विनातिकीट लोकलने प्रवास करणा-या प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेने कडक पावले उचलली आहेत.
मुंबई- विनातिकीट लोकलने प्रवास करणा-या प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेने कडक पावले उचलली आहेत. विनातिकीट प्रवास करणा-या प्रवाशांना पकडण्याकरता सीएसटी ते दादर या स्थानकांदरम्यान १२ मार्च रोजी विशेष तपास मोहीम राबवण्यात आली होती. यात ५६ वेगवेगळ्या गटांत विभाजन करण्यात आले होते. तिकीट तपासणीसांनी केलेल्या कारवाईत ६०८ विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्यावर केलेल्या दंडात्मक कारवाईत ८५ हजार ८२० रुपये एवढी रक्कम वसूल करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान जी. बी. कदम यांनी १० जणांवर कारवाई करून २ हजार ५३० रुपये तर मनोहर घाग यांनी ९ जणांना ताब्यात घेऊन २ हजार ४१० रुपये एवढी दंडात्मक रक्कम वसूल केली. महिलांच्या तेजस्विनी गटाने तब्बल ८४ फुकटय़ा प्रवाशांवर कारवाई करून २२ हजार ६९० रुपयांचा दंड वसूल केला. पकडण्यात आलेल्या प्रवाशांपैकी ४७ जणांवर प्रथम दर्जाच्या डब्यातून प्रवास करताना कारवाई करण्यात आली होती. विनातिकीट प्रवास करणा-या प्रवाशांमुळे रेल्वे प्रशासनाला मोठय़ा प्रमाणात आर्थिक भरुदड सहन करावा लागतो.
दरम्यान, या कारवाईमुळे लोकलने विनातिकीट प्रवास करणा-यांचे प्रमाण कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे असले तरी सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी लोकल ट्रेनच्या डब्यात तपासणी करणे शक्य होत नसल्याने गर्दीच्या वेळी विनातिकीट प्रवास करणा-यांची संख्याही अधिक आहे.
I think this is upto only march ending to complete their target…….please check regularly ticket as possible as