बेकायदेशीर तक्रारींबाबत केवळ सेलिब्रेटी असल्यामुळे कपिलची दखल मुख्यमंत्र्यांपासून महापालिका आयुक्तांनी घेतली. त्यामुळे कपिल बोले, सीएम डोले आणि कमिशनर हाले,अशी अवस्था शुक्रवारी पहायला मिळाली.
मुंबई- सामान्य माणसांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवली जाते. सेवा सुविधा आणि अधिका-यांविरोधात असलेल्या लेखी तक्रारींची कोणत्याही प्रकारची दखल न घेणा-या मुख्यमंत्री आणि महापालिका प्रशासन यांनी हास्य कलावंत कपिल शर्मा याने ट्विटरवर केलेल्या तक्रारीनंतर एकच पळापळ सुरु झाली. मुख्यमंत्री, महापालिका आयुक्तांनी चौकशीचे फर्मान सोडले. परंतु महापालिकेच्या दप्तरी लेखी स्वरुपातील तक्रारींची दखल घेऊन त्यावर कार्यवाही करण्याची प्रथा आणि परंपरा आहे.
ट्विटर यात कुठेही मोडत नसून बेकायदेशीर तक्रारींबाबत केवळ सेलिब्रेटी असल्यामुळे कपिलची दखल मुख्यमंत्र्यांपासून महापालिका आयुक्तांनी घेतली. त्यामुळे कपिल बोले, सीएम डोले आणि कमिशनर हाले,अशी अवस्था शुक्रवारी पहायला मिळाली.
कपिल शर्मा याने महापालिकेच्या कर्मचा-यांवर केवळ ट्विटरद्वारे तक्रार केली तर त्यांची दखल घेतली जाते. परंतु सामान्य माणूस अशाप्रकारे तक्रारींसाठी महापालिका इमारतीच्या पाय-या झिजवत असतात. त्यांची दखल घेतली जात नाही. त्यामुळे कायदेशीर मान्यता नसलेल्या ट्विरवरील तक्रारींची दखल घेतल्यामुळे याबाबत सामान्यजनांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
महापालिकेच्या जाणकारांच्या मते ट्विटरवरील तक्रारी स्वीकारण्याचे कोणतेही आदेश नाही. याला कोणतीही कायदेशीर मान्यताही नाही. खुद्द प्रमुख अभियंता (दक्षता)मनोहर पवार यांनी ट्विटरला कायदेशीर मान्यता आहे किंवा नाही हे तपासले जाईल असे सांगत हा विषय टाळण्याचा प्रयत्न केला.
सामान्य माणसांनी ट्विटरवर तक्रारी करायच्या काय?
कपिल शर्मा हा सेलिब्रेटी आहे, म्हणून त्याच्या तक्रारीची दखल घेतली. परंतु अशाप्रकारे गरीबांकडून महापालिकेचे अधिकारी ५ ते २५ हजार रुपयांची लाच घेत असतात. परंतु याची नोंद कुणी घेत नाही. कपिलच्या माध्यमातून महापालिकेतील भ्रष्टाचार बाहेर आला आहे. ट्विटर वरील तक्रारींना जर कायदेशीर मान्यता नाही तर मग त्यावरील तक्रारींची दखल कशी घेतली जाते? सामान्य माणसांनी पण आता ट्विटरच तक्रारी करायच्या काय?
प्रविण छेडा, विरोधी पक्षनेते, महापालिका
त्यांनी नावे द्यावी, आम्ही कारवाई करतो
शर्मा यांनी कोणाला लाच दिली त्यांची नावे त्यांनी जाहिर करावी. त्यांची चौकशी करून आम्ही त्यावर कारवाई करू. लाच देणे आणि लाच घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे तेही तेवढेच दोषी आहे. त्यांना जर वाटत असते तर त्यांनी ते आयुक्तांची भेट घेऊन बांधकाम अधिकृत करून घ्यायला हवे होते. परंतु ते अनधिकृत असल्यामुळेच ते अशाप्रकारे पैसे देऊन काम करत असतील.
तृष्णा विश्वासराव, सभागृहनेत्या, महापालिका
भ्रष्टाचा-यांची चौकशी व्हायलाच हवी
शर्मा यांच्या तक्रारीची गंभीर दखल मुख्यमंत्री, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी घेतली आहे. त्यांनी जर अनधिकृत बांधकाम केले असेल तर त्यांचे बांधकाम तोडायलाच हवे. पण त्याबरोबरच भ्रष्टाचारी कर्मचा-यांचीही कारवाई व्हायला हवी
मनोज कोटक, गटनेता, भाजपा महापालिका
तर कपिलविरोधात अब्रु नुकसानीचा दावा दाखल करावा
कपिलने जर महापालिकेच्या कर्मचा-यांविरोधात लाचखोरीचा आरोप केला असेल तर त्यांनी त्यांची नावे जाहिर करावी. जर ही नावे जाहिर करत नसेल तर कपिल विरोधात महापालिकेने १०० कोटींचा अब्रुनूकसानीचा दावा करावा
संदीप देशपांडे, गटनेता, मनसे महापालिका
सर्वसामान्यांच्या तक्रारींनाही हाच न्याय द्यावा
कपिलच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री आणि महापालिका प्रशासनाची यंत्रणा हलली. असाच न्याय आता सामान्य जनतेला मिळायला हवा. सामान्य जनतेच्या तक्रारी सोडवतानाही ही यंत्रणा हलली गेली पाहिजे. मुंबईत अनधिकृत बांधकामे मोठय़ाप्रमाणात होत आहेत. त्यांच्या तक्रारींकडेही लक्ष दिले गेले पाहिजे, पण ही महापालिका सर्वसामान्यांसाठी नसून श्रीमंत,धनदांडग्या आणि सेलिब्रेटीज यांच्यासाठीच आहे
धनंजय पिसाळ, गटनेता, राष्ट्रवादी काँग्रेस
I am paying 15 cr income tax from last 5 year n still i have to pay 5 lacs bribe to BMC office for making my office @narendramodi
— KAPIL (@KapilSharmaK9)
Yeh hain aapke achhe din ? @narendramodi
— KAPIL (@KapilSharmaK9) September 9, 2016
Kapilbhai pls provide all info.
Have directed MC,BMC to take strictest action.
We will not spare the culprit.@KapilSharmaK9 @narendramodi— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis)
अत्यंत अकार्यक्षम मुख्यमंत्री. पुण्यात भाजपचे 8 आमदार निवडून देऊनसुद्धा पुण्याला भकास ठेवले ह्याने. पुण्याच्या विकासाबाबत, मेट्रोबाबत काडी सुद्धा हलवली नाही ह्याने. सगळं पैसे राज्याचा फक्त नागपूरकडे पाठवितो हा….