काँग्रेस पक्षाने आज १३०व्या वर्षात पाऊल ठेवले आहे. सरत आलेल्या या वर्षात केंद्र सरकारमधील सत्तेमधून काँग्रेसला दूर व्हावे लागले आणि महाराष्ट्रातही क्रमांक एकचा काँग्रेस पक्ष तिस-या क्रमांकावर गेला. महाराष्ट्राची सत्ताही गेली. राजकीय पक्षांचे मुख्य ध्येय ‘सत्ता मिळवणे’ हे असले तरी सत्तेखेरीजही राजकारण करण्याची गरज आहे. राजकीय पक्ष म्हणून काँग्रेस पराभूत झाला असला तरी काँग्रेसचा विचार पराभूत झालेला नाही. या देशाला एकत्र ठेवण्यासाठी तोच विचार महत्त्वाचा आहे..
२८ डिसेंबर १८८५… आज काँग्रेसने १३०व्या वर्षात पाऊल ठेवले आहे. गोकुळदास तेजपाल इमारतीमधील संस्कृत महाविद्यालयाच्या एका सभागृहात काँग्रेस स्थापनेची पहिली बैठक झाली. सर अॅलन हय़ुम या ब्रिटिश माणसाच्या प्रयत्नातूनच, ब्रिटिशांचे राज्य असताना व्योमेशचंद्र बॅनर्जीच्या अध्यक्षतेखाली पहिले अधिवेशन २८ डिसेंबर १८८५ रोजी आयोजित केले गेले. तिथून सुरू झालेल्या प्रवासाने जहाल, मवाळ, टिळक, गांधी, नेहरू अशी अनेक पर्व काँग्रेसमध्ये झाली. देशातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून जवळपास १२९ वर्षे काँग्रेस आज उभी आहे. पहिल्या दिवशी ७२ प्रतिनिधी उपस्थित होते. बघता बघता काँग्रेसने केवळ राष्ट्रीय पक्ष म्हणून नव्हे, तर राष्ट्रीय तत्त्वज्ञान म्हणून, एक विचार म्हणून, काँग्रेसची ओळख जगाला करून दिली. या देशाच्या स्वातंत्र्याची लढाई काँग्रेसच्या नेतृत्वाखाली लढली गेली. १९०७ साली जहाल, मवाळ पक्ष स्थापन झाले. बाळ गंगाधर टिळक, लाला लजपतराय, बिपीनचंद्र पॉल हा जहालांचा गट, तर गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशहा मेहता, दादाभाई नौरोजी हा मवाळांचा गट. गट कोणताही असला आणि त्याचे नेतृत्व कोणाकडेही असले तरी सगळेच नेते एका उंचीचे, चारित्र्याचे आणि जनतेच्या विश्वासाचे नेते होते. १९१६च्या लखनौ काँग्रेसनंतर जहाल-मवाळ एक झाले आणि स्वातंत्र्याची पहिली लढाई ‘होमरूल’पासून सुरू झाली.
चंपारण्य आंदोलन आणि खेडा जिल्हय़ातील भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनाची भारतीय स्वातंत्र्याची गांधीयुगाची ही सुरुवात होती. १९१९मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड झाले आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध संतापाची लाट उसळली. महात्मा गांधी काँग्रेसचे महासचिव झाले. जगाच्या पाठीवर कुठेही एकाचवेळी, एकाच उंचीचे इतके मोठे नेते स्वातंत्र्याच्या चळवळीत हातात हात घालून लढत आहेत, असा एकही देश नाही, हे भारताने दाखवले. महात्माजींच्या पाठोपाठ सरदार पटेल, पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस, मौलाना आझाद, डॉ. राजेंद्रप्रसाद अशी नेतृत्वाची एक रांग या देशात निर्माण झाली. आज असलेल्या प्रदेश काँग्रेसच्या जिल्हा समित्या महात्माजींनी स्थापन केलेल्या आहेत. केवळ भारतीय स्वातंत्र्याची लढाई न लढता सामाजिक समतेचा आग्रह हा महात्माजींच्याच नेतृत्वाने काँग्रेसला दिलेला मंत्र होता. जातीभेदाविरुद्धची लढाई, दारूबंदीचा आग्रह हे काँग्रेसचे