मुंबईच्या ‘नाईट लाईफ’ला कायदेशीर मान्यता देण्याचा खटाटोप सुरू झालेला आहे. मुंबईत ‘नाईट लाईफ’ नाही अशी कोणाची समज असेल तर, तो भ्रम आहे. बेकादेशिररित्या सर्व धंदे सुरू आहेत त्याला कायदेशीर मान्यता दिली तर या मुंबईत रात्रभर धिंगाणे घालायला पैसेवाले मोकळे आहेत आणि राजकीय फायद्यासाठी धर्म, संस्कृती आणि चारित्र्याचे ठेकेदार असलेली शिवसेना या ‘नाईट लाईफ’चे प्रायोजक बनत आहे याला मुंबईकरांनी विरोध केला पाहिजे
मुंबईच्या ‘नाईट लाईफ’ची चर्चा तीन आठवडयांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी सुरू केली आणि गेल्याच आठवडयात मुंबई उच्च न्यायालयाने या नाईट लाईफमधले धोके महाराष्ट्रासमोर आणले. मुख्य प्रश्न सुरक्षेचा. महिलांना सुरक्षा कशी देणार? आणि दुसरा प्रश्न मुंबईतल्या पोलिसांवर पडणा-या ताणाचा. आज मुंबईच्या पोलिसांवर कमालीचा ताण आहे.
वाहतूक पोलिसांची कीव यावी इतके सकाळी ८ ते रात्री दहा वाजेपर्यंत ते रस्त्यावर आहेत. ती सुद्धा माणसेच आहेत. पण नाईट लाईफच्या विषयासंदर्भात न्यायालयाने उपस्थित केलेले मुद्दे तकलादू आहेत.
उद्या सरकारने असे सांगितले की, मुंबईच्या सध्याच्या पोलीस यंत्रणेवर ताण न येता आम्ही स्वतंत्र व्यवस्था करू आणि महिलांनाही सुरक्षा देऊ, तर न्यायमूर्तीनी उपस्थित केलेले मुद्दे गळून पडू शकतील.
जेव्हा मुबईच्या नाईट लाईफचे विषय ‘पोलिसांचा ताण’ किंवा ‘महिलांची सुरक्षा’ एवढयापुरते मर्यादित नाहीत. त्या पलीकडे मुंबईच्या सांस्कृतिक आणि सभ्य जीवनाला कायद्याने धटिंगण बनवायचे का, हा यात मुख्य प्रश्न आहे.
पैसेवालेच नाईट लाईफचा धिंगाणा करतील. बाकीच्या गरीब मुंबईने या फंदात कशाला पडावे? घरी शांत बसावे, असे सल्ले देण्यात येत आहेत. पण एकूण हे शहर पैसेवाल्यांच्या मुजोरीवरच आता कुरतडले जात असताना एकदा का ही नाईट लाईफ ‘राजमान्य राजर्षी’ झाले की त्यातून आदित्य ठाकरे यांच्या वयाची मुले तुम्हाला रात्र-रात्र या ठिकाणी वावरताना दिसतील.
एवढेच नव्हे तर पैसेवाल्यांची दिवसा मुजोरी आहेच. पण मग ही मुजोरी रात्रभर धिंगाणा घालेल. आणि म्हणून मुख्य प्रश्न महिलांच्या संरक्षणाचा नसून किंवा पोलिसांवर पडणाऱ्या ताणाचा नसून हे नाईट लाईफ कोणाला हवे आहे, कोणत्या वर्गाला हवे आहे आणि ते का हवे आहे, या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत आणि त्या मानाने सुरक्षित आणि सभ्य असलेल्या मुंबईला आणखीन बकाल आणि आणखीन धिंगाण्याचे शहर होऊ द्यायचे नसेल तर हे नाईट लाईफ मुंबईला कायद्याने नको आहे, हे सांगण्याची वेळ आलेली आहे.
आज बाळासाहेब ठाकरे असते तर तो छोटा आदित्य त्यांच्यासमोर उभा राहिला असता तर त्याला ते म्हणाले असते, ‘अरे आदित्य बाळा, हे असले धंदे तुला का सुचले आहेत?’ आदित्यने प्रबोधनकारांचे लेख वाचावेत.
