वास घेऊ देणे हे सुजाण नागरिकांचे कर्तव्य आहे. कोणत्याही सणाचा आनंद द्विगुणित होण्यासाठी फटाक्यांच्या दिखाऊ आतषबाजीची गरज नसते. आवाज करणा-या फटाक्यांच्या दूरगामी परिणामांची पर्वाच केली जात नाही. दीपावलीच्या निमित्ताने आम्ही आकर्षक जाहिरातींना भुलून सेलमधील डिफेक्टिव्ह माल विकत घेत असतो. दीपावलीचे स्वागत आपण दीपोत्सवांनी, मंगल गाण्यांनी, रांगोळया काढून, सेवाभावी संस्थांना आर्थिक मदत करून करू शकतो. फटाके बंदीने काहीच साध्य होणार नसून फटाके फोडणा-यांची मानसिकता बदलण्याकरता प्रदूषणाचे दुष्परिणाम, पर्यावरणरक्षणाचा प्रचार-प्रसार, लघुपट, पथनाटय़े, परिसंवाद, चर्चासत्र याद्वारे शालेय जीवनापासून जनजागृतीने मतपरिवर्तन केले पाहिजे. वाढत्या महागाईचे खापर सरकारवर फोडणा-या समाजातील काही मध्यमवर्ग प्रत्यक्षात वारेमाप चैन करत असतो. दिवाळीला प्रत्येक कुटुंबाने आपल्या आर्थिक क्षमतेनुसार खर्चाच्या लक्ष्मणरेषेचे पालन करावे.- कमलाकर गुर्जर, कळवा.
संपत्तीचे प्रदर्शन टाळा
आधुनिक काळात पारंपरिक दीपोत्सवाचे स्वरूप बदलत जाऊन दिखाऊ फटाकेबाजीला महत्त्व प्राप्त झाले आहे. फटाक्यांमुळे ध्वनी, वायुप्रदूषणासह कायमचे बहिरेपण, हृदयाची धडधड यांसारखे आजारही बळावतात. सणाचा आनंद द्विगुणित होण्याऐवजी रंगाचा भंग वा बेरंग होतो. त्यामुळे आवाज करणा-या फटाक्यांवर कायमची बंदी आणणेच श्रेयस्कर आहे. संपत्तीचे प्रदर्शन करणा-यांकडून फटाक्यांची आतषबाजी केली जाते. काही क्षणाच्या विरंगुळयासाठी पैशाच्या राशी खर्च केल्या जातात, पण त्याच वेळी भारतातील पन्नास टक्के जनता दारिद्रयात कशी जगते याचा विचार फटाके बहाद्दरांकडून केला जात नाही. दिवाळीला पर्यावरणपूरक बनवण्याची सुरुवात स्वत:पासून करायला हवी. याकरता फटाक्यांऐवजी गरजूंना फराळ, रांगोळीत नैसर्गिक रंग, स्वदेशी आकाशकंदील, भेटकार्डाऐवजी केवळ शुभेच्छा, विजेच्या बचतीकरता मर्यादित सजावट, गरिबांना वस्त्रदान, सौंदर्य, स्वच्छता आणि भरपूर ग्रंथवाचन अशा प्रकारे दिवाळी साजरी करावी. यातून इतरांना पर्यावरणस्नेही दीपावली साजरी करण्यासाठी प्रेरणा द्यावी.- प्राची गुर्जर, कळवा.
प्रदूषणपूरक दिवाळी नको
भारतीय सण म्हणजे निसर्गाची पूजा असते, असा गौरव होत असतानाच, अलीकडच्या काळात या भारतीय सणांनी प्रदूषण वाढवण्यात मोठा हातभार लावला, हे कटू सत्य आहे. पर्यावरणाची काळजी फक्त दुस-याने घ्यावी, सल्ला फक्त दुस-याला द्यावा आणि दुस-यानेच मानावा, हा प्रकार चालला तर आणखी काही वर्षानी तोंडाला मास्क लावून दिवाळी साजरी करण्याची वेळ येईल. फटाक्यांपासून निर्माण होणा-या प्रचंड ध्वनिप्रदूषणामुळे डोकेदुखी, बहिरेपणा आणि मानसिक अशांतता या व्याधी उद्भवतात. फटाक्यांतील धातू आणि रासायनिक संयोगापासून निर्माण होणा-या जनावरांना आणि पक्ष्यांना होतो. नवजात शिशू, वृद्ध, रुग्ण, अभ्यासू विद्यार्थी यांना फटाक्यांचा फटका बसतोच. शिवाय हवेचे व ध्वनिप्रदूषण होते, अपघात होतात. फटाके जाळणे म्हणजे पैशाचा धूर करणेच आहे. त्यापासून मिळणा-या आनंदापेक्षा त्रासच जास्त आहे. अशी पैशाची राख, धूर आणि प्रदूषण करण्यापेक्षा तेच पैसे जर गरजू व्यक्तीला उदाहरणार्थ शस्त्रक्रियेसाठी, अनाथाश्रम, वृद्धाश्रम किंवा गरीब लोकांना दिल्यास त्यांच्या अनेक मूलभूत गरजा ते भागवू शकतील आणि पर्यावरणही नैसर्गिक राहील.- संतोष जाधव, जोगेश्वरी
‘बंदी’बरोबर दंडही असावा!