त्यावेळचे कार्यक्रम होते. गांधीजींच्या नेतृत्वामुळेच अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्याची लढाई लढण्याचे एक मोठे तत्त्वज्ञान जगाला काँग्रेसनेच दिले. गांधीजींच्या नेतृत्वाने सगळे जग स्तिमित झाले. १९३०चा मिठाचा सत्याग्रह, १९४२चा ‘चले-जाव’ आंदोलनाचा लढा, हे सगळे काँग्रेसच्या इतिहासातले देदीप्यमान टप्पे आहेत. त्याहीपेक्षा ज्याला ‘काँग्रेस संस्कृती’ असे म्हटले जाते, ती ‘काँग्रेस संस्कृती’ म्हणजे सर्व जातीधर्माच्या समुदायाने हातात हात घालून देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा. गंधाचा टिळा कपाळावर लावून कट्टर हिंदू असलेले मदनमोहन मालवीय, मौलाना अबुलकलाम आझाद यांच्या हातात हात घालून स्वातंत्र्यासाठी लढले आणि पारशी असलेले वीर नरिमन या दोघांच्या बरोबर राहिले. खान अब्दुल गफार खान त्यांच्या मागे उभे होते. पुढे गांधी, नेहरू, राजेंद्रप्रसाद होते. ही ती काँग्रेस संस्कृती आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन स्वातंत्र्याचा लढा लढायचा आणि स्वातंत्र्यानंतर सर्व जातीधर्माच्या सहभागाने देशाची बांधणी करायची, हीच काँग्रेस संस्कृती आहे. हा देश एका जातीचा, एका धर्माचा कधीही होऊ शकत नाही, हाच काँग्रेसचा विचार आहे.
निवडणुकीच्या राजकारणात १९७७ साली काँग्रेस पराभूत झाली. १९९६ साली पराभूत झाली आणि २०१४ साली पराभूत झाली. पण, निवडणुकीतले पराभव हे काँग्रेसचे पक्ष म्हणून पराभव आहेत. काँग्रेसने ते स्वीकारले आहेत. काँग्रेसच्या विचारांचा हा पराभव नाही. किंबहुना सगळ्यांना सोबत घेऊन देश उभा करायचा, या विचाराचा पराभव कधीच होऊ शकत नाही. त्यामुळे २०१४च्या निवडणुकीत काँग्रेस हरली, याचे फार दु:ख करण्याचे कारण नाही. एकदा हा पराभव होणे गरजेचे होते. लोकांनी ही शिक्षा का दिली, याचे आत्मचिंतन काँग्रेसने करणे गरजेचे आहे. सत्तेत असताना काँग्रेस मोठी होती. ती सूज होती. सत्ता गेल्यावर ती सूज गळून पडेल आणि कात टाकलेली काँग्रेस पुन्हा एकदा उभी करता येईल. या देशात काँग्रेस हा एकमेव पक्ष असा आहे की, जो देशाच्या प्रत्येक गावात आहे. काँग्रेसचा मतदार आहे. काँग्रेसचा झेंडा आहे आणि काँग्रेसचा विचारसुद्धा आहे. एका जाती-धर्माचा प्रभाव काही काळ समाजाला प्रभावित करू शकला, तरी सर्व काळ हा प्रभाव टिकवता येणार नाही. कारण या देशाची मानसिक बैठकच मुळी परस्पर विश्वास आणि समजूतदारपणावर उभी आहे.
विविधतेतील एकता, अनेक भाषा सूत्र असूनही परस्पर संयमशीलता आणि अनेक जाती-धर्म असूनही एकात्मता ही काँग्रेसची शक्ती आहे. प्रत्येक राज्यातील संस्कृती वेगळी, आचार-विचार वेगळे, खान-पान, पोशाख वेगळे, उत्सव वेगळे, भाषाही वेगळीच. असे असले तरी या कमालीच्या विविधतेमध्ये राष्ट्रीय एकात्मता नावाची एक जबरदस्त शक्ती दडलेली आहे आणि ती शक्ती हेच भारताचे सगळ्यात मोठे आत्मिक सामर्थ्य आहे. त्या सामर्थ्यांची वैचारिक बैठक काँग्रेसचा विचार आहे. या विचारापासून काँग्रेसचे नेते जेव्हा थोडे थोडे दूर होऊ लागले, तेव्हा तेव्हा काँग्रेसच्या अप्रियतेची सुरुवात झाली आहे.
