‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत तोंड सांभाळून बोलावे’, अशा शब्दांत भाजप नेत्या शायना एन. सी. यांनी सोमवारी शिवसेनेला फटकारले आहे.
मुंबई– ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत तोंड सांभाळून बोलावे’, अशा शब्दांत भाजप नेत्या शायना एन. सी. यांनी सोमवारी शिवसेनेला फटकारले आहे. मोदी हे देशाचे पंतप्रधान असल्याचे भान उद्धव ठाकरे यांनी ठेवावे, असे त्यांनी सूचित केले. शिवसेनेकडून पंतप्रधान मोदींबाबतच्या वक्तव्याने भाजपचे कार्यकर्ते दुखावले आहेत. लोकसभा निवडणुकीतील विजय हा केवळ मोदींमुळेच मिळाला असल्याचा पुनरुच्चाही त्यांनी केला. दरम्यान, दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरून युतीमध्ये तू-तू मैं-मैं सुरूच आहे.
विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊनही दोन्ही पक्षातील तिढा सुटायला तयार नाही. भाजपची १३५ जागांची मागणी शिवसेनेने धुडकावून लावली आहे. भाजपनेही शिवसेनेशी जागावाटपाची चर्चाच बंद केली. प्रदेश प्रभारी राजीव प्रताप रुडी मुंबईत असूनही त्यांनी शिवसेनेशी चर्चेची तयारी दर्शवली नाही. येत्या १७ सप्टेंबरला भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे मुंबईत असून ते ‘मातोश्री’शी संपर्क साधणार नाहीत. या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून असलेल्या महायुतीतील मित्र पक्षांची स्थिती मात्र केवीलवाणी झाली आहे.
भाजपला कोणत्याही स्थितीत १३५ जागा दिल्या जाणार नाहीत. त्यामुळे जास्त ताणण्यात अर्थही नाही, अशा शब्दात भाजपला शिवसेनेने फटकारले आहे. भाजपनेही उद्धव यांच्या या वक्तव्याला अधिक महत्त्व न देता स्वतंत्र वाटचाल करण्याच्या दृष्टीने पाऊल पुढे टाकले. येत्या १८ सप्टेंबरपासून प्रत्येक जिल्ह्यात ‘लोकसंवाद’ अभियान राबवले जाणार आहे. तसेच भाजपने आपल्या स्वतंत्र जाहीरनाम्याची तयारी केल्याची माहिती प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी यांनी दिली.
भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तर पुण्याजवळ चौंडी येथे पंकजा मुंडेंच्या संघर्ष यात्रेचा समारोप ते जाहीर सभेच्या माध्यमातून करतील. त्याचबरोबर राज्याचे प्रभारी राजीव प्रताप रुडी मुंबईत आहेत. त्यामुळे त्यांनीही शिवसेनेपासून अंतर ठेवण्याचा निर्णय घेतला. या सर्व घडामोडी पाहता भाजपने ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत जाण्याची मन:स्थिती बनवल्याचे स्पष्ट आहे.
शिवसेना आणि भाजपच्या स्वतंत्र बैठका
शिवसेना आणि भाजपमध्येय जागा वाटपावरून वाद निर्माण झाल्यानंतर दोन्ही पक्षांनी वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्र बैठकींचे सत्र सुरू केले आहे. या माध्यमातून दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्याची तयारी करत आहेत.
‘मातोश्री’वर शिवसेनेची सोमवारी संध्याकाळी उशिरा बैठक झाली. यात जे मतदारसंघ भाजपच्या वाटयाला आहेत त्यातील शिवसेनेच्या इच्छुकांना पाचारण करून कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान, याचवेळी भाजपच्या बैठकीतही १३५ जागांच्या मागणीवर ठाम राहण्याचा निश्चय करण्यात आला.
गेला उडत मोदी आणि भाजप….