कोकणातील मातीही बहुगुणी म्हणून ओळखली जाते. या प्रदेशात विविध प्रकारची फळे सापडतात. त्यातील आंबा, काजू आणि नारळ या फळांनाच बागायती फळ म्हणून मान्यता प्राप्त झाली. मात्र अशी अनेक फळपिके आहेत ज्यांची व्यावसायिक तत्त्वावर लागवड केली जाऊ शकते. या फळझाडांच्याही बागायती उभ्या राहू शकतात. यापैकी एक म्हणजे जांभूळ पीक. रानमेवा एवढीच ओळख असलेले जांभूळ हे औषधी गुणधर्माचे फळ आजतागायत व्यावसायिक दृष्टिकोनातून दुर्लक्षित राहिलेले आहे. कोकणात या पिकाला पोषक वातावरण आहे. कोकण कृषी विद्यापीठाने या पिकाची जात विकसित केली असून तिची लागवड केल्यास शेतक-यांना भरघोस उत्पादन मिळू शकेल. बाजारपेठेत वाढती मागणी पाहता हे पीक शेतक-यांच्या आर्थिक उन्नत्तीमध्ये मोलाचा हातभार लावू शकेल, हे नक्की.
जांभूळ हे औषधी गुणधर्म असलेले, पण दुर्लक्षित असे फळपीक म्हणावे लागेल. अगदी हिमालयापासून ते तामिळनाडूपर्यंत या फळझाडाचे अस्तित्व आढळते. बहुतांशी सर्व प्रकारचे हवामान या पिकाला मानवते. त्यामुळे हवामानाबाबत फारशी अडचण या पिकाच्या मार्गात येत नाही. आजवर दुर्लक्ष झालेल्या या पिकाचे व्यावसायिक महत्त्व दिवसेंदिवस वाढू लागले आहे. भारतात विविध प्रकारची जांभळाची झाडे आढळतात.
वाढत्या व्यावसायिक महत्त्वाच्या पार्श्वभूमीवर नाशिक, पाचोरा, जळगाव या भागांत मोठय़ा प्रमाणावर लागवड होऊ लागली आहे. औषधी गुणधर्म आणि उत्तम इमारती लाकूड ही जांभूळ वृक्षाची वैशिष्टय़े. त्यामुळे शेतक-यांना याचा दुहेरी फायदा होऊ शकतो. डोंगरद-यात वसलेल्या कोकणात या पिकाला मोठा वाव आहे, मात्र यात हा प्रदेश मागे पडत असल्याचे चित्र आहे.
प्रकिया उद्योगासाठी महत्त्वाचे ठरणा-या जांभळापासून स्क्वॅश, सिरप, नेकटर यासारखे पदार्थ केले जातात. फळापासून तयार केलेले सिरप अतिसारावर गुणकारी ठरते, तर जांभळाच्या बियांची भुकटी मधुमेहावर उपकारक ठरते.
कोकणात विविध प्रकारची फळपिके होतात. मात्र मुख्यत: आंबा, काजू, आणि नारळ यांचीच व्यापारी शेती केली जाते. जांभूळ लागवडीतील प्रमुख अडसर चांगली जात, दर्जेदार रोपे आणि योग्य हंगातात तयार होणारे उत्पादन हा आहे. प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले येथील संशोधनाच्या आधारे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने महाराष्ट्रातील पहिली ‘कोकण बहाडोली’ नावाची अधिक उत्पन्न देणारी व मोठी फळे देणारी जांभळाची जातीची कोकणात लागवडीसाठी शिफारस केलेली आहे. या जातीची फळे २३.४० ग्रॅम वजनाची टपोरी असून त्यात ८७ टक्के गराचे प्रमाण आहे.
