मुंबईचा महापौर समाजाचा, नागरी एकतेचा मूर्तिमंत प्रतीक आहे. मुंबईचा प्रथम नागरिक आहे. मुंबईकरांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी महापौर बंगला हक्काचे व्यासपीठ आहे. ही वास्तू, मुंबईकरांप्रती त्याचे महत्त्व, दर्जा लक्षात घेता अशा ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक बनवणे योग्य वाटते का? महापौर निवासस्थानाऐवजी मुंबईत इतरत्र एखाद्या भव्य जागी स्मारक बनवावे का? महापौरांचे नवीन निवासस्थान लांब बनवल्यास मुंबईकरांना त्या ठिकाणी पोहोचताना गैरसोय होईल का? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळे त्यांचे स्मारक तेवढय़ाच भव्यदिव्य स्वरूपात बनवायला हवे का? या स्मारकासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना अध्यक्षपदी नेमलेल्या पब्लिक ट्रस्टची धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणीच झाली नाही. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बनवण्यात घाई होत असून त्यासमोरील तिढा अधिक वाढेल असे वाटते का?
बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ‘महापौर निवास’ नकोच
शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आगळे वेगळे व्यक्तिमत्त्व होते. मराठी लोकांसाठी, राज्यासाठी त्यांचे अफाट कार्य, योगदान पाहता त्यांचे स्मारक होऊ नये, अशी इच्छा कोणीच व्यक्त करणार नाही. मात्र ‘महापौर निवास’ ही जागा बाळासाहेबांच्या स्मारकासाठी योग्य नसल्याचा सूर वाचकांनी पत्रांच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. शिवसैनिकांना बाळासाहेबांप्रती जेवढा आदर आहे तेवढाच आदर देशातील प्रत्येक नागरिकाला आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे भव्य स्मारक बांधण्यासाठी अन्यत्र मोठया जागेचा शोध घ्यावा, असे मत वाचकांनी पत्रांच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. राजकीय पक्ष स्मारकाच्या नावाखाली राजकारण करत असल्याचा आरोप वाचकांनी पत्रांच्या माध्यमातून केला आहे. महालक्ष्मी रेसकोर्स किंवा इतर प्रशस्त ठिकाणी बाळासाहेबांचे स्मारक उभारावे. राज्यात भाजपा-शिवसेनेची सत्ता असून २०१७ मध्ये होणा-या महापालिका निवडणुका लक्षात घेता बाळासाहेबांच्या स्मारकाच्या नावाखाली मतदारांची दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोपही वाचकांनी पत्रांच्या माध्यमातून केला आहे.
स्मारकाचे राजकारण नको!
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. असे असताना गेल्या तीन वर्षापासून त्यांच्या स्मारकाचे राजकारण केले जात आहे. खरं म्हणजे बाळासाहेबांचे व्यक्तिमत्त्व लक्षात घेता त्यांचे स्मारकही तेवढयाच भव्य-दिव्य स्वरूपात बनायला हवे. हे स्मारक दादर-शिवाजी पार्क या परिसरातच हवे, कारण त्यांचे आयुष्य याच परिसरात गेले आहे. त्यामुळे दादर-शिवाजी पार्क परिसरातच स्मारकासाठी जागा शेाधावी. त्या अनुषंगाने भूखंड शोधावा.
स्मारकाबाबत घाई गर्दी नको. सर्व कायदेशीर बाबी तपासत स्मारकाचे बांधकाम केले तर ते सोपस्कार ठरेल. बाळासाहेबांनी कोणत्याही निर्णयात घाई केली नाही, साहेब कधीच सत्तेसाठी पुढे पुढे नव्हते. या स्मारकाच्या रचनेसाठी जनतेची व शिवसैनिकांची मते विचारात घ्यावी, कारण साहेब सर्वाचेच होते. त्यामुळे त्यांचे स्मारक चांगल्या दृष्टीने व्हावे हिच अपेक्षा.
– सुभाष वाघवणकर, जोगेश्वरी
स्मारकासाठी सार्वजनिक मालमत्तेचा वापर नको
मा. बाळासाहेब ठाकरेंच्या अंत्ययात्रेला लाखो लोक उपस्थित होते, असे एक कारण शिवसेनेकडून नेहमीच दिले जाते. मा. बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेला लाखो लोक आले होते, पण ते विविध विचारसणीचे होते. ते सर्व शिवसैनिक म्हणून त्या ठिकाणी आले नव्हते. या मुद्दयाला धरत स्मारकाबाबत असे म्हणता येईल की, बाळासाहेबांचे अनेक अनुयायी आहेत. लाखोंच्या नव्हे तर कोटींच्या संख्येत ते आहेत. त्यामुळे प्रत्येकाचा बाळासाहेबांप्रतीचा आदर लक्षात घेता स्मारकाची रचना करायला हवी. बाळासाहेबांच्या स्मारकाकरिता शिवसेना राज्य शासन, महानगरपालिकेवर का अवलंबून आहे? बाळासाहेबांच्या स्मारकाकरिता त्यांनी स्वत: खर्च करावा. त्यांच्या स्मारकाच्या बांधकामासाठी सार्वजनिक मालमत्तेचा वापर नको. केवळ बाळासाहेबांचे नाही, तर कोणत्याही नेत्याचे स्मारक, पुतळे आदींकरिता राजकीय पक्षाने स्वत: खर्च करावा. राज्य शासनासमोर अनेक गंभीर प्रश्न पडून आहेत. पण हे सर्व सोडून शासन केवळ पुतळे, स्मारक बांधण्याच्या दिखाऊ कामातच मग्न आहे.
