ऑस्कर पुरस्कारांसाठी परदेशी चित्रपट विभागात भारतातर्फे ‘बर्फी’ पाठवण्याचा निर्णय झाला आणि वादाचं मोहोळ उठलं. ब्रिलियंट, एक्स्ट्रॉऑर्डिनरी या विशेषणांनी भलामण झालेला ‘बर्फी’ अनेक परदेशी चित्रपटांवरून ढापला असल्याचा साक्षात्कार अनेकांना झाला..
भारतीय समाजाच्या रोमारोमात भिनलेला दुटप्पीपणा प्रत्येक ठिकाणी आपलं डोकं वर काढत असतो. मग ऑस्कर पुरस्कार तरी त्याला कसे अपवाद असणार? प्रामुख्याने अमेरिकन चित्रपटांसाठी असलेल्या या पुरस्कारांमध्ये परदेशी चित्रपटांसाठीचाही एक विभाग असल्यामुळे अमेरिकेव्यतिरिक्त जगाचा या पुरस्कारांशी संबंध येतो. ऑस्करची प्रदीर्घ परंपरा, त्याचं ग्लॅमर, प्रतिष्ठा, ऑस्करभोवती गुंफलेल्या अनेक दंतकथा यामुळे ऑस्कर हा चित्रपटजगतातला सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. त्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीशी संबंधित असलेल्या कलावंतांनाही ऑस्करचं सुप्त आकर्षण असतंच. त्यातच दशकभरापूर्वी ‘लगान’ने परदेशी चित्रपट विभागात अंतिम पाचात मारलेली धडक आणि तीन वर्षापूर्वी ए. आर. रहमान, गुलजार आणि रसुल पुकुट्टी यांनी मिळवलेले ऑस्कर पुरस्कार यामुळे हा अप्राप्य सन्मानही आवाक्यात आल्यासारखा वाटू लागल्यामुळे महत्त्वाकांक्षाही वाढीस लागल्यात. पण परदेशी चित्रपट विभागात काही आपली डाळ शिजत नाही. त्यामुळे मग ‘ऑस्करला इतकं महत्त्व कशासाठी द्यायचं? ते अमेरिकन चित्रपट उद्योगासाठीचे पुरस्कार!’ अशा, ‘कोल्ह्याला द्राक्षे आंबट’ म्हणीचा प्रत्यय देणा-या प्रतिक्रियाही इंडस्ट्रीतल्या महाभागांकडूनच ऐकायला मिळतात.
तरीही प्रत्येक वेळी ऑस्करसाठी भारतातर्फे पाठवायच्या चित्रपटाची निवड झाली की, वाद झडायला सुरुवात होते. परदेशी चित्रपट विभागाच्या अंतिम पाचात ‘लगान’ आल्यापासून तर हे वाद अधिक हिरिरीने होऊ लागलेत. तोवर कुठला चित्रपट पाठवला जातोय, हे कोणाच्या गावीही नसायचं. आता भारतातर्फे कुठला चित्रपट पाठवायचा हे ठरलं की, जणू त्या चित्रपटाने ऑस्करच पटकावला अशा पद्धतीने त्याचा उदोउदो होतो आणि दुसरीकडे त्याच्या निवडीवरून वादही झडू लागतात. यंदा ‘बर्फी’ची निवड झाल्यापासून अशीच वादावादीला सुरुवात झाली आहे. नितांतसुंदर, वेगळा अनुभव म्हणून ‘बर्फी’ प्रेक्षकांनी उचलून धरला. बॉक्स ऑफिसवर १०० कोटींच्या आकड्यापर्यंत या चित्रपटाने झेप घेतली आहे. क्रिटिकल अक्लेम आणि बॉक्स ऑफिस सक्सेस असं दुर्मीळ चित्र ‘बर्फी’च्या बाबतीत दिसलं. मात्र, भारताची ऑफिशियल ऑस्कर एंट्री म्हणून ‘बर्फी’चं नाव जाहीर झालं आणि ‘बर्फी’ हा कसा (आणि कुठल्या) परदेशी चित्रपटांवरून ढापला आहे, यावर मजकूरच्या मजकूर प्रसिद्ध होऊ लागला. कधी ब्लॉगवरून, कधी पेपरातून, तर कधी टेलिव्हिजन चॅनेलवरून.
‘बर्फी’वर चार्ली चॅपलिनसह अनेक परदेशी प्रभाव असल्याचं खुद्द दिग्दर्शक अनुराग बसूने कधीही नाकारलेलं नाही. प्रभाव, प्रेरणा आणि नक्कल हे केवळ तीन शब्दच नव्हेत, तर तिघांचा अर्थही वेगळा आहे. परदेशी चित्रपटाची केवळ फ्रेम टु फ्रेम नक्कल करून चांगला चित्रपट होत नाही, हे पटवण्यासाठी शेकडो हिंदी चित्रपट मौजूद आहेत. स्वत: अनुरागचा पहिला चित्रपट ‘साया’ असाच होता. त्याला नुकतंच कुठल्याशा मुलाखतीत विचारण्यात आलं होतं की, स्वत:चा कुठला चित्रपट आवडत नाही, त्यावेळी त्याने ‘साया’चं नाव घेऊन सांगितलं होतं की, त्यात काहीच ओरिजिनल नाही. अनुरागला ज्यांनी संधी दिली त्या महेश भट यांची हयात परदेशी चित्रपटांची कॉपी करण्यात गेली. तरीही त्यांचे उल्लेखनीय चित्रपट हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेही नाहीत. म्हणजेच, केवळ तंतोतंत कॉपी केली म्हणजे चांगला चित्रपट बनत नाही. त्यासाठी दिग्दर्शकाने त्यात आपल्या पदरचं बरंच घालावं लागतं, आपल्या कलाकृतीला स्वतंत्र व्यक्तिमत्व मिळवून द्यावं लागतं. ‘बर्फी’च्या संदर्भात अनुराग त्याबाबतीत निश्चित यशस्वी ठरला. त्यातला फील गुड फॅक्टर, प्रमुख व्यक्तिरेखेची विजिगिषु वृत्ती, चित्रपटाचा संदेश आणि एकूणच सकारात्मकता हे सर्व गुण ‘बर्फी’चे स्वत:चे आहेत.