केवळ दिवाळीतच नाही, ज्या-ज्या वेळी फटाके फोडले जातात, तेव्हा पैसा शब्दश: जाळला जातो. पैशाला ‘लक्ष्मी’ मानणा-या आपल्या संस्कृतीत, असा पैसा जाळण्यावर कोणतीही बंदी किंवा निर्बंध नाहीत. फटाके फोडून नक्की काय मिळते, हे उत्तर देण्या-यांनी फटाक्यांमुळे होणारे दुष्परिणाम पाहता कोणते समाधान मिळते, हे उत्तर देण्याचे धाडस करावे. फटाक्यांमुळे मिळणारा आनंद कोणत्या प्रकारात मोजायचा.. विकृती की खुनाशी.. आपले सण कसे विज्ञानप्रेरक आहेत, हे सांगितले जाते. मग अशा वेळी अशा अनधिकृत गोष्टी आपण त्यात का घुसडतो? महागाई-गरिबी यांची बोंबाबोंब असताना, ना कोणत्या फटाक्यांच्या दुकानातील गर्दी कमी होते.. की नाही दिवाळीतील फटाके फोडणे कमी होते? यातसुद्धा काही जण.. आमच्या सणाच्या वेळेस असे सर्वाना सुचते, असा ‘भावनाप्रधान’ मुद्दा उपस्थित करतील. या सर्वाना सरकारने, महानगरपालिकेने कायद्याचा बडगा दाखवायला हवा.. सर्व काही कळत असताना, प्रदूषणाबाबत जनजागृती न करता, बेफिकिरी दाखवणे म्हणजे मुर्खपणाचा कळस आहे. परंपरेच्या मोठया बाता मारायच्या पण वागण्यात मात्र ‘अडाणीपणा’ दाखवायचा ही आपली पूर्वापार परंपरा आहे. खरे तर सर्वानी थोडासा विचार करून फटाके बंदी करायला हवी.. पण कोणी तसे वागत नसेल तर सरकारने, कोणत्याही जाती-धर्माचा बाऊ, न करता कायद्याचा बडगा दाखवायलाच हवा..! – संदेश बालगुडे, घाटकोपर
प्रदूषणविरहित फटाक्यांना प्राधान्य
फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करणे अशक्य असल्याची प्रांजळ कबुली वाचकांनी दिली. पर्यावरणाचा विचार करता फटाक्यांवरील बंदी हा नाममात्र उपाय नसल्याचेही त्यांनी सांगितले. सण असो वा उत्सव, फटाक्यांशिवाय सोहळ्याला रंग येणार नाही त्यामुळे फटाक्यांवर बंदी नसावी, असाही वाचकांचा वर्ग आढळला. मात्र वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मोठमोठे फटाके फोडण्याऐवजी साधे फटाके फोडून दिवाळी साजरी करावी, असा सल्ला त्यांनी दिला. दिवाळी ही फटाक्यांनीच साजरी करावी, मात्र फटाके निवडताना प्रदूषणविरहित फटाक्यांना प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी अधोरेखित केले.
बंदीपेक्षा जनजागृती महत्त्वाची
पूर्वी वीज नसल्याने प्रकाशासाठी पणत्या लावणे, फटाके वाजवणे इ. उपाय केले जात. आता विजेचा शोध लागल्यानंतरही बालकांना फटाके वाजवण्यास प्रवृत्त केले जाते. परिणामी खोकला, दमा, कानाचे पडदे फाटणे, रक्तदाब वाढणे यासारख्या रोगांना आमंत्रण मिळते. त्यामुळे फटाक्यांवर बंदी आणण्याचा विचार सरकारकडून होत असेल तर या निर्णयाचे स्वागतच आहे. मात्र फटाक्यांवर बंदी आणली तरीही चोरून फटाके वाजवले जातील. हे टाळण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन सण साजरे करताना प्रदूषण वाढवणा-या गोष्टींची यादी करून सर्व शिक्षण संस्था व प्रसारमाध्यमांतर्फे समाजप्रबोधन करावे. – डॉ. कृष्णकांत नाबर, माहीम.