– विवेक जुवेकर, मुलुंड
महापौर निवासस्थानात स्मारक धोकादायक
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हिमालयासारखे उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. सर्वसामान्यांचे रक्षणकर्ते अशा त्यांच्या प्रतिमेमुळे जगभरात त्यांचे असंख्य चाहते आहेत. त्यामुळे त्यांचे स्मारक बनवल्यास त्यांच्या जयंती तसेच पुण्यतिथीदिनी त्यांच्या स्मारकासमोर हे असंख्य चाहते नतमस्तक होण्यासाठी साहजिकच येणार. महापौर निवासात स्मारकाची रचना करताना ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी. जगभरातील वाढत्या दहशतवादी कारवाया पाहता महापौर निवासस्थानासारख्या ऐतिहासिक वास्तूमध्ये स्मारक उभारणे सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचे आहे. सध्याचे शिवसेना नेतृत्व खुजे आणि मिळणारे भूखंड गिळणारे वाटते. याचाच फायदा मुख्यमंत्र्यांनी घेतला असून स्मारकासाठी महापौर निवासाची जागा शिवसेनेला देऊ करून पक्षांतर्गत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. स्मारकाच्या रचनेबाबतच्या सर्व कायदेशीर बाबी तपासूनच त्याची अंमलबजावणी करायला हवी, अन्यथा स्मारकाची निर्मिती लांबणीवर पडू शकते. स्मारक एखाद्या मोकळ्या भूखंडावर उभारावे. त्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करावेत. केंद्रात आणि राज्यात सत्ता मिळून शिवसेनेला एक वर्ष लोटले आहे. अशा परिस्थितीत स्मारकाच्या जागेचे पालिका निवडणुकांच्या निमित्ताने राजकारण व्हावे हे दुर्दैव!
– डॉ. कृष्णकांत नाबर, माहीम
स्मारकासाठी निवडलेली जागा योग्य नाही
मुंबईचे महापौर म्हणजे मुंबईचे प्रथम नागरिक. सरकारी कक्षात महापौरांना मुंबईचा प्रथम मानसन्मान दिला जातो. अशा महापौरांच्या प्रतिष्ठेच्या निवासस्थानाच्या वास्तूमध्ये उत्तुंग व्यक्तिमत्त्व असणारे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बांधणे योग्य ठरणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक हे मुंबईत उभारले जाणार असल्याने या निर्णयाचे स्वागत आहे. परंतु या स्मारकासाठी निवडलेली जागा योग्य नाही. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी मुंबईत इतरत्र योग्य ती जागा शोधावी. ज्या ठिकाणी स्मारक बांधले जाईल त्या ठिकाणी गोरगरीब, सर्वसामान्यांसाठी परिपूर्ण असे रुग्णालय उभारावे, कारण बाळासाहेब सर्वसामान्य जनतेचा नेहमी विचार करत असत.
– प्रवीण पाटील, भोईवाडा
अन्यत्र मोठया जागेत स्मारक व्हावे
बाळासाहेब ठाकरेंबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर आहे. तसेच त्यांचे मुंबईत भव्य स्मारक व्हावे अशी इच्छाही आहे. पण स्मारकासाठी महापौर बंगल्याची जागा योग्य नाही. महापौर निवासस्थान हे मुंबईच्या प्रथम नागरिकांचे निवासस्थान आहे. सरकारी निवास स्थानात स्मारक करायचे नाही, असा नियमच आहे. मुंबईचे महापौर निवासस्थान ऐतिहासिक वास्तू म्हणून गणले जाते. झाडे, समुद्र अशी निसर्गरम्य पार्श्वभूमी असलेले महापौर निवासस्थान मुंबईतील इतर सरकारी निवासस्थानांपेक्षा आकर्षक आहे. त्यामुळे मुंबईत इतरत्र मोठया जागी बाळासाहेबांचे भव्य स्मारक व्हावे.
– कमलाकर जाधव, बोरिवली
महापौर निवास मुंबईकरांचे हक्काचे व्यासपीठ
बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व आहे त्यामुळे त्यांचे स्मारक भव्य व्हायला हवे. शिवाजी पार्क ही शिवसेनेची कर्मभूमी आहे, हे जरी खरे असले तरी त्यासाठी महापौरांचे निवासस्थान ही जागा स्मारकासाठी अयोग्य आहे. ही भावना तमाम मुंबईकरांच्या मनात निर्माण झाली आहे. मुंबईचे महापौर समाजाचे, नागरी एकतेचे मूर्तिमंत प्रतीक आहेत. त्यांचे निवासस्थान हे मुंबईकरांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ असून ती एक हेरिटेज इमारत आहे. या ठिकाणी स्मारक उभारून त्यांचे निवासस्थान शहरात इतरत्र लांब स्थलांतरीत केले तर मुंबईकरांसाठी ते गैरसोयीचे ठरेल. स्मारक उभारण्याच्या जागेसाठी अनेक पर्याय असताना महापौर निवासस्थानात स्मारक उभारणे अयोग्य आहे. या ठिकाणी स्मारक झाल्यावर त्याला नाव देण्यावरूनही वाद निर्माण होणार आहे.
– पुष्पा ढवळे, नवीन पनवेल
स्मारक संकुचित जागी बंदिस्त नको
बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकांचेच नव्हे तर समस्त महाराष्ट्रीय जनतेचे हृदयसम्राट होते. अशा महान व्यक्तिमत्त्वाचे स्मारक प्रशस्त व मोक्याच्या जागीच व्हायला पाहिजे. यात कोणाचेच दुमत असणार नाही. मुंबईतील महापौर स्थानाला मुंबईच्या इतिहासात ‘आगळे नि वेगळे स्थान’ असताना त्या वास्तूत बाळासाहेबांच्या स्मृती कशा काय बंदिस्त करू शकतो? बाळासाहेबांचे उत्तुंग स्मारक होण्यासाठी भव्य जागेतच होणे गरजेचे आहे. मुंबई महानगरपालिकेत सत्ता शिवसेनेची असली तरी वरिष्ठ नेत्यांनी विवादास्पद घाट घालणे बरोबरच नाही. पब्लिक ट्रस्ट आणि धर्मादाय आयुक्त यातील विवादित मुद्दयाला मुख्यमंत्र्यांनी राजकीय फोडणी दिलेली आहे. राजकीय तेढ निर्माण होणे हिताचे नाही. बाळासाहेबांचे व्यक्तिमत्त्व, विशाल दृष्टिकोनातून नेहमीच ‘सडेतोड, वादातीत’ राहिले असले तरी स्मारक मात्र त्यांच्या पश्चात वादातीत न ठेवता एक स्मारक सर्वाना मान्य होईल, अशा जागीच निश्चित व्हायला हवे.
