मराठा समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि ‘सामना’चे संपादक उद्धव ठाकरे यांनी गुडघे टेकत माफी मागितली.
मुंबई- मराठा समाजाचे मूक मोर्चे अत्यंत शांततामय मार्गाने निघत असताना दै. ‘सामना’मध्ये मराठा समाजाच्या महिलांची विटंबना करणारे व्यंगचित्र काढून त्यांची बदनामी करण्यात आली होती. या व्यंगचित्रातून महिलांचाही अपमान करण्यात आला होता. त्यावरून सकल मराठा समाजातून अत्यंत संतप्त प्रतिक्रिया उमटून शिवसेनेच्या काही मराठा लोकप्रतिनिधींनीही राजीनामे दिल्यावर अखेर या संतापापुढे गुडघे टेकत शिवसेना पक्षप्रमुख आणि ‘सामना’चे संपादक उद्धव ठाकरे यांनी माफी मागितली आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांचा माफीनामा म्हणजे शिवसेनेला उशिरा सुचलेले शहाणपण आहे, असा टोला काँग्रेसने लगावला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दै. ‘सामना’मध्ये २५ सप्टेंबरच्या अंकात मराठा मोर्चात सहभागी होणा-या महिलांचा अपमान करणारे व्यंगचित्र प्रसिद्ध झाले होते. या हीन व्यंगचित्राबद्दल मराठा समाजातून अत्यंत संताप व्यक्त केला जात होता. शिवसेनेमधील दोन आमदार आणि एका खासदाराने आपल्या पदाचा राजीनामाही दिला होता. उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाची माफी मागावी, अशी मागणी करण्यात येत होती. इतक्या मोठय़ा प्रमाणात संपात व्यक्त होत असतानाही ‘उद्धव ठाकरे किंवा दै. ‘सामना’ने माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही.’ अशी भूमिका शिवसेनेच्या वतीने उद्योगमंत्री तथा शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी जाहीर केली होती.
दै. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनीही व्यंगचित्राकडे व्यंगचित्र म्हणूनच पाहा, माफी मागण्याचा प्रश्न येतोच कुठे? असे उद्दाम आणि उद्धट वक्तव्य केले होते. त्यामुळे तर मराठा तरुणाईच्या मनात संतापाचा लाव्हा दिवसेंदिवस खदखदत होता. अखेर चौथ्या दिवशी ज्यांनी व्यंगचित्र काढले त्या श्रीनिवास प्रभूदेसाई यांच्यावर दबाव आणून त्यांची ‘दिलगिरी’ दै. ‘सामना’मधून प्रसिद्ध करत शिवसेनेने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. तरीही मराठा समाजाच्या मनातील संताप कमी होत नव्हता. पक्षाचे प्रमुख आणि ‘सामना’चे संपादक म्हणून उद्धव ठाकरे यांनीच माफी मागितली पाहिजे, अशी मागणी होत होती. मुंबई महापालिका आणि राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा संताप महाग पडणार याचा अंदाज आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाच्या संतापासमोर गुडघे टेकत सपशेल माफी मागितली.
शिवसेना भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपला माफीनामा सादर केला.
दुसरयाने केलेल्या चुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी संपादक म्हणून माफी मागने त्यांचा मनाचा मोठेपणा आहे