बियांचे वजन ३.१ ग्रॅम इतके कमी आहे. फळांचा रंग गर्द जांभळा आहे. परिपक्व फळे चार दिवस टिकतात. या कोकण बहाडोलीची मृदुकाष्ठ कलमेही विद्यापीठामार्फत मोठय़ा प्रमाणात तयार करून शेतक-यांना उपलब्ध करून दिली जात आहेत. जांभूळ पिकाची लोकप्रियता तसेच औषधी गुणधर्म आणि इमारती लाकूड यामुळे भविष्यातील मागणी लक्षात घेऊन अनेक शेतक-यांनी व्यापारी तत्त्वावर या पिकाची लागवड करण्यास सुरुवात केली आहे. जळगाव, पुणे, ठाणे, नाशिक या जिल्हय़ांमध्ये जांभूळ लागवडीचे प्रमाण वाढत आहे. नाशिकचे साहेबराव तिडके, वाणगाव ठाणेचे विवेक शहा, पाचोरा जळगावचे आर. ओ. पाटील यांनी यापूर्वीच ‘कोकण बहाडोली’ या जातीची लागवड करून उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या ६-७ वर्षातील या लागवडीपासून पाटील यांना या वर्षी २० टन उत्पादन अपेक्षित आहे. पाटील यांनी अर्धा-एक किलो पॅकिंग करून याचा विक्री व्यवसायही सुरू केला आहे. १०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री केल्यास याची उलाढाल किती होतेय, हे लक्षात घ्या.
मात्र, असे भरभरून उत्पन्न घेण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने संशोधनाअंती शिफारस केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करायलाच हवा. कलमापासून केलेल्या लागवडीमध्येदेखील फळधारणा होण्यास उशीर लागतो. तसेच काही वेळा अत्यल्प फळधारणा झालेली दिसते. वरील शेतक-यांनी या विविध अडचणींबाबत विद्यापीठाशी संपर्क साधल्यावर या शेतक-यांच्या सहकार्याने त्यांच्याच शेतावर विद्यापीठाने याबाबत संशोधन गेल्या दोन वर्षापासून सुरू केले आहे. या संशोधनाला उत्तम यश आलेले असून या शेतक-यांना अपेक्षित उत्पन्न मिळू लागलेले आहे.
यामध्ये प्रामुख्याने उंच वाढणा-या झाडांची शेंडा छाटणी करून वाढ नियंत्रित ठेवणे, दुय्यम किंवा तृतीय फांद्यांना गर्डलिंग (खाच पाडणे) करून या झाडांना चांगली फूल व फळधारणा करणे याचा अंतर्भाव आहे. वाढ नियंत्रित राहिल्यामुळे फळे काढणे सोयीचे होते आणि गर्डलिंगमुळे अपेक्षित उत्पन्न पावसापूर्वी घेण्याचे नियोजन करता येते.
लागवडीबाबत शिफारशी
विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे जांभळाची लागवड १० मीटर बाय १० मीटर वर न करता ७ बाय ७ किंवा ८ बाय ८ मीटरवर करावी. जेणेकरून एकेरी जास्त कलमे लावता येतील. घाटणीने आपण कलमांची वाढ नियंत्रित ठेवू शकतो. या अंतरावर १ मीटर बाय १ मीटर व १ मीटर आकाराचे खड्डे खणून लागवड करावी. हे खड्डे दोन घमेले माती, चांगले कुजलेले शेणखत, दीड किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि १०० ग्रॅम मिथिल पॅरॉथिऑन पावडरच्या मिश्रणाने एप्रिल-मे महिन्यात भरून घ्यावेत.
अशा खड्डय़ांमध्ये पावसाच्या सुरुवातीला डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून मृदुकाष्ठ कलमे आणून लागवड करावीत. लागवडीनंतर पहिली दोन वर्षे प्रत्येक कलमास पाणी द्यावे. योग्य निगा राखल्यास सातव्या वर्षापासून उत्पन्न येण्यास सुरुवात होते.
भविष्यात मोठी व्यावसायिक उलाढालीची क्षमता असलेल्या या बागायतींसाठी शेतक-यांनी तयारीला लागायला हवे. अजूनपर्यंत रानमेवा एवढय़ापुरतेच मर्यादित राहिलेल्या या पिकाची सर्वाधिक आर्थिक उलाढाल असलेल्या फळामध्ये समावेश झाल्यास आश्चर्य वाटू नये.
मला हा लेख ज्याने लिहिला आहे .त्याचा मोबिल नंबर हवा आहे . किवा पाटील ज्यांनी
जांब ळची लागवड केली आहे .त्यांचा नंबर हवा आहे . मीळे ल का?
मो.9527737943
मेल santoshmore1234@yahoo.co.in