समाजप्रबोधन होणे गरजेचे
दिवाळी म्हणजे आनंदाची उधळण. माणसांना एकत्र बांधणा-या या सणात पैशाची आतषबाजी व्हावी, यासाठी श्रीमंतांकडून दिवाळी आणि फटाके हे समीकरण चांगलेच रूढ झाले. अमाप पैसा लाभलेल्या श्रीमंतांनी दिवाळी अधिकाधिक लोकांच्या डोळय़ात भरेल, अशा प्रकारे साजरी करण्याची स्पर्धा आरंभली आणि फटाक्यांना आवाज वाढू लागला. मात्र प्राणप्रतिष्ठेची दिवाळी असलेल्यांनी दिवाळीत पैशाचा उन्माद सोडला नाही आणि फटाक्यांची ठिणगी पडू लागली. हळूहळू हे लोण मध्यमवर्गीयांमध्ये पसरू लागले. आजचे चित्र पाहता आता फटाक्यांशिवाय दिवाळी अशक्यप्राय होऊन बसली आहे. दिवाळी सणादरम्यान होणा-या ध्वनी आणि वायुप्रदूषणामुळे समाजाला कसे वाचवायचे, हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. फटाक्यांच्या ध्वनिप्रदूषणामुळे डोकेदुखी, रक्तदाब, हृदयविकार यासारखे विकार वाढतात. पुष्कळ प्रमाणात कचरा, धूळ, धूर या अनिष्टकारक गोष्टी निर्माण होतात. या फटाक्यांमुळे जुन्या इमारतींना तडा जाण्याची शक्यता असते. अनेकदा फटाक्यामुळे माणसांचे कान बधिर होतात. त्यामुळे कायमचा बहिरेपणा येण्याची भीती असते. गर्भवती महिला, वृद्ध, आजारी माणसे, लहान मुले यांना फटाक्यांच्या ध्वनिप्रदूषणामुळे खूप त्रास होतो. तरीही फटाक्यांचा नाद काही सुटत नाही. खरे तर फटाके वाजवण्यावर बंदी घालण्यापेक्षा फटाके बनवणा-या कारखान्यांवर बंदी घालायला हवी. अमेरिकेमध्ये ध्वनिविरहित फटाके उडवण्यास अनुमती आहे. याच धर्तीवर भारतातही असे दंड विधान अंमलात आणल्यास निदान ध्वनिप्रदूषणातून नाममात्र सुटका होईल. – राजा मयेकर, लोअर परळ.
पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी
तेजोमय प्रकाशाचा संदेश देणारा दिवाळी हा सण हा सणांचा राजा. मात्र गेल्या काही वर्षात दिवाळी सणाच्या निमित्ताने होणा-या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दिवाळीदरम्यान ध्वनिप्रदूषण होतेच, शिवाय वातावरणही प्रदूषित होते. मात्र सण साजरा करण्यास प्राधान्य असल्याने इतर बाबी या निर्थक आणि अर्थहीन ठरतात. फटाक्यांचा शोध हा चीनमध्ये इसवीसनापूर्वी लागलेला. या फटाक्यांचा प्रसार इतक्या झपाटय़ाने इतर देशांमध्ये झाला की उत्सव साजरा करण्यासाठी फटाके हवेच, असे समीकरण बनले. अर्थात, भारतातही फटाके प्रत्येक गल्लोगल्लीत फोडले जाऊ लागले. दिवाळी हा सणांचा राजा असल्याने फटाक्यांसह दिवाळी साजरी होणे ही जणू एक प्रथा म्हणूनच रुजली. आज या प्रथेची पाळेमुळे इतकी खोलवर रुजली आहेत की, फटाक्यांशिवाय दिवाळी पाहणे म्हणजे काही चुकचुकल्यासारखे होईल. त्यामुळे फटाक्यांवर बंदी आणण्यासाठी आता कडक नियमांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. दिवाळीला पर्यावरणपूरक बनवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने फटाकेबंदी करावी. प्रसंगी दंडउभारणी करून फटाक्यांच्या वापरावर निर्बंध आणावेत, पण त्याचसोबत इतर सामाजिक संस्थांनीदेखील जनजागृतीची मोहीम राबवावी. फटाक्यांमुळे लाखो रुपयांचा चुराडा होतोय, त्यामुळे दिवाळीच नव्हे तर कोणत्याही सण अथवा सभारंभादरम्यान फटाक्यांच्या आतषबाजीवर निर्बंध आणणे बंधनकारक करावे. – नारायण पन्हाळेकर, काळाचौकी
फटाकेविरहित दिवाळी हे सुजाणतेचे लक्षण