– अनंद दाभोळकर, अंधेरी
स्मारक उत्तुंग असावे
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे मराठी माणसाला हक्काने जगण्यास प्रवृत्त करणारा एक ज्वलंत विचार होता आणि शिवसेनेचा जन्म झाला त्या दादरमध्ये बाळासाहेबांचे स्मारक व्हावे ही लोकभावना अजिबात चुकीची नाही. पण त्यासाठी मुंबईचे प्रथम नागरिक म्हणून आदर असणा-या महापौर बंगल्याची निवड व्हावी हा वादाचा मुद्दा भविष्यातील निवडणुकांवर डोळा ठेवून भिजत घोंगडं ठेवण्याचा सरकारचा कुटिल डाव वाटतो. दादर चौपाटी लगतचे महापौर निवास्थान ऐतिहासिक वास्तू म्हणून गणले जाते. मुळात ऐतिहासिक वास्तूत फेरबदल, त्या परिसरात काही बांधकाम करायचे असल्यास कायद्याच्या कठोर अटी-शर्तीचे बंधन असते ते झुगारून स्मारक उभारणे उचित वाटत नाही. तसेच सीआरझेड त्याचबरोबर पुरातत्त्व खात्याच्या कचाटयातून त्याला बाहेर काढणे खूपच जिकिरीचं काम आहे. सरकारी निवासस्थानात नेत्यांची स्मारके उभारण्यास सर्वोच्च न्यायालयाची बंदी असून केंद्रानेही निवासस्थानांचे स्मारकात रूपांतर करू नये असा निर्बंध घातला आहे. या पार्श्वभूमीवर महालक्ष्मी रेसकोर्सची थिमपार्कसाठी चर्चेला असणारी अफाट मोकळी जागा बाळासाहेबांच्या स्मारकाला न्याय देणारी ठरेल असे वाटते.
– दिलीप अक्षेकर, माहीम
बाळासाहेबांपुढे महापौर निवास गौण
खरं तर स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक होण्यास इतकी वादावादी होण्याचे काहीच कारण नाही. कारण बाळासाहेब निव्वळ शिवसेनाप्रमुख नव्हते, मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी भाषेची बुलंद डरकाळी होती. ।। जय हिंद जय महाराष्ट्र।। ही घोषणा ही त्यांचीच देणगी आहे. पहिली ही घोषणा फक्त शिवसैनिक म्हणत, आता मात्र सर्व पक्षाचे नेते म्हणतात. अर्थात यालाही भाजपाचा अपवाद आहे. कारण यांना जनमानस कळतच नसावा किंवा दिल्लीश्वरांची मिंदी असावीत. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला जर इंदू मिलची १२-५० एकर जागा दिली जाते. तर बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर निवास गौण आहे. जगभरात विशेष व्यक्तींसाठी कायद्यात फेरबदल होत असतात. आपल्या देशात कित्येक बदल झाले आहेत. बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वापुढे महापौर निवास गौण आहे. काही व्यक्ती राज्याच्या व्यक्ती नसून चेहरा आहे, ओळख आहे. त्यातलेच बाळासाहेब हे व्यक्तिमत्त्व आहे. आम्ही मागे पंजाबमध्ये यात्रेसाठी गेलो असताना तेथील लोकांनी आमचे स्वागत ।। जय हिंद जय महाराष्ट्र।। या घोषणेने केले. तसेच उत्तर प्रदेशात गेलो तेव्हा आम्ही मराठी बोलत असताना तेथील लोक म्हणाले, हे शिवसेनेवाले आहेत. तरी या स्मारकाचा वाद चिघळवणे म्हणजे आपले स्वत:चे अवमूल्यन करणे आहे.
– शंकर पानसरे, काळाचौकी
राजकीय इच्छाशक्तीची गरज
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या जागेबद्दल वाद निर्माण होण्याची परिस्थिती उद्भवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या महापौर बंगल्याची जागा दिल्याची घोषणा, सेनेचे कार्याध्यक्ष यांनीही ही जागा मिळाल्याचे समजून स्मारकाच्या पुढच्या तयारीसाठी केलेले प्रयत्न पाहता, भाजपाने केलेले राजकीय कुरघोडीचे नाटय़ जनता पाहत आहे. मुख्यमंत्री स्वत: नागपुरात महापौर होते. त्यांना चांगली कल्पना आहे की, सरकारी वास्तू ही विशिष्ट पुढा-यांच्या स्मारकासाठी देता येत नाही. कायद्याने हे रीतसर नाही. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी चाललेला त्यांच्या पश्चात जागेचा घोळ किंवा वाद कोर्टात किंवा विकोपाला न जाता स्मारकासाठी पक्की व निश्चित जागा कुणी देता का, असे म्हणायची वेळ यावी यासारखे दुर्दैव ते कोणते? सत्ता तुमची, राज्य तुमचे तरी बाळासाहेब व बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाबाबत हा दुजाभाव कां बरे?
– उत्तम भंडारे, चेंबूर
शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे राजकारण नको
शिवसेना प्रमुख बाळासाहेब हे आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व होते, त्यांचे स्मारक होऊ नये, अशी इच्छा कोणीही व्यक्त करणार नाही. मात्र महापौर निवासस्थानाची जागा बाळासाहेबांच्या स्मारकासाठी देणे हे अयोग्य असल्याचे मत वाचकांनी पत्रांच्या माध्यमातून व्यक्त केले. बाळासाहेब फक्त शिवसैनिकांचे चाहते होते असे नव्हे, तर जनमानसात त्यांचे आगळेवेगळे स्थान होते. बाळासाहेबांचे भव्य स्मारक बांधण्यासाठी अन्यत्र मोठया जागेचा शोध घ्यावा, असा सल्ला वाचकांनी पत्रांच्या माध्यमातून दिला आहे. महाराष्ट्रासाठी बलिदान देणा-यांचे भव्य स्मारक उभारणे गरजेचे आहे. मात्र राजकीय पक्ष स्मारकाच्या नावाखाली राजकारण करत असल्याचा आरोप वाचकांनी पत्रांच्या माध्यमातून केला आहे. महालक्ष्मी रेसकोर्स अथवा बॉम्बे डाईंगची प्रशस्त जागा असून त्या ठिकाणी बाळासाहेबांचे स्मारक उभारावे. राज्यात भाजपा-शिवसेनेची सत्ता असून २०१७ मध्ये होणा-या महापालिका निवडणुका लक्षात घेता बाळासाहेबांच्या स्मारकाच्या नावाखाली मतदारांची दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप वाचकांनी पत्रांच्या माध्यमातून केला आहे.
