माझी आई अशिक्षित आहे. ती फक्त मराठी बोलते. तिला हिंदी बोलता येत नाही. इंग्रजीचा ए, बी, सी, डी माहीत असण्याचे काही कारण नाही. पण परळसारख्या मराठीबहुल परिसरात राहतानाही तिचे हिंदी आणि इंग्रजीशिवाय काही अडलेले नाही. ती गृहिणी आहे. त्यामुळे तिचे कार्यक्षेत्रही घरापुरतेच मर्यादित आहे. आज सत्तरीला पोहोचलेली आई घरात, परिसरात, बसमध्ये, भाजीवाल्यांबरोबर आणि एकूण राज्यातील अनेक प्रांतांत धार्मिक पर्यटन करताना फक्त मराठीच बोलते. ती फक्त मराठीच बोलते कारण ती मराठी आहे. अशिक्षित इंग्रज व्यक्तीही इंग्रजीच बोलतो कारण त्याची मातृभाषाच मुळी इंग्रजी असते. जगाच्या पाठीवर हा अशिक्षित इंग्रज व्यक्ती फक्त तीच भाषा बोलेल, यात तिळमात्र शंका नाही. काही अपवाद सोडले तर १०० टक्के हेच घडते. माझ्या आईमध्ये आणि इंग्रज व्यक्तींमध्ये एकच साम्य आहे की, ते दोघेही अशिक्षित असल्यामुळे त्यांना अपरिहार्यपणे कुठेही गेले तरी तीच भाषा बोलावी लागते.
आता माझी आई मराठी. ती राहते महाराष्ट्रात. त्यामुळे ती मुंबईतच मराठी बोलत नाही तर सर्वत्रच आणि कोणाहीबरोबर मराठी बोलते. मुंबईत मराठी भाषकांबरोबरच हिंदी तसेच इतर भाषा बोलणा-या व्यक्ती, गट आणि समूहात आहेतच. इंग्रजी बोलणारेही आहेत. परंतु इंग्रजी भाषा ही कोणत्याही भारतीयाची मातृभाषा नाही. ती संपर्कभाषा आहे. एवढे सामान्यज्ञान भारतातल्या सगळ्या व्यक्तींकडे मोठ्या प्रमाणावर आहे.
आज जागतिकीकरणामुळे शहरांमध्ये राहणा-या प्रत्येकाला एकापेक्षा जास्त भाषा बोलता येतात. उदा. भारतीय शहरांमध्ये राहणा-या सुशिक्षित व्यक्तींना एकापेक्षा जास्त भाषा बोलताच येतात. शहरांमध्ये मराठीत शिकणा-या मुलांनी मातृभाषेत जरी शिक्षण घेतले तरी अशा मराठी भाषकाला हिंदी आणि तोडकेमोडके इंग्रजी येते. लिहिता येत नाही. मात्र चेक, पासबुक, वीज भरणा, चित्रपटगृहे तसेच शैक्षणिक संस्थांमधील इंग्रजीतील लिखित व्यवहार त्यांना समजतो आणि ते असा व्यवहार थेट इंग्रजी किंवा हिंदीत करतात. आज भारतातील कोणत्याही शहरात राहणा-या व्यक्तीला इंग्रजी येणे आवश्यकच आहे. १९९१ पासून जागतिकीकरण शहराच्या तळागाळापर्यंत पोहोचले. त्यामुळे शहराच्या प्रत्येक घरात केबल टीव्ही, डिश टीव्ही आला. प्रत्येक कुटुंबात हा कुटुंबसदस्य सापडतोच. त्याला दुसरा पर्याय अजिबात नाहीच.
