प्लास्टिक बॅग्जपासून होणारं पर्यावरणाचं नुकसान आज सर्वानाच माहीत आहे. जगात आज निव्वळ प्लास्टिकच्या वापरापासून होत नसेल इतकं नुकसान केवळ प्लास्टिक बॅग (थैली किंवा पातळ पिशवी)च्या वापरामुळे होत आहे. प्लास्टिकची पिशवी निर्माण झाल्यानंतर ती नष्ट होण्यासाठी सुमारे हजार एक वर्ष लागतात. वाचूयात या गंभीर समस्येविषयी..
नुकतंच काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये सिडनीसह तीन शहरांत काही व्हेडिंग मशिन्स बसवण्यात आल्या. या अजब मशिन्समध्ये प्लास्टिकचे कॅन व पॅक टाकल्यावर त्यातून बसचं तिकीट मिळायची सोय केली गेली आहे. ही कल्पना तिथल्या नागरिकांना खूप आवडलीय व त्यांनी प्रचंड प्रतिसाद या नव्या कल्पनेसाठी दिलाय. इतका की पहिल्या तीनच दिवसांत या मशिन्समध्ये दहा हजाराहून अधिक कॅन्स, पॅक साठवले गेले. हे कॅन व पॅक आता पुनर्निर्माणासाठी पाठवण्यात येतील. मुद्दा हा आहे की जगभरात प्लास्टिकची वाढती समस्या अधिकाधिक गंभीर बनत चाललीय. या समस्येचाच एक सर्वात मोठा भाग आहे प्लास्टिक पिशव्या. आज या पिशव्यांचा वापर आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून राहिलाय. पण पृथ्वीवरील हे प्रदूषण सहजासहजी नाहीसं होण्यासारखं नाही.
जगातील सर्व प्रमुख समुद्र आज निरनिराळ्या आकाराच्या प्लास्टिक पिशव्यांनी कोंदलेले आहेत. तिथं प्लास्टिकच्या पिशव्या नुसत्या तरंगतायत असं नाही तर या पिशव्यांच्या कच-याची महाकाय बेटं तिथं निर्माण झालेली आहेत. दरवर्षी सुमारे दोन कोटी देवमासे, डॉल्फिन्स, सील्स, सी लायन, इतर जलचर तसंच इतर पशू-पक्षी यांचा या प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे मृत्यू होतो आहे. हे जमिनीवरील व समुद्रातील प्राणी खाद्य म्हणून प्लास्टिकच्या पिशव्यांकडे आकर्षति होतात. त्यांच्या पोटात पिशवी गेल्यावर त्यांना जंतूसंसर्ग होऊन त्यांची चयापचय प्रक्रिया बिघडून त्याची परिणीती अखेर मृत्यूत होते. आज जगातील समुद्रांमधील ९० टक्के कचरा हा प्लास्टिक पिशव्या व इतर प्लास्टिकचा आहे. तीच गत जमिनीवरील कच-याचीही आहे. तुम्ही आजूबाजूच्या कच-याच्या ढिगाकडे नजर टाकली तर तुम्हाला प्लास्टिकची पिशवी चघळणारी एखादी गाय वा कुत्रा नक्कीच दिसेल. इतकंच नाही तर देवस्थानानजीक नेहमीच माकडं अशा पिशव्या पळवून नेताना दिसतात. हे असेच दुर्दैवी प्राणी असतात. मानवप्राण्याला प्लास्टिक घातक आहे हे कळत असल्यामुळे तो ते खात नाही; मात्र आपण याचा वापर अद्याप थांबवलेला नाही.
एकदा निर्माण झालेलं प्लास्टिक हे कधीच नष्ट होत नाही. या उलट त्याचे तुकडे पडून ते इतरत्र जमिनीत, समुद्रात, नदी-नाल्यात मिसळत जाऊन ते प्राण्यांच्या तोंडी येतात. काही वेळेस असे प्राणी मनुष्याच्या पोटात गेल्यावर याच प्लास्टिकचा अंश आपल्याही पोटात जात असतो. १९५०च्या सुमारास प्लास्टिक पिशव्यांचा वापर होऊ लागला व साठच्या दशकानंतर तो वाढतच गेला. तेव्हापासून निर्माण झालेला एकही प्लास्टिकचा तुकडा अद्याप नष्ट झालेला नाही. तो आजही तसाच कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तसाच पृथ्वीवर टिकून आहे. काही प्लास्टिक पिशव्या या इतक्या पातळ असतात की त्यांचा फक्त एकदाच कसाबसा वापर होऊ शकतो. या पिशव्या २० मायक्रॉनपेक्षा कमी असतात. या पिशव्यांचा कचरा ही आज जगाची सार्वत्रिक समस्या बनलेली आहे. हा कचरा गाळ बनून आपल्या, सांडपाणी वाहून नेणा-या पाईप्समध्ये, गटारांमध्ये, जमिनीत, नाल्यांमध्ये, नद्या व समुद्रात अडकून राहतो. असा कचरा साठल्यामुळे कित्येक कसदार जमिनी नापीक बनल्याची उदाहरणं आहेत.
