जो दुस-यांसाठी जगला त्याला जगण्याचा खरा अर्थ कळला असं संत-महात्मे सांगून गेले. खरं तर ते सर्वांनाच माहीत आहे; पण ते कृतीत आणणं मोजक्या लोकांनाच शक्य होतं. सांताक्रूझ येथील सुनील आपटे हे व्यक्तिमत्त्व याच गटात मोडते. गतिमंद मुलांना जगण्याची नवी उमेद देणारं, आपलंस करणारं जिव्हाळय़ाचं ठिकाण सांताक्रूझमध्ये असावं असं त्यांना वारंवार वाटत होतं. याच विचारांतून त्यांनी सांताक्रूझ येथे फेब्रुवारी २००७ साली ‘घरकुल’ची स्थापना केली. ‘घरकुल’च्या या छताखाली आज ४० विद्यार्थी आपलं शिक्षण घेत आहेत.
समाजात जन्माला येणा-या काही नवजात बालकांची बौद्धिक क्षमता काही विशिष्ट वयोमर्यादेपर्यंतच वाढते. बौद्धिक पातळीच्या कमतरतेमुळे अशा मुलांना सामान्य लोकांमध्ये जगणे काहीसे कठीण जाते. सर्वसाधारण मुलांपेक्षा अगदी वेगळ्या मानोविश्वात रमणारी ही मुले असतात. सामान्य मुले देखील त्यांना आपल्यात सामील करून घेत नाहीत. मात्र हीच मुले परिस्थितीचे आव्हान स्वीकारत जिद्दीने स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी धडपडत असतात. अशा या गतिमंद मुलांना जगण्याची नवी उमेद देणारे, आपलेसे करणारे, जिव्हाळ्याचे ठिकाण म्हणजे ‘घरकुल’. मुंबईत अनेक वसतिगृहे किंवा शाळा अशा मुलांसाठी चालवल्या जातात. मात्र ‘घरकुल’मध्ये मिळणारा जिव्हाळा, आपलेपणा अन्य कुठेही आढळणार नाही, याचा प्रत्यय तेथे गेल्यावर येतो.
गतिमंद मुलांना जगण्याची आवड निर्माण करणाऱ्या सांताक्रूझ येथील घरकुलची स्थापना फेब्रुवारी २००७ मध्ये झाली. घरकुलचा पाया रचला तो सुनील आपटे यांनी. सुरुवातीला अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागले. समाजातील सुशिक्षित आणि श्रीमंत वर्गाला अपंगांच्या किंवा गतिमंद मुलांविषयीच्या शाळेची कल्पना असते. मात्र जो अशिक्षित आणि गरीब वर्ग आहे त्यांना अशा शाळेची कल्पनाही नसते. अशा गरीब घराण्यातील गतिमंद मुलांना एकत्र आणून त्यांना अभ्यासापलीकडील काही गोष्टी शिकवण्याची गरज संस्थेचे संस्थापक सुनील आपटे यांना भासली. त्यांनी प्रत्यक्षात झोपडपट्टी विभागात या विषयीचा सर्वे करून त्यांच्या पालकांना भेटून सुरुवातीला आठ मुलांना घेऊन शाळा चालवली. आयुष्यात प्रत्येक गोष्ट शिकण्यासाठी शाळा-महाविद्यालयाची गरज नसते. आपले आयुष्यच एक मोठी शाळा आहे. पुस्तकातील धडे शिकून ज्ञान मिळते आणि आयुष्य नावाच्या शाळेतून अनुभवाने जगता येते. याच उद्देशाने त्यांनी ‘घरकुल’ची स्थापन केली. ही संस्था कोणत्याही नफ्याच्या आशेवर न राहता केवळ गतिमंद मुलांच्या आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी प्रयत्न करत आहे. शिवाय पालकांकडून एकही पैसा न घेता मुलांना शिक्षण दिले जात आहे. दूध, दुपारचे जेवण, कपडे, त्यांना शिक्षण देण्याकरिता विशेष शिक्षक, शाळेत ने-आण करण्यासाठी बस सेवाही शाळेकडून पुरवली जाते. याशिवाय मुलांच्या देखभालीकरिता चार जण आहेत. मुलांना आईप्रमाणे वागणूक देणारे, आत्मीयता जपणारे शिक्षक हे या शाळेचे खास वैशिष्टय़ झाले आहे.
आजघडीला ४० मुले घरकुलाच्या छताखाली शिक्षण घेत आहेत. या संस्थेसाठी सरकार कोणत्याही प्रकारे निधी देत नाही. शासनाला बरेच अर्ज पाठवण्यात आले. मात्र आजतागायत त्याची दखल घेण्यात आली नाही. येथील शिक्षक संस्थेसाठी लागणारा पैसा किंवा एकूण सर्व विद्यार्थ्यांच्या खर्चासाठी लागणारा पैसा हा स्वत:च्या खिशातूनच करतात किंवा काही वेळा जे देणगी देण्यास इच्छुक असतील अशा लोकांकडून संस्थेच्या खर्चासाठी थोडाफार हातभार लागतो. या संस्थेपुढे सर्वात मोठा प्रश्न आहे तो जागेचा. ही संस्था सध्या सांताक्रूझ येथील म्युनिसिपल शाळेच्या तळमजल्यावर कार्यरत आहे. मात्र संस्थेला उपलब्ध करून दिलेली जागा ही संस्थेच्या मालकीची नसून भाडेतत्त्वावर आहे. त्यातही केवळ ८०० चौ. फूट जागेमध्ये ४० विद्यार्थी वावरताना दिसतात. उद्या म्युनिसिपल शाळेने जर जागा खाली करण्यास सांगितले, तर जाणार कुठे? हा गंभीर प्रश्न संस्थेपुढे आहे. या बाबतीत निधी आणि जागा देण्यासाठी मात्र सरकार पाठ फिरवत असल्याचे चित्र दिसत आहे.