स्मारकासाठी महापौर बंगल्याची जागा अयोग्य
बाळासाहेब ठाकरे ख-या अर्थाने शिवसेनेचे वाघ होते. त्यांच्या शब्दातच इतकी ताकद होती की, अन्यायाविरुद्ध माणूस पेटून उठलाच पाहिजे. ख-या अर्थाने तेच मराठी माणसासाठी जगले, मराठी अस्मिता टिकवली ती बाळासाहेबांनीच! सत्तेपासून कायमच चार पावले दूर राहिले तरी राज्यकर्त्यांवर त्यांचा वचक होता. या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे स्मारकही तसेच भव्यदिव्य व ते या राज्याच्या राजधानीतच व्हावे याबाबत कुणाचे दुमत असूच शकत नाही. मात्र धर्मादाय आयुक्त कार्यालयात पब्लिक ट्रस्टची नोंदणीही न करता या न्यासाचे अध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांची घोषणा आणि महापौर बंगल्यात माननीय बाळासाहेबांचे स्मारक या घोषणा मुख्यमंत्र्यांनी इतक्या घाईगडबडीत व तडकाफडकी का करावी याचे कोडे न सुटणारे आहे. बाळासाहेबांचे स्मारक हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आणि कर्तृत्वाला साजेसेच हवे आणि ते महापौर बंगल्यात न होता बाळासाहेब जेथे वावरले त्या मातोश्री बंगल्याच्या आवारात वा राज्य शासनाने मुंबईत या स्मारकासाठी मध्यवर्ती ठिकाणी जागा उपलब्ध करून त्या ठिकाणीच करावे.
– मुरलीधर धंबा, डोंबिवली
स्मारकाबाबत जनतेला विचारात घ्या
मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बनवले पाहिजे. पण महापौर निवासस्थानात बाळासाहेबांचे स्मारक बनवणे हे योग्य नाही. मुंबईमध्ये स्मारक बनवण्यासाठी अनेक जागा उपलब्ध आहेत. तिथे बाळासाहेबांचे भव्य-दिव्य स्मारक बनवले गेले पाहिजे. महापौर निवासस्थानामध्येच स्मारक बनवण्याचा सरकार हट्ट का करत आहे? स्मारकाच्या जागेबाबत मुख्यमंत्र्यांनी त्वरित घोषणाही केली. त्यासाठी ट्रस्टही बनवण्यात आली आणि ट्रस्टचे अध्यक्ष उद्धव ठाकरे व ट्रस्टमध्ये आदित्य ठाकरेंनाही सहभागी करून घेण्यात आले. हे सर्व निर्णय खूप झटपट घेण्यात आले. बाळासाहेबांना महाराष्ट्रातील सर्व स्तरावरील व्यक्ती मानतात, त्यांच्या स्मारकाचे निर्णय हे जनतेला विचारून घेणे गरजेचे आहे. पण तसे न करता सरकार स्वत: आपल्याला योग्य वाटतील ते निर्णय घेत आहे. स्मारक हे महाराष्ट्राच्या जनतेसाठी आहे की, नुसतेच ठाकरे कुटुंबासाठी!
– शिरीष सावंत, गोरेगाव
स्मारकासाठी-‘मातोश्री’ योग्य
महापौर निवासस्थानी बाळासाहेबांचे स्मारक बनवले जाणार व महापौरांच्या निवासासाठी दुस-या ठिकाणी जागा उपलब्ध केली जाणार आहे. महापौर निवास हे सरकारी निवासस्थान आहे. त्यामुळे तेथे स्मारक बनवता येणार नाही, याची कल्पना असतानादेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौर निवासस्थानाच्या जागेची घोषणा केली. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ‘मातोश्री’ची जागा अधिक उत्तम आहे. बाळासाहेबांनी ‘मातोश्री’वर आपले आयुष्य व्यतीत केले, तेथूनच त्यांनी अनेक निर्णय घेतले, शिवसैनिक व सामान्य जनता त्यांना भेटण्यासाठी सतत ‘मातोश्री’वर येत असतात. ‘मातोश्री’मध्ये बाळासाहेबांचा श्वास आहे, शिवसैनिकांचे प्रेम या वास्तूला लाभले आहे. तर बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ‘मातोश्री’ ही उत्तम जागा आहे.
– उमेश कुलकर्णी, माहीम
सर्व तुम्हीच ठरवणार..
सामान्य जनता ही बाळासाहेबांचा खूप सन्मान करते. त्यामुळे बाळासाहेबांचं स्मारक हे मुंबईमध्ये भव्य-दिव्य बनवले पाहिजे. महापौर निवासस्थानी स्मारक बनवले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यामुळे महापौरांना राहण्यासाठी दुसरीकडे सोय करण्यात येणार आहे. जर स्मारक हे महापौर निवासात असेल तर महापौरांना राहण्यासाठी दुसरीकडे का हलवण्यात येत आहे. महापौर निवासस्थानात महापौरच राहणार नाही तर, तेथे कोण राहणार..? मग महापौर निवासस्थानाचे नावही बदलण्यात येणार. हे सरकार स्वत:ला वाटेल तसे निर्णय घेत आहे आणि जनतेवर ते थोपवत आहे. बाळासाहेबांचे स्मारक बांधण्यासाठी मुंबईत अनेक जागा आहेत, तरीही महापौर निवासाचीच जागा नक्की करण्यात आली. त्यामुळे स्मारक हे महाराष्ट्राच्या जनतेसाठीच आहे की, अन्य कोणासाठी असा प्रश्न निर्माण होतो.
