केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या दोन नव्या गाड्या लवकरच कोकण रेल्वे मार्गावरून धावणार आहेत.
रत्नागिरी- केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या दोन नव्या गाड्या लवकरच कोकण रेल्वे मार्गावरून धावणार आहेत. तिरुवनंतपुरम- हजरत निझामुद्दीन आणि कोचुवेली-लोकमान्य टिळक टर्मिनस अशा या दोन गाड्या आहेत. एक जुलैला बदलेल्या रेल्वे वेळापत्रकानुसार या गाड्या धावणार आहेत.
यातील केरळमधील तिरुवनंतपुरमहून दिल्लीला जाणारी तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन ही साप्ताहिक (२२६३३) दर बुधवारी त्रिवेंद्रमहून दुपारी २.४० वाजता सुटून शुक्रवारी दुपारी २.२० वाजता ती दिल्लीला हजरत निजामुद्दीन स्थानकावर पोहोचेल. हजरत निजामुद्दीन-तिरुवनंतपुरम मार्गावरील प्रवासासाठी ही गाडी (२२६३४) दर शुक्रवारी रात्री ११.४० वाजता सुटून सोमवारी पहाटे ३.१० वाजता तिरुवनंतपुरमला पोहोचेल. ही गाडी कोकण रेल्वे मार्गावर मडगाव, पेडणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, चिपळूण तसेच पुढे पनवेल, वसई सुरत आदी स्थानकांवर थांबणार आहे. या गाडीला सहा स्लीपर, चार वातानुकूलित थ्री टायर, दोन वातानुकूलित टू टायर, सहा दुस-या श्रेणीचे सर्वसाधारण तर दोन गार्ड आणि ब्रेक व्हॅन याप्रमाणे डब्यांची रचना असेल. या गाडीमुळे कोकणातून मुंबई तसेच दिल्लीकडे जाण्यासाठी नव्या सुपरफास्ट गाडीचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
दुसरी नवीन गाडी कोचुवेली ते मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणार आहे. या दोन्ही गाड्या रेल्वेने नव्या वेळापत्रकाप्रमाणे धावणार आहेत. या दोन्ही गाडय़ांची प्रारंभाच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील, असे रेल्वेने म्हटले आहे.
या वर्षी कोकणातून दक्षिणेला जाणाऱ्या ३ नवीन गाड्या सुरु झाल्या. पण कोकणासाठी एकही नवीन गाडी नाही.
केवळ चिपळूण,रत्नागिरी,कणकवली आणि कुडाळ या चार स्थानाकांपुरती कोकण मर्यादित नाही.
फक्त नावातच कोकण आहे. काही वर्षांनी हे नाव पण बदलतील.