कित्येक वर्ष शिक्षण, करिअरला वळण लावण्याच्या नादात आपल्याला नक्की काय हवं आहे, आपली आवड नेमकी काय आहे हे आपण विसरून जातो. हे लक्षात येतं तोपर्यंत उशीर झालेला असतो. स्टार प्रवाहच्या ‘दुर्वा’ या मालिकेत काम करणारा हर्षद अतकरीही असाच एक. अभिनयाच्या क्षेत्रात उतरण्याचं शहाणपण त्याला उशीरा सुचलं खरं, पण उत्तम अभिनयाच्या जोरावर त्यानं अगदी पहिल्याच फटक्यात तोलामोलाची भूमिका मिळवली.
स्टार प्रवाहवरच्या ‘दुर्वा’ या मलिकेतून हर्षद अतकरी हा नवा चेहरा प्रेक्षकांसमोर आला. मालिका राजकारणावर आधारित असल्यामुळे ज्यांना राजकारणात विशेष रस आहे अशांची ही मालिका अगदीच आवडीची. या मालिकेत पाटील अण्णांचा उजवा हात आणि विश्वासू कार्यकर्ता केशव सानेची भूमिका हर्षद साकारत आहे. राजकारणातील मास्टरमाईंड अशी केशवची ओळख. राजकारणातील प्रत्येक खेळी कशी खेळायची याची खडान्खडा माहिती केशवला असते. केशवची भूमिका त्यानं इतकी उत्तम साकारली आहे की तो खरंच राजकारणात मुरलेला कार्यकर्ताच वाटू लागतो. केशव या पात्राच्या रूपानं हर्षदनं डेली सोप्सच्या इण्डस्ट्रीत पर्दापण केलं आणि महत्वाचं म्हणजे त्याच्या पहिल्याच मालिकेतून त्यांनं महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांची मनंही जिंकली.
अभ्यास करायचा, शिकायचं, कॉर्पोरेट क्षेत्रात करिअर बनवायचं असं साधंसुधं स्वप्न त्याचंही होतं. पण यापेक्षा काहीतरी वेगळं करण्याची इच्छा त्याच्या मनात होती. तो म्हणतो ‘मी बीएमएस केलंय. अभिनयाच्या क्षेत्रात उतरण्याचं शहाणपण मला फार उशीरा सुचलं. २१ व्या वर्षी ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर मला वाटू लागलं की व्यावसायिक शिक्षण घेण्यापेक्षा अभिनयाच्या क्षेत्रात उतरलं पाहिजे. या इण्डस्ट्रीत वावरणारे बरेच कलाकार आहेत जे शाळा, कॉलेजपासून अभिनयाच्या क्षेत्रात उतरलेले आहेत. ही मंडळी कॉलेजमध्ये असताना कॉलेजच्या नाटयमंडळात भाग घेतात, स्पर्धा, एकांकिका वगैरे करतात पण मी कॉलेजमध्ये असं काहीच केलं नव्हतं. अभिनयाचा कोणताच अनुभव गाठीशी नव्हता पण अभिनय करण्याचं स्वप्न मात्र काही केल्या पाठ सोडत नव्हतं. घरी जेव्हा अभिनय करायचा आहे असं सांगितलं तेव्हा त्यांना माझे विचार फारसे पटले नव्हते. मी तर एमबीएचं शिक्षण सुरू केलं होतं. काही केल्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये बसून मला नोकरी करायची नव्हती, त्यामुळे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर या क्षेत्रात कसं यायचं हाच विचार करत धडपड सुरू केली.’