मुलांना मानसिक अपंगत्वावर जिद्दीने मात करावी यासाठी ‘घरकुल’ नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असते. एकूण ४० मुला-मुलींची बौद्धिक चाचणी तपासून चार भागांत त्यांची विभागणी करण्यात आली आहे. प्रायमरी, सेकंडरी, प्री-व्होकेशनल आणि व्होकेशनल अशी त्यांची वर्गवारी करण्यात आली आहे. यामध्ये नुकताच प्रवेश घेतलेली सहा वर्षाची मुले आणि ज्यांची बौद्धिक क्षमता खूपच कमी आहे अशी मुले प्रायमरी वर्गात आहेत. तसेच सहा वर्षावरील मुले ही सेकंडरी वर्गात आहेत. या वर्गातील मुलांना दैनंदिन जीवनातील स्वत:ची कामे स्वत: करणे हेही समजत नाही. त्यामुळे त्यांना ते शिकवले जाते. प्री-व्होकेशनल आणि व्होकेशनल या वर्गात साधारण बौद्धिक क्षमता बऱ्यापैकी आहे, अशी मुले आहेत. या दोन वर्गातील मुले पणत्या रंगवणे, मेणबत्त्या बनवणे, ज्वेलरी संबंधित काही कामे, चित्र काढून ती रंगवणे, दोऱ्यामध्ये मणी ओवणे यासारख्या कामांत व्यस्त असतात. सोमवार ते गुरुवार असे चार दिवस ही मुले आपल्याला आवडणा-या कामात हरवलेली असतात. शुक्रवारी मात्र सर्व विद्यार्थी एकत्र येऊन एकाच वर्गात नृत्याच्या विश्वात रमलेले असतात. शिवाय हिशोबनीस महाजन सर, थेरपीसाठी डॉ. गौरी बोरकर, मुलांना रंगकामाचे शिक्षण देण्याकरिता उमा बोरकर आणि मुलांच्या पालकांसाठी कौन्सिलिंगकरिता भक्ती वाळवे हे चार शिक्षक कोणत्याही प्रकारच्या अपेक्षा न करता केवळ गतिमंद मुलांसाठी त्यांना आनंद मिळावा या हेतूने फावल्या वेळात घरकुलमध्ये येतात आणि मुलांचे मनोरंजन करतात.
गतिमंद मुलांसाठी कार्यरत असलेल्या बऱ्याच संस्थांचा असा नियम आहे की, मूल १८ वर्षाचे झाले की त्याला त्याच्या आई-वडिलांकडे घरी पाठवण्यात येते. घरकुलमध्ये मात्र मुलगा किंवा मुलगी १८ वर्षाचे झाले की बौद्धिक चाचणी तपासून त्यांची जे काम करण्याची क्षमता आहे, त्यानुसार व्यावसायिक प्रशिक्षणाकरिता बोरिवली येथील डॉन बॉस्को शाळेत पाठवले जाते आणि ते शिक्षण देऊन झाले की त्यांना नोकरी मिळवून दिली जाते. जेणेकरून ती मुले स्वत:चा उदरनिर्वाह करू शकतील.
घरकुलची भविष्यातील धोरणे
- इतर मतिमंद मुलांनाही आधार देण्यासाठी घरकुलच्या शाखा सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे.
- ज्या मुलांना पालक सांभाळत नाहीत, अशा मुलांना आधार देण्यासाठी वसतिगृह चालू करणे.
- जी मुले या शाळेत येऊ शकत नाहीत, अर्थात, ती अंथरूणावरच असतील अशा मुलांना त्यांच्या घरी जाऊन प्रशिक्षण देणे.
- सध्या घरकुलमध्ये सहा वर्षे किंवा त्यावरील मुलांनाच प्रवेश दिला जातो. परंतु, यापुढे जी मुले तीन ते सहा या वयोगटात येतात त्यांनाही प्रवेश दिला जाणार असून संस्थेने त्यासाठीची तयारी केली आहे.
या मुलांवर त्यांच्या व्यंगानुसार सतत उपचार चालू असतात. ज्या मुलांना बोलण्याचा त्रास होत आहे, त्यांना बांद्रा येथील अलियावर जंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्थेतील रुग्णालयात उपचार चालू आहेत आणि ज्या मुलांना शारीरिक व्यंग आहे, अशा मुलांचे उपचार नानावटी रुग्णालयात चालू आहेत. या मुलांच्या औषधोपचारासाठी पुरेपूर काळजी ‘घरकुल’मध्ये घेतली जाते.
ह्याच sarkhe satkarya jagat ankhin konte asu shakel? gharkool chi dhura sambhalnaryana aamchya
Shubhechha!