दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी होत आहे. पाणीटंचाईची तीव्र समस्या महाराष्ट्रातील विविध राज्यांत तसेच जिल्ह्यांमध्ये आढळून येत आहे. दिवसेंदिवस कमी होत जाणा-या पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. आणि त्यासाठीच याबाबत जनजागृती करून पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी महर्षी दयानंद महाविद्यालय एन.एस.एस. युनिटच्या स्वयंसेवकांनी डॉ. अविनाश कारंडे, कार्यक्रम अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम हाती घेतले.
एन.एस.एस.च्या स्वयंसेवकांनी आजूबाजूच्या परिसरात जाऊन ‘पाणी वाचवा’ या विषयाबाबत वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम केले. याची सुरुवात एन.एस.एस. युनिटने स्वत:पासून केली.
दरवर्षी आयोजित करण्यात येणा-या ‘स्फूर्ती’ ह्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेसाठी ‘पाणी वाचवा’ या संकल्पनेवर आधारित सर्व विषय ठेवण्यात आले होते. या महोत्सवात सुमारे ४३ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता.
अॅलेक्झिया मिशिल (हेड ऑप., वॉटर अॅण्ड स्लम्स डिपार्टमेंट, स्वीझ एनव्हार्नमेंट) या उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी होत्या. त्यांनी पाण्याच्या बचतीबाबत तसेच पाण्याच्या समस्यांबाबत पी.पी.टी. सादरीकरणातून माहिती सांगितली. तसेच एम.डी महाविद्यालयातील एन.एस.एस. युनिट राबवत असलेल्या ‘स्वप्नपूर्ती’ या प्रकल्पातील तिसरीत शिकत असणारी रिया जाधव या मुलीने शेतक-यांच्या आत्महत्यांविषयी भाषण केले.
या भाषणातून तिने शहरातील लोकांना ‘शहराकडील लोक पाणी साठवू शकत नाहीत, निदान पाणी वाचवू तरी शकतात, तेव्हा पाणी वाचवा आणि शेतक-यांना मदत करा.’ अशा प्रकारचा भावनिक संदेश सर्वाना दिला. दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान गणेशोत्सव मंडळामध्ये पथनाटयाद्वारे जनजागृती करण्यात येते.
आपल्याला अशा विविध प्रकारे पाण्याच्या बचतीचा संदेश कसा देता येईल आणि त्यासाठी इतरांची देखील मदत करता येईल हे दाखवून पाणी वाचवा हा संदेश देण्यात आला. त्याचबरोबर ‘पाणी वाचवा’ या विषयावर आधारित कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेत डॉ. राजेंद्र सिंग (मॅगसेसे पुरस्कार विजेते आणि स्टॉकहोम पुरस्कार विजेते) देखील उपस्थित होते. त्यांनी पाण्याची बचत आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्याच्या विविध पद्धतींवर भर दिला. तसेच दत्तक असलेल्या आदिवासी पाडयांमध्ये देखील वृक्षारोपण करून पाणी वाचवा तसेच भूृगर्भातील पाण्याची पातळी वाढवणे, इत्यादींबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘जलजागृती सप्ताह’ या उपक्रमातसुद्धा महाविद्यालयाने सहभाग घेतला. या सप्ताहाचे औचित्य साधून डॉ. अविनाश कारंडे यांनी सर्व एन.एस.एस.च्या स्वयंसेवकांना त्यांच्या व्हॉट्सअप आणि फेसबुकवर प्रोफाईल छायाचित्र म्हणून पाणी वाचवण्याच्या प्रतिज्ञेचे छायाचित्र ठेवण्यास सांगितले. त्याचसोबत रंगपंचमी खेळताना ओल्या रंगांचा वापर करण्याऐवजी सुक्या रंगाने होळी खेळण्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला.
स्वप्नपूर्ती या प्रकल्पातील विद्यार्थ्यांना दरवर्षी होळीच्या आधी ‘सुकी होळी’ साजरी करण्याचा संदेश दिला जातो. ‘पाणी वाचवा, पाणी जिरवा’, ‘आज रंग बरसे, कल पानी को तरसे’, ‘हरा, पिला, निला, गीला, पाणी के बिना भी बने त्योहार रंगीला.’ अशा घोषवाक्यांमार्फत आणि फलकांमार्फत जनजागृती करण्यात आली. त्याचसोबत पाणी वाचवण्याचे काही उपायही सांगितले गेले.
» दात घासताना व दाढी करताना पाण्याचा नळ बंद ठेवावा.
» नळावर पाणी भरताना रांगेत उभे राहून पाणी भरल्याने पाण्याची बचत होईल.
» भांडी धुतलेले पाणी जर बाथरूम धुण्यासाठी वापरले तर पाण्याचा पूर्ण वापर होऊ शकतो.
» प्रत्येकाने वर्षातून एक तरी झाड लावले तर जमिनीतील म्हणजे भूगर्भातील पाण्याच्या साठयामध्ये वाढ होईल.
» शेतीसाठी वा बागेसाठी आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर करावा.
अशा प्रकारचे उपाय पथनाटयाद्वारे सांगितले गेले. तसेच महाविद्यालयात, जागतिक पाणथळ दिननिमित्ताने लघुपट दाखवून जनजागृती करण्यात आली. अशाप्रकारे विद्यार्थी आपली परीक्षा, अभ्यास इत्यादी गोष्टी सांभाळून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत आहेत. या सर्व उपक्रमांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ही जलजागृती आम्ही या सप्ताहापुरती मर्यादित न ठेवता पुढेही करत राहू, असे कार्यक्रम अधिकारी डॉ. अविनाश कारंडे यांनी सांगितले.
ब्रावो ! Dr, avinash karande,,!