गेल्या शनिवारी नक्षलवाद्यांनी छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात जगदलपूरच्या मार्गावर असलेल्या घनदाट दर्भा जंगलाच्या परिसरात काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर सशस्त्र हल्ला चढवला, बेछुट गोळीबार केला, बॉम्बस्फोट घडवले आणि काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसह राज्यातील काँग्रेसचे नेतृत्वच संपवून टाकले.
गेल्या शनिवारी नक्षलवाद्यांनी छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात जगदलपूरच्या मार्गावर असलेल्या घनदाट दर्भा जंगलाच्या परिसरात काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर सशस्त्र हल्ला चढवला, बेछुट गोळीबार केला, बॉम्बस्फोट घडवले आणि काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसह राज्यातील काँग्रेसचे नेतृत्वच संपवून टाकले. शनिवारची संध्याकाळ मृत्यूच्या काळोखात विलीन झाली. गेल्या शनिवारी तारीख होती २५ मे, २०१३. नक्षलवाद्यांच्या दृष्टीने या तारखेला फार मोठे महत्त्व आहे. १९६७मध्ये २५ मे रोजीच दार्जिलिंग जिल्ह्यातील नक्षलबाडी गावात नक्षलवादी चळवळीची पहिली ठिणगी पडली होती. ‘शोषित, पीडितांच्या न्याय्य हक्कांसाठी पुकारलेला संघर्ष’, अशा आकर्षक वेष्टनातील मार्क्सवादी-लेनिनवादी गटांच्या विचारधारेचा तो पहिला सशस्त्र आविष्कार म्हटले तर ते अयोग्य ठरणार नाही. एका भूमिहीन मजुराला सरकारने देऊ केलेली जमीन हिसकावून घेणा-या गावगुंडांना त्या वेळी नक्षलवाद्यांनी धडा शिकवला होता. तेव्हाच या चळवळीचे याच गावाच्या नावाने बारसे झाले.
आता काळाच्या ओघात बरेच पाणी वाहून गेले आहे. तेव्हा आदिवासींच्या हक्कांसाठी गावगुंडांच्या विरोधात उभे ठाकलेले नक्षलवादी आज अनेक भागांत शोषणकर्ते ठरले आहेत, गावगुंडांच्याच आवेशात खाणमालक, उद्योगसमूह यांच्याकडून खंडणी वसूल करत आहेत. अराजक माजवायचे हे एकमेव उद्दिष्ट झाल्यागत चळवळीसाठी पैसा या नावाने खंडणी वसुली, शस्त्र खरेदी, अन्नधान्याची बेगमी आणि मग जमले तर आदिवासी, शोषितांचे हितसंरक्षण हे आजच्या नक्षलवादाचे वास्तव आहे.
नक्षलवादी चळवळीचा अभ्यासक असलेला चंद्रपूरचा पत्रकार देवेंद्र गावंडे गेली अनेक वर्षे याविषयी सातत्याने लिहीत आहे. नक्षलवादी चळवळीबद्दल जाणतेपणाने लिहिणा-या ज्येष्ठ पत्रकारांचे परखड बोल या तत्त्वज्ञानाची फोलपटे समोर आणतात. नक्षलवादी चळवळीच्या शर्करावगुंठीत विचारधारेची भुरळ पडून त्या काळात अनेक बुद्धिजीवी या चळवळीचे पाठीराखे झाले होते. आजही आहेत..
