मेट्रो-३ प्रकल्पाच्या आड येणा-या गोरेगाव आरे कॉलनीतील तब्बल दोन हजार झाडे हटवण्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत राखून ठेवण्यात आला.
मुंबई- मेट्रो-३ प्रकल्पाच्या आड येणा-या गोरेगाव आरे कॉलनीतील तब्बल दोन हजार झाडे हटवण्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत राखून ठेवण्यात आला. मात्र ही झाडे काढण्यास मंजुरी दिली नसताना झाडांवर कुऱ्हाड चालवण्याचा उद्योग सुरू असल्याचे पुरावेच सदस्यांनी महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना सादर केले. याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश आयुक्तांनी उद्यान विभागाला दिले आहेत.
‘कुलाबा-वांद्रे ते सिप्झ मुंबई मेट्रो-३’चे आरे कॉलनी येथील प्रस्तावित कारशेड डेपोसाठी तब्बल २ हजार २९८ झाडे हटवली जाणार आहेत. यासाठी २५४ झाडांची तोड तर उर्वरित २ हजार ०४४ झाडांचे पुनरेपण मरोळ-मरोशी येथील मोकळय़ा जागेत करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव वृक्षप्राधिकरणाच्या बैठकीत येणार असल्याने आरे बचाव समितीच्या सदस्यांनी महापालिकेत गर्दी केली होती.
परंतु प्रत्यक्षात प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी हा प्रस्ताव पुकारल्यानंतर राखून ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर केले. परंतु यावर अभिजित चव्हाण व दिलीप लांडे यांनी यावर आक्षेप घेत या प्रकल्पांच्या आड येणारी कोणती झाडे कापली जाणार आहेत तसेच त्यांचे पुनरेपण कधी आणि कुठे होणार आहे, याचे सादरीकरण करावे, असे सांगत त्याला विरोध केला.
येथे सर्व सदस्यांचा पाहणी दौरा आयोजित करण्याची मागणी करतानाच यापूर्वी तानसा जलवाहिनी बदलताना भांडुप येथील दोन हजार झाडे काढण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यापूर्वी ३० जणांची एक समिती गठित केली होती. त्याच धर्तीवर वृक्षप्राधिकरणाचे सदस्य समितीच गठीत करून याचा झाडांचा अहवाल तयार करण्याची मागणी चव्हाण केली. यावेळी सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव यांनीही पाहणीची मागणी लावून धरली.
एका बाजुला हा प्रस्ताव मंजुरीअभावी राखून ठेवला असतानाच प्रत्यक्षात आरे कॉलनी या प्रकल्पा आड येणारी झाडे कापण्यास सुरुवात झाली आहे. दोन झाडे कापण्यात आल्याचे पुरावेच यावेळी चव्हाण यांनी कुंटे यांना सादर केले. त्यामुळे याबाबतचा तातडीने अहवाल तयार करून आपल्याला सादर करावा तसेच झाडे कापल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे आदेश कुंटे यांनी उद्यान विभागाच्या अधिका-यांना दिल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.
मुंबई सारख्या शहरात उंचच उंच इमारत बांधून मुंबई सारखे शहर रशिया, टोकियो, लंडन आणि प्यरिस सारखे बनवून दाखवण्याची हिंमत येथील विकासकाने दाखविली पाहिजे. गरीब जनता झोपडपट्टीत राहतात त्यामुळे तेथील जनतेच्या सोयीसुविधेकरिता विकासकाने त्या झोपडपट्टीवाल्या रहिवाश्याना ताबडतोब इमारतीतील सदनिकेत जागा दिली पाहिजे, त्यामुळे आपली मुंबई सुधारण्यात येथील विकासकाला आणि सरकारला फार मोठी मदत होईल.