आधी लोकल ट्रेनचा पेंटाग्राफ तुटल्यामुळे आणि त्यानंतर दिव्यात संतप्त रेल्वे प्रवाशांनी केलेल्या रेल रोको आंदोलनामुळे सहा तासांपासून बंद असलेली मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरु झाली आहे.
कल्याण – आधी लोकल ट्रेनचा पेंटाग्राफ तुटल्यामुळे आणि त्यानंतर दिव्यात संतप्त रेल्वे प्रवाशांनी केलेल्या रेल रोको आंदोलनामुळे सहा तासांपासून बंद असलेली मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरु झाली आहे. दुपारी साडेबाराच्या सुमारास सहा तासानंतर दिवास्थाकातून सीएसटीच्या दिशेने पहिली गाडी रवाना झाली. ट्रॅकवर जमलेल्या आंदोलकांना हटवल्यानंतर रेल्वे वाहतूक सुरु करण्यात आली.
दिव्यात प्रवाशांनी रेल्वे रुळावरुन उतरुन केलेल्या रेल रोको आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने परिस्थिती अधिकच चिघळली. कोपर ते ठाकूर्ली दरम्यान लोकल ट्रेनचा पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.
या दरम्यान रेल्वे स्थानकांवर जमलेल्या प्रवाशांना उदघोषणेव्दारे कोणतीही माहिती दिली गेली नाही. बराचवेळ थांबूनही लोकल येत नाही तसेच माहितीही मिळत नसल्याने दिवा स्थानकातील संतापलेले प्रवाशी ट्रॅकवर उतरले. यावेळी प्रवाशांनी लोकलच्या दिशेने दगडफेक सुरु केली. त्यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.
आंदोलकांनी दिवा स्थानकाबाहेर पोलिसांची एक गाडीही पेटवून दिली. दरम्यान पेंटाग्राफमधील बिघाड दुरुस्त झाल्याची माहिती रेल्वेचे जनसंर्पक अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली. मात्र परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले नसल्याने, रेल्वे वाहतूक सुरु होऊ शकली नव्हती. काही समाजकंटकांनी या परिस्थितीचा फायदा उचलून हिंसाचार करण्याचा प्रयत्न केला असे नरेंद्र पाटील यांनी सांगितले. दिव्यामध्ये परिस्थिती बिघडलेली असताना, कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानकांवर तणावपूर्ण शांतता होती.
या प्रकारामुळे कामावर निघालेल्या लाखो प्रवाशांचे हाल झाले तर, रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी उसळली होती. नववर्षाच्या दुस-याच दिवशी मध्य रेल्वेने लोकल प्रवाशांना मनस्तापाची भेट दिली. कोपर ते ठाकूर्ली दरम्यान लोकल ट्रेनचा पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.
ऐन कामावर निघण्याच्यावेळी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांचे हाल झाले. कोपर ते ठाकुर्ली दरम्यान सीएसटीच्या दिशेने जाणा-या आणि कल्याणच्या दिशेने जाणा-या गाडया जलद मार्गावर वळवण्यात आल्या होत्या.
बदलापूरहून सीएसटीला चाललेली लोकल पेंटाग्राफ तुटल्याने कोपर ते ठाकूर्ली दरम्यान बंद पडली. त्यामुळे धीम्या मार्गावर कल्याणच्या दिशेने जाणा-या आणि सीएसटीला जाणा-या गाडया खोळंबल्या.
गाडी बराचवेळ जागची हलत नव्हती तसेच स्पष्ट सूचना मिळत नव्हती त्यामुळे कल्याणच्या दिशेने जाणा-या गाडयांमधील प्रवाशांनी अखेर ट्रॅकवरुन पायी चालत इच्छित स्थानक गाठले. मध्य रेल्वे मार्गावरील लोकल वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडल्याने, रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी उसळली होती.
Very unfortunate for commuters to suffer on Central Rail. Directed GM to sort out the grievances ASAP. Diva to CST feasibility studied now
— Suresh Prabhu (@sureshpprabhu)
Suburban rail network is under severe stress. Long neglected.Drawing up plan to revamp it on top priority. Need time to implement.Huge task
— Suresh Prabhu (@sureshpprabhu)
जेव्हा कधी ट्रेन मध्येच बंद होते सकाळच्या वेळी त्यावेळी ती दुरुस्त करण्यापेक्षा तिला इंजिन लावून बाजूला का घेत नाही .त्याच प्रमाणे मधली स्टेशन्स जसे की दिवा, डोंबिवली किंवा कल्याण वरून अतिरिक्त ट्रेन का सोडत नाही जेणेकरून लोकांना त्रास कमी होईल. ह्यात एकाच आहे एक तर स्टेशन मास्तर ला अधिकार नसेल किवा त्याला करायचा नसेल. आजच घ्या ना जर सकाळच्या वेळी एखादी ट्रेन दिवा स्टेशन वरून सोडली असती तर एवढा तमाशा झाला नसता. जे नुकसान झाले त्याला माथेफिरू प्रवासी जबाबदार तर आहेच पण त्याच बरोबर संबधित रेल्वे अधिकारी पण तेवढेच जबाबदार आहेत. लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका नाही तर बाहेर फिरायचे मुश्किल होईल.