भारताचा विरोध असतानाही ब्रह्मपुत्रा नदीवर तीन धरण बांधून भारतावर ‘ब्रह्मास्त्र’ सोडण्याचा डाव चीनने रचला आहे.
बीजिंग- एकीकडे मैत्रीचा आव आणत दुसरीकडे तीन मोठे धरण बांधून चीनने भारतावर ‘ब्रह्मास्त्र’ सोडण्याचा डाव रचल्याचे उघडकीस आले आहे. भारत व चीन या दोन्ही देशांतून वाहणा-या ब्रह्मपुत्रा नदीवर डागु, जियाचा आणि जिएझू येथे आणखी तीन भलेमोठे धरण बांधण्यास चीन सरकारने मंजूरी दिली आहे. भारताचा तीव्र विरोध असतानाही चीनने यापूर्वीच ब्रह्मपुत्रेवर मोठे धरण बांधून ५१० मेगावॅट क्षमतेचे जलविद्युत प्रकल्प उभारले आहे. आता त्याहीपेक्षा मोठे भरण बांधण्याचे चीनने ठरवले आहे. याबाबत भारताला कोणतीही कल्पना न दिल्याने भारताने चिंता व्यक्त केली आहे.
पहिले धरण बांधले तेव्हाही चीनने भारताला अंधारात ठेवले होते. त्यानंतर मात्र भारताने याप्रकरणी आवाज उठवल्यानंतर यापुढे तिबेटमधे ब्रह्मपुत्रा नदीवर कोणतेही मोठे धरण उभारणार नाही, असे वचन चीनने भारताला दिले होते. प्रत्यक्षात तिबेटच्या भूमीवरच ब्रह्मपुत्रेवर तीन मोठे धरण बांधण्याचा खटाटोप चीनने चालवला आहे.
चीनच्या १२व्या पंचवार्षिक योजनेत ही तिन्ही धरणे पूर्ण करण्याची चीनची योजना असल्याचे भारतीय अधिका-यांनी सांगितले. तर आंतरदेशीय नद्यांबाबत चीनने नेहमीच जबाबदारीची भूमिका निभावली असल्याचे चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हांग लेई यांनी सांगितले. कोणतीही नवीन योजना राबवताना वैज्ञानिक अभ्यास आणि नदीपात्राच्या खाली व वरच्या भागात रहाणा-या देशांचे हित पाहूनच योजना अमलात आणली जाते, असे ते म्हणाले. ब्रह्मपुत्रा नदीला चीनमध्ये यारलंग जांगबो नावाने ओळखले जाते. या नदीवर धरण बांधले जात आहेत, याची कल्पना आपण भारत आणि बांग्लादेशाला दिली आहे का, असे विचारले असता ते म्हणाले की, याबाबत मला पूर्ण माहिती घ्यावी लागेल. भारत आणि चीन यांच्यात सलोख्याचे संबंध वाढत असताना धरण बांधण्याचे प्रकरण उजेडात आले आहे.
नुकतेच भारताचे सुरक्षा सल्लागार शिव शंकर मेनन यांनी चीनच्या दाई बिंगुओ यांच्याशी सल्लामसलत केली होती. यावेळी दोन्ही देशांतून वाहणा-या ब्रह्मपुत्रा नदीच्या पाणी वाटपावरही चर्चा झाली होती. त्यावेळी या नदीवर कोणतेही धरण बांधण्याची चर्चा झाली नाही. तसेच ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रावर विपरीत परिणाम होईल असे काम चीनकडून केले जाणार नाही, असेही आश्वासनही त्यांनी दिले होते.
दरम्यान, चीनच्या या हालचालींची माहिती भारताकडे उपलब्ध होताच उभय देशांत आजवर झालेल्या बैठकांचा हवाला देत भारताने चीनच्या या प्रकरणाची तपशीलवार शहानिशा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
भारत आणि चीनच्या आर्थिक उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत बनलेली ब्रह्मापुत्रा नदी, तिबेटच्या १६२५ किलोमीटर्स भूप्रदेशातून वाहते. भारतात प्रवेश केल्यानंतर तिचा प्रवाह आणखी ९१८ किलोमीटर्सचा आहे. ब्रह्मपुत्रेला दरवर्षी येणा-या महापुरामुळे ईशान्य भारत आणि बिहारमधील मोठा भूभाग अनेकदा पूरग्रस्त ठरतो. या घटनेबाबत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी चिनी नेत्यांचे ब्रह्मपुत्रेच्या जलप्रबंधनाकडे लक्ष वेधले. २००६ साली ब्रह्मपुत्रेबाबत उत्पन्न झालेल्या समस्यांचा विचार करण्यासाठी, एका विशेषज्ञ समितीची नियुक्ती करण्यात आली. समितीच्या झालेल्या बैठकांमध्ये भारताने वारंवार स्पष्ट केले की, ब्रह्मपुत्रेवर चीनने धरण बांधले अथवा तिचा प्रवाह अन्यत्र वळवला तर भारतात ईशान्येकडील राज्ये आणि बिहारला खूप मोठे नुकसान सहन करावे लागेल. यापूर्वी झालेल्या बैठकांमधे ब्रह्मपुत्रेवर तिबेटमधे धरण बांधण्याचा अथवा जलविद्युत प्रकल्प उभारण्याचा चीनचा कोणताही इरादा नाही, असे त्यांच्या प्रतिनिधीने स्पष्ट केले होते. मात्र प्रत्यक्षात चीनने आपले वचन मोडून ब्रह्मपुत्रेवर मोठे धरण बांधून ५१० मेगावॅट क्षमतेचे जलविद्युत प्रकल्प उभारले आहे.
The hotesny of your posting is there for all to see