उन्हाळी सुट्टीसाठी कोकणात जाणा-या प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर ९२ विशेष फे-या चालवण्यात येणार आहेत.
मुंबई- उन्हाळी सुट्टीसाठी कोकणात जाणा-या प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर ९२ विशेष फे-या चालवण्यात येणार आहेत. कोकणात नियमित जाणा-या गाडयांना मोठया प्रमाणात प्रतीक्षायादी सुरू असल्याने उन्हाळी विशेष गाडयांचा फायदा प्रवाशांना होणार आहे.
[poll id=”1318″]
त्यामुळे कोकणात जाणा-या प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल, असा विश्वास कोकण रेल्वेकडून व्यक्त करण्यात येत आहे. या विशेष फे-या लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी, दादर ते सावंतवाडी व दादर-झारप या स्थानकांदरम्यान चालवण्यात येणार आहेत.
यामध्ये ०१००५ ही वातानुकूलित विशेष गाडी १ एप्रिल ते ३ जून या काळात लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकातून दर शुक्रवारी मध्यरात्री १.२४ वाजता रवाना होऊन करमाळी स्थानकात सकाळी ११.३० वाजता दाखल होईल.
परतीच्या प्रवासादरम्यान ०१००५ ही गाडी दर शुक्रवारी करमाळी स्थानकातून दुपारी १.१० वाजता रवाना होऊन रात्री १२.२० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकात दाखल होईल. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम या स्थानकांत थांबे दिले आहेत.
तसेच ०१०९५ दादर-सावंतवाडी ही गाडी दर रविवार, मंगळवार आणि शुक्रवारी सकाळी ७.५० वाजता १७ एप्रिल ते ७ जून या काळात चालवण्यात येणार आहे. तर परतीच्या प्रवासाकरता ०१०९६ ही गाडी १८ एप्रिल ते ८ जून दरम्यान दर सोमवार, बुधवार आणि शनिवारी सावंतवाडी स्थानकातून पहाटे ४.५० वाजता रवाना होऊन दादर स्थानकात दुपारी ०३.५० वाजता दाखल होईल.
या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, अरवली रोड, संगमेश्वर, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झारप या स्थानकांत थांबे देण्यात आले आहेत.
याशिवाय, ०१०३३ ही गाडी १८ मार्च ते १५ एप्रिल दरम्यान दर रविवार, मंगळवार आणि शुक्रवारी दादर स्थानकातून सकाळी ७.५० वाजता रवाना होऊन झारप स्थानकात सायंकाळी ७.५५ वाजता दाखल होईल.
तर परतीच्या प्रवासाकरता ०१०३४ ही गाडी १९ मार्च ते १६ एप्रिल काळात दर सोमवार, बुधवार आणि शनिवारी झारप स्थानकातून पहाटे ५ वाजता रवाना होऊन दादर स्थानकात दुपारी ३.५० वाजता दाखल होईल. ही ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, अरवली रोड, संगमेश्वर, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ या स्थानकांत थांबेल. अद्याप या गाडयांचे आरक्षण सुरू झाले नसून लवकरच याबाबत घोषणा करण्यात येणार आहे.
होळी हा सण कोकणात प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात साजरा होतो पण होळी सणासाठी सोडलेल्या जादा गाड्यांना संगमेश्वर, आरवली ,विलवडे,राजापूर,वैभववाडी येथे थांबा देण्यात आला नाही ह्यामुळे कोकणात होळीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांचा हिरमोड झाला आहे कोकण रेल्वे ने हि चूक त्वरित सुधारून रत्नागिरी जिल्यात ह्या गाड्यांना थांबे द्यावे.