कॉलेजचे दिवस म्हटलं की, प्रत्येकांच्या डोळ्यांसमोर आठवणींचा अल्बमच नकळत तरळतो. टपरीवरचा चहा.. पैसे जमवून पेट्रोल भरणं.. केव्हाही उठून भटकंतीला जाणं, असे हे कॉलेजचे दिवस पुन्हा येत नाहीत. पण कॉलेज संपल्या संपल्या मुलांना जबाबदारीची जाणीव होऊ लागते. ती आपसूक होत नसल्यास घरचे तशी जाणीव करून देतातच. विद्यार्थीदशेतून बाहेर पडून नव्या जगाची ओळख करून घेत या तरुण पिढीला मोठं व्हावं लागतं. नवनवीन जबाबदा-या त्यांच्या अंगावर पडतात. पण या सगळ्यात तरुणाई स्वत:ला सांभाळून पुढे जाण्यासाठी पुढील आयुष्याची स्वप्नं पाहत असते.
अरे यार, कॉलेज संपलं.. आता काय? कॉलेज संपण्याची ही खंत तरुणाईला असते. कारण, कॉलेज लाइफ हा विद्यार्थीदशेतला शेवटचा टप्पा असतो. धम्माल, मस्ती, जल्लोष, सेलिब्रेशन हे सगळं कॉलेजमध्ये असतानाच मित्रमैत्रिणींसोबत करताना जी मजा असते, ती पुन्हा कधी अनुभवता येत नाही. पण कॉलेज संपल्यावर तरुणांना निश्चितच आपल्या ध्येयाच्या मार्गाने जावं लागतं. नुसती पदवी घेऊन उपयोग नसतो तर घेतलेल्या शिक्षणाचा सुयोग्य उपयोग करावा लागतो. स्वत:ला सिद्ध करण्यासोबतच आपण घरासाठी, दुस-यांसाठीही काही तरी करू शकतो हे दाखवायचे दिवस कॉलेजनंतरच सुरू होतात. चांगलं करिअर करायचं असतं, उत्तम नोकरी मिळवायची असते, खूप काही स्वप्नं असतात. काही वेळा स्वप्नांना स्पर्धाही आडवी येते. या स्पर्धेच्या जमान्यात स्वत:ला सिद्ध करणं म्हणजे मोठं आव्हानच. काहींची आर्थिक परिस्थिती बिकट असते म्हणून त्यांना नोकरी करावी लागते तर काहींना फक्त करिअर करण्यातच रस असतो. त्यातील काहींना शिकण्याची ऊर्मी इतकी असते की नोकरी आणि अभ्यास सांभाळून ते पुढे जात असतात. काही असेही असतात की ‘काही तरी कर’ असा घरातल्यांचा पिच्छा सुटावा म्हणून जीवावर येऊन नोकरी करतात. कॉलेज संपल्यानंतर अचानक पडलेल्या जबाबदारीचा सामना तरुणाई धडपडत का होईना, पण करत असते. जबाबदारीची जाणीव कोणी करून न देताही होत असते. तर काही तरुणांना ती जाणीव करून द्यावी लागते. पुढल्या जबाबदारीच्या टप्प्यात काहींना यश येतं तर काहींना अपयश. कॉलेज संपल्यानंतर म्हणजेच नोकरी मिळेपर्यंत जी दोन ते तीन वर्ष असतात त्यात संयम, आत्मविश्वास, निष्ठा, चिकाटी, मेहनत अंगी असणं आवश्यक असतं. या गुणांच्या आधारावरच तर त्यांना त्यांचं ध्येय गाठायचं असतं. आपल्याला काय करायचं आहे हे लक्षात ठेवूनच पावलं उचलावीत, तरच यश साध्य होतं हे या काळातच तरुणांना कळतं. जबाबदारीचं हे पारडं तरुणाई कशी सांभाळतात, त्यांना काय अडचणी येतात, त्यांच्या जबाबदा-याचं भान कसे ठेवतात, यावर तरुणांच्या या प्रतिक्रिया :
एक ब्रेक हवा होता!
