वर्षभरात घोषणाबाजी आणि भाषणबाजी पलीकडे काहीही न करता जे काही चांगले सुरु आहे ते आपल्यामुळेच असा आव आणणा-या नरेंद्र मोदी सरकारला आज एक वर्ष पूर्ण होत आहे.
मुंबई – वर्षभरात घोषणाबाजी आणि भाषणबाजी पलीकडे काहीही न करता जे काही चांगले सुरु आहे ते आपल्यामुळेच असा आव आणणा-या नरेंद्र मोदी सरकारला आज एक वर्ष पूर्ण होत आहे.
दैनिके, नियतकालिके आणि वृत्तवाहिन्यांना जाहीराती देऊन मोदी सरकार हा वर्षपूर्तीचा सोहळा गाजावाजा करुन साजरे करत आहे. मात्र वर्षपूर्तीचा सोहळयाला अपवाद ठरलेय ते शिवसेनेचे मुखपत्र असलेले दैनिक ‘सामना’.
मुंबईतल्या सर्वच प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये मोदी सरकारच्या वर्षपूर्तीची जाहीरात पहिल्या पानावर प्रसिध्द झाली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या सरकारच्या वर्षभरातल्या कामकाजाचा लेखाजोखा मांडलाय. सरकारच्या जमेच्या बाजू सांगितल्या आहेत.
मात्र भाजपाचा मित्र पक्ष आणि सत्तेमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेला मोदी सरकारचा वर्षभराचा कारभार पटलेला दिसत नाही. त्यामुळेच मोदी सरकारच्या वर्षपूर्तीची जाहीरात ‘सामना’ मध्ये पहिल्या पानावर प्रसिध्द झालेली नाही. आतल्या ११ नंबरच्या पानावर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली वर्षपूर्तीची महाराष्ट्र शासनाची जाहीरात आहे. त्यामुळे वर्षपूर्तीच्या निमित्ताने शिवसेनेने पुन्हा एकदा आपली नाराजी दाखवून दिली आहे.
वास्तविक मागच्यावर्षी याच दिवसापासून मोदी यांनी सत्तारोहण केले त्या २६ मे पासूनच शिवसेना आणि भाजपमध्ये विसंवादाला सुरुवात झाली होती. लोकसभेमध्ये १८ खासदार असूनही मोदींनी शिवसेनेची अवघ्या एक केंद्रीय मंत्रीपदावर बोळवण करुन डिवचले होते.
त्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तेमध्ये सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या शिवसेनेला अनेकदा मानहानीकारक अनुभवातून जावे लागले. आताही महाराष्ट्र सरकारमध्ये शिवसेना सहभागी असली तरी, शिवसेनेकडे दुय्यम महत्वाची खाती आहेत. ही सल शिवसेनेला सतत डाचत असते त्यामुळे केंद्रात आणि राज्यात भाजप बरोबर युती असूनही शिवसेना वेळोवेळी भाजप विरोधी भूमिका घेत असते.
उद्धव काय फक्त घरात बसून आदेश देणार?