‘बर्फी’च ऑस्करसाठीचा एकमेव पात्र चित्रपट होता का, याविषयी वाद होऊ शकतात. विशेषत: ‘विकी डोनर’, ‘कहानी’, ‘देऊळ’, ‘पानसिंग तोमर’ यांसारखे वैविध्यपूर्ण चित्रपट स्पर्धेत असताना. पण यापैकी कुठलाही चित्रपट निवडला गेला असता तरी वाद झालाच असता. ‘कहानी’सारख्या निर्दोष, बांधेसूद थ्रिलरमध्येही ‘टेकिंग लाइव्ह्ज’, ‘द व्हॅनिशिंग’, ‘डोंट लुक नाऊ’ यांसारख्या अनेक चित्रपटांचे घटक असल्याचं सांगितलं जातं. ‘कहानी’च्या क्लायमॅक्सचं ‘टेकिंग लाइव्ह्ज’च्या क्लायमॅक्सशी साधर्म्य असल्याचं सांगितलं जातं. पण म्हणून ‘कहानी’चा आणि लेखक-दिग्दर्शक सुजॉय घोषचा ब्रिलियन्स नाकारता येणार नाही.
चित्रपट लिहिताना, दिग्दर्शित करताना, चित्रपट घडण्याच्या संपूर्ण प्रक्रियेतच विविध घटकांचा प्रभाव कळत-नकळतपणे पडत असतो. ‘पानसिंग तोमर’सारख्या संपूर्ण ओरिजिनल कथेवर चित्रपट बनतानाही एखाद्या प्रसंगावर किंवा त्या प्रसंगाच्या ट्रीटमेंटवर किंवा गोष्ट सांगण्याच्या पद्धतीवरही कुठल्या तरी चित्रपटाचा प्रभाव असू शकतो. पण म्हणून त्या चित्रपटावर किंवा दिग्दर्शक तिग्मांशू धुलियावर चोरीचा आरोप करणं चुकीचं ठरेल.
भारतातून ऑस्करसाठी चित्रपट पाठवताना परदेशी चित्रपटाकडून ऑस्करच्या परीक्षकांना नेमकं काय अपेक्षित असतं, याचा विचार होत नाही, तसंच चित्रपटाच्या निवडीवरून वाद घालतानाही तो केला जात नाही. ‘विकी डोनर’ हा आपल्यासाठी संपूर्ण ओरिजिनल आणि धाडसी चित्रपट असेलही, पण परदेशात, त्यातही अमेरिकेत स्पर्म डोनेशन हा विषय खरोखरच तितका टॅबू आहे का, याचा विचार व्हायला हवा. तसा तो नसेल तर नायकाच्या या प्रोफेशनविषयी त्याच्या भवतालच्या माणसांनी इतका गजहब करायचं कारणच काय, हेच परीक्षकांना उमगणार नाही. ‘मदर इंडिया’मध्ये राधा मूठभर धान्यासाठी सुखिलालाची शय्यासोबतीची मागणी का मान्य करत नाही, असा प्रश्न म्हणे ऑस्करच्या परीक्षकांना पडला होता आणि त्यामुळेच तो अंतिम पाचात येऊनही विजेता ठरू शकला नव्हता. याचाच अर्थ परदेशी चित्रपट विभागातले सिनेमेही पाश्चिमात्य दृष्टिकोनातूनच पाहिले जाणार असतील तर आपल्या चित्रपटांना तिथे मुळातच किती संधी आहे, याचा विचार व्हायला हवा. या सगळ्यात ‘बर्फी’ कुठे बसतो? ‘बर्फी’तलं एकूणच वातावरण आणि दिग्दर्शकाने दिलेली ट्रीटमेंट यावर युरोपियन चित्रपटांचा प्रभाव आहे, ही बाब ‘बर्फी’ला विरोध करताना नाकारली जातेय. ऑस्करमधल्या अन्य चित्रपटांच्या तुलनेत कदाचित ‘बर्फी’ टिकणारही नाही, पण निदान तो परीक्षकांना अगदी अपरिचित वाटणार नाही, इतकं मात्र त्याच्याविषयी ठामपणे म्हणता येईल. ऑस्करची बर्फी आपल्याला मिळणार की द्राक्षांप्रमाणे बर्फीही आंबट ठरणार, हे यथावकाश कळेलच.
लेख छान आहे.