कॉलेज सुरूच राहावं, असं मला नेहमी वाटायचं. जेव्हा नोकरी नव्हती तेव्हा नैराश्य आलं नाही कारण माझ्यावर कोणत्याही जबाबदाऱ्या नव्हत्या. पण आईवडिलांनी एवढं शिकवलं तरीही नोकरी नाही याचं वाईट वाटायचं, पण ते शक्य नव्हतं. तसंच आयटी क्षेत्रात शिक्षण झाल्यानंतर चांगली नोकरी कधी मिळेल याची उत्सुकता होती. त्यात मला दुस-या कोणत्याही क्षेत्रात नोकरी करायची नव्हती. तसंच कॉलेज सोडून काहीच दिवस झाले होते म्हणून लगेच कामाला लागायची इच्छा नव्हती. पण नंतर घरी बसून कंटाळा येऊ लागला आणि मी नोकरी शोधायला लागलो. कारण जबाबदा-या नसल्या तरी आईवडिलांच्या माझ्याकडून अपेक्षा होत्या. – नितेश डोळे
शिकत गेलो
कॉलेज संपल्याची खंत मला नक्कीच वाटते. कारण कॉलेजमध्ये टाइमपास, धम्माल करायला मिळायची. पण कॉलेज संपल्यानंतर आपण आपलं करिअर करावं असं वाटत होत. माझे बाबा नामांकित कंपनीत होते त्यामुळे मलाही एका नामांकित आणि चांगल्या हुद्दयावर काम करण्याची इच्छा होती. त्यासाठी मी अजून शिक्षण घेतलं. आता एका कंपनीत वेबसाइट डेव्हलपर म्हणून काम करतोय. कॉम्प्युटर सायन्स केल्यानंतर मला एक वर्षानंतर नोकरी मिळाली. पण मला त्याचं काहीच वाटलं नाही कारण नोकरी मिळेपर्यंत मी शिकत होतो. एकदा का नोकरी लागली की आपलं आयुष्य फक्त पळापळीचं होतं. मित्रमैत्रिणींना काय तर स्वत:लासुद्धा वेळ मिळत नाही. – चेतन तामणेकर, बेस्क्वेअर टेक्नॉलॉजी
मागे पडल्याची भावना होती !
कॉलेज झाल्यावर मी लगेच नोकरीची शोधाशोध केली. बी.एस्सी करूनसुद्धा सुरुवातीला मला नोकरी मिळत नव्हती. शेवटी मला एका बँकेत नोकरी मिळाली. खरं तर ती माझ्या क्षेत्रात नसल्यामुळे थोड नैराश्य आलं होतं. त्यात मला मिळणारं वेतनसुद्धा कमी होतं. माझ्या बी.एस्सीच्या बॅचमध्ये असलेल्या मित्रमैत्रिणींनी नोकरीबद्दल विचारल्यावर मला सांगायला खूप वाईट वाटायचं. कारण सगळीकडे स्पर्धा वाढली आहे आणि त्या स्पर्धेत मी कुठेतरी मागे आहे असं सतत वाटायचं. पण काही दिवसांनी मला माझ्या क्षेत्रातच नोकरी मिळाली. तसंच हळूहळू स्वत:ला सिद्ध करून दाखवण्यासाठी मला उत्तम संधी मिळत गेल्या. पण तो काळ माझ्यासाठी खूपच कठीण होता. – प्रियांका पाटकर
शिक्षण असूनसुद्धा नोकरी नव्हती!
शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी लगेच नोकरी शोधायला लागलो. कारण, माझ्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी माझ्यावर होती. बहिणीचं लग्न असल्यामुळे मला पैशांची जास्तीत जास्त सोय करावी लागणार होती. बहिणीच्या लग्नाचं चांगलंच दडपण आलं होतं. लगेच आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळावी अशी इच्छा होती. दोन वर्ष मला नोकरी मिळेच ना, पण शेवटी मला चांगल्या ठिकाणी नोकरी मिळाली. नोकरी लागेपर्यंत मनावर ताण असायचा आणि लगेच नोकरी न मिळाल्यामुळे थोडं नैराश्यही होतं. त्यात माझं शिक्षणही उत्तम होतं, तरीही नोकरी मिळत नव्हती म्हणून डोक्याला ताप वाटायचा. – धीरेन मकवाना, थॉमस कुक
शिक्षणाच्या फायद्यासाठी नोकरी केलीच
कॉलेजमध्ये असताना सारखं वाटायचं की मला चांगल्या ठिकाणी नोकरी मिळावी. कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन केल्यानंतर दोन वर्ष ग्राफिक आणि अॅनिमेशनचा कोर्स केला आणि मला लगेच नोकरी मिळाली. घराची जबाबदारी नव्हती पण आवड म्हणून नोकरी करत होते, कारण मला माझ्या जबाबदा-यांची जाणीव होती. आपण घेतलेल्या शिक्षणाचा काही तरी फायदा व्हावा असं नेहमी वाटायचं. – तृप्ती सातार्डेकर, पायोनिअर्स ऑफिस ऑटोमेशन
घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या
मी कॉमर्समध्ये शिक्षण घेतलं. नोकरी लगेच मिळावी अशी इच्छा नव्हती कारण मला थोडं एन्जॉय करायचं होतं. पण घरच्यांच्या अपेक्षेमुळे मी नोकरी शोधायला सुरुवात केली. बँकिंग क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती पण मला सुरुवातीला बँकेत नोकरी मिळाली नाही. एका कंपनीत मला नोकरी मिळाली खरी, पण त्यात मला अजिबात आवड नव्हती. एका वर्षाने मला बँकेत नोकरी मिळाली. मी चांगली नोकरी मिळवण्यासाठी सतत शोधात राहिलो. – रूपेश बाने, आयसीआयसी बँक
ज्या विद्यार्थ्यांना शिकण्याची आवड आहे आणि पैशाची चणचण सुद्धा आहे, कारण शिक्षण घ्यायचे म्हणजे पैसा आलासच, अशा विद्यार्थ्यांना नोकरी करून शिकण्याची इच्छा सुद्धा असते. पण आजकाल दुसऱ्या राज्यातील व्यक्तीसुद्धा नोकरीनिमित्ताने मुंबई सारख्या शहरात येतात आणि मुंबईतील मुला, मुलींचा हक्क हेरावून घेतात. खास तर त्यांचे नातेवाईक इथे प्रचंड प्रमाणात पसरलेले आहेत. तुम आजा ओ यहा खानेपिनेके साथ रहेनेका भी बंदोबस्त किया है. ती व्यक्ती वरीष्ठास विश्वासात घेते आणि बाहेरून आलेल्या आपल्या व्यक्तीस किमान १० ते १५ दिवसात आपल्या ठिकाणी कामास ठेवते. अशाने ज्या व्यक्तीची कुठेही ओळख नाही अशी व्यक्ती महिनाभर, वर्षभर फेऱ्या मारत राहते. जेव्हा एखादी कंपनी त्यांना ठेवण्यास तयार होते, त्यावेळेस त्यांची मानसिक स्तिथी बिघडलेली असते. आपणास सर्व येत असूनहि ती व्यक्ती मुलाखतीच्या वेळेस निष्क्रिय ठरते. खरोखरच आपल्या जन्मभूमीत राहूनही कित्येक अशा तरुण, तरुणींना त्यांच्या हक्काची जागा कधीच मिळत नाही. त्यामुळे खाजगी कंपनीतसुद्धा रहिवाशी दाखला घेऊनच त्या व्यक्तीस कामावर ठेवावे, हि नम्र विनंती.