मराठी संगीत रंगभूमीच्या सुवर्णकाळातील एक मानाचं पान असलेलं अजरामर संगीत नाटक म्हणजे कटयार काळजात घुसली..
मराठी संगीत रंगभूमीच्या सुवर्णकाळातील एक मानाचं पान असलेलं अजरामर संगीत नाटक म्हणजे कटयार काळजात घुसली. पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या लेखणीतून उतरलेलं आणि पं. जितेंद्र अभिषेकींच्या बहारदार संगीताने सजलेलं हे नाटक रंगभूमीवर आलं आणि त्याने एक नवा इतिहास रचला. कला मोठी की कलाकार?
गायकी महत्त्वाची की घराणं? या दोन प्रश्नांवर या नाटकाची पूर्ण गोष्ट आधारली आहे. हे नाटक जेव्हा रंगभूमीवर आलं होतं त्या काळात देशात अनेक मोठमोठी संगीत घराणी आपल्या गायकीद्वारे संगीताची सेवा करीत होते. पण या सेवेसोबतच या घराण्यांमध्ये स्वत:चं वेगळेपण आणि श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची स्पर्धाही रंगत होती. अमुक एक राग, बंदिश किंवा ठुमरी जी आपण गाऊ शकतो तशी इतर कुणाला गाता येणे शक्य नाही त्यामुळे आपली गायकी आणि आपलंच घराणं हे इतरांपेक्षा श्रेष्ठ असं या स्पध्रेचं स्वरूप होतं. याच कथासूत्रातून कटयारची निर्मिती झाली.
कटयार काळजात घुसलीमध्ये पंडित भानूशंकर, खाँसाहेब आफताब हुसन आणि सदाशिव गुरव ही तीन मुख्य पात्रे. यात खाँसाहेबांची भूमिका साकारली होती ती पंडित वसंतराव देशपांडे यांनी, तर भानूशंकरजीच्या भूमिकेत होते ज्येष्ठ गायक अभिनेते पं. भार्गवराम आचरेकर. एवढया वर्षानंतरही या नाटकाची लोकप्रियता कमी झालेली नाही. आजही रंगभूमीवर अनेकांचे वेगवेगळ्या संचासह या नाटकाचे प्रयोग चालू आहेत. हेच नाटक आता भव्य रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर.
एस्सेल व्हिजन आणि श्री गणेश मार्केटिंग अॅण्ड फिल्म्स यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे सुप्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी. यानिमित्ताने सुबोध दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत हे विशेष. यासोबत या चित्रपटात आणखी एका कलावंताचं रुपेरी पडद्यावर पदार्पण होणार आहे. आजवर आपल्या गायनाने आणि बहारदार संगीताने भारतातच नव्हे तर जगभरातील श्रोत्यांना वेड लावणारे गायक शंकर महादेवन यांचं.
यानिमित्ताने शंकरजी प्रथमच अभिनय करताना दिसणार असून या चित्रपटात ते पंडित भानूशंकर शास्त्री ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत. या चित्रपटातील त्यांचं हे नवं रूप सादर करणारा शानदार सोहळा मुंबईत शुक्रवारी पार पडला. यावेळी शंकर महादेवन यांच्यासोबत दिग्दर्शक सुबोध भावे, निर्माते सुनील फडतरे, एस्सेल व्हिजनचे संस्थापक नितीन केणी आणि बिझनेस हेड निखिल साने आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना शंकर महादेवन म्हणाले की, ‘कटयार काळजात घुसली’ हे नाटक सर्वार्थाने अजरामर आहे.
याची कथा ही आजच्या काळातही लागू होते. अभिषेकीबुवांच्या अजरामर संगीताने सजलेल्या नाटकावर आधारित या चित्रपटात मी अभिनयाद्वारे प्रेक्षकांसमोर येतोय ही माझ्यासाठी खरंच भाग्याची गोष्ट आहे. यासाठी मी स्वत:ला पूर्णपणे दिग्दर्शक सुबोध भावेच्या स्वाधीन केलं आणि त्यानेही अतिशय योग्य पद्धतीने ही भूमिका आणि त्यातील बारकावे समजावून सांगितले, ज्याचा मला खूप फायदा झाला.
अभिनयासोबतच चित्रपटाच्या या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रापत पदार्पण करणारे सुबोध भावे आपल्या या वेगळ्या अनुभवाविषयी म्हणाले की, शास्त्रीय संगीतावर माझं अपार प्रेम आणि श्रद्धा आहे. मला स्वत:ला गाता येत नसलं तरी मी शास्त्रीय संगीताचा निस्सीम चाहता आहे. पंडित जितेंद्र अभिषेकी यांना मी गुरुस्थानी मानतो आणि हा चित्रपटही त्यांनाच वाहिलेली छोटीशी आदरांजली आहे असं मी मानतो.’
‘कटयार काळजात घुसली’ ही कथा जेवढी दोन घराण्यातील संघर्षाची आहे तेवढीच गुरू-शिष्याच्या नात्याचीसुद्धा आहे. कटयारचा आकर्षणबिंदू आहे ते यातील गाणी. ‘घेई छंद मकरंद’, ‘तेजोनिधी लोहगोल’, ‘सुरतपिया की छिन बिसरायी’ ही आणि अशीच इतर लोकप्रिय गाणी. विविध राग, हरकती आणि आवाजातील नजाकतीने सजलेल्या या गाण्यांना संगीतबद्ध केलं होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी. ही गाणी त्याच चालीवर पण नव्या आवाजात या चित्रपटामधून ऐकायला मिळणार आहेत.
याशिवाय यात काही नवीन गाण्यांचाही समावेश आहे. यातील मूळ गाण्यांचं पुनध्र्वनिमुद्रण आणि ही नवीन गाणी संगीतबद्ध केली आहेत शंकर-एहसान-लॉय या लोकप्रिय संगीतकार त्रयींनी. हिंदीतील अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांना आपल्या संगीताने चारचाँद लावणारं हे त्रिकूट या निमित्ताने मराठीत पदार्पण करीत आहे हे विशेष. येत्या दिवाळीत १३ नोव्हेंबरला हा संगीताचा सुरेल नजराणा एस्सेल व्हिजन रसिकांना बहाल करणार आहे.
अफलातुन चित्रपट….ना भुतो न भविष्यती….संगीतमय चित्रपटांतील अव्दितीय चित्रपट…..पुन्हा होणे नाही.एक यशस्वी मोठे धाडस…..डॉ निकम मालेगांव नाशिक जिल्हा.9422247746