१९५२च्या पहिल्या निवडणुकीवेळचे वातावरण ज्यांना आठवत असेल, त्यावेळी काँग्रेससमोर सगळ्यात मोठे आव्हान कोणत्या पक्षाचे होते तर ते हिंदू महासभेचे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे हिंदू महासभेचे नेते. त्यांच्या राष्ट्रभक्तीबद्दल कोणाचेही दुमत असणार नाही. त्यांनी भोगलेल्या यातना आणि त्यांचा त्याग याला तोडही नाही. त्यांचे वक्तृत्वही समाजाला बेभान करणारे. लाख-लाख लोकांच्या सभा माईक नसताना गाजत होत्या आणि अशी हवा बनली होती की, आता हिंदू महासभेचे राज्य येणार. सावरकरांच्या सभेनंतर पंडितजींची एक सभा व्हायची.
सावरकरांच्या तोडीचे वक्तृत्व नसतानाही केवळ मनाच्या नितळपणामुळे आणि आत्मीयतेमुळे सावरकरांच्या सभेचा सगळा परिणाम पंडित नेहरू आपल्या चार वाक्यांनी भरून काढायचे. १९५२च्या निवडणुकीतील त्यांचे एक वाक्य असे होते –
‘लोग मुझे प्रधानमंत्री की हैसियत से देखते है, मुझे मालुम नही, मैं प्रधानमंत्री हूँ या नही हूँ. मै तो इतना जानता हूँ की, मैं भारत माँ का सेवक हूँ.
बापू ने हमको इतनाही सिखायाँ है..’
या शब्दांचा परिणाम या देशावर दोन दशके टिकून होता. जे प्रधानमंत्री होते ते स्वत:ला सेवक समजत होते. आज या देशात काँग्रेसचा पराभव होण्याचे कारण हे की, जे सेवक आहेत, ते स्वत:ला प्रधानमंत्री समजून वागत आहेत.
काँग्रेसच्या १३० वर्षातील स्वातंत्र्याच्या अगोदरच्या लढाईची वर्षे जेवढी महत्त्वाची आहेत, तेवढीच स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची वष्रे देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. कारण गेल्या पन्नास वर्षात देशात जे काही घडले आहे ते खंडप्राय देशासाठी खूप मोठे आहे आणि ते केवळ सरकारने घडवलेले नाही. सरकार त्याचे माध्यम होते, पण देशाच्या बांधणीचा हा विचार विविध राज्यांमध्ये झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात काँग्रेसच्या विकासाच्या जाहीरनाम्यातून सरकारला दिला जात होता. त्यातूनच भाक्रा-नानगलसारखे धरण उभे राहिले. त्यातूनच जमशेदपूरच्या पोलाद कारखान्याची भट्टी पेटली. हे निर्णय नेहरूंचे होते. नेहरू सरकारचे होते. पण, धोरणात्मक निर्णय काँग्रेसच्या अधिवेशनात झालेले आहेत.
आंतरराष्ट्रीय पातळीवरचे शांतता, सहजीवन आणि पंचशील ही आजही भाजपा सरकारला स्वीकारावी लागलेली सूत्रे या देशाला काँग्रेसनेच दिलेली देन आहे. अमेरिका किंवा रशिया या युद्धपिपासू गटांमध्ये सामील न होता, विकसनशील देशांचा अलिप्ततावाद आणि तिस-या शक्तीची निर्मिती हीसुद्धा काँग्रेसचीच देणगी आहे. आवडी येथील काँग्रेस अधिवेशनातला समाजवादी समाजरचनेचा ठराव आज कालबाहय़ ठरला असला तरी त्याच ठरावाने या देशातील सामान्य जनतेचा विचार करायला काँग्रेस सरकारला भाग पाडले होते, हे विसरता येणार नाही.
या देशातले बँकेचे राष्ट्रीयीकरण, संस्थांनिकांचे तनखे रद्द करणे, कोळशांच्या खाणीचे राष्ट्रीयीकरण हे इंदिरा गांधी पंतप्रधान असताना घेतलेले निर्णय, त्यावेळच्या राजकीय परिस्थितीत ‘सिंडिकेट’ला शह देण्यासाठी इंदिरा गांधी यांनी घेतले असले तरी फरिदाबादच्या काँग्रेस अधिवेशनात तसा ठराव काँग्रेस सदस्यांनी मंजूर केला होता, याची नोंद इतिहासाने घेतलेली आहे.
