तरुणांचं भावविश्व, त्यांच्या कॉलेज जीवनातल्या गमतीजमती, संघर्ष दाखवणारी ‘दुनियादारी’ ही कादंबरी सुहास शिरवळकरांनी १९८२ साली लिहिली. पुण्यातल्या एका महाविद्यालयातल्या तरुणांच्या जीवनाची कथा या कादंबरीत मांडण्यात आली होती. या कादंबरीतली पात्रं तेव्हाच्या तरुणांना अगदी आपलीशी वाटली. या कादंबरीवर पुढे एक मालिकाही आली. तसं या कादंबरीचं कथानक अनेक दिग्दर्शकांना भुलवणारं आहे. त्यात मानवी जीवनातील सर्व रस आहेत. कोणत्याही यशस्वी चित्रपटासाठी आवश्यक असलेले सगळे गुण या कादंबरीत आहेत. संजय जाधव याच्यासारख्या सर्जनशील कॅमेरामन-दिग्दर्शकाच्या नजरेतून ही गोष्ट सुटली असती तरच नवल. त्यांनी या कादंबरीवर चित्रपट बनवायचं ठरवलं आणि याच नावाचा सिनेमा आता १९ जुलैला प्रदर्शित होतोय. या सिनेमाच्या निर्मितीत ‘महाराष्ट्र कलानिधी’ व नितेश राणे यांचाही सहभाग आहे. या सिनेमाच्या निर्मितीवर दिग्दर्शक-कलाकारांच्या नजरेतून टाकलेला एक दृष्टिक्षेप-
माझ्या स्वप्नातील भूमिका !
अंकुश चौधरी
‘दुनियादारी’ चित्रपटातली ‘डीएसपी’ ही भूमिका अगदी माझ्या जवळची आहे. माझ्या महाविद्यालयीन जीवनात मीही काहीसा असाच होतो. सगळय़ांचा म्होरक्या, मैत्रीसाठी काहीही करण्याची तयारी, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी पुढे असणारा, थोडेफार राडेही करणारा, थोडक्यात जिवाला जीव देणारा. मी ही कादंबरी वाचली होती तेव्हा मलाही ती खूप आवडली होती. हा चित्रपटाचा विषय आहे, अशी माझ्या मनाने तेव्हाच खूणगाठ बांधली होती. यात मी केलेली डीएसपी ही भूमिका अशी आहे की, जी आपण कधी ना कधी करावी, असं मला नेहमी वाटायचं.
पण तसा काही योग येत नव्हता. संजय जेव्हा या चित्रपटाची जुळवाजुळव करत होता, तेव्हाही मी सतत त्याच्या मागे होतो. मध्यंतरी कुणीतरी दुसराच अभिनेता ही भूमिका करणार असं ठरलं, तेव्हा मी मनात म्हटलं की ‘अरेरे, गेली आपली संधी’. मात्र माझ्या नशिबात ही भूमिका होतीच. संजयने ‘दुनियादारी’ करायला घेतला तेव्हा तेव्हा डीएसपीच्या भूमिकेसाठी त्याने माझीच निवड केली.ही भूमिका करताना तेव्हाच्या काळाचा विचार करणं आवश्यक होतं. तेव्हाची फॅशन, चालण्याची ढब, तेव्हाच्या तरुणांच्या काही लकबी यांचा अभ्यास केला. यासाठी माझ्या वडिलांचीही मला मोठी मदत झाली. त्या काळात कोणत्या ना कोणत्या हिरोला फॉलो करण्याची पद्धत होती.
त्याच्यासारखी केशरचना करण्याचा अनेक जण प्रयत्न करत असत. माझा डीएसपी हा काहीसा अमिताभ बच्चन यांच्या जवळ जाणारा आहे. हा चित्रपट सर्वकालिक आहे, असं मला वाटतं. आधीच्या पिढीला आणि आताच्या तरुणांना तो आपलासा वाटेल. या चित्रपटाचं संगीतही वैशिष्टय़पूर्ण झालं आहे. चित्रपटाच्या मूडनुसार यात गाणी आहेत.
संजय जाधव
‘दुनियादारी’ ही कादंबरी मी इंजिनीअरिंगच्या पहिल्या वर्षाला असताना वाचली होती. ती वाचतानाच त्यातले प्रसंग, घटना अगदी आपल्या समोरच घडताहेत की काय, असं वाटत राहिलं. तेव्हा माझा चित्रपटसृष्टीशी संबंध नव्हता, पण एक गोष्ट तेव्हाही मला जाणवली की या कादंबरीवर कुणीतरी चित्रपट करायला हवा. पुढे जेव्हा इंडस्ट्रीत आलो तेव्हा अनेक गोष्टी ऐकत होतो. कुणी म्हणत होतं की राजदत्त, सचिन पिळगावकर अशी मंडळी या कादंबरीवर चित्रपट करणार आहेत. पण तेव्हाही कुणीतरी हा चित्रपट करावा व आपल्याला किमान कॅमेरामन म्हणून बोलवावं, तेव्हा असं वाटलं होतं.