थोडक्यात जागतिकीकरणामुळे मातृभाषेबरोबरच इंग्रजी भाषा येणे, ही भारतात तरी अपरिहार्य गोष्ट केली आहे. मला मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराथी या भाषा येतात. गोव्यातील कोंकणी (व्यवहारात फक्त प्रमाणित मराठी भाषाच वापरतात.) बंगाली, कानडी ऐकल्यावर समजते. भारतातील इतर भाषा ऐकल्यावर ती पंजाबी आहे की, तमिळ, राजस्थानी आहे हे समजते. मी आहे मराठी. राहतो महाराष्ट्रात. मग महाराष्ट्रात राहत असताना मी कोणती भाषा वापरावी? उत्तर साधे आहे ते म्हणजे मराठीच. कारण भाषावार प्रांतरचनेत मराठी राज्याची राज्यभाषा ही मराठीच आहे. इतर राज्यांच्या नागरिकांप्रमाणे माझाही तो मूलभूत अधिकार आहे. असे असताना मी परराज्यांतून उदरनिर्वाहासाठी आलेल्या परप्रांतीयांबरोबर त्यांच्या राज्यांच्या राज्यभाषेत का बोलावे? समजा कोणी पर्यटनासाठी आले असेल आणि त्याला मराठी भाषा येत नसेल तर त्याला समजणा-या हिंदी भाषेत बोलायला मी तयार आहे. कारण हिंदी भाषा देशात सर्वात बोलली जाते, हा शुद्ध भ्रम आहे. मात्र, हिंदी भाषा हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून पाहिली जाणारी संख्येच्या दृष्टीने मोठी भाषा आहे. दक्षिणेतील चारही राज्यांमध्ये हिंदी चित्रपट पाहिले जातात. पण हिंदी भाषा बोलली जात नाही. ती फक्त पर्यटकांबरोबरच बोलली जाते. तिथे उदरनिर्वाहासाठी आलेल्याबरोबर कनिष्ठ स्थरावर स्थानिक भाषा आणि वरिष्ठ किंवा अधिकारी स्तरावर इंग्रजी आणि स्थानिक राज्यभाषेचा वापर केला जातो.
आता एखाद्या राज्यातून दुस-या राज्यात कामानिमित्त किंवा पर्यटनासाठी जाणा-या लोकांना, गटाला किंवा समूहाला त्या राज्यातील कोणती भाषा बोलली जाते, हे येताना माहीत नसते का? तर असते. अगदी विविध कारणांनी पर्यटन करणारे पर्यटकही विशिष्ट राज्यात जाताना त्या राज्यात कोणती भाषा बोलली जाते, याची जुजबी माहिती घेतात. ठेवतात.
आता मी घरात मराठी बोलतो. माझ्या राज्यात सर्व प्रांतांतही मी मराठी बोलावे, अशी माझी इच्छा असते. अगदी शहरातही. पण शहरात परप्रांतीय असतात, हा माझा दोष आहे का? नाही. त्यांचाही नाही. नोकरीसाठी, उदरनिर्वाहासाठी ते मुंबई आणि राज्यातील सधन (सुपीक) शहरात येतात. सर्व प्रकारातील रोजगारांची उपलब्धता येथे आहे. ते त्यांच्या क्षमतेनुसार रोजगार करतात. कधी अधिकृत तर कधी अनधिकृत व्यवसाय, धंदे करतात. माझी आडकाठी नाही. कारण सर्वच राज्यांत छोटय़ा-मोठय़ा प्रमाणात असे किरकोळ अनधिकृत व्यवसाय, धंदे चालतात. लोकसंख्येच्या रेटय़ामुळे आणि शहरी लोकांच्या घडय़ाळाच्या काटय़ाला जुंपले असल्यामुळे असे व्यवसाय, धंदे (फेरीवाले) टिकतात. प्रशासन आणि राजकीय व्यवस्थेमुळे अशा गोष्टी टिकतात. अशा व्यक्ती देशाच्या नागरिक असल्या तरी त्या राज्यांतील नागरिक होत नाहीत. ते ज्या राज्यातून आलेल्या असतात त्यांच्या राज्यांशी त्यांची नाळ जोडलेली असते. असावी. यात काही वाईट नाही. मात्र उदरनिर्वाहासाठी आलेला एखादा परप्रांतीय ‘मुझे मराठी आती नही। हिंदी में बोलो।’ असे म्हणाला तर मला माझ्या राज्यात, मीच परप्रांतीय असल्यासारखे वाटते. मग अशा वेळी मी त्याच्याशी हिंदीतून बोलावे का? तर नाही. कारण महाराष्ट्रात येताना या राज्याची भाषा मराठी आहे, हे त्याला माहीत नसते का? तर असते. मग हे माहीत असताना त्याची भाषा तो मला बोलायला भाग पाडतो, ही त्याची भाषिक मुजोरी नाही का? तर १०० टक्के ही त्याची भाषिक मुजोरी आहे.
