मराठी नाटक आणि मराठी चित्रपट ही कलेची माध्यमं वेगवेगळी असली तरी त्या क्षेत्रात काम करणा-या कलावंतांच्या मैत्रीची विण घट्ट आहे. कलावंत नाटकात काम केल्यानंतर चित्रपटातील भूमिका जगतात. दिग्दर्शकही सिनेमाकडे वळतात. काही लेखकही नाटकं लिहिता-लिहिता चित्रपटाच्या कथा, पटकथा आणि संवाद लिहितात. काही लेखक आपल्याच नाटकावर चित्रपट लिहून देतात. प्रसिद्ध नाटककार आणि समीक्षक जयंत पवार यांनी त्यांच्याच ‘माझं घर’ या नाटकावर आधारित ‘तिचा उंबरठा’ नावाने चित्रपट लिहिला असून, त्याचा मुहूर्त अलीकडेच झाला. नाटकावर आधारित अशा चित्रपटांची संख्या वाढली तर नाटक आणि चित्रपट माध्यमांचं नातं आणखी घट्ट होईल.
नाटक आणि चित्रपट ही दोन्ही व्यक्त होण्याची कलामाध्यमं वेगवेगळी असली तरी, त्यांच्या ऋणानुबंधांची विण मात्र खूप घट्ट आहे. रंगभूमीवर आपल्या अभिनयाची कर्तबगारी सिद्ध करत कलावंत कालांतराने मोठय़ा पडद्यावर झळकत असतात. हिंदी चित्रपटात कलावंतांना थेट प्रवेश मिळत असला तरी मराठी सिनेकलावंत मात्र आधी रंगभूमीवरच झिजलेले असतात, असा इतिहास आहे. हा प्रवास फक्त कलावंतांनाच नव्हे तर काही दिग्दर्शक आणि लेखकांनीही अनुभवला आहे. अनेकांनी आधी मराठी नाटकाचं दिग्दर्शन केलं, काहींनी वेगवेगळ्या नाटय़स्पर्धामधून आपली दिग्दर्शनाची ताकद दाखवून दिली आणि त्यानंतर ते चित्रपटाच्या दिग्दर्शन क्षेत्रात आपला झेंडा फडकवत अभिमानानं उभे राहिले.
मराठी कलावंत आणि दिग्दर्शकांच्या प्रवासाबरोबर नाटय़लेखकांचाही प्रवास कालांतराने चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद लिहिण्याकडे झाला का, या प्रश्नाचं उत्तर शोधताना त्यातील काही नावं पटकन गवसतात. नाटक लिहितानाच ज्यांनी चित्रपटही लिहिले, ते पटकथेत स्थिरावलेतही. पण ती संख्या कलावंतांच्या तुलनेत फारच कमी आहे. अर्थात, नाटय़लेखन किंवा नाटय़दिग्दर्शन करणाऱ्यांनी पुढचा टप्पा म्हणून चित्रपट किंवा टीव्ही मालिकांसाठी लेखन-दिग्दर्शन केलंच पाहिजे, असा कुणाचा आग्रह असू शकत नाही. असणार नाही. असू नये. लेखकाने माध्यमांतर केलं नसलं तरी त्यांच्या नाटय़गोष्टीने मात्र कालांतराने पडद्यावर जाण्याचं स्वप्न बघितलं पाहिजे. अर्थात, नाटय़लेखक आपल्या नाटय़संहितेतून एक गोष्ट सांगत असतात. काही नाटकांचे प्रयोग गाजतात. वाजतात. रसिकांच्या मनात कायमस्वरूपी घर करून अजरामरही होतात. त्या नाटकांवर आधारित, त्या नाटकांचं कथाबीज केंद्रस्थानी ठेवून चित्रपट निघत असतात. त्यांचं प्रमाण बोटावर मोजण्याइतकंच आहे.
अलीकडच्या काळात निर्मित होणारे चित्रपट केवळ मनोरंजन करणारे नाहीत, तर ते समाज जीवनाचं प्रतिबिंबही मांडत आले आहेत. माणसाचं जगणं केंद्रस्थानी ठेवून जगण्याची परिभाषा सांगू पाहात आहेत. काही चित्रपट वेगवेगळे सामाजिक विषय ताकदीनं मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. माणसांच्या जगण्याची घुसमट, कोंडी जगासमोर आणताहेत. बदललेल्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय परिणामांचा वेध घेऊन उद्याच्या जगण्यातील धोकेही सांगताहेत. सांगू पाहत आहेत. असेच असंख्य विषय घेऊन दरवर्षी शे-दोनशे मराठी नाटकं लिहिली जातात. ती नाटकं एखाद्या स्पर्धेत किंवा व्यावसायिक रंगभूमीवर काही काळ टिकतात आणि कालांतराने नामशेष होतात. त्या नामशेष होण्याबरोबरच त्या नाटकांची गोष्टही नामशेष होत असते. ती होऊ नये म्हणून, त्या नाटकांच्या गोष्टींवर चित्रपटांची कथा होऊ शकते का? याचा विचार मोठय़ा प्रमाणात होण्याची गरज आहे.
