गेला रविवार मोठया धुरळ्याचा गेला. जाम खकाणा उडाला. बाबौ. सगळीकडे झाडझुड. झाडून सगळे कामाला लागलेले. म्हणजे झाडायला लागलेले. गल्लीबोळ, रस्ते, सोसायटया, चाळी, चौक, असतील नसतील त्या कचराकुंडय़ा, इमारतींच्या गच्च्या जे जे दिसेल त्यावरून झाडू फिरली. चाचा नेहरूंचा बालदिन कसाबसा सुटला या साफसफाईतून. पण रविवारी मात्र सगळे कामाला लागले होते. ठिकठिकाणी वाण्याकडच्या केरसुण्या, खराटे यांचा विक्रमी खप झाला अशी बातमीही होती दुस-या दिवशी. खात्रीने देशात दुस-या दिवशी धुळीचा कण उरला नसणार. दुस-या दिवशी रस्त्यावर आलेले महापालिकांचे आणि इतर यंत्रणांचे सफाई कामगारही अचंब्यात पडले होते की आता झाडायचं काय आणि रस्त्याच्या या बाजूचा ढीग दुसरीकडे सरकवायचा तर तो तरी आहे कुठे म्हणून. एवढया सकाळी उठून आलो कामावर तर ते कष्टही मातीत गेले म्हणायची सोय नाही. कारण हल्ली सिमेंट-डांबराच्या रस्त्यांवर मातीच नसते आणि जी काही आजूबाजूला असणार तीही रविवारच्या झाडूवाल्यांनी लोटून नेलेली ना. आमच्या पोटावर पाय आणला म्हणून सफाई कामगारांच्या काही संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात झाडू उंचावणारही होत्या. पण कुणीतरी सांगितलं की जाऊ दे भाऊ, एक दिवसाचं राष्ट्रीय कर्तव्य होतं ते.
सगळ्यांनी त्यात भाग घेतला होता. झाडणारे कामात मान खाली घालून पण कुणी फोटो कोढतयं का याकडे लक्ष ठेवून. आणि फोटोग्राफरही कामात चांगली अॅक्शन मिळतेय का म्हणून. एवढया सगळ्या धुरळ्यात एकच चांगला फोटो मिळाला तो बारामतीला. तो सगळ्यांनीच छापला आणि सर्वानीच पाहिला. झाडणारे अमक्या पक्षाचे आणि न झाडणारे विरोधक अशीही विभागणी होऊन गेली त्यातच.
गमतीचा भाग सोडावा म्हटलं तरी गम्मतच होती सगळी. स्वच्छता, साफसफाई हे आरोग्यासाठी आवश्यक आहेच. परिसराच्या सौंदर्यासाठीही महत्त्वाचं आहे हे कुणालाही नाकारता येणार नाही. पण हा एक दिवसाचा हंगामा प्रसिद्धीलोलूप आणि भाषणबाज मंडळींनी घडवून आणला होता. ज्यांनी आयुष्यात घरात इकडची काडी तिकडे केली नसेल, ज्यांच्या घरात दोन-दोन मोलकरणी कामाला असतात, जे घरातली कच-याची बादलीही दार उघडून झाडूवालीला देणार नाहीत-देत नाहीत, ज्यांनी फार क्वचितच घरात कचरा काढला असेल अशी लोकचं या झाडूकामगारांमध्ये मोठया संख्येने होती. त्यांनी ख-या अर्थाने हा संदेश स्वीकारला का, स्वच्छतेचं, स्वकष्टांचं महत्त्व अंगी बाणवलं का या प्रश्नांची उत्तरं शोधायला गेलात तर हातात धूळमातीच येईल.
ज्या मंडळींच्या नजरेला घरातील कोप-यात जमलेलं कोळ्याचं जाळं खटकत नाही, ज्यांना पुस्तकांवरची धूळ दुखावत नाही, दिसत नाही, ज्यांनी टीपॉयवरील चहाच्या कपांचे डाग कधी ओल्या फडक्याने पुसून काढलेले नाहीत त्यांना या एक दिवसाच्या साफसफाईने काहीही शिकवलं नसणार. कारण स्वच्छतेसाठी अंत:प्रेरणा लागते आणि त्याची सुरुवात स्वत:पासून, घरापासून करावी लागते. त्यासाठी दररोज झाडू हातात घ्यावी लागते.
या मंडळींपैकी कितीजणांनी दुस-या दिवशी त्याच प्रेमाने, अंत:प्रेरणेने, स्वच्छतेच्या कळकळीने झाडू हातात घेतली असणार याचं उत्तर तुम्ही शोधू शकता. दुस-या दिवशी परत कचरा रस्त्यावर टाकला गेला, आपल्या दारापुढील, दुकानापुढील पुढे लोटला गेला, कचराकुंडीकडे न जाता तिच्या दिशेने भिरकावला गेला, बेफिकिरीच्या पिचका-या मारल्या गेल्या, कागदाचे बोळे, सिगारेटची थोटकं, वेफर्सची पाकिटं, बिस्लेरीच्या बाटल्या सगळं नेहमीसारखं जमा होत गेलं. अंत:प्रेरणा असेल तर आपण आपल्या हातातील बोळा किंवा कागदाचा तुकडाही डस्टबीन वा कचरापेटीशिवाय इकडेतिकडे फेकू शकणार नाही.
