देशाच्या राजकारणात महाराष्ट्राचा आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहावे, असे एकमेव नेते आज तरी केवळ शरद पवार आहेत. आपल्या वयाची पंच्याहत्तर वर्षे आणि संसदीय कारकिर्दीची ५० वर्षे त्यांनी नुकतीच पूर्ण केली आहेत. त्यानिमित्ताने त्यांचे वेगवेगळे सत्कार राज्यभर सुरू आहेत. विधिमंडळातही त्यांच्या अभिनंदनाचे दोन प्रस्ताव गेल्या वर्षभरात येऊन गेले. त्यांचे कौतुकसोहळे अजूनही सुरूच आहेत. त्या कौतुकसोहळय़ाचाच एक भाग म्हणून २१ फेब्रुवारी रोजी त्यांची मुलाखत पुण्यात पार पडली. सर्वच महानगरपालिका, नगरपालिका आणि विधनसभा निवडणुकीत फारसे यश न मिळवू शकलेले राज ठाकरे सध्या ब-यापैकी मोकळे आहेत. त्यांनी खास फुरसत काढून ही मुलाखत घेतली. या मुलाखतीने महाराष्ट्राला जे काही द्यायचे असेल ते दिले असेल, मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट घडली ती वृत्तवाहिन्यांचे घसरलेले टीआरपी वाढले.
महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव असणा-या आणि विशेषत: तरुणांमध्ये आकर्षण असणा-या (होय, शरद पवार यांनी वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केली असली तरी आणि राज ठाकरे यांना तूर्तास राजकीय अपयश आलेले असले तरी तरुणांमध्ये त्यांच्याबद्दल आकर्षण) या दोन नेत्यांमधील संवाद ऐकण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र उत्सुक होता. राज ठाकरे यांचा बेधडकपणा आणि शरद पवार यांचा संयमी स्वभाव याचा सामना पाहायला मिळेल, असे वाटले होते. मात्र, तसे फारसे झाले नाही. पण, यापूर्वी कधीही न पाहिलेला प्रयोग महाराष्ट्राला या निमित्ताने पाहायला मिळाला. राज ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्नांना पवार यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी अत्यंत चपखल उत्तर दिले. याच प्रश्नोत्तरांच्या जुगलबंदीमध्ये आरक्षणाच्या मुद्दय़ावर त्यांनी केलेल्या भाष्याने राज्यात खळबळ उडाली. ‘आरक्षण जातीवर नाही, तर ते आर्थिक निकषावर असले पाहिजे’ या त्यांच्या वाक्याने अनेकांना गोंधळात टाकले. खरे तर प्रश्न विचारताना राज ठाकरे यांनाही या प्रश्नांवर पवार जे उत्तर देतील, त्यावरून इतका गदारोळ निर्माण होईल, असे वाटले नसेल. तो गदारोळ उठल्यानंतर राज ठाकरे यांना ‘शरद पवार यांच्या बोलण्याचा अर्थ सहा महिन्यांनी कळतो’ या आपण बोललेल्या वाक्याची आठवण झाली असेल.