– जयेश पारकर, मुलुंड
स्मारक हे नुसते निमित्त, डाव तर वेगळाच..
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्ताने स्मारकाचा रेंगाळलेला प्रश्न मार्गी लावला असला, तरी त्यावरूनसुद्धा मतभेद होत असल्याचे दिसून आले आहे. महापौरांचे नवीन निवासस्थान लांब बनवल्यामुळे अर्थातच मुंबईकरांना त्या ठिकाणी पोहोचताना गैरसोय तर होईलच. बाळासाहेबांच्या स्मारकावरून अनेक प्रकारे राजकारण होतील, भ्रष्टाचार होतील असे दिसून येत आहे. महापौर निवासस्थानी बाळासाहेबांचे स्मारक हा वेगळा डाव दिसून येतो.
– अमित गुरव, मालाड
स्मारक उचित ठिकाणी व्हावे!
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांचे स्मारक महापौर बंगल्याच्या जागेत व्हावे हे शिवसनिकांना व त्यांच्या नेत्यांना वाटणे साहजिकच आहे. त्यांचे उत्तुंग व्यक्तिमत्व पाहता बंगल्या शेजारी असलेला पार्क क्लूबची जागा समाविष्ट केली तर भव्य स्मारक होऊ शकतं. तसेच हिंदू हृदय सम्राट याचं स्मारक शिवतीर्थावर झाले तर तो एक इतिहासच घडेल. त्यामुळे सामंजस्याने व सहकार्याने सर्वानी एकत्र येऊन बाळासाहेबांचे भव्य स्मारक उचित ठिकाणी झाल्यास हीच त्यांना महाराष्ट्रातील जनतेची खरी श्रद्धांजली ठरेल.
– यशवंत चव्हाण, सीबीडी बेलापूर
स्मारकासाठी प्रामाणिकपणा हवा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक कोणत्या ठिकाणी उभारावे याच गोष्टीवरून जर एवढे वाद होत असतील तर पुढे स्मारक उभारल्यानंतर त्यासमोरील तिढा नक्कीच वाढत जाईल. बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे स्मारक अत्यंत भव्यदिव्य जरी नसले तरी चालेल; पण त्याच्यावरून भ्रष्टाचार व वाद व्हायला नको. बाळासाहेब हे एक आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळे त्यांच्या स्मारकासाठी प्रामाणिकपणे काम करायला हवे.
– समिक्षा पाटील, गोरेगाव
स्मारकासाठी घाई होत आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना अध्यक्षपदी नेमलेल्या पब्लिक ट्रस्टची धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणीच झाली नाही. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बनवण्यात घाई होत असल्याचेही लक्षात येते. महापौर निवासस्थानात बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक बनवा किंवा मातोश्रीवर; पण स्मारकाचे राजकारण होऊ नये. जर स्मारक कुठे बांधायचा हाच प्रश्न अजून सुटत नसेल तर ते स्मारक बनवणे लांबच राहिले.
– संकेत पाटील, परेल
हा निर्णय बाळासाहेबांनाही रुचला नसता..
महापौर बंगला हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बनविण्याचे निश्चितच उचित ठिकाण नाही. सदैव प्रेरणादायी असे स्मारक मुंबई शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तरुणांच्या रोजच दृष्टीस पडेल अशा ठिकाणी असायला हवे. सेना भवनच्या इमारतीपासून काही अंतरावर जर कुठे असेल तर ते अधिक योग्य होईल. कुणाच्याही केवळ समाधानासाठी घेतलेला घाईचा निर्णय ते हयात असते, तर त्यांना निश्चितच आवडला नसता. कारण ते कधीही आपल्या भाषणात भविष्यात काही वावगे घडू नये अशाप्रकारचे शब्द वापरीत असत. म्हणूनच असा अतिउत्साहात घेतलेला निर्णय, निश्चित केलेली जागा आणि कोणतीही कायदेशीर पूर्तता न करता निर्माण करीत असलेली पब्लिक ट्रस्ट खुद्द शिवसैनिकांना देखील आवडणार नाही.
– नरेश नाकती, बोरिवली
स्मारक स्वखर्चाने बनवावे
शिवाजी पार्क येथे बाळासाहेबांचे ‘स्मृतिस्थळ’ उभारून त्यांचा योग्य तो मान राखला गेला आहे, तेव्हा महापौर निवासस्थानात बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक बनवणे योग्य वाटत नाही. बाळासाहेब हे एका प्रादेशिक राजकीय पक्षाचे पक्षप्रमुख होते. त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आपल्या मुलाला, उद्धवला पक्षप्रमुख पदावर बसवले. ते स्वत: लोकशाही मार्गाने जनतेतून निवडणूक लढवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नाहीत. आताही पाहिलं तर उद्धव निवडणूक लढवून मुख्यमंत्री का होत नाही? या मुद्दय़ांचा कधी अभ्यास केला आहे का? मग बाळासाहेबांचे स्मारक उद्धव व शिवसैनिकांनी स्वखर्चाने बनवावे.
– वाचक, मुंबई
‘ई-मेल’द्वारा आलेली पत्रे..
बाळासाहेबांचे स्मारक निर्विवाद व्हावे
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा विषय वादग्रस्त होऊ शकतो ही बाबच मनाला लागून गेली. बाळासाहेबांसारख्या व्यक्तिमत्त्वाने स्वत:चे संपूर्ण आयुष्य हिंदू धर्मासाठी, मराठी माणसांसाठी आणि आपल्यावर जीवापाड प्रेम करणा-या लोकांसाठी व्यतीत केले. त्यामुळे त्यांच्या स्मारकाच्या जागेवरून सुरू असणारा वाद हा प्रत्येक मराठी मनाला वेदना देणारा आहे. स्मारक कोणत्या जागी बनवावे, यापेक्षा ते स्मारक लोकांना किती आपलेसे वाटेल या दृष्टिकोनातून त्याची रचना करावी. बाळासाहेबांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या आठवणी चिरकाल आणि निर्वविाद टिकून राहाव्यात, असे स्मारक तयार होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा. परंतु स्मारक कोणत्या जागी बांधावे यापासून जर वाद होत असतील तर ही बाब चिंताजनक आणि फेरविचारार्थ आहे. बाळासाहेबांवर प्रेम करणारे नेते आज सर्वच पक्षात आहेत. महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला देखील एक निडर आणि बेधडक नेतृत्व म्हणून बाळासाहेबांबद्दल प्रचंड अप्रूप आणि आदर आहे. म्हणूनच बाळासाहेबांचे भव्य आणि आगामी पिढीला त्यांच्या अमूल्य कार्याचे ज्ञान मिळेल असे स्मारक ज्या ठिकाणी होईल ते वादाशिवाय व्हावे हीच इच्छा.
