सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ या गावी एका नराधम डॉक्टराने स्त्रीभूण हत्येचे केंद्र चालवल्याची घटना पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे. एका महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाला. त्याचा बभ्रा होऊ नये म्हणून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याची घाई तिचा पती करू लागला. माहेरच्या कुटुंबीयांना यात संशय वाटल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी पतीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. त्यावेळी त्याने गर्भपात करताना मृत्यू झाल्याचे कबूल केले. त्यानंतर केलेल्या तपासात एकापेक्षा एक धक्कादायक घटना उलगडत गेल्या.
या शस्त्रक्रिया करणा-या डॉक्टरकडे शस्त्रक्रियेसाठी आवश्यक?असणारे शिक्षणही नव्हते. तो होमिओपॅथीमधील पदवीधर होता. या शिक्षणात गंभीर आजाराबाबत अथवा शस्त्रक्रियेबाबत कोणतेही शिक्षण दिले जात नाही. तरीही त्याने आपल्या रुग्णालयात अनेक शस्त्रक्रिया केल्याचे उघड झाले आहे. त्याच्याकडे क्ष-किरण यंत्रही आढळून आले आहे. त्यामुळे तेथे मोठय़ा प्रमाणावर शस्त्रक्रिया झाल्याचे निष्पन्न होत आहे.
दुसरी धक्कादायक बाब म्हणजे, या मृत महिलेच्या पतीने दिलेला जबाब. आधीच दोन मुली आहेत. तिसरा गर्भही मुलीचाच असल्याने तो पाडून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया केली. त्यात पत्नीचा मृत्यू झाला, असे त्याने सांगितले. रुग्णालयात सापडलेल्या एका रजिस्टरमध्ये शस्त्रक्रियांच्या नोंदीही आढळल्या. त्यात भूलतज्ज्ञाला दिलेल्या रकमांचे तपशीलही आढळले. या सा-या घटना या प्रकरणाचे गांभीर्य वाढवणा-या आहेत. एखादा डॉक्टर ग्रामीण भागात कसा धुमाकूळ घालू शकतो आणि त्याचा सरकारी यंत्रणेला मागमूसही लागत नाही, याचे हे ढळढळीत?उदाहरण आहे.
एका बाजूला महिला अंतराळात जात असताना दुस-या बाजूला मुलगी झाली हो, म्हणत टाहो फोडणारा एक समाज आहे. मुलगी नको, मुलगाच हवा हा अनाठाई अट्टाहास वेदनादायी आहे. सामाजिक मागासलेपणाचे ते लक्षण आहे. मुलगी नको म्हणून पत्नीच्या जीवाशी खेळणे हे नुसते आक्षेपार्हच नसून गुन्हेगारी स्वरूपाचे आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास करताना ओढय़ाच्या काठावर खोदकाम केले. तेव्हा एकोणीस गर्भाचे अवशेष सापडले.
हे सर्व अवशेष मोठय़ा आकाराचे होते. म्हणजेच ते अधिक वयाचे होते. गर्भपातासाठी वीस आठवडय़ांची मुदत असते. ती मुदत ओलांडून गेल्यानंतर गर्भपात करता येत नाही. त्यामुळे या डॉक्टरने वैद्यकीय संकेत तर पायदळी तुडवलेच, पण गुन्हेगारी कारवाया करताना त्याला न्यायालयाचीही भीती वाटेनाशी झाली, हेच यातून सिद्ध होत आहे.
या रजिस्टरमध्ये सापडलेल्या नोंदीतून ज्यांची नावे निष्पन्न होतील, त्यांनी स्त्रीभ्रूण हत्या केली असेल त्यांच्यावर गुन्हे नोंदवून त्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. त्याचबरोबर स्त्री सन्मानासाठी पुन्हा एकदा जोरदार प्रयत्न करण्याची गरज म्हैसाळच्या घटनेतून अधोरेखित झाली आहे. ते करायला हवेतच.
सर्वात प्रथम त्या डॉक्टरलाच जीवंत गाडा ज्याने ह्या हत्या केल्यांत.