भारतीय संस्कृती ही निसर्गाला पूजणारी आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून केवळ निसर्गाला हानी पोहोचवण्यात भारतीय सणांचा हातभार लागत आहे. फटाक्यांच्या हव्यासात साज-या होणा-या दिवाळी सणाला प्रदूषणामुळे गालबोट लागत आहे. त्यामुळे दरवर्षी दिवाळीचा सण दारावर येऊन ठेपला की, फटाक्यांमुळे होणा-या प्रदूषणाबाबतची कानउघाडणी करण्यात सामाजिक संस्था, प्रसारमाध्यमे गर्क होतात. यंदा दिवाळी सणाला महागाईचे ग्रहण लागले आहे. तरीही कुठलीही कमतरता न ठेवता दिवाळी सण साजरा करण्यास सर्वाचे प्राधान्य राहील. उत्सवाला गालबोट लागू नये म्हणून फटाक्यांची उधळपट्टी करणारा गट आपल्याकडे मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करणे म्हणजे मनावर ओझे बाळगत दिवाळी साजरे करण्यासारखे होईल. फटाक्यांच्या धुरामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांना, गरोदर महिला, विद्यार्थी, वृद्ध व प्राण्यांना आणि? पक्षांना एवढेच नव्हे तर ज्येष्ठ नागरिक, रुग्ण त्यातही प्रामुख्याने दमेकरी रुग्ण यांना प्रचंड त्रास होतो, हे पुन्हापुन्हा सांगण्यात काही अर्थ नाही. यापेक्षा पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी पुढाकार घेणे म्हणजे सुजाण व सुसंस्कृत नागरिकांचे लक्षण आहे. – प्रविण पाटील, परळ
निसर्ग जगला तरच मानव जगेल
लक्ष लक्ष दिव्यांनी आसमंत उजळून अंध:कार दूर करणा-या दीपोत्सवाचा मनोहारी सोहळा सुरू झाला आहे. अविवेकरूपी अंधाराला नाहीसे करून विवेकाचा प्रकाश पसरवण्याची ही एक पर्वणी असते. अविवेकावर मात करण्यासाठी विवेक हवा, ज्ञान हवे. त्याच ज्ञानाचा, विवेकाचा विचार करून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी व्हायला हवी. फटाक्यांना धर्मशास्त्रानुसार कोणताही आधार नाही. परकीयांच्या अंधानुकरणातून आपण फटाक्यांचा अट्टहास बाळगतोय. दिवाळीच्या आनंदोत्सवाला प्रदूषणकारी फटाक्यांमुळे गालबोट लागत आहे. त्यामुळे सर्वच सण आणि उत्सवांमध्ये फटाके फोडण्यावर कायमची बंदी घालून सणांचा विशेषत: दिवाळीचा आनंद लुटण्यास हातभार लागावा. फटाक्यांमुळे सणाचा आनंद द्विगुणित होतो हे थोतांड आहे. फटाक्यांवर बंदी घालतानाच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि सामाजिक संघटनांनी लोकांचे समुपदेशन करावे. प्रदूषणामुळे माणसाला आरोग्याच्या विविध समस्यांनी ग्रासले असल्याचे जनतेने लक्षात घ्यावे. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पर्यावरणपूरक सण साजरे करणे महत्त्वाचे आहे. कारण निसर्ग जगला तरच मानव जगेल व दीर्घायुषी होईल व जीवनाचा आनंद द्विगुणीत होईल, हे लक्षात घ्यायला हवे. – दिलीप अक्षेकर, माहीम
कोकणातील दिवाळी साजरी करा
पूर्वी दिवाळी फक्त गूळ खोब-यामध्ये भिजवलेले पोहे एवढाच आमचा दिवाळीचा फराळ असायचा. कडाक्याच्या थंडीत नरक चतुर्दशीदिवशी भल्या पहाटे अभ्यंगस्नान करणे, गोविंदा गोविंदा म्हणत तुळशी वंृदावनाच्या पुढे कारीटे फोडत नरकासुराचा वध करणे आणि पुन्हा पूर्ण स्नान करून शूचिर्भूत होण्यात काही वेगळाच आनंद असायचा. अल्पमोती पण बहुगुणी असा सात्त्विक वृक्षाच्या सालीचा रस पिणे, ही आमची दिवाळी असायची. आजही कोकणात याच पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. म्हणूनच