पणजोबांपासून त्याला खूप शिकता येईल. आजोबांपासून खूप शिकता येईल. या तरुण मुलांनी हा महाराष्ट्र, ही मुंबई अधिक सुसंस्कृत, अधिक चारित्र्यसंपन्न आणि चांगल्या लोकांचे शहर करण्याऐवजी नाईट लाईफचे धंदे यांच्या डोक्यात आले कुठून? आदित्य हे तुझे वय नाही, हे तुला स्पष्टपणे सांगण्याची गरज आहे.
चांगले वाच, चांगले लिही. प्रबोधनच्या जुन्या अंकांचा अभ्यास कर. बाळासाहेबांच्या मार्मिकमधील व्यंगचित्रांचा अभ्यास कर. आज बाळासाहेब असते तर त्यांनीच या नाईट लाईफच्या विरोधात असे काही व्यंगचित्र चितारले असते की त्यांच्या त्या ‘फटका-याने’ हे सगळे बार, पब आणि धिंगाण्याच्या जागा बंद झाल्या असत्या.
आता मुंबईच्या नाईट लाईफला कायदेशीर मान्यता मिळवून देण्यासाठी महापालिकेतला सत्तारूढ शिवसेना पक्ष अधीर झालेला आहे. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांना पुढे करून या मुंबईच्या नाईट लाईफला महापालिकेच्या सर्व परवानग्या मिळवून देण्याची योजना सुरू झालेली आहे. निरनिराळ्या उपाहारगृहांची श्रेणी आणि वेळा महानगरपालिकेच्या अधिकारात येतात.
महानगरपालिकेला या नाईट लाईफसाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवावा लागेल. सेनेचा आग्रह असल्यास भाजपा सरकारला हा प्रस्ताव स्वीकारावा लागेल. या प्रस्तावाचे जसे सेनावाले आग्रही आहेत, त्याची कारणे मुंबईतल्या बारवाल्यांशी निगडित आहेत.
बारवाल्यांना रात्रभर धिंगाणा घालायचा आहे आणि त्यातून फार मोठा पैसा जमावण्याची ही एक संधी बारवाल्यांना मिळणार आहे आणि मग राजकीय पक्षांचे आणि अशा धंदेवाल्यांचे आर्थिक संबंध कसे असतात हे काही लपून राहिलेले नाही.
या स्थितीत जर सेना आणि भाजपावाले एक होऊन या मुंबईच्या नाईट लाईफला कायदेशीर मान्यता देणार असतील तर लोकांनाच रस्त्यावर उतरून याला विरोध करावा लागेल.
आर. आर. पाटील गृहमंत्री असताना त्यांनी अनेक लोकांचा विरोध पत्करून डान्सबार बंदी विधेयक आणले. कारण या डान्सबारच्या मागे अनेक गोष्टी दडलेल्या होत्या. पैशांची उधळण करणारा एक वर्ग समाजात असतो आणि त्यांच्यासाठीच हे डान्सबार आहेत.
जर पनवेलच्या पुढे कोन गावापर्यंत गेलात तर तिथे डान्सबारसाठी कुठून कुठून आणि कोण कोण लोक येतात आणि कोणकोणत्या गाडयांतून येतात, याची माहिती घेतली तर हे नाईट लाईफ कोणासाठी आणि कशासाठी आहे, समाजाला विकृतीने कसे ग्रासलेले आहे याचा अंदाज येऊ शकेल.
खरे म्हणजे सेना-भाजपावाले संस्कृतीचे आणि चारित्र्याचे ठेकेदार आहेत, अशी जाहिरात करत असतात. चुकून का होईना जर काँग्रेसवाल्यांपैकी कोणीही अशा नाईट लाईफचा पुरस्कार केला असता तर हे ‘संस्कृती रक्षक’ सेना-भाजपावाले काँग्रेसवर तुटून पडले असते आणि रोखठोक आणि सच्चाईमध्ये काय काय लिहिले गेले असते.
आज या नाईट लाईफबद्दल सच्चाई काही लिहीत नाही. पण संस्कृतीचे रक्षक असल्याचा ठेका घेतलेले हेच लोक आता नाईट लाईफचा पुरस्कार कसा काय करू शकतात आणि तो कशाकरिता याची कारणे मुंबईकरांना हळूहळू कळू लागलेली आहेत.