माझी आईही जी फक्त मराठी बोलते (तिच्या भाषिक मर्यादेमुळे जी तिच्या अशिक्षितपणामुळे आलेली असते) ती सगळय़ा प्रकारच्या फेरीवाल्यांबरोबर मराठीच बोलते. ते त्यांना कळतेही. कारण त्यांच्यासमोर दुसरा पर्याय नसतो. कारण माझ्या आईला हिंदी कळते. पण बोलता येत नाही. ती मराठीच बोलते. त्यात तिचा भाषिक स्वाभिमान हा भाग १०० टक्के नसतो. समोरच्याला चुपचाप तिचे बोलणे ऐकावे लागते. त्यामुळे होते काय की, ती जे काय बोलते, ते लक्षपूर्वक ऐकून समोरची व्यक्ती त्यानुसार कार्यवाही करते. भाज्यांची कोणतीही हिंदी किंवा इंग्रजी नावे तिला येत नाही तरी ती हिंदी भाषक भाजीवाल्यांकडून भाजी खरेदी करते, खरेदी करताना किमतीबाबत घासाघीस करून किंमत कमी करते. खरेदी-विक्रीचा व्यवहार दोन्हीकडून अगदी व्यवस्थित पार पडतो.
मी शिक्षित आहे. ब-याच भाषा मला येतात. असे असताना मी परप्रांतीयांबरोबर त्यांच्या भाषेत बोलावे का? परप्रांतीय म्हणजे फक्त भाषिक का? तर नाही. राज्याबाहेरून (गोव्याचा अपवाद. गोवा हे दुसरे मराठी भाषिक राज्य आहे. मूळ नाव गोमांतक) हिंदी बोलणारेच फक्त परप्रांतीय असतात का? तर नाही. मराठी न येणारे सर्व परप्रांतीय. मग त्यात मराठी घरांमध्ये जन्माला येऊन मराठी बोलता न येणारेही परप्रांतीय म्हणायला हवेत. परराज्यात वर्षानुवर्षे राहून त्या राज्याशी एकनिष्ठ झालेले पण आडनाव न बदलणारी मराठी कुटुंबे आहेत. पण त्याचबरोबर खोटे अवसान आणून, एकरूप होण्याचा आव आणण्यासाठी आडनावांचा सहज अपभ्रंश करून घेणारेही आहेतच. बंगाली, दक्षिणेकडील राज्यांमधून आलेलेही (ज्यांच्या भाषांमध्ये संस्कृतचे शब्द सहजपणे आढळतात.) परप्रांतीय आहेत. त्यांच्याशीही बोलताना आपण हिंदीत बोलतो. त्यांची भाषा हिंदी नसते तरी. आता बंगालमध्ये किंवा दक्षिणेकडील राज्यांमध्ये तुम्ही स्थायिक झाल्यावर बंगाली किंवा दक्षिणेकडील स्थायिक तुमच्याबरोबर कोणत्या भाषेतून बोलतील तर त्यांच्या राज्यभाषेतून. मग अशा हिंदी मातृभाषा नसलेल्या आणि शहरात किंवा राज्यातील इतर भागांत स्थायिक झालेल्यांबरोबर त्यांना सुलभ व्हावे, त्यांना कळावे म्हणून हिंदी भाषेत तरी का बोलू?
मुंबईचे नाव काही वर्षापूर्वी बॉम्बे होते. त्यावेळी मराठी माणूस घरात आणि घराबाहेर बोलताना त्याचा उल्लेख मुंबईच करायचा. मात्र, परप्रांतीयांबरोबर बोलताना बॉम्बे करायचा. पण, ज्यावेळी बॉम्बेचे मुंबई झाले त्यानंतरचे चित्र उलट झाले. हिंदी, इंग्रजी आणि जगातील सर्वच भाषांमध्ये मुंबईचा उल्लेख फक्त मुंबईच होऊ लागला. बोलताना, लिहितानाही तो मुंबई झाला. कारण मुंबई हा शब्द मराठी आणि परप्रांतीयांकडूनही मुंबई असाच होऊ लागला. त्यावेळी ‘मुंबई’ बोलता येत नाही म्हणून बॉम्बे बोलणारे, त्याचे समर्थन करणारे सगळे परप्रांतीय होते. आता या सगळय़ा परप्रांतीयांना मुंबई कसे बोलता येते? येते ना? हेच आता भाषेचे आहे. परप्रांतीयांना कोणत्याही राज्यात उदरनिर्वाहासाठी गेले असताना तिथली भाषा बोलता आली पाहिजे, याची जाणीव असते. पण महाराष्ट्रात आल्यानंतर शहरांमध्ये तरी त्यांची वरीलप्रमाणे भाषिक मुजोरी का चालते?
