आरामदायी वातानुकूलित प्रवासाची सवय लागलेल्या पुणे आणि नाशिककरांना आता पुन्हा एसटी महामंडळाच्या कळकट गाडय़ांतून प्रवास करावा लागणार आहे.
मुंबई – आरामदायी वातानुकूलित प्रवासाची सवय लागलेल्या पुणे आणि नाशिककरांना आता पुन्हा एसटी महामंडळाच्या कळकट गाडय़ांतून प्रवास करावा लागणार आहे. मुंबई – पुणे आणि नाशिक – पुणे मार्गावर धावणा-या ‘शिवनेरी’ बस टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात ११० पैकी ८० बस एका दणक्यात बंद करण्यात येणार आहेत. सध्या केवळ ३० बस मार्गावर धावतील, अशी माहिती खुद्द परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे.
मुंबई – पुणे आणि मुंबई – नाशिक मार्गावर वातानुकूलित ‘शिवनेरी’ बस धावते. आरामदायी प्रवास करणा-या प्रवाशांची त्याला चांगली पसंतीही लाभली होती. मात्र सध्या धावणा-या ११० बसपैकी ८० बस या खासगी मालकांच्या आहेत.
या बससेवेतून मिळणारा नफा खासगी बसधारकांच्या खिशात जातो. पुणे मार्गावरील ‘शिवनेरी’ बंद होणारत्याचा एसटी महामंडळाला कोणताही फायदा होत नाही. त्यामुळे त्या बस बंद करण्यात येणार आहेत. तर एसटी महामंडळाच्या मालकीच्या असणा-या केवळ ३० बस रस्त्यावर धावणार आहेत. त्याही आता जुन्या झाल्या असून त्या चालविण्याच्या स्थितीत असेपर्यंतच ही सेवा सुरू राहणार आहे. ‘शिवनेरी’ बंद झाल्यानंतर प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून ‘हिरकणी’ बसच्या फे-या वाढविण्यात येणार आहेत, असे रावते यांनी सांगितले.
शिवनेरीच्या ११० बस सध्या मुंबई, पुणे, नाशिक यामार्गावर धावतात. यातील ८० बस या खासगी कंत्राटदारांच्या असून त्या महामंडळाने भाडय़ाने घेतल्या आहेत. त्यापोटीच वर्षाला १२०० कोटी खर्च महामंडळाला करावा लागतो. म्हणून त्या बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे रावते यांनी सांगितले. ‘शिवनेरी’च्या आरामदायी प्रवासाची सवय लागलेल्या प्रवाशांची गैरसोय होणार नाही का, असे विचारले असता, हिरकणीचा दर्जा चांगला ठेवण्याच्या सूचना अधिका-यांना दिल्या असल्याचे रावते यांनी सांगितले.
वेरी गुड डिसिजन.