या विषयात फार मोठी आर्थिक गुंतवणूक आहे. डान्सबारमध्ये काम करणाऱ्या मुलींची वाहतूक करणाऱ्या टोळया आहेत. त्या टोळयांचे संबंध फार विचित्र लोकांशी जुळलेले आहेत.
आज हे मुंबईचे ‘नाईट लाईफ’ अजून कायदेशीर झालेले नाही. तसे ते पॅरिसमध्ये कायदेशीर आहे. पण कोणाला जर असे वाटत असेल की, कायद्याने बंदी असलेले ‘नाईट लाईफ’ मुंबईत बंदच आहेत, तर ती खोटी समजून आहे.
मुंबईत काळोख पडल्यानंतर फोर्ट विभागाला कोणाचा घेराव पडलेला असतो, जहांगिर आर्ट गॅलरीपासून ओव्हल मैदान आणि ओल्डकस्टमपर्यंत एवढया विभागात रात्री उशिरापर्यंत काय काय चालते, याचा सगळा तपशील पाहिला तर या नाईट लाईफने मुंबईकरांना आताच मोहपाशात ओढलेले असल्याचे दिसेल.
गेल्या काही वर्षात मुंबईच्या फोर्ट परिसरात ‘मसाज’च्या नावावर जी सेंटर चालवली जातात, तिथे काय काय धंदे होतात? ती सेंटर्स कोणाची आहेत? त्यावेळच्या सायंवृत्तपत्रांमध्ये त्याच्या उघडपणे जाहिराती येत होत्या.
मुंबईच्या पोलिसांना हे धंदे कुठे कुठे चालतात, त्यांच्यामागे कोण कोण आहेत, याचा सगळा तपशील माहिती आहे. पण असे असूनही पोलिसांमधली जी अॅन्टीसोशल ब्रॅच (समाज विघातक कृती विरोधातली शाखा) अधून मधून छापे टाकून, आपण काम करतो आहोत, असे दाखवित असते.
परंतु ‘रात्रीची मुंबई’ ही पूर्णपणे पोखरलेली आहे. संध्याकाळ झाल्यानंतर पूर्व-पश्चिम मार्गावरील बस थांब्यांवर काय काय चालते याचेही तपशील या सगळ्या लोकांकडे आहेत.
गाण्याबजावण्याच्या बैठका कुठे कुठे होतात, हेही पोलिसांना माहिती आहे. ‘तीन पत्ता’ नावाचा जो प्रकार आहे त्यामध्ये किती करोड रुपये गुंतवणूक होते, तेही मुंबईला नवीन नाही.
ही सगळी माहिती असताना महापालिकेने मुंबई ‘स्वच्छ’ करण्यासाठी कंबर कसायला हवी होती. त्याऐवजी मुंबईच्या नाईट लाईफला अधिकृत मान्यता देण्याचे काम आता होत असताना, त्या विरोधात कोणताही राजकीय पक्ष आवाज उठवत नाही. हे ‘नाईट लाईफ’ कोणत्या वर्गाला हवे आहे.
आदित्य ठाकरे यांचे वय काय? त्यांच्यासारख्या तरुणाने या विषयाचा पुरस्कार करणे हे त्यांच्या राजकीय कर्तृत्वाला कमीपणा आल्याचे लक्षण आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी या ‘नाईट लाईफ’चा पुरस्कार केला असता का आणि आदित्यला हे करू दिले असते का आदित्यचे पालक म्हणून उद्धव ठाकरे आणि आदित्यच्या मातोश्री रश्मीताई यांना तरी हे कसे काय चालते? घरात ते चर्चा करत असतील की नाही. आपला मुलगा कशाचा पुरस्कार करतो आहे, एवढे तरी आई-वडिलांना माहिती असायला हवे.
रतन खत्रीचा मटका
नाईट लाईफशी जो समाज जोडला जाणार आहे, तो बाकी सगळ्या अपप्रवृत्तींशी आपोआप जोडला जाणार आहे. मुंबईमध्ये आज दारूत खर्च होणारा पैसा दिवसाला कोटय़वधी रुपये आहे.