मग अशा वेळी ही मुजोरी मोडून काढण्यासाठीच मी मराठीत बोलतो. टॅक्सीवाले, रिक्षावाले, भाजीवाले, पेपरस्टॉलवाले अगदी सरकारी आणि केंद्र सरकारमधील कार्यालयांमध्ये मी मराठी बोलतो. कारण हे मराठी भाषक राज्य आहे आणि मी मराठी भाषक आहे, हे मला माहीत आहे.
आता राहिला मराठी आणि हिंदीचा भावनिक, राजकीय मुद्दा. मुळात असा कोणताही मुद्दा उपस्थित होऊच नये. कारण या दोन्ही भाषा या देवनागरी भाषा आहेत. देवनागरीत आपण मराठी लिहितो आणि हिंदीही लिहितो. शाळेत गेल्यावर दुसरी किंवा तिसरी कोणतीही भाषा अभ्यासक्रमात असली तरी हिंदी ही भाषा कोणताही मराठी भाषक विद्यार्थी पटकन शिकतो. याचे कारण हे आहे की, ती देवनागरी लिपी आहे. त्यामुळे मराठीशी या भाषेचे पूर्णपणे साधम्र्य आहे, सारखेपणा आहे. गुजराथी भाषेचेही असेच आहे. मराठी आणि गुजराथी मुळाक्षरे ही बारा आहेत. बाराखडी या दोन्ही भाषांमध्ये आहे. म्हणूनच गुजराथी बोलताना ती न येणा-या मराठी व्यक्तीलाही ती समजते, पण बोलता येत नाही. काही शब्द इकडे-तिकडे असतातच. मराठीतील काही शब्द आणि त्यांचे अर्थ मराठी भाषकांनाही समजत नाही, कळत नाहीत. मराठी आणि हिंदीत एवढय़ा मोठय़ा प्रमाणात साम्य असताना हिंदी भाषकांबरोबर मी हिंदीत का बोलू? जर मराठी भाषकांना हिंदी समजू शकते तर हिंदी भाषकांनीही ढोंग आणि सोंग आणले नाही तर त्यांनाही मराठी अगदी व्यवस्थित समजेल. मराठी माणसाने प्रयत्न केला तर हे होऊ शकते. ‘मुझे मराठी आती नही’ बोलणा-यांना ‘धडा शिकवण्याचा’ प्रयत्न करू नका. धडा देण्याचा प्रयत्न करा आणि तो पूर्णपणे भाषिक, शाब्दिक असायला हवा. बोलण्याने होत आहे रे, आधी बोललेची पाहिजे. ‘खळ-खटय़ाक’ या राजभाषेचीही मग गरज लागणार नाही.
आता भाषा म्हणजे काय ते समजून घेऊ. भाषेचे दोन प्रकार असतात. एक बोलली जाणारी बोलीभाषा आणि लिहिली जाणारी प्रमाणित भाषा. शुद्ध आणि अशुद्ध अशी कोणतीही भाषा नसते. अशिक्षित माणसाला भाषा येते. पण ती बोलीभाषा येते. आता पुन्हा माझ्या आईचे उदाहरण घ्या. ती अशिक्षित आहे. पण तिला मराठी येते. आता मराठी बोलीभाषा येते. तिला लिहिली जाणारी प्रमाणित भाषा येत नाही. हातात पाटी, खडू न घेताही तिला ही संवादाची भाषा येते. ती या भाषेच्या जोरावर घरातील आणि घराबाहेरच्या लोकांबरोबर संवाद साधते. बोलते. परप्रांतीयांबरोबरही मराठी बोलले की, त्यांनाही मराठी बोलता येईल.
