सुमारे १५० वर्षे इंग्रजांच्या ताब्यात असलेल्या भारताला काँग्रेसने अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवून दिले होते.
ठाणे- सुमारे १५० वर्षे इंग्रजांच्या ताब्यात असलेल्या भारताला काँग्रेसने अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवून दिले होते. त्यानंतरही गांधी-नेहरूंच्या विचाराने देश एकसंघ राहिला. काही निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर भारत काँग्रेसमुक्त करण्याच्या घोषणा भाजपा करत आहे.
१९७८ मध्ये इंदिरा गांधी, संजय गांधी यांच्यासह काँग्रेसचे मोठमोठे नेते पराभूत झाले, मात्र तरीही १९८० मध्ये देशात काँग्रेसची सत्ता आली. या इतिहासाची आता पुनरावृत्ती होणार असून काँग्रेसमुक्त भारताचे भाजपाचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली.
ठाण्यातून होणा-या विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे आघाडीचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पवार बोलत होते.
या बैठकीला उमेदवार वसंत डावखरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर, माजी मंत्री गणेश नाईक, काँग्रेस नेते जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार आनंद परांजपे आदी प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
पवार म्हणाले की, जोगेश्वरीत शनिवारी झालेल्या शिवसेना भाजपाच्या बैठकीत जे नगरसेवक युतीच्या उमेदवाराला मते देणार नाहीत, त्यांची राजकीय कारकीर्द संपवण्याची भाषा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यांचा हा आत्मविश्वास चांगला आहे, मात्र तो काही कामाचा नाही, असे म्हणत पवार यांनी मुख्यमंत्र्यांवरही टीका केली. सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केलेल्या प्रचंड जाहिरातबाजीवरही त्यांनी टीका केली.
यावेळी बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी डावखरे यांचा विजय पक्का असल्याचे सांगत काँग्रेसची १०० टक्के मते त्यांना मिळतील अशी ग्वाही दिली. तर शिवसेना भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यामुळेच त्यांच्यावर धमक्या देण्याची वेळ आल्याची टीका त्यांनी केली. निवडणुकीत सुरू असलेल्या घोडेबाजारावरही त्यांनी टीका केली.
नगरसेवक पैशाने विकले जातात, हे दुर्दैवी आहे. भ्रष्टाचाराचा डाग एकदा लागला की तो कुठल्याही साबणाने पुसला जात नाही, असे सांगतानाच प्रामाणिकपणे काम करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. वसंत डावखरे यांच्या रुपाने आघाडीने ठाण्यात उजवा उमेदवार दिला आहे. त्यांना निवडून देत ठाण्यापासून विजयाची सुरुवात करा आणि शिवसेना भाजपाचे बुरे दिन सुरू करा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर यांनीही वसंत डावखरे यांच्या पाठिशी आपली संपूर्ण ताकद असून त्यांचा विजय पक्का असल्याचे सांगितले. डावखरे यांना आपण नेहमीच पाठिंबा दिला असून ते आपले जुने मित्र आहेत. मध्यंतरी बविआच्या पाठिंब्याबाबत ब-याच अफवा उठल्या. काही लोक मला येऊन भेटले, मात्र मी डावखरेंना शब्द दिला, असे ठाकूर म्हणाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी डावखरे यांचा विजय केवळ औपचारिकता म्हणून बाकी आहे. डावखरे यांचे सगळयांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध, त्यांची काम करण्याची तळमळ पाहता त्यांनाच निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी युती सरकारवरही त्यांनी तोंडसुख घेतले.
सरकारला दुष्काळाचे गांभीर्य नसून कर्जमाफी न दिल्याने अजूनही शेतकरी आत्महत्या करत आहेत. व्यापा-यांवरही ‘एकही भूल, कमल का फूल’ म्हणण्याची वेळ आली आहे. देशाच्या सगळया घटकांमध्ये नाराजी असून सरकार विरोधकांना संपवण्याचा घाट घालत आहे. या परिस्थितीत आपली संख्या वाढवणे गरजेचे असून त्याची सुरुवात ठाण्यातून करा, असे चव्हाण म्हणाले. नारायण राणे यांच्यामुळे विधीमंडळात आपला आवाज प्रखर होणार आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
युती सरकारवर टीका करताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे म्हणाले की, सरकारने दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रचंड जाहिरातबाजी केली. आपण अनेकदा सत्तेत आलो, पण अशी जाहिरातबाजी करण्याची वेळ आपल्यावर कधी आली नाही, अशी टीका तटकरे यांनी केली.
‘ठाणे माझ्यासाठी लकी!’
या बैठकीपूर्वी काँग्रेस लोकप्रतिनिधींच्या बैठकीत बोलताना नारायण राणे यांनी ठाणे आपल्यासाठी ‘लकी’ असल्याचे सांगितले. ठाण्याची जबाबदारी मिळाल्यानंतर विधानपरिषदेची उमेदवारीही मिळाली, त्यामुळे ठाणे आपल्यासाठी ‘लकी’ असून ठाणे शहरात आगामी काळात खूप काही करण्यासारखे असल्याचे ते म्हणाले.
विधानपरिषदेत वाघ आला!
प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांनी आपल्या भाषणात नारायण राणे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच आता विधानपरिषदेत वाघ आला, अशा शब्दांत त्यांनी राणे यांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रात सध्या सरकार चुकीच्या पद्धतीने कारभार करत असून राणे विधिमंडळात आल्याने सरकारवर अंकुश निर्माण होईल, असे कदम म्हणाले.
राणे जे बोलतात ते करतात!
या बैठकीत बोलताना विधान परिषदेचे उमेदवार वसंत डावखरे यांनी नारायण राणे यांच्या आक्रमक कार्यशैलीचे कौतुक केले. राणे यांचा करिष्मा वेगळाच असून त्यांच्या येण्याने ठाण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आले आहे. राणे जे बोलतात ते करतात, त्यामुळे मला आता चिंता करण्याची गरज नाही, असे डावखरे म्हणाले. शिवाय नारायण राणे आता विधिमंडळात येणार असल्याने विधीमंडळ ख-या अर्थाने जिवंत होईल, असे म्हणत आगामी काळात पुन्हा आघाडीचे सरकार येवो आणि त्याचे नेतृत्व नारायण राणे यांना मिळो, अशा शब्दांत डावखरे यांनी राणे यांना शुभेच्छा दिल्या.
Jai Ho…
Sarvana Aata pasun अभिनंदन
अभिनंदन साहेब