जनकल्याणाच्या नावाखाली अराजकाचे, हिंसाचाराचे, रक्तपाताचे, निष्पापांचे बळी घेण्याच्या पाशवी वृत्तीचे समर्थन करायला ही मंडळी जेव्हा पुढे येतात तेव्हा ‘जगा आणि जगू द्या’ या जगण्याच्या सरळसाध्या विचारसरणीचा अवलंब करणा-या माझ्यासारख्या सर्वसामान्यांना ते झेपतच नाही. छत्तीसगडमधील ताज्या हिंसाचारानंतर एका वृत्तवाहिनीने नक्षलवादाविषयी लागोपाठ दोन दिवस ज्येष्ठ-श्रेष्ठ तज्ज्ञ, माहीतगारांमध्ये चर्चा घडवून आणली. या चर्चेत प्रत्येक जण नक्षलवादाविषयी बोलत होता, नक्षलवाद्यांविषयी बोलत होता, त्यांच्या विचारधारेविषयी बोलत होता. त्यांना या देशाचे कायदेच मान्य नाहीत, ही राज्यपद्धतीच कशी मान्य नाही, म्हणूनच ते स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनही पाळत नाहीत याचेही कुणी समर्थन करत होता. सर्व विषयाचा सर्वानी अनेक अंगानी कीस पाडला. सर्वसामान्यांच्या बाजूने मात्र कुणीच बोलले नाही. आदिवासींपासून तुम्हा-आम्हा सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे, आम्हाला हिंसा मान्य नाही, झटपट न्यायदानाचा आव आणून एखाद्याचा जीव घेणे, गोळ्यांनी शरीराची चाळण करणे, प्रवाशांनी भरलेली अख्खी बस बॉम्बने उडवून देणे, पोलिसांवर, सीआरपीएफच्या बेसावध जवानांवर अंदाधुंद गोळीबार करून, त्यांचे हालहाल करून मारणे, मेलेल्या जवानांच्या पोटात स्फोटके भरून आणखी घातपात घडवण्याच्या आसुरी योजना आखणे यातील काही काही आम्हाला पटत नाहीत. आमच्या जगण्याच्या साध्यासोप्या व्याख्येत हे बसत नाही. नक्षलवादी विचारधारा हिंसेचे समर्थन करत असेल तर ती सर्वसामान्यांसाठी काडीचीही उपयोगाची नाही, या सगळ्यांबद्दल या चर्चेत वा नंतरही कुणी ज्येष्ठ-श्रेष्ठ, थोर थोर मंडळी कुठे बोलल्याचे आढळले नाही.
सर्वसामान्यांची ही भावना काही अंशाने प्रकटली ती प्रेक्षकांच्या, वाचकांच्या प्रतिक्रियांमधून. रोजच्या रहाटगाडग्याला खेचत, हालअपेष्टा, खस्ता सोसत, अडचणींना सामोरे जात आपण सगळेच जगतो आहोत. पण म्हणून आपण सगळ्यांनीच शस्त्रे हाती घेतलेली नाहीत वा घातपाताची कटकारस्थाने रचलेली नाहीत वा कुणावर गोळी झाडलेली नाही. कारण तुमचा आमचा जगण्याच्या तत्त्वज्ञानावर अढळ विश्वास आहे. या सगळ्यांची भावना आणखी प्रकर्षाने व्यक्त व्हावी म्हणून हे सगळे पोटतिडिकीने सांगावेसे वाटले.
नक्षलवादी चळवळीचे शहरांत सुखाने राहणारे बुद्धिजीवी समर्थक यामुळे कदाचित नाराज होतील. या लेकाला नक्षलवादी चळवळच मुळात माहिती नाही, ती विचारधाराच समजलेली नाही, अशीही टीका करतील. मान्य आहे. आयुष्यावर प्रेम करणा-या हजारो सर्वसामान्यांपैकीच एक असल्यामुळे आम्हाला त्या वाटेला जायचेच नाही. कितीही विपरीत झालं, सोसावं लागलं तरी याच सर्वसामान्यांनी अजून लोकशाही टिकवून ठेवली आहे. मानवता, बंधुभाव, मूल्यं यांना सर्वोच्च मानलं आहे. आम्हाला आमच्या देशाबद्दल अजूनही प्रेम आहे, अभिमान आहे आणि ज्यांचे उद्दिष्टच मुळी या देशाला, इथल्या व्यवस्थेला नख लावायचं आहे त्यांच्याशी आम्हाला काडीचंही घेणंदेणं नाही!
अशा पांढरपेशा बुद्धीवादामुळेच प्रचंड अशा भ्रष्टाचाराचा आता भस्मासुर झाला आहे .त्यामुळे नजिकच्या भविष्यकाळात बुद्धीवाद्यानीही शस्त्रे हाती घेतली तर नवल वाटायला नको