दिवसें दिवस बदलत असलेल्या तंत्रज्ञानाचा फायदा घेत आता मुंबई पोलिस हायटेक होत आहेत.
मुंबई – दिवसें दिवस बदलत असलेल्या तंत्रज्ञानाचा फायदा घेत आता मुंबई पोलिस हायटेक होत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हेगारांचे लोकेशन शोधून काढण्याचा नवीन उपक्रम उत्तर प्रादेशिक विभागात नुकताच सुरू करण्यात आला आहे.
या उपक्रमामुळे गुन्हेगारांचे लोकेशन आणि पोलिसांनी घटनास्थळी जाऊन केलेल्या पाहणीची माहिती सहज मिळू शकणार आहे. या सर्वाची नोंद ठेवून गुन्हेगारांवर पोलिसांचे वेळोवेळी लक्ष राहणार आहे.
उत्तर प्रादेशिक विभागात बहुतांश झोपडपट्टी येत असल्याने तेथे चो-या, घरफोडय़ा, सोनसाखळी चोरी, लुबाडणूक या गुन्ह्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली होती. बहुतांश गुन्हेगार उत्तर प्रादेशिक विभागात पसरलेल्या झोपडय़ांमध्येच लपून बसलेले असत.
याबाबत तपासाकरता किंवा आरोपींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांना स्थानिक नागरिक सहकार्य करत नसल्याचे अनेक प्रकरणांतून पुढे आले आहे. तर आरोपी खोटी माहिती देऊन पोलिसांना चकवा देतात. अशा वेळी त्या आरोपींना शोधणे कठीण असते. ही बाब लक्षात घेऊन उत्तर प्रादेशिक विभागात गुन्हेगारांचे लोकेशन शोधून काढण्याचा नवीन उपक्रम अतिरिक्त आयुक्त किशोर जाधव यांनी सुरू केला आहे.
मुंबईतल्या बहुतांश पोलिसांकडे अँड्रॉइड मोबाइल आहेत. त्यांनी घटनास्थळी जाऊन व्हॉट्स अॅपमधील लोकेशन संबंधित अधिका-यांना व्हॉटस अॅपवर ऑनलाइन पाठवायचे. या लोकेशनची नोंद पोलिस अधिकारी ठेवतात. त्यामुळे एखादी घटना घडल्यास तेथील संशयित आरोपीचे लोकेशन समजण्यास पोलिसांना सोपे झाले आहे.
तसेच ऑनलाइन लोकेशन पाठवल्यावर खरेच तो पोलिस शिपाई तेथे गेला होता का हेही यावरून स्पष्ट होते. भविष्यात त्या गुन्हेगाराने पुन्हा गुन्हा केल्यास त्याला तेथून शोधून काढता येणे शक्य होणार आहे. तसेच द्रुतगती महामार्गावर अपघात झाल्यावर तो कोणत्या ठिकाणी झाला आहे. त्या ठिकाणापासून जवळचे पोलिस ठाणे किती अंतरावर आहे. याची माहिती मिळणे सुलभ होणार आहे.
अशा प्रकारचा हा उपक्रम मुंबईत प्रथमच सुरू करण्यात आला आहे. यामुळे गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवणे आणि कर्मचा-यांची कामगिरी तपासून पाहणे याकरता ही लोकेशन पद्धत फायदेशीर ठरत आहे. याचा फायदा काही गुन्ह्यांचा छडा लावण्यात झाला आहे.
– किशोर जाधव, अतिरिक्त पोलिस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग
तपासाकरता किंवा आरोपींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांना स्थानिक नागरिक सहकार्य करत नसल्याचे विधान चुकीचे आहे. जर एखादा आरोपी आपल्यावर अन्याय करत आहे म्हणून जर पोलिस चौकीत साधा फोन केला तरी ४ते ५ फोन नंतर फोन उचलला जातो. नंतर तेथील अधिकाऱ्याकडून उत्तर येते कि तुम्ही चौकीत फोन का केला? फक्त १०० नंबर लावा ५ते १० मिनिटात आमचे अधिकारी घटना स्थळी येतील. १०० नंबर लावला कि तेथील कर्मचारी विभाग विचारतात, घटना कोणत्या विभागात घडली, पत्ता सांगा. ज्या हवालदार साहेबांची ड्युटी त्या विभागात आहे, ते त्या विभागात उपलब्ध नसतात. जरी ते त्या विभागात ड्युटीवर असले तरी त्यांना रहिवाशी राहतो तेथील पत्ता माहित नसतो. मुंबईतल्या बहुतांश पोलिसांकडे अँड्रॉइड मोबाइल दिले आहेत, त्यांचे नंबर तेथील स्थानिक गुंडाकडे उपलब्ध असतात आणि एखाद्या निर्दोष व्यक्तीस अडकवण्याकरिता ते त्यांच्याशी थेट संपर्क साधतात. मुंबई पोलिस म्हटल्यावर तोंडातून चकार शब्द हि न काढता बिचारा गरीब व्यक्ती मार खात राहतो आणि पैसे भरत बसतो. जो व्यक्ती प्रथम पोलिस चौकीवर येईल त्याची तक्रार आम्ही प्रथम घेऊ असा हजेरी जबाब चौकीत दिला जातो. म्हणजे उद्या एखाद्या व्यक्तीस मारहाण करून तो व्यक्ती प्रथम पोलिस चौकीत पोहोचला म्हणजे तो निर्दोष असा समज पोलिस चौकीतील बड्या अधिकाऱ्यांचा आहे. जोगेश्वरी येथील पोलिसचौकीत तर तेथील रात्रपाळीतील कर्मचाऱ्यांकरिता करमणुकीचे साधन टेलीविजन ठेवले आहे. जेथे आपण तक्रार नोंदवितो त्या अधिकाऱ्याच्या डोळ्यासमोरच टेलीविजन बसवलेला आहे आणि त्या करिता सीसीटीवि हि लावलेला आहे, पण वरिष्ठ अधिकारी सुद्धा या गोष्टींकडे काना डोळा करीत आहे. अशाने का गुनेहागारीला चाप बसणार आहे का ?