आता मराठी भाषकांच्या न्यूनगंडाविषयी. मराठी माणूस परप्रांतीयांबरोबर हिंदी का बोलतो. कारण मराठी माणसाला शहरात राहूनही इंग्रजी बोलता, वाचता आणि लिहिता नीटपणे येत नाही. शहरात राहण्यासाठी, टिकून राहण्यासाठीही इंग्रजी येणे आवश्यक आहे. कनिष्ठ स्तरांवरील परप्रांतीय मराठी भाषकांबरोबर हिंदी बोलतात आणि वरिष्ठ स्तरांवरील परप्रांतीय इंग्रजीत बोलतात. या दोन्ही भाषांचा उपयोग केल्यानंतर मराठी भाषक काहीसा गोंधळतो. कारण या दोन्ही भाषा शहरात राहूनही मराठी भाषकाला बोलता येत नाहीत. माझ्यात हा न्यूनगंड तयार झाल्यानंतर तो घालवण्यासाठी मी प्रयत्न केला. त्यासाठी मला आवडणा-या साहित्याचा मी आधार घेतला. हिंदी आणि इंग्रजी साहित्य वाचून काढले. ते समजत नसतानाही. मग समजत गेले. इंग्रजी उत्तम करण्यासाठी शब्द पाठ न करता फक्त इंग्रजी-मराठी शब्दकोश एक वर्ष, दिवसातून एक ते दीड तास चाळला, वाचला. म्हणजे ‘ए’ हे मूळाक्षर घेऊन ‘ए’मधील सर्व शब्द वाचून काढले, डोळय़ाखाली येऊ दिले, पण पाठ केले नाही. मग तेच शब्द इंग्रजी वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या, दुकानांवरील इंग्रजी नावाच्या पाटय़ा आणि त्याचे अर्थ, बोलणा-या व्यक्तींचे हावभाव आणि शब्दोच्चार ऐकत राहिलो. हिंदी आणि इंग्रजी चित्रपट पाहत राहिलो. त्यांचा रसास्वाद घेत राहिलो.
हिंदी उत्तम केले पण महाराष्ट्रात न बोलण्याचा निर्णय घेतला. उत्तर भारतातील राज्यांमध्ये पर्यटन किंवा अन्य गोष्टींसाठी जाईन, त्यावेळी बोलेन. पण राज्यात नाही. कारण हिंदी ही त्यांची मातृभाषा. त्यांच्या राज्यात जाऊन मी त्यांच्याबरोबर मराठी बोलू शकत नाही. बोलायला गेलो तर त्या-त्या राज्यांतील व्यक्ती माझी हालत काय करतील, याची मला पूर्ण कल्पना आहे. याच धर्तीवर परप्रांतीयांनाही हे कळले पाहिजे की, हे माझे राज्य आहे. मी फक्त मराठीच बोलणार. तेव्हा परप्रांतीयांनी मराठी शिकून घेणे आणि भाषिक मुजोरी न गाजवता मराठी समजून घेण्याची आणि बोलण्याची सवय लावायला हवी. हिंदी भाषा, हिंदी मालिका मी पाहतो. हिंदी गाण्यांचा आस्वाद घेतो. तो माझ्या मनोरंजनाचा, भाषिक समृद्धीचा भाग आहे. त्यामुळे मी मराठी आहे म्हणून मी हिंदी चित्रपट, मालिका किंवा गाण्यांचा आस्वाद घेऊ नये, ते पाहू नये, अशी टीका केली जाऊ नये. हिंदी चित्रपट, मालिका, गाणी हा हिंदी शिकण्याच्या अभ्यासक्रमाचा भाग नाही की, जे पाहिल्यानंतर मला त्यांचा व्यवहारात उपयोगच केला पाहिजे किंवा ती भाषा बोललीच पाहिजे.
परप्रांतीय हिंदी आणि इंग्रजी बोलून स्थानिकांवर भाषिक मुजोरी गाजवतात. ही मुजोरी मोडून काढण्यासाठी हिंदी, इंग्रजी चांगली समजून घ्या. पण, त्यांच्याशी बोलू नका. त्यांना मराठीत बोलायला भाग पाडा. इंग्रजी ही संपर्कभाषा आणि पोटभाषा झाली आहे. पण त्यामुळेही भारतीय लोक जागतिकीकरणातून निर्माण झालेला आपल्या भाषेतील प्रांतिक, राज्यीय न्यूनगंड लपवण्याचा प्रयत्न करतात. पण, भारताची पोटभाषा आणि संपर्कभाषा झालेली ही भाषा आल्यावर आपली मातृभाषाही न लपवता बोलता येते. भाषिक न्यूनगंड दूरही होतो. इंग्रजी चांगली लिहिता, बोलता आली तरी शहरातील आणि सर्व मराठी भाषकांना आपला न्यूनगंडाची वेदना हिंदी किंवा अन्य भाषेच्या रूपात व्यक्त करण्याची वेळ येणार नाही.