शिवाय हा कचरा हटवणं ही फार मोठी कठीण गोष्ट असते. खेरीज प्लास्टिक पिशव्यांचा हा कचरा इकडून नेऊन दुसरीकडे टाकला तरी तो नष्ट करणं शक्य नाही. त्यामुळे जगात या प्लास्टिक पिशव्यांच्या कच-याचे ढिग वाढतच आहेत. आज आपण खरेदी, वेष्टन, कचरा फेकणे अशा अनेक कारणांकरता प्लास्टिक पिशव्यांचा वापर करत असतो. याच प्लास्टिक पिशवीचं विघटन होण्यासाठी सुमारे एक हजार र्वष लागतात. खरं तर प्लास्टिक पिशव्यांच्या जन्मापूर्वी मनुष्य इतर प्रकारच्या प्राणीजन्य पदार्थाचा आवरण किंवा थैली म्हणून उपयोग करत होता. परंतु प्राणीहत्या व निसर्गाचा नाश थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू झाला तो आजतागायत. तो इतका वाढलाय की जणू त्यानेच आपल्याला विळखा घातलेला आहे.
प्लास्टिक पिशव्यांचा वापर करण्याऐवजी आपण काय करू शकतो?
पुनर्वापर, कमी वापर व पुनर्निमाण : प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणं लोकांनी थांबवावं यासाठी आज जगात सर्वत्र समाजप्रबोधन केलं जातं. त्याला यशही मिळतं आहे. लोकांनी प्लास्टिक पिशव्यांचा कमीतकमी वापर करावा यासाठी त्यांना समजावलं जातं. त्यानुसार आज अनेकांनी या पिशव्या वापरणं कमी किंवा बंद केलेलं आहे. या पिशव्यांचा पुन्हा पुन्हा वापर कसा करता येईल व तितकाच पर्यावरणाला धोका पोहोचवण्याची वेळ टाळता कशी येईल हे देखील पाहिलं जातं. तसंच पिशव्या गोळा करून त्यांचं पुनíनमाण करून त्या पुन्हा वापरात आणल्या जातात. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जगात १ बिलियन टन इतकं प्लास्टिक निर्माण झालं व आज एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातच हे उत्पादन पूर्वीपेक्षा दुप्पट झाल्याची नोंद ‘सायंटिफिक अमेरिकन’ या संशोधन मासिकानं केली आहे.
प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी : काही देशांमध्ये प्लास्टिक पिशव्या वापरण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. यामध्ये भारतासह अनेक देशांचा समावेश आहे. प्लास्टिक पिशवी वापरण्यावर बंदी असलेल्या प्रदेशात प्लास्टिकची पिशवी वापरल्यास दंड आकारला जातो. हा दंड प्रत्येक देशात वेगवेगळा आहे. दंड आकारण्याच्या नियमानंतर काही देशांमध्ये प्लास्टिक पिशव्यांच्या वापरात घट झाल्याचं दिसून आलं. तसंच यामध्ये पर्यावरणवादी व काही गरसरकारी सामाजिक संस्थानी केलेल्या लोकप्रबोधनाचाही मोठा वाटा आहे.
बॅग टॅक्स : आर्यलडसारख्या काही देशांनी प्लास्टिक पिशवी वापरण्यावर कर सुरू केला. म्हणजे प्लास्टिक पिशवी वापरायचीच असल्यास ती कर भरून वापरावी. कारण अनेक उद्योग व संस्थांना प्लास्टिक पिशव्यांची वेष्टन इ.करिता गरज असते. या करामुळे लोकांनी प्लास्टिक पिशवी वापरण्याची गरज का आहे या दृष्टीने विचार करायला सुरुवात केली. विनाकारण कर का भरावा म्हणून लोकांनी मग प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी केला. या उपायामुळेही प्लास्टिक पिशव्यांच्या वापरात घट झाली.
