संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरणाच्या कालव्याचे काम संथ गतीने सुरू असून ते निकृष्ट दर्जाचे होत आहे.
देवरूख- संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरणाच्या कालव्याचे काम संथ गतीने सुरू असून ते निकृष्ट दर्जाचे होत आहे. कालव्यातून जाणारे पाणी, त्याचा असलेला वेग, याचा विचार करून बांधकाम होत नसल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी संतोष येडगे यांनी केला आहे.
कोटय़वधी रुपये खर्च करून धरणाचे काम सद्यस्थितीला पूर्णत्वास जाऊ लागले आहे. या धरणाच्याच कालव्याचा मुख्य दरवाजा २९ ऑगस्ट रोजी तुटला होता. त्याची दुरुस्ती होईपर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले. त्यानंतर बोगद्याजवळून कालव्यापर्यंत पाणी वाहून नेण्यासाठी धरणाचे पाणी संथ गतीला आणण्यासाठी संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ही संरक्षक भिंत सिमेंट, खडी, वाळू व स्टील यांचा आधार घेऊन उभारणे आवश्यक असताना चक्क दगडाचा वापर करून ही भिंत उभी केली जात आहे. हे काम अत्यंत धोकादायक स्थिती निर्माण करणारे आहे, असा आरोप धरणाची पाहणी केल्यानंतर येडगे यांनी केला आहे.
धरणातून अत्यंत वेगाने येणारे पाणी कालव्याद्वारे सोडण्यासाठी त्याची गती संथ होण्यासाठी ही संरक्षक भिंत अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. मात्र, नेमून दिलेला ठेकेदाराकडून निकृष्ट काम केले जात आहे. लघुपाटबंधारे विभागाचे अभियंताही याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत. हे निकृष्ट काम त्वरित थांबवण्यात यावे, अशी मागणी येडगे यांनी केली आहे.
संगमेश्वर तालुक्यातील आणखी एक धरण गडगडी नदी प्रकल्प (किंजळे धरण) हा सुद्धा गेली २० वर्षे संथगतीने सुरु आहे.हे धरण कधी पूर्ण होणार देव जाणे?