कोकणी माणूस निसर्गाशी समतोल राखण्यास यशस्वी झाला आहे. मात्र शहरातील दिवाळी ही शहरीकरणात रुजलेली दिवाळी आढळते. गडबड, गोंधळ, गोंगाट केला की दिवाळी साजरी होते, असा समज इथे रूढ आहे. त्यामुळे दिवाळी येण्याअगोदरपासूनच रात्री-अपरात्री फटाके फोडून इतरांना मन:स्ताप देणे, दिवाळी सणादरम्यान महिलावर्गाने मेहनतीने काढलेल्या रांगोळीवर पाय देणे, असे किळसवाणे प्रकार पाहिलेत की हीच आपली दिवाळी साजरी करण्याची पद्धत का, असा प्रश्न पडतो. फटाक्यांमुळे आज हवेच्या प्रदूषणात कमालीची वाढ होत आहे. दिवाळीदरम्यान माणसालाच नव्हे तर प्राणी-पक्षीही जखमी होतात. मात्र त्याकडे सर्रास दुर्लक्ष होऊन दिवाळी सणाचा आनंद लुटला जातो. निसर्गाला आव्हान देणा-या या फटाक्यांची दिवाळी सणात आवश्यकता आहे, असे नाही. मुळात ही प्रथा परप्रांतीयांकडून भारतात आली. अंधाराकडून प्रकाशाची वाटचाल करण्याचा संदेश देणा-या दिवाळी सणात फटाक्यांची आवश्यकता नाही, हे प्रत्येकाने समजून घेणे आवश्यक आहे. पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करायची असेल तर आपण सर्वानी कोकणातील ‘गूळ-खोब-याचे पोहे’ हा फराळ करून, ‘ध्वनि व वायुप्रदूषणमुक्त’ दिवाळी साजरी करावी, ही विनंती. – रामचंद्र मेस्त्री, घाटलेगाव
मोठय़ा आवाजातील फटाक्यांवर बंदी आणावी
दिवाळी हा सण वर्षातून एकदा लक्ष्मीच्या रूपात सुख-समृद्धी घेऊन प्रत्येकाच्या घरात येतो. त्यामुळे सरकारने कितीही महागाईचे सावट वाढवले तरी आनंद साजरा करण्यासाठी नागरिक आपल्या परीने हा सण मोठय़ा उत्साहाने व दिमाखाने साजरा करत असतात. दिवाळीला पूरक बनवण्यासाठी कंदील, तोरण, रांगोळी, विजेची रोषणाई करून घर सुशोभित दिसेल अशी सजावट केली पाहिजे. फटाके उडवण्याचा आनंद घ्यायचा असेल तर कमी आवाजाचे व घराला प्रकाशमय करतील असेच फटाके लावावेत. फटाक्यांमुळे डोकेदुखी, दमा आणि हृदयविकारासारखे आजार जास्त प्रमाणात होतात. या फटाक्यांचा त्रास निसर्गातील प्राणिमात्रांवरसुद्धा मोठय़ा प्रमाणात होत असतो. पर्यावरण वाचवण्यासाठी आपण मोलाचे सहकार्य केले पाहिजे, जेणेकरून आपणास ही दिवाळी मोठय़ा सुखा-समाधानाने व आनंदात साजरी करणे सहज शक्य होईल. – विक्रम म्हात्रे, चेंबूर
फटाक्यांचा रातांधळेपणा
आनंदोत्सवाची उधाण असलेल्या दिवाळी सणात केवळ जल्लोषाला महत्त्व असते. महागाईचा पारा चढला तरी त्याचा यक्तिंचितही परिणाम दिवाळीवर होईल, असे चित्र सध्या तरी दिसत नाही. फराळ, अभ्यंगस्नान, रांगोळी, दिव्यांची आरास, फटाके या दिवाळी सणाचा अविभाज्य भाग आहेत. फटाक्यांना डावलून दिवाळी साजरी करणे म्हणजे दिवाळी या सणावरच विरजण पाडण्यासारखे आहे. प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. ध्वनी व वायुप्रदूषणाला आमंत्रण देणा-या फटाक्यांचा नायनाट करणे, हे अत्यंत निकडीचे आहे. जमिनीवर फुटणा-या फटाक्यांपासून माणसाला त्रास होतो तर आकाशात फुटणा-या फटाक्यांपासून पक्ष्यांना आपला जीव गमवावा लागतो. फटाक्याच्या आवाजामुळे व धुरामुळे मानवाबरोबर पशु-पक्ष्यांना व निसर्गालाही नुकसान सहन करावे लागते. प्रत्येक व्यक्तीने मनावर घेतले तर आवाज व प्रदूषणरहित दिवाळी साजरी करता येऊ शकते. – मयूर ढोलम, जोगेश्वरी
फटाक्यांचा अतिरेक.. प्रदूषणाचा उद्रेक!