नाटकावर आधारित काही चित्रपट आलेत. ते गाजलेत. अनेक नाटककारांना चित्रपट लिहिण्याचं तंत्र माहीत नसल्याने त्यांनी आपल्या नाटकाची गोष्ट अर्थात कथा चित्रपटासाठी दिली. काहींनी पटकथालेखनाच्या तंत्राशी मैत्री करून, स्वत:च कथा, पटकथा, संवाद लिहून दिलेत. त्यातलंच एक नाव म्हणजे प्रसिद्ध नाटककार जयंत पवार. त्यांच्या ‘माझं घर’ या नाटकावर आधारित ‘तिचा उंबरठा’ या चित्रपटाचा मुहूर्त अलीकडेच झाला. आपल्या नाटकांत सामाजिक विषयांची मांडणी करणारा एक महत्त्वाचा नाटककार म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्या नाटकावर आधारित ‘तिचा उंबरठा’मध्ये मुंबईत राहणा-या विभावरी नावाच्या उच्च-मध्यमवर्गीय संस्कारीत गृहिणीची कथा सांगितली आहे. नवरा, मुलगी, आई, बाबा, भाऊ, सासू, नणंद यांच्या विश्वात आनंदाने जगणा-या विभावरीला अचानक एका धक्कादायक निर्णयाचा सामना करावा लागतो. त्यातून ती कशा प्रकारे स्वत:ला सावरते आणि स्वत:चा उंबरठा म्हणजेच संसार जपण्यासाठी कशी कटिबद्ध राहते याची कथा म्हणजे ‘तिचा उंबरठा’. विख्यात अॅक्शन डिरेक्टर रवी दिवाण यांनी हा मराठी सिनेमा बनविण्याचं शिवधनुष्य उचललं असून, सिंधुताई सपकाळ यांची भूमिका रुपेरी पडद्यावर अजरामर करणारी तेजस्विनी पंडित ‘तिचा उंबरठा’च्या शीर्षक भूूमिकेत आहे. या चित्रपटाद्वारे तिचे वेगळे रूप सिनेरसिकांना पाहायला मिळणार आहे.
‘फॉरेनची पाटलीण’, ‘चिरगूट’ या चित्रपटांचं दिग्दर्शन केलेले प्रदीप घोनसीकर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. चिन्मय मांडलेकर, तेजस्विनी पंडित, ज्योती चांदेकर, हर्षा खांडेपारकर, सुयश टिळक, तुलिका प्रकाश निकम, भारत शर्मा, शीतल शुक्ला, अभिनय पाटेकर, अदिती सावंत (बालकलाकार) आदी कलाकारांच्या या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. योगेश जानी हे ‘तिचा उंबरठा’चं छायांकन करणार आहेत. नितीन देसाईंचं कला दिग्दर्शन आहे. जसराज जोशी, कविता सेठ, अक्षता सावंत, सुहास सावंत, पिंकी चिनॉय आदी गायकांच्या आवाजात श्रेयस-प्रीत ही संगीतकार दुकली ‘तिचा उंबरठा’मधील गीतांना स्वरसाज चढविणार आहे.
अलीकडच्या काळात मराठी चित्रपटांची संख्या प्रचंड वाढली आहे. काही चांगले विषय येतात. काही फारच सुमार असतात. ‘तिचा उंबरठा’ या चित्रपटाच्या निमित्ताने ‘माझं घर’सारख्या असंख्य नाटकांच्या गोष्टी चित्रपटाच्या कथा होऊ शकतील, असा भरवसा आहे. नामशेष होणारी नाटकांची गोष्ट चित्रपटांत गुंफली तर त्या नाटककाराला आनंद होईल. नाटक आणि चित्रपट माध्यमाची मैत्री नाटय़लेखकांच्या कथेने समृद्धीकडे घेऊन जाईल. ही संख्या दिवसेंदिवस वाढत गेल्यास नाटक आणि चित्रपट या दोन्ही माध्यमांची मैत्री घट्ट होईल.
छान लेख लिहिला आहे.