या देशात साठ वर्षाच्या स्वातंत्र्यात काय झाले, असा प्रश्न विचारणारे अनेक बुद्धिवंत आहेत. स्वातंत्र्याच्या काळातील चाळीस कोटींचा देश अन्नधान्याच्या बाबतीत परावलंबी होता. आता सव्वाशे कोटींचा देश झाल्यावरही देश अन्नधान्याच्या आघाडीवर स्वावलंबी झाला, ही किमया ज्या शेतक-याने केली, त्यामुळे शेतक-याला मदत करण्याची भूमिका काँग्रेसच्या त्या त्या अधिवेशनात घेण्यात आली. उद्योग, शिक्षण, सहकार, विज्ञान, तंत्रज्ञान या सगळ्या विषयांत पन्नास वर्षात घेतलेली उंच झेप एका राष्ट्रीय पक्षाच्या स्वच्छ, वैचारिक, राजकीय धोरणांमुळेच शक्य झालेली आहे.
त्यामुळे पन्नास वर्षात काय झाले, असे सातत्याने नकारात्मक बोलणारा जो वर्ग आहे, त्या वर्गापासून सगळ्याच समाजाचे जीवनमान वाढले की नाही, हा प्रश्न आपल्यालाच विचारून त्याचे उत्तर आपणच दिले पाहिजे. पाच-दहा मैल सहजपणे चालणारी माणसे आज गाडय़ा-घोडय़ाने फिरू लागली. गाडी-घोडय़ाने फिरणारी माणसे आता चारचाकीने फिरू लागली आणि चारचाकीने फिरणारा माणूस आता अगदी सहजपणे विमानाने फिरू लागला. हे पन्नास-साठ वर्षात झालेले परिवर्तन काहीसे संथ गतीचे वाटले तरी सामान्य माणसाचे जीवनमान निश्चितपणे उंचावणारे आहे आणि ते परिवर्तन काँग्रेसच्या निर्णयातून घडले आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जगाच्या नकाशात आज भारत हा समर्थ, संपन्न आणि शक्तिशाली देश म्हणून मान्यता पावला, याचे सगळे श्रेयसुद्धा काँग्रेसचे सरकार आणि काँग्रेसची धोरणे यांनाच आहे.
साल | अध्यक्षाचे नाव | अधिवेशनाचे ठिकाण |
१८८५ | व्योमेशचंद्र बॅनर्जी | मुंबई |
१८८६ | दादाभाई नौरोजी | कलकत्ता |
१८८७ | बद्रुद्दिन तैयबजी | मद्रास |
१८८८ | जॉर्ज युले | अलाहबाद |
१८८९ | विल्यम वडरबन | मुंबई |
१८९० | फिरोजशहा मेहता | कलकत्ता |
१८९१ | पंडित आनंद चार्लू | नागपूर |
१८९२ | व्योमेशचंद्र बॅनर्जी | अलाहबाद |
१८९३ | दादाभाई नौरोजी | लाहोर |
१८९४ | अल्फ्रेड वेब | मद्रास |
१८९५ | सुरेंद्रनाथ बॅनर्जी | पुणे |
१८९६ | रहीमतुल्ला सयानी | कलकत्ता |
१८९७ | सी. शंकरन नायर | अमरावती |
१८९८ | आनंद मोहन बोस | मद्रास |
१८९९ | रमेशचंद्र दत्त | लखनौ |
१९०० | नारायण चंदावरकर | लाहोर |
१९०१ | दिनशा वाँच्छा | कलकत्ता |
१९०२ | सुरेंद्रनाथ बॅनर्जी | अहमदाबाद |
१९०३ | लालमोहन घोष | मद्रास |
१९०४ | हेन्री कॉटन | मुंबई |
१९०५ | गोपालकृष्ण गोखले | बनारस |
१९०६ | दादाभाई नौरोजी | कलकत्ता |
१९०७ | रासबिहारी घोष | सुरत |
१९०८ | रासबिहारी घोष | मद्रास |
१९०९ | मदनमोहन मालवीय | लाहोर |
१९१० | विल्यम वेडरबन | अलाहबाद |
१९११ | भीष्मनारायण धर | कलकत्ता |
१९१२ | रावबहादुर मुधोळकर | बंकीपूर |
१९१३ | नवाब सय्यद | कराची |
