आफ्रिकेतील नामिबियात शुक्रवारी सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान झाले. देशातील या मतदानाचे भारताच्या दृष्टीने नोंद घेण्याची बाब म्हणजे…
विंडहोक- आफ्रिकेतील नामिबियात शुक्रवारी सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान झाले. देशातील या मतदानाचे भारताच्या दृष्टीने नोंद घेण्याची बाब म्हणजे या देशात प्रथमच इलेक्ट्रॉनिक यंत्राद्वारे मतदान घेण्यात आले आणि ही यंत्रे भारताने तयार केलेली आहेत. यासह संपूर्ण आफ्रिका खंडात इ-वोटिंगद्वारे निवडणुका घेणारे नामिबिया हे पहिले राष्ट्र बनले आहे.
याआधी आफ्रिका खंडातील केनियाने प्रायोगिक तत्त्वावर मतदान यंत्राचा वापर केला होता. मात्र संपूर्ण निवडणुकांमध्ये इ-वोटिंगचा वापर नामिबियानेच प्रथम केला आहे. यासाठी संपूर्ण देशात चार हजार मतदान केंद्र उभारण्यात आली होती. मतदानाची प्रक्रिया तब्बल १४ तास सुरु होती असे, अधिका-यांनी सांगितले.
यंत्राद्वारे मतदान करण्यास आलेल्या नव मतदारांना नवी पद्धत लगेच समजत होती. मात्र वृद्ध मतदारांना ही पद्धत समजावून काही वेळ लागत होता असे निवडणूक केंद्रावरील अधिका-याने सांगितले.
देशातील सत्ताधारी एसडब्लूएपीओ पक्षाला पुन्हा एकदा सत्तेत येण्याचा विश्वास आहे. विशेष म्हणजे १९९०मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेली २४ वर्षे हाच पक्ष सत्तेत आहे.
या निवडणुकीत देशातील मतदार नॅशनल असेम्ब्लीसाठी ९६ सदस्यांची आणि एका अध्यक्षाची निवड करतील. अध्यक्षपदासाठी एकूण नऊ उमेदवार रिंगणात आहेत.
नामिबिया देशाबद्दल जाणून घ्या
हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश असून १९९०मध्ये दक्षिण आफ्रिकेने नामिबियाला स्वातंत्र्य मंजूर केले. त्याआधी म्हणजे पहिल्या महायुद्धापर्यंत नामिबिया जर्मन साम्राज्याची वसाहत होता. महायुद्धातील पराभवानंतर लीग ऑफ नेशन्सने नामिबियाचा ताबा दक्षिण आफ्रिकेकडे दिला. त्यानंतर २३ वर्षे स्वातंत्र्यासाठी संघर्षकरून हा देश स्वातंत्र झाला.
विंडहोक ही नामिबियाची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे. हा देश नामिब आणि कालाहारी या वाळवंटांदरम्यान वसला आहे. देशातील बहूतांशी भूभाग रुक्ष आणि अतिरुक्ष प्रकारात मोडतो. यामुळे नामिबिया सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला दुस-या क्रमांकाचा देश आहे. येथे प्रति चौरस किमीमध्ये केवळ २.५ लोक राहतात.
फारच चांगली बातमी आहे , भारताच्या लोकशाही जगात आपले वर्चस्व राखून आहे ह्या बातमी सोबत इतर माहिती व नकाशा व ध्वज सोबत दाखवल्या मुळे वाचकाचा ज्ञानात भर पडली आहे प्रहरच्या माधमातून आशा प्रकारची मिळत असल्यामुळे प्रहारचे एक वेगळे स्थान निर्माण झाले आहे