आरक्षणावरून संपूर्ण राज्यातील मराठी तरुण अस्वस्थ असताना, मराठा क्रांतिमोर्चाने ती अस्वस्थता समोर आलेली असताना शरद पवार यांच्यासारख्या जाणत्या नेत्याने उच्चारलेल्या त्या वाक्याचे सर्वानाच आश्चर्य वाटले. कुणी शरद पवार यांच्याकडून ते अनावधानाने निघून गेले असावे, असा अंदाज काढला. तर शिवसेनेने आपलेच ढोल बडवून घ्यायला सुरुवात केली. ‘शिवसेनाप्रमुखांनी जे सांगितले ते कळायला पन्नास वर्षे लागली,’ असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. तर मराठी तरुणांनी पवार यांच्या या वाक्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
एकंदर शरद पवार यांची राजकीय कारकीर्द आणि त्यांचा राजकीय अनुभव, ज्या परिपक्वतेने ते राजकारणातील प्रत्येक पाऊल टाकत आले आहेत, ते पाहता पवारांनी ते वाक्य अनावधानाने उच्चारलेले आहे, असे कोणीही राजकारणातील जाणकार व्यक्ती म्हणू शकणार नाहीत. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबद्दल मराठा समाजाला आपुलकी वाटत आलेली आहे. आपल्या समाजात जन्मलेली एखादी व्यक्ती इतक्या उंचपदावर पोहोचल्यानंतर त्या समाजामधल्या कुणालाही आपुलकी वाटू शकते. मात्र, शरद पवार यांनी मात्र आपण एकाच समाजाचे नेते आहोत, असा शिक्का लागणार नाही, याची सतत काळजी घेतल्याचे दिसते. त्यासाठीच सर्व समाजघटकातील लोकांना बरोबर घेतल्याचे दिसून येते. त्यातील काहीजणांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविल्याचे दिसून येते. त्यात रिपब्लिकन नेते रामदास आठवले, छगन भुजबळ, अगदी आताचे धनंजय मुंडे यांच्यासारखी अनेक नावे घेता येतील. असे असताना त्यांच्याकडून तसे वाक्य का बरे निघाले असेल?
राजकारणातील शरद पवार यांचा अनुभव पाहता राज ठाकरे म्हणतात त्या प्रमाणे ‘त्या’ वाक्याचा खरा अर्थ सहा महिन्यानंतर लोकांना कळायला लागेल. केंद्रामध्ये असलेल्या भाजपबद्दल लोकांमध्ये मोठय़ा प्रमाणात नाराजी वाढू लागली आहे. विशेषत: व्यापारी आणि उद्योगपतींनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाच्या सिंहासनापर्यंत पोहोचविण्यासाठी हातभार लावला. तो वर्ग नोटाबंदी आणि जीएसटीमुळे मोठय़ा प्रमाणात नाराज आहे. मागच्या निवडणुकीत ज्या मित्रपक्षांना त्यांनी आपल्या सोबत घेतले होते. त्यातील बहुतेक मित्रपक्ष नाराज आहेत. अगदी ढोबळ उदाहरणे द्यायची झाली तर महाराष्ट्रात ३० वर्षापासूनची दोस्ती असणारी शिवसेना आज शत्रूसारखी भाजपशी वागत आहे. तिकडे चंद्राबाबू नायडू यांनीही आपला वेगळा सूर आळवायला सुरुवात केली आहे.
महाराष्ट्रातील विचार करायचा झाल्यास राजू शेट्टीने भाजपपासून उघड फारकत घेतली आहे. या सर्व परिस्थितीत केंद्रात पुन्हा भाजपचे सरकार येईल का, असा प्रश्न आहे. एकीकडे भाजप सरकारविरोधात मोठय़ा प्रमाणात नाराजी दिसत असताना दुसरीकडे राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळखल्या जाणा-या काँग्रेसबद्दल अद्याप फार मोठी लोकांच्या मनात आपुलकी निर्माण होऊ शकलेली नाही. राहुल गांधी यांनी गुजरातच्या निवडणुकीत ब-यापैकी प्रतिमा निर्माण केली असली तरी अद्याप त्यांच्याकडे पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून कोणी पाहायला तयार नाही. अशा वेळी विविध पक्षांची एकजूट करून केंद्रात विरोधी पक्षांचा सर्वसमावेशक नेता नेमण्याची वेळ आली तर त्यात शरद पवार यांचे नाव फार वर आहे. अशा वेळी आपण कोणा एका समाज घटकाचे आहोत, असा शिक्का राहू नये म्हणून त्यांनी ‘ते’ वाक्य उच्चारलेले असावे. चला ‘त्या’ वाक्याचा अर्थ कळण्यासाठी सहा महिने वाट पाहू या!
पवार साहेब जे काही बोलले ते योग्यच बोलले . सर्वाना त्याचा फायदा झाला पाहिजे .पवार साहेब सर्वाना सामावून घेणारे नेते आहेत.