अशी अंत:प्रेरणा असलेली माणसे वेगळीच असतात. गाडगेबाबा, आपले माजी महापौर महादेव देवळे यांच्यासारखी. गाडगेबाबांचं संध्याकाळी कीर्तन असायचं. आणि त्याआधीच एखादा तास चौकात बाबांची स्वारी यायची. चिंध्या-तुकडयांनी शिवलेला पोशाख, हातात खापरं असं गोजरं रूप. हा माणूस यायचा, कुणाशी काही न बोलता झाडायला लागायचा. परिसरात झाडू फिरायची. कुणीतरी बाबांना ओळखायचं, पुढे धावायचं. झाडू घेऊ पाहायचं. लाजून स्वत: झाडायला लागायचा. अवघा चौक साफसूफ. बाबा खूश. कीर्तन जाम रंगायचं. गाडगेबाबा स्वच्छतेचा मंत्र असा आचरणातून सांगायचे, रुजवायचे. कचरा आणून टाकून मग फोटोसाठी झाडू हातात घेणारे ते नव्हते. कुणीतरी सांगितलंय म्हणून वा कुणाच्या तरी नजरेत आपण आलो पाहिजे म्हणून जुलूमाची साफसफाई करणारे ते नव्हते. त्यामुळे त्यांचा मंत्र समाजात रुजला आहे. माजी महापौर देवळे अगदी आतापर्यंत त्यांच्या गल्लीचा रस्ता झाडून काढायचे. सकाळी उठले की ठरलेला नित्यनेम. अंत:प्रेरणा ही अशी असावी लागते.
एक किस्सा वाचला होता. युरोपच्या कुठल्यातरी शहरात सिग्नलला थांबलेली पर्यटकांची मोटर. या मोटारीतून एक सिगारेटचे वा कुठले तरी पाकीट बाहेर कडेच्या पदपथावर भिरकावले गेले. तेच पाकीट तितक्याच वेगाने आत आले आणि पाठोपाठ आवाज – जे तुम्हाला नकोय ते आम्हालाही नकोय. अशी प्रखर सामाजिक जाणीव आहे म्हणून युरोप स्वच्छ, सुंदर आहे. अपवाद इटलीचा. इटलीत शिरलात की भारतात प्रवेशल्यासारखं वाटायला लागतं. हे सांगायला वाईट वाटतंय पण वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.
आपल्याला सवय जिकडे वाटेल तिकडे कचरा टाकायची. आपण कचराकुंडीपर्यंत जाणार नाही, घंटागाडी आली तरी कचरा घेऊन धावणार नाही. कचरा फेकणार तो गेटबाहेर. दुस-याच्या दारात. स्वच्छ ठाण्याची गोष्ट सांगतो. ठाण्यात कोपरीत स्टेशनजवळ आनंद दिघे यांच्या नावाने एका कोप-यावर पाटी लावून छान हिरवळ लावली होती. त्या कोप-यात आधी कचरा टाकला जायचा. ढीग जमायचा. तो कोपरा असा सुशोभित झाल्यावर वाटलं आता कच-याचा ढीग बंद होईल. काही दिवस तसं झालंही. आता हिरवळ सुकली, दिघेसाहेबांच्या पाटीवर, शिल्पावर धुळीची पुटं आणि समोर कच-याचे ढीग. समोरच्या वस्तीतील पोरं तिथंच विधीसाठी बसतात. या कोप-याच्या समोरच शिवसेनेची शाखा आहे, भाजपच्या संदीप लेलेंचे कार्यालय आहे आणि विद्यमान विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांचे संपर्क कार्यालयही हाकेच्या अंतरावर आहे. याच कोप-यावरून त्यांची गाडी नेहमी जाते-येते.
तलावांचे शहर असलेल्या ठाण्यातील किती तलाव तर कच-याने बुजवले. मखमली तलावात काठावरच्या मंदिराचा कचरा, सांडपाणी लोटलं जातं. आणखी एक तलाव तर बिल्डरने डबरचे ट्रक रिकामे करून बुजवत आणलाय. जी परिस्थिती ठाण्यात तीच मुंबईत, तीच इतर उपनगरांमध्ये, शहरांमध्ये. अगदी ट्रेनमध्येही भरपूर कचरा करणारे, बिस्लेरीच्या बाटल्या फेकणारे, फळांच्या साली बाकाखाली लोटणारे सुशिक्षित आपल्या अवतीभवतीच दिसतात.
या सगळ्यांना भानावर आणायला आता गाडगेबाबाही पुरे पडणार नाहीत!
संत गाडगेबाबांनंतर आत्ता पर्यंत कोणाही पंतप्रधानाला न सुचवेली स्वच्छ भारताची कल्पना मोदीजींना सुचली . ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रसिद्धी लोलुप सुटाबुटातील लोक रस्त्यावर उतरले ,सर्व अधाशी माध्यमे त्यांच्या मागे पुढे करू लागली ,आणि मग त्यांना तर चेवच चढला ,मग मात्र वाचून लागले खरोखरच गाडगेबाबा पुरे पडणार नाहीत