प्लास्टिक पिशव्यांना इतर पर्याय : आज आपल्याकडेही छोटी छोटी गावं व शहरं पर्यावरणाचा नाश होऊ नये म्हणून प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी आणताना दिसत आहेत. त्याजागी तागाच्या, कापडाच्या व कागदाच्या पिशव्यांचा वापर केला जात आहे. लोकांनी याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे. मॉल, मोठी दुकानं इ.सारख्या अनेक ठिकाणी प्लास्टिक पिशवी हवी असल्यास वेगळी किंमत भरून घ्यावी लागते. यामुळे त्यांच्या वापराचं प्रमाण निश्चितच कमी झालेलं आहे. ज्यांचं जैविक विघटन शक्य होतं. अशा पिशव्या वापरण्यासाठी अनेक देशात नागरिकांना प्रोत्साहन दिलं जात आहे.
मायक्रॉन्सचं गणित
प्लास्टिकच्या पिशव्यांची जाडी ही मायक्रॉन्समध्ये मोजली जाते. त्यानुसार काही देशांमध्ये विशिष्ट मायक्रॉन्स जाडीच्या पिशव्या वापरण्याविषयी नियम घालण्यात आलेले आहेत. भारतातील कायद्यानुसार आता पूर्वीप्रमाणे २० मायक्रॉन्स जाडीची पिशवी वापरण्यावर बंदी आहे. त्याऐवजी ४० मायक्रॉन्स व जास्त जाडीच्या पिशव्या वापरल्या जातात. याचं कारण अति पातळ पिशव्यांचे तुकडे होऊन त्या जमिनीत व पाण्यात सर्वत्र मिसळतात व त्यामुळे जमिनींचा कसदारपणा नाहीसा होतो तसंच जलचरांना धोका उद्भवतो. जास्त जाडीच्या पिशव्यांचे तुकडे कमी वेगाने पडतात. तेवढाच पर्यावरणाला कमी धोका पोहोचतो म्हणून ही मायक्रॉन्सची मर्यादा. मात्र ४० मायक्रॉन्सची पिशवी साधारण २ रुपयांना पडते व त्या तुलनेत २० मायक्रॉन्सची पिशवी ही १० पैशांना पडते. त्यामुळे अनेक ठिकाणी या पातळ पिशव्या वापरल्या जातात. मुळात प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी व्हावा यासाठीची जास्त जाडीच्या पिशव्यांची किंमत जास्त ठेवण्यात आली आहे. २० मायक्रॉन्सपेक्षा पातळ पिशवी सार्वजनिक ठिकाणी वापरल्यास दंड होऊ शकतो, अशी तरतूद आपल्याकडील काही राज्यांत करण्यात आलेली आहे.
देशोदेशी प्लास्टिक पिशव्यांवर बंदी
- डेन्मार्कमध्ये २००३ पासून प्लास्टिक पिशव्यांवर रिटेलर्ससाठी कर
- वेल्समध्ये २०११ ऑक्टोबरपासून प्लास्टिक पिशव्यांवर शुल्क
- इटलीमध्ये २०११पासून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी
- जर्मनीमध्ये दुकानदारांसाठी प्लास्टिक पिशव्यांवर पुनíनमाणासाठी शुल्क
- इंग्लडमध्ये प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर शुल्क
- अमेरिकेत प्लास्टिक पिशव्यांवर बंदी
- आर्यलडमध्ये प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर कर
- मेक्सिकोत २०१० पासून दुकानदारांना प्लास्टिक पिशव्यांच्या वापरासाठी दंड
- ऑस्ट्रेलियात काही ठिकाणी अति पातळ पिशव्या वापरण्यास बंदी
- द.आफ्रिकेत प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी व शुल्क
- चीनमध्ये २००८ पासून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी
- बांगलादेशमध्ये २००२ पासून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी
- फ्रान्समध्ये प्लास्टिक पिशव्यांच्या वापरासाठी दुकानदारांकडून शुल्क
- बेल्जियममध्ये २००७ पासून प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर कर
८४५९४८४४९०
प्लास्टिक पिशवी बंद करून उपयोग नाही तर त्याचे उत्पादन बंद केले तर ठीक होईल.
उत्पादन बंद केले तरच प्लॅस्टिक बंद होणार नाहीतर जनतेची दिशाभूल करून जनतेकडूनच दंड च्या स्वरूपात पैसे वसुलण्याचा धंदा चालू राहील.
सांगायचे तात्पर्य एवढेच जनतेला त्रास देऊ नका प्लॅस्टिक चे मूळ कारण काय आहे हे सर्वांना माहिती आहे ते अगोदर बंद करा नंतर जनतेला दोष द्या.