तालुक्यातील ३१४ प्राथमिक शाळांमधील मुलांना शालेय पोषण आहारासाठी सरकार धान्य पुरवते. हे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी गुजरातमधील नवसारी येथे नेले जात होते.
भिवंडी – तालुक्यातील ३१४ प्राथमिक शाळांमधील मुलांना शालेय पोषण आहारासाठी सरकार धान्य पुरवते. हे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी गुजरातमधील नवसारी येथे नेले जात होते.
याबाबत भिवंडी जनआंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शुक्रवारी अंबाडी नाका येथे धान्याने भरलेला टेम्पो पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला.
यामध्ये ५० किलो वजनाच्या १५० गोणी तांदूळ आणि २० पिशव्या पिठ आढळले. या घटनेची दखल घेवून गटविकास अधिकारी डॉ. करुणा जुईकर यांनी कंत्राटदार ‘नाईक फाउंडेशन’ संस्थेला शनिवारी ‘कारणे दाखवा’ नोटिस बजावली असून येत्या तीन दिवसांत फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे संकेत दिले आहेत.
तालुक्यातील ३१४ शाळांना आहारासाठी धान्य पुरवण्याचे कंत्राट घेणा-या नाईक फाउंडेशनचा ‘काळाबाजार’ यामुळे उघडकीस आला आहे.
विशेष म्हणजे ३ वर्षापूर्वी पंचायत समितीच्या मासिक सभेत ठेका देण्यास विरोध असतानाही फाउंडेशनलाच हा ठेका मिळाला होता. यासाठी वरिष्ठ पातळीवरून दबावतंत्र वापरून फाउंडेशनने पोषण आहाराचा ठेका घेण्यासाठी ‘साटेलोटे’ केल्याचे बोलले जात आहे.
नाईक फाउंडेशनकडून पडघा येथील प्लांटवर रात्री हा आहार तयार केला जातो. दुस-या दिवशी दुपारी स्टीलच्या बंद डब्यांमधून शाळांमध्ये तो पाठवला जातो. या कामासाठी १२ तासांपेक्षा जास्त वेळ लागत असल्याने डब्यांमधील अन्न निकृष्ट होते.
सरकारी धोरणानुसार पोषण आहाराचे काम स्थानिक महिला बचत गटांना मिळाले तर मुलांना ताजा आणि घरगुती आहार मिळेल. परंतु नाईक फाउंडेशन विद्यार्थ्यांच्या कोटय़ाप्रमाणेच धान्य घेते. तांदूळ आणि पिठ शिल्लक राहिल्याने त्याची विक्री काळ्या बाजारात केली जात असल्याचा आरोप जनआंदोलन समितीने केला आहे.
‘स्वाभिमान’ संघटनेचा कारवाईत सहभाग
पोषण आहाराचे धान्य गुजरातमधील नवसारी येथे काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी टेम्पोतून नेले जाणार असल्याची माहिती भिवंडी जनआंदोलन समितीचे कल्पेश जाधव, स्वप्नील पाटील, दिनेश जाधव, प्रमोद पवार तसेच स्वाभिमान संघटनेचे वाडा तालुका अध्यक्ष जितेश पाटील, प्रवीण वसनिक, कल्पेश जाधव यांना मिळाली होती. या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अंबाडी नाक्यावर पाळत ठेवून धान्याने भरलेला टेम्पो अडवला.
यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गणेशपुरी पोलिसांना घटनास्थळी बोलावून टेम्पोची तपासणी केली असता टेम्पोत १५० गोणी तांदूळ आणि २० पिशव्या पीठ आढळले. आहारातील तांदळाला पॉलिश करण्यासाठी किंवा गव्हावर प्रक्रिया करण्यासाठी हे धान्य नवी मुंबई किंवा पनवेल येथील मिलमध्ये नेण्यासाठी संबंधित कंत्राटदाराला सरकारची परवानगी घ्यावी लागते. मात्र, या शालेय पोषण आहाराची वाहतूक करताना हा नियम डावलल्याचे स्पष्ट झाले आहे.
I guess finding useful, reliable inoofmatirn on the internet isn’t hopeless after all.