पुढे जेव्हा मी माझं प्रॉडक्शन हाउस सुरू केलं, तेव्हा या कादंबरीवर आपण मालिका करावी, असा विचार मनात आला. मी कादंबरीचे हक्क घ्यायला गेलो तेव्हा मला कळलं की, सतीश राजवाडे कालच येऊन हक्क घेऊन गेलाय. तोही माझा चांगला मित्र असल्याने मग मालिकेचा विचार तसाच राहिला. पुढे मी अनेक वेळा या विषयावर सुहासजींशी बोलायचो. त्यांच्या अगदी मागेच लागलो होतो, असंही म्हणायला हरकत नाही. एकदा त्यांचा मला फोन आला, आपण या ‘दुनियादारी’वर काहीतरी करूया. मी त्यांना म्हणालो की, येत्या दोन-तीन दिवसात मी पुण्यात येऊन तुम्हाला भेटेन, मात्र ती भेट होणं नव्हतं. आमचं बोलणं झाल्यानंतर ते तीन दिवसांनीच हार्ट अॅटॅकने गेले. ‘
दुनियादारी’वरील चित्रपटाची निर्मिती तशीच राहिली, पण हक्क माझ्याकडे होते. मला कधी ना कधी हा चित्रपट करायचाच होता. गेल्या वर्षीच्या मिफ्टा पुरस्कार सोहळय़ाला जाताना नानूभाई माझ्याबरोबर विमानात होते. मी त्यांना विचारलं की, मराठी चित्रपट व्यवसायावर थोडंफार बोलणं झालं. ‘मिफ्ता’हून परतल्यावर त्याच दिवशी मी दुपारी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना भेटून त्यांना या चित्रपटाचं प्रपोजल दिलं. तेही उत्साहित झाले.
या चित्रपटाची सगळी जुळवाजुळव आम्ही पूर्ण केली. चित्रपटासाठी कलाकार निवडण्याचा वगैरे प्रश्नच आला नाही, कारण हा चित्रपट करायचा विचार माझ्या मनात आल्यापासून या चित्रपटासाठीची पात्रं माझ्या मनात पक्की होती. मला हा चित्रपट सत्तरच्या दशकात घडतोय, असं दाखवायचं होतं. या कादंबरीतला काळ साधारण तोच होता. दुसरं असं की, एकाच वेळेस तरुणांना व प्रौढांनाही आपलासा वाटला पाहिजे, असं मला वाटत होतं. या चित्रपटातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेची ओळख तयार करण्याचं काम हर्षदा खानविलकरने केलं. तिने त्यांच्या स्टाईल्स ठरवल्या. अंकुशला ‘शोले’मधल्या अमिताभसारखी वेशभूषा दिली. स्वप्नील जोशीला ‘बॉबी’मधल्या ऋषी कपूरसारखा लुक दिला. अशा अनेक गमतीजमती आम्ही या चित्रपटात केल्यात.
मूळ कादंबरीला पडद्यावर आणताना फारसे बदल करण्यात आलेले नाहीत. हा चित्रपट करायचं ठरवल्यापासून एक गोष्ट पक्की होती, मला या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीला एक उदाहरण घालून द्यायचं होतं. त्यासाठी या चित्रपटाचं चित्रीकरण हे पुण्यातल्या कृषी विद्यापीठाच्या परिसरात व्हावं असं मला वाटतं होतं. कारण हे लोकेशन फारच महागडं होतं. याच परिसरात पूर्वी ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ हा चित्रपट चित्रित झालाय. जर इथे तडजोड केली, तर संपूर्ण चित्रपटाची मजाच निघून जाईल, असंही वाटत होतं.
या वेळी नितेश राणे माझ्या मदतीला धावून आले. त्यांना माझी अडचण समजल्यानंतर त्यांना ‘महाराष्ट्र कलानिधी’च्या माध्यमातून या लोकेशनचा आर्थिक भार पेलला. एकदा त्या लोकेशनवर चित्रीकरण करणार, हे निश्चित झाल्यानंतर पुढचा सगळा प्रवास सोपा झाला. अनंत पणशीकर यांनीही सहकार्य केलं. आता तर हा चित्रपट ‘झी टॉकीज’नं वितरणासाठी घेतला आहे.