– वैभव पाटील, घणसोली
बाळासाहेबांचे विचार सर्वापर्यंत पोहोचतील असे स्मारक बांधा
स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक हे महापौर निवासस्थानात होणार आहे हेच पटत नाही, कारण महापौर निवासस्थान ही पुरातन वास्तू आहे. बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाला शोभेल असे भव्य स्मारक बनवायला हवे आणि त्यासाठी शहरात इतरत्र मोठी जागा सहज उपलब्धही होईल. खरं तर प्रत्येक महान व्यक्तिमत्त्वाचे स्मारक हे त्यांचे राहते निवासस्थानच असायला हवे. गेल्याच महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा इंदू मिल या ठिकाणी पार पडला. ही स्मारके सरकारी खर्चातून बांधली जाणार आहेत. मग बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ट्रस्टची गरज काय? बाळासाहेब हे खरे लोकनेते होते आणि आजही ते सर्वाच्या मनात आहेत. बाळासाहेबांचे आयुष्य ज्या परिसरात व्यतीत झाले अशा शिवाजी पार्क परिसरातील लोकांची मते जाणून घेतली आहेत काय? स्मारकामुळे प्रत्येक व्यक्तीला, आगामी पिढीला त्या लोकनेत्याचे विचार कळायला हवेत. या स्मारकाची रचना अशा प्रकारे करावी जेणेकरून हे स्मारक आगामी पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल. स्मारक पूर्ण झाल्यानंतर त्याची काळजीही घ्यायला हवी.
– निरुता भाटवडेकर, दादर
सर्व नागरिकांच्या देखरेखीखाली राहील असे स्मारक बनवा
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या रचनेबाबत सर्वाना प्रश्न पडला आहे. बाळासाहेबांच्या लाखमोलाच्या कर्तृत्वामुळे त्यांची ख्याती केवळ राज्यात नाही तर संपूर्ण देशात आहे. आपल्या रक्ताचे पाणी करून ज्यांनी महाराष्ट्र घडविला आहे, दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून ज्यांनी आपले आयुष्य मुंबई, महाराष्ट्राला बहाल केले अशा व्यक्तिमत्त्वाच्या स्मारकाला स्मारकाच्या जागेवरून विरोध केला जातोय ही शोकांतिका म्हणावी लागेल. बाळासाहेबांचे स्मारक होणार हे निश्चित आहे. महापौर निवासस्थानाऐवजी शिवाजी पार्कमध्ये जर जागा शोधली तर सर्वासाठी सोयीस्कर ठरेल. तसेच हे स्मारक सर्व नागरिकांच्या देखरेखीखाली राहील. त्या ठिकाणाहून येणा-या-जाणा-या जनतेचे लक्ष दिवसरात्र लागून राहिल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सोयीस्कर ठरेल. पण शहरात इतरत्र जर स्मारकासाठी भव्य जागा मिळाली तर त्यावर लक्ष ठेवणे तितकेच गरजेचे आहे.
– दत्तात्रय शिवराम धनावडे, कल्याण
बाळासाहेबांच्या विचारांचे स्मारक उभारा
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या जागेची घोषणा ही तब्बल तीन वर्षानंतर झाली. पण या महान व्यक्तिमत्त्वाच्या स्मारकाची घोषणा होताच अवघ्या २४ तासांत स्मारकासाठी निवडलेल्या जागेवरून वाद निर्माण झाला आहे. यासारखे मराठीजनांचे दुर्दैव नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या कर्तृत्वाला साजेसे स्मारक व्हावे ही महाराष्ट्रातील तमाम जनतेची इच्छा आहे. अवघ्या मराठी मनावर आधिराज्य गाजविणा-या बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे स्मारक उभारायला हवे.
आजची तरुण पिढी तसेच आगामी पिढीपर्यंत बाळासाहेब ठाकरेंचे विचार पोहोचवण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. जेणेकरून मराठी माणसाला न्याय मिळवनू देणारे, हिंदुत्ववादी विचार अधिक प्रखरतेने मांडणारे आणि आपल्या विचारांशी ठाम राहणारे नेतृत्व म्हणून त्यांचा आदर्श कायम सर्वासमोर राहील. मराठी भाषा आणि मराठी माणूस यांच्या विकासासाठी अखेरच्या श्वासापर्यंत ते एकनिष्ठ राहिले. बाळासाहेबांच्या विचारांना सन्मान मिळवून देणारे स्मारक प्रत्येक तरुणाच्या मनात उभारावे. मराठी माणसाला न्याय आणि अभिमान मिळवून देणा-या कामाचे स्मारक उभारा. बाळासाहेब ठाकरे हे केवळ व्यक्ती नसून ज्वलंत विचार होते. त्यांच्या विचारांप्रमाणे आचरण करत स्मारक उभारणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे.