सण-उत्सव तसेच राजकीय नेते मंडळीचा वाढदिवस इत्यादींचे निमित्त साधून गेल्या काही वर्षात फटाक्यांच्या आतषबाजीचा अतिरेक होत आहे. लहान मुलांचा सणासुदीचा उत्साह समजू शकतो, परंतु जेव्हा तरुण जवानीच्या नशेत बेभान होऊन बेधडकपणे राजरोस काणठळ्या बसवणा-या प्रचंड आवाजाचे फटाके फोडतात तेव्हा मात्र समस्त जनता बेजार होते. पंरतु यांना रोखण्याचे धाडस विभागातील ना रहिवासी करतात ना कुठल्या ‘हेल्पलाइन’ची मदत होते. रात्री दहानंतरही प्रत्येक गल्लीबोळ्यात फटाक्यांचा अतिरेक चालू असतो. हा तमाशा पहाटेपर्यंत सुरू राहतो. अशा बेधुंद, बेछूट, बेदरकार, बेजबाबदार टोळभैरवांना कायदेशीर आळा घालणे काळाची गरज आहे. अशांना ‘स्पॉट अटक’ होऊन कठोर शासन अत्यावश्यक ठरते. अशा प्रचंड आवाजाच्या व शो-बाजीच्या प्रचंड धूर ओकणा-या फटाक्यांवर रोख लावण्यासाठी फटाके लावणा-यांवर, विक्रेत्यांवर तसेच प्रदूषण तथा पर्यावरणाला घातक ठरणा-या उत्पादकांवर पण कठोर कारवाई होणे जरुरीचे आहे. -सुधीर साळुंके, अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, लालबाग
फटाकेविरहित दिवाळी साजरी करावी
फटाक्यांवर बंदी करावी का, यावर प्रत्येकाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. फटाक्यांमुळे हजारो रुपयांचा चुराडा होत असतो. मानवतेच्या दृष्टिकोनातून सणांचा-उत्सवांचा आनंद मिळून-मिसळून साजरा केल्यास, सणाचे महत्त्व आनंद ख-या अर्थाने प्रत्येकाच्या घरात पाहायला मिळेल. पर्यावरणातील वाढत्या प्रदूषणामुळे निसर्गाचा समतोल दिवसेंदिवस ढासळत आहे. परिणामी अवकाळी पाऊस, भूकंप, चक्रीवादळ या निसर्गाच्या प्रलयंकारी रूपाला मानवाला सामोरे जावे लागत आहे. पर्यावरणपूरक बनवण्यासाठी प्रत्येकाने फटाके न फोडण्याचा संकल्प करावा हीच विनंती. – अनिलकुमार उबाळे, कोपरखैरणे, नवी मुंबई
फटाक्यांचा अट्टहास नको
आवाजाच्या फटाक्यांचे उत्पादन निश्चितच कमी करायला हवे. आवाज व धुरामुळे मोठय़ा माणसांवर, लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. आनंद साजरा करण्याच्या लोभात आपण पर्यावरणाचा ऱ्हास करत आहोत, याचे भान सर्वानी जपावे. सिमेंटचे जंगल उभे करताना आपण निसर्गातील विविध गोष्टींवर घाला घालत आहोत. त्याचे गंभीर परिणाम भविष्यात आपल्याला भेडसावणार आहेत. यासाठी पालिकेसह राज्य सरकारनेही पर्यावरणाविषयीचे प्रबोधन अधिक तीव्र करायला हवे. सणांचा आनंद फटाक्यांच्या अधिकाधिक आवाजामुळे होतो, ही समज बाळगणा-या सुशिक्षितांबाबत आश्चर्यच वाटते. सण साजरा करावा, मात्र उत्साहाच्या भरात प्रदूषणाच्या समस्येला आपण खतपाणी घालतो. कायदा करण्याइतपत वेळ आणणे, याएवढी नामुष्की आणण्यापेक्षा सर्वानी पर्यावरणाचे भान राखून फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करावी. – नरेश नाकती, बोरिवली (प.)
