वडिलांनी दिलेला वारसा पुढे जपत त्यात शैक्षणिक आधार घेत वीणा खाडिलकर यांनी कीर्तनाच्या स्वरूपात अनेक गावागावांत सामाजिक कार्य केले आहे. युवा कीर्तनकार म्हणून नावारूपास आलेल्या वीणा यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलं आहे.
‘महाराष्ट्राला संतांची भूमी असं म्हटलं जातं. महाराष्ट्रातील चार संप्रदायांनी एकत्र येऊन सामाजिक सलोखा, समाज जागृती व सांस्कृतिक पिढी घडवण्याचे महान कार्य अखंड चालू ठेवले आहे व कायम चालू राहणार आहे, त्यासाठी मी व आमचा कीर्तनकार परिवार सजग व जागृत होऊन कार्य करत आहोत’, असं म्हणणं आहे एका युवा कीर्तनकार महिलेचं. संगीत आणि संस्कृत या विषयात एम. ए. केलेल्या वीणा त्यागराज खाडिलकर या गावोगावी जाऊन अनेक सामाजिक विषयांवर कीर्तन करतात.
त्यांच्या वडिलांकडून त्यांना कीर्तनाची प्रेरणा मिळाली, असं त्या म्हणतात. शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व संत यांच्या जीवनचरित्रावरही त्या कीर्तन करतात. त्यासाठी त्यांचा या विषयांवर गाढा अभ्यास आहे. त्या केवळ कीर्तनकार नसून उत्तम संगीत शिक्षिकादेखील आहेत. त्यागराज म्युझिक अॅकॅडमी या संस्थेत त्यांनी जवळपास ५०हून अधिक विद्यार्थ्यांना संगीताचे धडे दिले आहेत.
मुंबई, पुणे आदी कलेच्या माहेरघरात त्यांच्या त्यागराज म्युझिक अॅकॅडमीच्या शाखा आहेत. त्यांच्या या संस्थेला पं. भीमसेन जोशी, भारतरत्न लता मंगेशकर यांनी शुभेच्छा भेट दिली आहे. अपंग, अंध महिला तसेच गरीब विभागात जाऊन त्या मोफत संगीताचं शिक्षण देतात. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून पुण्यामध्ये कीर्तनाच्या स्पर्धाही आयोजित केली जाते. अनेक मराठी चॅनेलवरही त्यांनी त्यांचे कीर्तन सादर केले आहे.
मात्र इतर अनेक लोककल्याणांच्या मानाने या कलेला शासन व माध्यमांमध्ये विशेष स्थान प्राप्त होण्याची नितांत गरज आहे, असं त्यांना वाटतं. समाजातले कीर्तनकार हा स्वत: सामाजिक व राष्ट्रीय कार्य करत असतो. समाजात दुष्काळ असो नैसर्गिक आपत्ती असो की बेटी बचाव असो, अशा अनेक विषयांवर कीर्तनकार गावोगाव जागृतीचे महान कार्य करत आहेत. याचाच अर्थ समाजहित जोपासत समाजाला योग्य वळण लावण्याचं काम कीर्तनकार करत असतात. परंतु या कलेला म्हणावा तसा प्रतिसाद शासनाकडून दिला जात नाही.
परंपरा जपत सामाजिक भान जपणा-या कलेकडे अगदी कमी लोकांचा कल पाहायला मिळतो. परंतु युवा कीर्तनकार म्हणून मान मिळवलेल्या वीणा खाडिलकर यांनी ही प्रथा मोडीत काढत त्यांचं स्वत: विश्व या कीर्तन क्षेत्रातच निर्माण केलं आहे. तेव्हा अशा कलेला विशेष प्राधान्य देण्याची गरज आहे. या लोप पावत चाललेल्या कलेस विविध मार्गाने कार्यरत करण्याची गरज आहे, असंही त्यांचं म्हणणं आहे.
त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. महाराष्ट्र शासन कीर्तन शिबिर १९८७, अखिल भारतीय कीर्तनकार संमेलन १९९२, कुरुक्षेत्र विकास बोर्ड १९९३, ‘युवा कीर्तनकार’ करवीर पीठ शंकाराचार्य आदी पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं आहे.
स्नेहा कोलते
अभिनंदन !