– विवेक तवटे, कळवा
महापौर निवासस्थानात बाळासाहेबांचे स्मारक नकोच
महाराष्ट्राचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेल्या दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या महापौर निवासस्थानात करण्यात येणा-या स्मारकावरून सध्या निर्थक वाद चालू आहे. बाळासाहेब ठाकरे हे केवळ एका पक्षाचे प्रमुख नव्हते तर ते जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार होते. धारदार आवाजाचे उत्कृष्ट वक्तेहोते. अत्यंत जहाल आणि आक्रमक राजकीय नेते होते. जनमानसात त्यांची कमालीची लोकप्रियता होती. त्याच्या अंत्ययात्रेच्या वेळी लाखोंच्या संख्येने उसळलेल्या जनसागराने त्याची प्रचिती आली. त्यामुळे अशा थोर नेत्याचे स्मारकही त्यांच्या कीर्तीला साजेसे व्हायला हवे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आणि एकूणच जीवनकार्यातील विविध पैलूंचे दर्शन घडवणारे स्मारक करायचे असेल तर त्यासाठी जागाही तितकीच प्रशस्त हवी. या प्रशस्त जागेच्या मापदंडात महापौरांचे निवासस्थान बसत नाही. तरीही स्मारकासाठी हेच निवासस्थान घेण्याचा घाट घातला जात आहे, हे चुकीचं आहे. राहता राहिला मनाला वारंवार भेडसावणारा एक शेवटचा प्रश्न. बाळासाहेबांना जाऊन तीन वष्रे पूर्ण झाली. केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो किंवा महानगरपालिका..अत्र तत्र सर्वत्र शिवसेनेची सत्ता आहे. पण तरीही स्मारकाचे भिजत घोंगडे का ठेवले होते? खरोखरच प्रामाणिक हेतूने बाळासाहेबांचे स्मारक करायचे आहे की, यातसुद्धा चालढकल आणि दिरंगाई करत २०१७ साली होऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे राजकरण दडले आहे?
– प्रदीप शंकर मोरे, अंधेरी
स्मारकाचे राजकारण
महापौर निवासस्थानात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक होणार असे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले. त्यानंतर ठाकरे कुटुंबातील राज ठाकरे यांनी या जागेला विरोध केला. मुळात मुंबई महानगरपालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन भाजपाने ही राजकीय खेळी केली आहे. मराठी, दलित मतांवर डल्ला मारण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन भाजपाने सेनेला डावलून केले. यावेळी पंतप्रधानांनीही उपस्थिती लावली होती. कल्याण-डोंबिवली मनपा निवडणुकीत तर सेना-भाजपाने एकमेकांचे वस्त्रहरण केले आणि पुन्हा गळ्यात गळे घातले. महापौर निवासस्थान हे मुंबईच्या प्रथम नागरिकाचे निवासस्थान असून याच नागरिकाला रस्त्यावर आणण्याचे काम केले जात आहे. या हेरिटेज वास्तूवर सर्वाचा डोळा असून राजकारण चालू आहे. भाजपाला या स्मारकात काडीचा रस नाही. केवळ मुंबई मनपा निवडणुकीत मराठी मते ध्यानात घेऊन हा खटाटोप चालू आहे.
– प्रकाश नागणे, भाईंदर
स्मारकाच्या जागेवरून वाद नको
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या जागेवरून होणारे वाद निर्थक आहेत. बाळासाहेबांचे स्मारक त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे असावे याबाबत कुणाचेही दुमत नाही. पण स्मारकाच्या जागेवरून राजकारण मुळीच होता कामा नये. सरकारी बंगल्याचे स्मारकात रूपांतर करणे शक्य नाही. त्यामुळे शासनाने यावर तोडगा काढायला हवा. बाळासाहेबांचे स्मारक रितसर आणि निर्विवाद व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा आहे.
– उदय वाघवणकर, जोगेश्वरी
स्मारकाची दुरवस्था होता कामा नये
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी समाजाला दिलेले योगदान आणि शिकवण अफाट आहे. आज प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयातले ते शिल्पकार आहेत. त्यामुळे साहेबांचे स्मारक महापौर निवासस्थानात उभारण्यापेक्षा महाराष्ट्र राज्यात कित्येक छत्रपतींचे महत्त्वाचे किल्ले आहेत आणि राज्यातून, देश-विदेशातून पर्यटक किल्ले पाहायला जातात. अशा ठिकाणी चांगल्या प्रकारे किल्ल्यांची दुरुस्ती करून साहेबांचे भव्य-दिव्य स्मारक उभे केल्यास प्रत्येक व्यक्तीला सतत प्रेरणा मिळत राहील. मुंबईत बाळासाहेबांचे आयुष्य, कार्य यांचे प्रतिबिंब असणारे म्युझियम काढून त्यांच्या तरुण वयापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत झालेली वाटचाल माहिती, पुस्तके, चित्रफीत या माध्यमातून मांडावी. स्मारक उभारल्यानंतर त्याची काळजीही घ्यावी. कारण ज्या क्रांतिकारांचे शहरात, राज्यात पुतळे, स्मारके आहेत त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. एकदा पुतळा किंवा स्मारक उभारले की, त्याकडे काही वर्षानी दुर्लक्ष होते. त्यामुळे शासनाने बाळासाहेबांचे स्मारक महापौर बंगल्यात बांधण्यापेक्षा त्यांचे विचार प्रत्येकापर्यंत कसे पोहोचवता येतील यावर भर द्यावा. बाळासाहेबांनी स्मारकासाठी कधीच भर दिला नव्हता. नेहमी सर्वसामान्यांची मदत केली. स्मारकाचा प्रश्न मार्गी लावण्यासोबत राज्यातील गरीब-कष्टी सामाजाचे प्रश्नही मार्गी लावावेत.
– राजेंद्र मधुकर सावंत, टिटवाळा
उतावीळपणा कशाला
महापौर हे निवासस्थान बिकानेरच्या महाराजाच्या ‘बीच हाऊस’ म्हणून ओळखल्या जाणा-या या बंगल्यात असलेली महापालिकेची काही कार्यालयं दूर करून १९६४ मध्ये सुमारे सव्वालाख रुपयांच्या खर्चामध्ये डागडुजी करण्यात आली. हा बंगला म्हणजे एक नागरिक एकतेचे मूर्तिमंत प्रतीक आहे. प्रथम नागरिकांचे एक व्यासपीठ आहे. अशा ठिकाणी बाळासाहेबांचे स्मारक बनविणे योग्य वाटत नाही. त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाप्रमाणे एकूण १० जागा पाहिल्या आहेत, त्यापैकी एक जागा पाहणे योग्य ठरेल. जेणेकरून दादरची त्यांची कर्मभूमी त्याच्या आसपास स्मारक असणे जरुरीचे आहे. त्यांचे अंत्यसंस्कार जेथे झाले ती एक संस्कारभूमी ही देखील पवित्र दर्शनास ठरेल त्याच मानाने जवळपास मोकळ्या जागेत भव्य असे स्मारक बांधावे जेणेकरून अंत्यसंस्कार झालेली भूमी तेथे वंदन करून कुठे तरी दूरवर स्मारक नसावे. मुख्यमंत्री साहेबांनी त्या महापौर बंगल्यासाठी तेथे तोंडी पब्लिक ट्रस्ट बनवून त्यांचे अध्यक्ष पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना करून टाकले. हे उतावळेपणाचे लक्षण, हे कशासाठी असे कधी होते का?
