जलसंधारण ही काळाची गरज झाली आहे. यापूर्वी ही गरज नव्हती, तर मानवाने घ्यावयाची दक्षता होती. पण ती न घेतली गेल्याने आज ती गरज बनली.
जलसंधारण ही काळाची गरज झाली आहे. यापूर्वी ही गरज नव्हती, तर मानवाने घ्यावयाची दक्षता होती. पण ती न घेतली गेल्याने आज ती गरज बनली. पाणी हे जीवन आहे. जन्म घेणा-या प्रत्येकाला जगण्यासाठी पाणी हा एक अत्यावश्यक घटक आहे. हा अमृतरूपी साठा आपल्या भावी पिढीसाठी राखून ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. आज पाण्याची परिस्थिती पाहता भविष्यातील ही धोक्याची घंटा आहे. दरवर्षीचे दुष्काळाचे सावट पाहता शेतीसाठी पाण्याचे जतन करावेच लागेल. यासाठी पाण्याचा एकही थेंब वाया जाणार नाही याची काळजी शेतक-यांपासून सर्वानीच घेणे आवश्यक आहे. लवकरच पावसाळा सुरू होत आहे. पावसाचे अधिकाधिक पाणी जमिनीत मुरवून पाण्याचे संवर्धन करू शकतो. यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.
गेल्या ५० वर्षात दरडोई पाण्याची उपलब्धता एक-तृतीयांशने कमी होत आहे. पावसाच्या प्रमाणात वर्षागणिक होत चाललेली घट यामुळे दरवर्षीच देशातील अनेक भाग दुष्काळाच्या छायेत असतात. म्हणूनच शेती आणि दररोजच्या वापरासाठी पाण्याचे नियोजन व्हायलाच पाहिजे. यावर जलसंधारण हाच एकमेव उपाय आहे.
शहरी असो वा ग्रामीण प्रत्येकाने पाण्याच्या नियोजनाबाबत जागृत झाले पाहिजे. अशा नियोजनामध्ये मग योग्य सिंचन पद्धतीचा अवलंब, घरगुती पाण्याचा वापर, सांडपाण्याचा पुनर्वापर, विहीर पुनर्भरण व रेनवॉटर हार्वेस्टिंग आदी पाणीबचतीचे उपाय करून पाणी समस्या कमी करता येईल. विहिरीतीलच नव्हे तर कालव्याच्या पाण्याचाही अपव्यय होताना दिसतो. मोठमोठया धरणांत साठवलेले पाणी कालव्यातून किंवा पाटातून पिकांना सोडले जाते. पण सद्य:स्थितीत ७० टक्के पाणी फक्त दोन टक्के बागायतदारच वापरताना दिसतात. जमिनीखालील पाणी उपसण्यासाठी यंत्रे तुटून पडलेली दिसतात. प्रत्येक शेतक-याच्या शेतात चार-दोन कूपनलिका असतात. शहरातही हीच स्थिती. यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खालावत असून एका शेतात किती बोअर घ्यावयाच्या, किती खोलीपर्यंत ती असावी यावर मर्यादा हवी. शिवाय विहीर पुनर्भरण, बोअर पुनर्भरण, जलशोषक खड्डे याद्वारे भूगर्भात पाणी जिरवले तरच जमिनीतील पाण्याची पातळी टिकून राहील.
रेनवॉटर हार्वेस्टिंगने साठवलेले पाणी संरक्षित पाणी म्हणून पिकासही वापरता येईल. वारंवार दुष्काळास बळी जाणा-या राज्यांमध्ये मोठया प्रमाणात सार्वजनिक रेनवॉटर हार्वेस्टिंग टेक्नॉलॉजीचा वापर करून पाणी साठवले जाते. इस्त्रायल या छोटय़ा देशाने पाण्याचे नियोजन कसे असावे याचा वस्तुपाठच जगाला घालून दिला आहे. यामुळेच कसदार जमीन नसतानाही या देशाने कृषी क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे. भारतातील शेतक-याने विविध मशागतीच्या पद्धती, पीकपद्धती वापरून मृदा आणि जलसंधारण केले पाहिजे. सामान्य नागरिकांनीसुद्धा सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी प्रयत्न करावा.
(लेखक कृषी विद्यावेत्ता, मृद्शास्त्रज्ञ आहेत.)
Rainwatar हार्वेस्टिंग हि खर्चिक बाब असल्यामुळे जर ग्रामपंचायतीने यात लक्ष घातले आणि थोडीफार मदत केली, व त्याचे महत्व सगळ्यांना पटवून दिले तर जनता नक्कीच भाग घेईल. त्याची सुरुवात प्रथम ग्रामपंचायत कार्यालय पासूनच करायला हवी आहे.
ग्रामपंचायत करेलच असे नाही कारण त्याच महत्व खेड्यात प्रथम पटवून सांगावे लागेल. त्या ऐवजी ओढ्यांना बंधारे घालावेत शाळेतील व एन.एस.एस. मार्फत श्रम कार्य करुन प्रथम कृती करून दाखवावी.
काही नवीन प्रयोग सुचतील तर कळवा…