त्यामुळे त्याचं वितरणही मोठय़ा स्तरावर होतंय. एक फार वर्षापूर्वी पाहिलेलं माझं स्वप्न अशा पद्धतीनं पूर्ण होताना पाहून खरोखरच आनंद होत आहे. हाच आनंद प्रेक्षकांनाही मिळेल अशी मला खात्री आहे. ‘दुनियादारी’ कादंबरी लिहिण्यात आली तेव्हाच्या व आजच्या परिस्थितीत बदल झालेला असला तरी तरुणाईचा जोश तोच आहे. ज्यांनी ही कादंबरी वाचली असेल त्यांना पुन:प्रत्ययाचा आनंद, तर ज्यांनी ती वाचली नाही त्यांना एक दर्जेदार चित्रपट पाहण्याचं समाधान मिळेल.
प्रगल्भ भूमिका केल्याचं समाधान!
सई ताम्हणकर
मलाही असंच वाटतं की, या चित्रपटातली शिरीन ही व्यक्तिरेखा साकारायला मिळण्याची संधी हे माझ्यासाठी भाग्यच आहे. अशा प्रकारची भूमिका मी याआधी केली नव्हती. ती फार प्रगल्भ आहे. आपल्याला जीवनात काय करायचं आहे, याची तिला पूर्ण जाणीव आहे. ती अगदी वाहवत जरी गेली तरी आपण का वाहवतोय, याचं एक निश्चित असं उत्तर तिच्याकडे आहे. मी तशी नाही त्यामुळे ही भूमिका साकारताना मला फार मजा आली.
संजयबरोबर काम करतानाही एक वेगळीच मजा येते. तो अगदी सगळय़ाच गोष्टींकडे बारकाईने पाहतो. म्हणजे अगदी बसताना, उठतानाही आपल्या शरीराची ठेवण कशी सुबक असली पाहिजे याचाही विचार तो करतो. त्यामुळे ते पात्र अधिक जिवंतपणे प्रेक्षकांच्या समोर येतं. मी याबाबतीत काहीशी निष्काळजी आहे. मात्र या सा-या गोष्टी शिकून घेताना मला खरोखरच फार मजा आली. या चित्रपटातून मला एकाच व्यक्तिरेखेच्या विविध छटा दाखवता तर आल्याच, पण या टीमबरोबर काम करतानाची मजाही काही औरच होती. आपण पुन्हा एकदा जुने दिवस जगतोय, अशाच प्रकारची भावना आमच्या सगळ्यांची होती.
स्वप्निल जोशी
‘दुनियादारी’ या चित्रपटातली श्रेयस तळवलकर ही भूमिका माझ्यासाठी एखादं स्वप्न सत्यात उतरण्यासारखी आहे. कोणत्याही अभिनेत्याला अशा प्रकारची भूमिका आपण करावी असं वाटत असतं. या भूमिकेत विविध छटा दाखवायची संधी मला मिळाली. या भूमिकेचं वैशिष्टय़ म्हणजे ही भूमिका प्रतिक्रियावादी आहे. आपल्या सभोवताली घडत असलेल्या घटनांबद्दल, नात्यांबद्दल तो प्रतिक्रिया नोंदवत असतो. त्याच्या सर्व क्रिया या सभोवतालच्या परिस्थितीनुसार घडत जातात. ही गोष्ट मला फार आवडली.
हा चित्रपट करणं हे संजयचं स्वप्न होतं. इतर सगळय़ांप्रमाणेच मीही ही कादंबरी वाचली होती, तेव्हा या कादंबरीतला श्रेयस मला फार भावला होता. ही भूमिका आपल्याला कधी करायला मिळेल, असं वाटलंही नव्हतं. त्यामुळे मी पुन:पुन्हा हेच सांगेन की, ही भूमिका म्हणजे माझं एक स्वप्नच सत्यात उतरलं आहे.
मी महाविद्यालयीन दिवसांमध्ये या श्रेयसपेक्षा फार वेगळा होतो.
तो हळूहळू उलगडत जातो. मी मात्र काहीसा मस्तीखोर होतो. एक मात्र खरं की, या चित्रपटात दाखवलेली जी मैत्रीची संकल्पना आहे, त्या प्रकारेच मीही जीवनात मैत्री केली. ती त्या दिवसांमध्ये होती तशीच ती आजही आहे. हा चित्रपट, त्याचं कथानक, दिग्दर्शक व एकंदरीतच आमचा सगळा ग्रुप पाहता आम्हाला हा चित्रपट करताना जितकी मजा आली तितकीच ती प्रेक्षकांनाही येईल, असा मला ठाम विश्वास आहे.
akadm zakas
suparrrr.
Teri meri yari mag….geli Duniyadari…Ekdam Zakkkkas…. Marathi Film Ahe…
thanks to all duniyadari team.
khup chan