– विनायक वाडेकर, नेरूळ
दादरमध्येच इतरत्र स्मारक उभारा!
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रस्तावित स्मारकाचा वाद चिघळत असताना मुंबईच्या महापौर निवासाची लक्षणीय वास्तूचे क्षालन होणे ही गंभीर बाब आहे. मुंबईच्या प्रथम नागरिक तसेच मिळणारा बहुमान पाहता, तसेच दादरमधील शिवाजी पार्क परिसरात समुद्रकिनारी लागून शानदार उभा असलेला महापौर बंगला मुंबईची शान आहे. त्याचप्रमाणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वाची दादरसारख्या मुख्यत: ‘शिवाजी पार्क’सारख्या परिसराशी असलेली नाळ पाहता, बाळासाहेबांचे उत्तम राष्ट्रीय, सार्वभौम, कलात्मक स्मारक भव्य स्वरूपात बांधण्यात आलेले उत्तमच झाले असते; परंतु दादरमध्येच इतर ठिकाणी कुठेही जागा मिळाली असती, तरीही संबंधित जागेच्या पूर्तता व्यवस्थित करून त्या ठिकाणी ‘कायदेशीर’ स्वरूपातले स्मारक योग्यच झाले असते. मुळातच शिवाजी पार्क मैदान, महापौर बंगला, पार्क क्लब, पार्क कट्टा यांसारखे नागरिकांना आनंद घेण्यात येणारे ठिकाण यांचा वापर करणे म्हणजे ‘शिवाजी पार्क’ची प्रमुख ओळख पुसण्यासारखे आहे. मराठी माणसाचा हक्काचा आवाज समजला जाणारा शिवाजी पार्क शिवसेनेसाठी वाटचालीत जडणघडण समजला जातो.
– ओमकार विलणकर, प्रभादेवी
स्मारकासाठी सर्वानी एकत्र आले पाहिजे!
धाडसी स्वभाव, साहसी कर्तृत्व, तुफानी वक्तृत्व, जाज्वल्य हिंदुत्वनिष्ठ पण त्याचवेळी मायबोली मराठी अस्मितेचाही योग्य व समूचित तो मान-सन्मान राखण्यासाठी सदैव जागरूक राहिलेल्या अलौकिक व आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्त्वाच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे मुंबईत समुचित स्मारक व्हावे ही आमजनतेचीच आत्यंतिक तळमळीची, महत्त्वाची अपेक्षा. हे स्मारक भव्यदिव्य, लक्षवेधी, त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला शोभेसे चित्ताकर्षक व पाहताक्षणीच मनाचा ठाव घेणारे असायला तर हवेच; पण त्याशिवाय त्यांच्या दर्शनासाठी लांबची पायपीट करावी लागणार नाही, हे पाहणेही तितकेच अत्यावश्यक ठरते. या दृष्टीने पाहता महापौर बंगल्याच्या आवाराची बंगल्याला धक्का न लावता संभाव्य स्मारकासाठीची केलेली निवड समुचित वाटते.
– मधुकर ताटके, गोरेगाव
महसुलाचे कारण देत दारूबंदी टाळण्याची सरकारची
भूमिका पटते का?
बिहारमध्ये १ एप्रिल २०१६पासून दारूबंदीची घोषणा केली असून महाराष्ट्रातही फडणवीस सरकारने दारूबंदी लागू करावी, यासाठी सामाजिक संस्था, मुंबईचे डबेवाले आदींनी आवाज उठवला आहे. दारू विक्रीतून राज्य सरकारला दरवर्षी १८ हजार कोटींचा महसूल मिळतो. मात्र मिळणा-या महसुलाचा सर्वसामान्यांना फायदा होता का? महसुलामुळे राज्यात दारूबंदी लागू करणे अशक्य असल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे वक्तव्य योग्य वाटते का? महसूल मिळवण्यासाठी दारू हे माध्यम योग्य वाटते का? मालाड मालवणी येथे झालेल्या विषारी दारूकांडानंतर सरकारने धडा घेतला नाही का? दारूमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली असून याचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी तातडीने दारू बंदी लागू करायला हवी होती का?
याबद्दल वाचकांनी आपली मते शब्दमर्यादा १०० ते १५० शब्द. पाकिटावर ‘वाचकांचे व्यासपीठ’ असा आवर्जून उल्लेख करावा,
वाचकांनी आपली मते शुक्रवारपर्यंत पुढील पत्त्यावर पाठवावीत.
शब्दमर्यादा : १०० ते १५० शब्द. पाकिटावर ‘वाचकांचे व्यासपीठ’ असा आवर्जून उल्लेख करावा.
प्रहार कार्यालय,
वन इंडियाबुल्स सेंटर, नववा मजला,
ज्युपिटर मिल्स कंपाउंड, लोअर परळ, मुंबई – ४०००१३,
फॅक्स : ०२२-६१२३९९००. ०२२- ६१२३९९६६
‘वाचकांचे व्यासपीठ’ ऑनलाइन
आपली मते तुम्ही vyasapith@gmail.com या ई-मेल आयडीवरही पाठवू शकता.
ऑनलाइन पत्र लिहा vyasapith@gmail.com वर तसेच ‘प्रहार’च्या संकेतस्थळावर किंवा प्रहारच्या फेसबुक पेजवरही मत नोंदवू शकता. त्यासाठी लॉग इन करा www.prahaar.in
हि त्यांची वैक्तिक मालमत्ता नव्हे त्या पेक्षा मातोश्रीलाच स्मारक बनवावे