थोडक्यात, मला माझी मातृभाषा, देशात सर्वात पाहिली जाणारी हिंदी भाषा आणि संपर्क आणि पोटभाषा असलेली इंग्रजीही येते आणि म्हणूनच महाराष्ट्रात मी ठामपणे, अगदी व्यवस्थिपणे मराठी बोलतो. मी सगळीकडे मराठी बोलतो. मुंबईत तरी तुम्ही परप्रांतीयांबरोबर मराठीत बोललात की, ९९ टक्के परप्रांतीयांना मराठी येते. एक टक्के परप्रांतीयांना ती येत नाही. कारण त्यांचे उत्तर बहुदा हेच असेल की, ‘हम कलही बंबई में आये है। क्या करे’
अरे! मग तू आजपासून मराठी ऐकायला आणि बोलायला शिक ना बाबा.
मराठी माणसाला देशाबद्दल अतिशय अभिमान आहे. ‘मोडेन पण वाकणार नाही,’ अशी म्हण मराठीत आहे. पण, परप्रांतीयांनाही याचा चांगलाच अनुभव असेल की, मराठी माणसाइतका लवचिक माणूस त्याला देशात कुठेही सापडणार नाही. मात्र, हा लवचिकपणा परप्रांतीयांनी दुबळेपणा समजू नये आणि मराठीत सांगणा-यांचे ऐकून घ्यावे, समजून घ्यावे. ‘मुझे मराठी नही आती।’ असे म्हणण्याची हिंमतही करू नये. मराठी बोलणे येत असूनही समजत नसल्याचे ढोंग करू नये. मराठी हे आपले राज्य नाही, मराठी ही आपली भाषा नाही, ही मानसिकता मग महाराष्ट्रात येऊन तुम्ही उदरनिर्वाह कोणत्या भाषेच्या जोरावर करणार? तुमच्या की, मराठी भाषकांच्या? पालिका रुग्णालयातील अनेक अमराठी किंवा परप्रांतीय डॉक्टर मराठीत बोलतात. का तर त्यांचा उदरनिर्वाह मराठी भाषेमुळे चालतो. पुढेही चालणार असतो. मग इतर उत्तर भारतीयांची भाषिक मुजोरी मराठी भाषकांनी का खपवून घ्यावी? मराठी भाषकांच्या राज्यातीलच भाषिक आग्रहाला परप्रांतीयांनी आणि मराठी भाषकांनीही हट्टी, दुराग्रही किंवा उद्धट म्हणण्याची हिंमत करू नये. इतर भाषकांना त्यांच्या राज्यात त्यांची भाषा बोलताना मी अडवत नाही त्याच धर्तीवर माझ्या राज्यात मी मराठी बोलताना मला अडवण्याचे कोणतेही संयुक्तिक कारण परप्रांतीयांकडे नाही. उलट मी मराठी बोलत असेल तर ते समजून घ्यावे आणि नंतरच बोलावे. पर्यटनासाठी आलेल्यांसाठी हे सर्व नियम शिथिल आहेत आणि उदरनिर्वाहासाठी आलेल्यांसाठी हे सर्व नियम पाळणे अत्यावश्यक आणि बंधनकारक आहे. आता शेवटचा पण सगळय़ा मुद्दय़ांपेक्षा जास्त आवश्यक मुद्दा. माझा जन्म हिंदू, मुस्लीम किंवा विशिष्ट जाती-जमातीमध्ये स्त्री किंवा पुरुष असा होणे किंवा एखाद्या प्रांतात किंवा राज्याचा होणे, ही बाब माझ्या हातात नसते. पण मी एक मराठी, मी एक गुजराथी किंवा देशी किंवा परदेशी अशा गोष्टींनाच कायमस्वरूपी चिटकून राहणे, संपूर्णपणे चुकीचे आहे. मी एक मनुष्य आहे आणि त्यानुसार मी स्वत:कडे आणि इतरांकडे पाहणे आवश्यक आहे. पण, असे करताना मी माझे अस्तित्व, माझे देशीयत्व नाकारू शकत नाही. ते स्वीकारून आणि इतरांनी ती माझी ओळख मान्य करूनच मला स्वीकारले पाहिजे. माझी फक्त इतकीच माफक अपेक्षा आहे.
कृपया मला या लेखाचे लेखक सांगाल का ? मला त्यांचा ई-मेल आयडी मेल करा.
marathi badalcha addar apanach tevla tar etar lok thevtil ……….
marathi raha marathi jaga