१९१४ | भुपेंद्रनाथ घोष | मद्रास |
१९१५ | सत्तेंद्र प्रसन्न सिन्हा | मुंबई |
१९१६ | अंबिका चरण मुजुमदार | लखनौ |
१९१७ | डॉ. अॅनी बेझंट | कलकत्ता |
१९१८ | सय्यद हसन इमाम | मुंबई |
*१९१८ | मदनमोहन मालवीय | दिल्ली |
१९१९ | मोतीलाल नेहरू | अमृतसर |
१९२० | लाला लजपत राय | कलकत्ता |
*१९२० | सी. विजयराघवन चारियर | नागपूर |
१९२१ | हकीम अजमल खान | अहमदाबाद |
१९२२ | चित्तरंजन दास | गया |
१९२३ | मौलाना महंमद अली | काकीनाडा |
*१९२३ | मौलाना अबुल कमल आझाद | दिल्ली |
१९२४ | महात्मा गांधी | बेळगाव |
१९२५ | सरोजिनी नायडू | कानपूर |
१९२६ | एस. श्रीनिवास अय्यंगार | गोहाटी |
१९२७ | मुक्तार अहमद अन्सारी | मद्रास |
१९२८ | मोतीलाल नेहरू | कलकत्ता |
१९२९ | जवाहरलाल नेहरू | लाहोर |
१९३० | अधिवेशन झाले नाही | |
१९३१ | वल्लभभाई पटेल | कराची |
१९३२ | मदनमोहन मालवीय | दिल्ली |
१९३३ | नलीन सेनगुप्ता | कलकत्ता |
१९३४ | डॉ. बाबू राजेंद्र प्रसाद | मुंबई |
१९३५ | जवाहरलाल नेहरू | लखनौ |
१९३६ | जवाहरलाल नेहरू | फैजपूर (जळगाव) |
१९३८ | सुभाषचंद्र बोस | हरिपूर |
१९३९ | सुभाषचंद्र बोस | त्रिपुरा |
१९४० | मौलाना अबुल कलाम आझाद | रामगड |
१९४६ | आचार्य कृपलानी | मेरठ |
१९४८ | पट्टाभी सीताराममय्या | जयपूर |
१९५० | पुरुषोत्तमदास टंडन | नाशिक |
१९५१ | जवाहरलाल नेहरू | दिल्ली |
१९५३ | जवाहरलाल नेहरू | दिल्ली |
१९५४ | जवाहरलाल नेहरू | कल्यानी (प. बंगाल) |
१९५५ | यु. एन. ढेबर | आवडी (मद्रास) |
१९५६ | यु. एन. ढेबर | अमृतसर |
१९५७ | यु. एन. ढेबर | इंदूर |
१९५८ | यु. एन. ढेबर | गोहाटी |
१९५९ | यु. एन. ढेबर | नागपूर |
१९६० | नीलम संजीव रेड्डी | बंगलोर |
१९६१ | नीलम संजीव रेड्डी | भावनगर |
१९६२ | नीलम संजीव रेड्डी | पाटणा |
१९६४ | के. कामराज | भुवनेश्वर |
१९६५ | के. कामराज | जयपूर |
१९६८ | एस. निजलिंगप्पा | हैदराबाद |
१९६९ | एस. निजलिंगप्पा | फरिदाबाद |
*१९६९ | जगजीवनराम | मुंबई |
१९७२ | शंकरदयाळ शर्मा | कलकत्ता |
१९७५ | देवकांत बारूआ | चंदीगढ |
१९७८ | इंदिरा गांधी | नवी दिल्ली |
१९८३ | इंदिरा गांधी | कलकत्ता |
१९८५ | राजीव गांधी | मुंबई |
१९९२ | पी. नरसिंह राव | तिरूपती |
१९९७ | सीताराम केसरी | कलकत्ता |
१९९८ | सोनिया गांधी (आजतागायत) |
* या वर्षी दोन वेळा अधिवेशन झाले.
कॉंग्रेस हा आधी विचार होता पण नंतर त्याला पक्षीय स्वरूप दिले गेले. आता तर हा पक्ष राजकारणग्रस्त आहे.
१३० वर्षात काय वाहून गेले हा देखील विचार व्हायला पाहिजे.. कॉंग्रेस इतकाच एक जुना विचार भारतात आहे आणि जो अजूनसुद्धा एक संघटना महणून ओळखला जातो .. तो म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.