हर्षदनं एका मालिकेपर्यंत टप्पा गाठायला पाच-सहा वर्ष मेहनत घेतली. तो सांगत होता की ‘अभिनय कसा करायचा हेच मला माहीत नव्हतं. लोकांसमोर जायचं तर उत्तम अभिनय आलाच पाहिजे असा माझा नियम होता. कॉलेज संपलं होतं त्यामुळे कॉलेजच्या नाटयस्पर्धात भाग घेण्याचा सवालच नव्हता. तो मार्ग कधीच बंद झाला होता. त्यामुळे कुठे कुठे हौशी नाटक मंडळींचा ग्रुप आहे का हे बघ, अभिनय करणारी हौशी मंडळी, ग्रुप यांची माहिती शोधून काढ, त्यांच्याशी संपर्क ठेव असे माझे प्रयत्न सुरू झाले. या प्रयत्नात पथनाटय करणारे, हौशी नाटक मंडळ, राज्य नाटय स्पर्धा करणारे अशांशी ओळखी वाढत गेल्या. मग नाटकात एक ओळ म्हणणं, मॉब, पथनाटय यात छोटी मोठी काम करणं असं करत मी अभिनय करायला शिकलो. अनेक जण संपर्कात येऊ लागले आणि ओळखीतून अशा छोटया स्पर्धात काम मिळत गेलं. शिक्षण होतं पण नोकरी नव्हती, मला करायची देखील नव्हती. स्पर्धा या केवळ हौसेखातर होत्या त्यामुळे त्यातून काहीच उत्पन्न मिळायचं नाही. त्यातूनच मालिकांसाठी ऑडिशन देण्याची खटपट सुरू झाली.’
हर्षदनं ऑडिशनच्याही काही गोष्टी सांगितल्या. तो म्हणतो, ‘ऑडिशन द्यायला गेल्यावर कित्येकदा रिजेक्शनच यायचं. त्यातून दीड वर्ष घरीच होतो. मालिकेत छोटा मोठा रोल करण्यापेक्षा लीड रोलच करायचा हे मनाशी पक्कं ठरवलं होतं. त्यामुळे छोटया मोठया भूमिका नाकारत गेलो. एक वेळ अशीही होती मला इतकी निराशा आली होती की ऑडिशन द्यायचीच नाही, पण मनाची समजूत घातली. स्टार प्रवाहच्या एका मालिकेसाठी ऑडिशन दिलं होतं तिथे मी रिजेक्ट झालो. पण दोन वर्षानंतर त्याच चॅनेलच्या ‘दुर्वा’ या मालिकेत आज महत्वाची भूमिका मी साकारतोय.’
हर्षदला त्याच्या चाहत्यांकडून प्रतिक्रिया येत असतात. तो म्हणतो, ‘मालिकेत माझा चेहरा फार गंभीर दाखवला आहे. त्यामुळे कधी हसताना मला दाखवलं नाही. एखाद दुस-या सीनमध्ये मी हसलो की तुम्ही हसल्यावर किती छान दिसता, जरा हसत जा की असा मेसेज माझ्या फेसबुकवर असतो. एक मुलगा तर माझ्या केशव या पात्राच्या इतक्या प्रेमात होता की त्यानं अगदी हुबेहूब माझ्यासारखा पेहराव केला होता आणि तसेच फोटो काढून मला मेल देखील केले होते. मुलींना जितका मी आवडतो तितकाच मुलांनाही आवडतो. माझ्यासाठी ही गोष्ट जास्त महत्वाची आहे. पुणे, कोल्हापूर येथील लोक ही मालिका जास्त पाहतात त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रिया नेहमीच ऐकायला मिळतात.’
राजकारणात मुरलेल्या कार्यकर्त्यांची भूमिका हर्षद नुसता पडद्यावर साकारतच नाही तर प्रत्यक्षातही त्याला राजकारण रस दिसतोय हे त्याच्या बोलण्यातून जाणवत होतं. तरूणांनी राजकारणात यावं, राजकारणात बदल करावे अशा विचारांचा तो आहे. राजकारण वाईट नसतं, तरूणांनी राजकारणात लक्ष घातलं तर देशाचा विकास नक्कीच होऊ शकतो असं ही त्यानं आपल्या तरूण चाहत्यांना सांगितलं आहे.
हर्षदला डेली सोप्सनंतर चित्रपट किंवा नाटकांत काम करायची इच्छा आहे. येत्या काही दिवसानंतर ‘दुर्वा’ मालिकेत राजकीय रणधुमाळी पाहायला मिळेल. मालिकेत नवनवीन ट्रॅक दिसतील, अनेक रहस्यांचे गौप्यस्फोट होतील असंही त्यानं सांगितलं. एकंदर काय, पडद्यावर दुर्वा-केशवची प्रेमकहाणी सध्या तरी दिसणार नाही, पण जाता जाता मालिका वेगळ्या वळणावर येईल अशी पुसटशी कल्पना त्यानं दिली.
खुपचा छान.. तुमी मला खुप आवडता…