प्रदूषणमुक्त फटाक्यांचा वापर करावा
दिवाळी हा दिव्यांचा म्हणजेच प्रकाशाचा तसेच फराळ आणि फटाक्यांचा सण. दिवाळी म्हणजे फटाके हे समीकरणच झाले आहे. फटाक्यांच्या कडकडाटांनी दिवसरात्र समाजातील लोकांना मानसिक मनस्तापाला सामोरे जावे लागते. दिवाळीच्या काळातील ध्वनिप्रदूषणाची आकडेवारी फटाक्यावर कोणतीही ठोस अशी कारवाई केली जात नाही. याची कारणे अनेक आहेत. त्यातील महत्त्वाचे म्हणजे फटाक्यांची निर्मिती करणा-या कंपन्यांवर कारवाई करण्याचा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला अधिकार नाही. परिणामी ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे वारंवार उल्लंघन होत फटाक्यांचा बाजार तेजीत होतो. अशा फटाक्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे. १२५ डेसिबलपेक्षा अधिक असलेला आवाज कानाच्या पडद्यांना हानी पोहोचवू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. सुजाण नागरिकांनी ढासळत्या पर्यावरणाचे भान बाळगून वेळीच प्रसंगावधानता बाळगावी, अन्यथा निसर्गाचा कोप होण्यास विलंब होणार नाही. प्रदूषणावर नाममात्र उपाय म्हणून जमेल त्या पद्धतीने प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सर्वानी पुढाकार घ्यावा. – विजय पवार, बोरिवली (प.)
वाचकांचे व्यासपीठ
रेल्वे प्रवाशांचे मनस्वास्थ्य बिघडतंय?
मध्य रेल्वेच्या प्रथमश्रेणीतून प्रवास करणा-या एका महिला प्रवाशाला नुकताच सहकारी महिला प्रवाशांकडून प्रचंड मनस्ताप सहन करावा लागल्याची घटना घडली. महिन्याभराच्या अन्यायानंतर या तरुणीने संबंधित महिला कंपूची तक्रार केल्यानंतर या महिलांना अटक व दंडही झाला. मात्र, यामुळे ऐन गर्दीच्या वेळी मुंबईतील लोकल प्रवाशांच्या बिघडत्या मनस्वास्थ्याचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला. पुरुषांप्रमाणेच आता महिलावर्गही आक्रमक होऊ लागला आहे का? सर्वच प्रवाशांच्या वागण्यात हिंसात्मक बदल होऊ लागले आहेत का? विकासाची जपमाळ जपणा-या आधुनिक महिलावर्गाचे हे नवे चित्र समाजासमोर कोणता आदर्श उभे करत आहे? रेल्वे प्रशसानाने महिलांच्या डब्यातील गर्दीवर कोणते उपाय योजावेत? सुरक्षा, सोयी पुरवण्यात रेल्वेला अपयश का येत आहे? .. याबद्दल वाचकांनी आपली मते शुक्रवापर्यंत पुढील पत्त्यावर पाठवावीत. शब्दमर्यादा: १०० ते १५० शब्द. पाकिटावर ‘वाचकांचे व्यासपीठ’ असा आवर्जून उल्लेख करावा. आपली मते तुम्ही vyasapith@gmail.com या ई-मेल आयडीवरही पाठवू शकता.
प्रहार,
वन इंडियाबुल्स सेंटर,नववा मजला,
ज्युपिटर मिल्स कंपाउंड,
लोअर परळ,
मुंबई – ४०००१३,
फॅक्स : ०२२-४०९६९९००. ०२२- ६१२३९९६६
‘वाचकांचे व्यासपीठ’ ऑनलाइन पत्र लिहा
vyasapith@gmail.com वर तसेच ‘प्रहार’च्या संकेतस्थळावर किंवा प्रहारच्या फेसबुक पेजवरही मत नोंदवू शकता. त्यासाठी लॉग इन करा www.prahaar.in किंवा www.facebook.com/prahaar.in
संपत्तीचे प्रदर्शन टाळा – आधुनिक काळात पारंपरिक दीपोत्सवाचे स्वरूप बदलत जाऊन दिखाऊ फटाकेबाजीला महत्त्व प्राप्त झाले. फटाक्यांमुळे ध्वनी, वायू प्रदूषणासह कायमचे बहिरेपण, ह्दयाची धडधड यांसारखे आजारही बळावतात. रूग्णालयातील रूग्ण, वृध्द व्यक्ती, लहान बालके, गरोदर महिला आणि मुके प्राणी-पक्षी यांनाही त्रास सहन करावा लागतो. ब-याचदा फटाक्याच्या ठिणग्यांमुळे मोठ्या आगीही लागतात. यामुळे सणाचा आनंद द्विगुणित होण्याऐवजी रंगाचा भंग वा बेरंग होतो. त्यामुळे आवाज करणा-या फटाक्यांवर कायमची बंदी आणणेच श्रेयस्कर आहे. संपत्तीचे प्रदर्शन करणा-यांकडूनच फटाक्यांची आतषबाजी केली जाते. काही क्षणांच्या विरंगुळ्यासाठी पैशांच्या राशी खर्च केल्या जातात पण त्याचवेळी भारतातील पन्नास टक्के जनता दारिद्र्यात कशी जगते याचा विचार फटाके बहाद्दरांकडून केला जात नाही. दिवाळीला पर्यावरणपूरक बनवण्याची सुरूवात स्वतःपासून करायला हवी. याकरिता फटाक्यांऐवजी गरजूंना फराळ, रांगोळीत नैसर्गिक रंग, स्वदेशी आकाशकंदिल, भेटकार्डाऐवजी केवळ शुभेच्छा, वीजेच्या बचतीकरिता मर्यादित सजावट, गरिबांना वस्त्रदान, सौंदर्य, स्वच्छता आणि भरपूर ग्रंथ वाचन अशाप्रकारे दिवाळी साजरी करावी. यातून इतरांना पर्यावरणस्नेही दीपावली साजरी करण्यासाठी प्रेरणा द्यावी.