दारूंची दुकाने उघडण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर या दारूच्या उलाढालीत कित्येक जणांचे संसार बरबाद झालेले आहेत. रतन खत्रीचा मटका जेव्हा होता तेव्हा मुंबईतल्या कष्टक-यांना या मटक्याचे व्यसन लागले होते.
या मटक्याने हजारो कुटुंबे उद्ध्वस्त केली. त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी मटका बंद करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्यावर केवढा मोठा आर्थिक दबाव आला होता. त्यावेळच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींपर्यंत हा दबाव पोहोचला होता.
परंतु श्रीमती इंदिरा गांधींनी रतन खत्रीला अटक करण्याचे आदेश दिले. आणि समाजाला कीड लागलेली एक दृष्ट प्रवृत्ती मोडीत काढण्यात आली. राज्यकर्त्यांला समाजाच्या हितासाठी हे निर्णय घ्यावे लागतात आणि ते खंबीर असावे लागतात.
आज दुर्दैवाने समाजात मूल्यांची घसरण झपाटयाने सुरू झालेली आहे. चारित्र्यसंपन्न नेत्यांची वाण सगळीकडे आहे. कोणाकडे पाहून समाजाने जगायचे, अशी माणसे समाजात आज दिसत नाहीत.
अशावेळी चैनबाजीमध्ये पैसा उडवण्याच्या प्रवृत्तीला पायबंद घालण्याऐवजी या विकृत कल्पना यांना कशा काय सुचू शकतात? आणि त्याचे समर्थन कसे काय करू शकतात.
विकृत, घातक विचार
आज कुणाचा असा समज असेल की मुंबईत ‘नाईट लाईफ नाही’, तर ते कायद्याने नाही एवढेच. उद्या शिवसेनेने या नाईट लाईफला महापालिकेमार्फत कायद्याची मंजुरी दिली रे दिली की या मुंबईत राजरोसपणे रात्री धिंगाणे सुरू राहतील.
म्हणून या ‘नाईट लाईफ’ला नुसताच विरोध करून चालणार नाही तर हा विकृत विचार समाजाला घातक कसा आहे आणि तो का समोर आणला जातोय, यावरही घाव घालण्याची गरज आहे.
अगदी स्पष्ट सांगायचे तर आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकरिता शिवसेनेची ही एक खेळी आहे. कारण आता मराठी-मराठी करून शिवसेना फार मोठे यश मिळवू शकेल अशी स्थिती राहिलेली नाही.
मुंबईत फक्त वीस टक्के मराठी मतदार शिल्लक राहिले आहेत. हे मुंबई शहर पोखरून टाकणाऱ्या अशा सगळ्या चुकीच्या धंदेवाल्यांना पाठी घालण्याचा हा एक विकृत विचार सेनेने पुढे आणलेला आहे. तो सर्वशक्तीने हाणून पाडला पाहिजे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर मुंबई शहराची एक प्रतिमा आणि प्रतिष्ठा आहे, ती प्रतिष्ठा जपण्याकरिता ‘मुंबईचे पॅरिस’ होऊ देता कामा नये. शिवाय मुंबई ही मराठी माणसांच्या राज्याची राजधानी आहे.
मराठी माणसाच्या नावावर मते मागणा-यांनी तरी महाराष्ट्राला असल्या भिकमाग्या आणि दळभद्री विचारापासून दूर नेले पाहिजे आणि याचा विरोध केला पाहिजे.
तीच मराठी अस्मितेची भाषा करणारी माणसे पैसेवाल्यांच्या चैनबाजीसाठी नाईट लाईफच्या नावाचा मुंबईत धिंगाणा सुरू करणार असतील तर ज्या विचाराने बाळासाहेबांनी शिवसेना सुरू केली त्या विचाराला मूठमाती देण्याचे काम हीच मंडळी करीत आहेत, हे स्पष्टपणे सांगण्याची वेळ आलेली आहे.
आज बाळासाहेब असते तर म्हणाले असते की, ‘अरे कसले नाईट लाईफ, डे लाईफ आधी चांगले करा.’ बाळासाहेबांचा विचार आम्ही पुढे नेतो आहोत, असे सांगणा-यांनी तरी अशा नाईट लाईफचा पुरस्कार करू नये.
काय करणार आजोबा ? कधी कधी माझी जवानी उफाळून येते,त्या साठी हा प्रयत्न करतोय ,!