पर्यावरणाचा –हास रोखा – दिवाळीला पर्यावरणपूरक बनविण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने ऋण काढून सण साजरे करण्यापेक्षा आपल्या आर्थिक क्षमतेनुसार खर्चाच्या लक्ष्मणरेषेचे पालन केले पाहिजे. दीपावलीचे पावित्र्य, महत्त्व, धार्मिक परंपरा लक्षात घेता पर्यावरणाची गंभीर समस्या निर्माण करणा-या घटना, बाबी, कृती टाळल्या पाहिजेत. आवाज करणा-या फटाक्यांमुळे प्रदूषणाबरोबर विविध विकारांनी जर्जर असणा-या रूग्णांना त्रास तर होतोच पण त्याचबरोबर फटाके लावताना निष्काळजीपणामुळे अनेकांना जीवनाला मुकावे लागते. फटाके लावणा-यांना स्थळ, काळ, वेळेचेही भान नसते. रात्री एक-दोन वाजताही फटाके वाजवले जातात. त्यामुळे सर्वांना ध्वनी प्रदूषणापासून मोकळा श्वास घेऊ देणे हे सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे. कोणत्याही सणाचा आनंद द्विगुणित होण्यासाठी फटाक्यांच्या दिखाऊ आतषबाजीची गरज नसते. आवाज करणा-या फटाक्यांच्या दूरगामी परिणामांची पर्वाच केली जात नाही. सीमेवर देशाचे संरक्षण करणा-या सैनिकांमुळे, पोलीसांमुळे आम्ही सर्व सण साजरे करू शकतो याचे विस्मरण करून चालणार नाही. युवापिढीचे भवितव्य लक्षात घेता “ग्रंथ हेच आपले गुरू” समजून सुज्ञ वाचकांनी हा चांगला वारसा पुढे चालवावा. वर्षभर फटाके बनविणा-या कारखान्यांतून अत्यल्प वेतनात बालमजूर तासन् तास असुरक्षित वातावरणात काम करीत असतात याचा विसर पडता कामा नये. पारंपरिक दीपावलीचे महत्त्व लोप पावत असून दिवाळीला दिवाळखोरीचे स्वरूप प्राप्त होतयं. वाढत्या महागाईचे खापर सरकारवर फोडणा-या समाजातील काही मध्यम वर्ग प्रत्यक्षात वारेमाप चैन करीत असतो. दीपावलीच्या निमित्ताने आम्ही आकर्षक जाहिरातींना भुलून सेलमधील डिफेक्टिव माल विकत घेत असतो. दीपावलीचे स्वागत आपण दीपोत्सवांनी, मंगल गाण्यांनी, रांगोळ्या काढून, सेवाभावी संस्थांना आर्थिक मदत करून करू शकतो. फटाके बंदीने काहीच साध्य होणार नसून फटाके फोडणा-यांची मानसिकता बदलण्याकरिता प्रदूषणाचे दुष्परिणाम, पर्यावरण संरक्षणाचा प्रचार-प्रसार, लघुपट, पथनाट्ये, परिसंवाद, चर्चासत्र याद्वारे शालेय जीवनापासून जनजागृतीने मतपरिवर्तन केले पाहिजे. फटाके वाजविण्यास बंदी घालण्यास सरकारला जनमताचा विचार करावा लागतो. मोठ्या आवाजांच्या फटाक्यांबरोबर शोभेच्या दारूकामामुळे प्रदूषण वाढते याचे भान सणाचा बेरंग करणा-या उपद्रवी गुन्हेगारांना करून देण्यास त्यांच्याविरूध्द पोलीसांनी योग्य ती कारवाई करावी. “कळतयं पण वळत नाही” अशा सूज्ञ नागरिकांस अधिक सांगणे न लगे.