तुमचे-आमचे म्हणजे सर्वसामान्यांचे वाढदिवस हल्ली लक्षात ठेवण्यासारखे साजरे होऊ लागलेत. हे वाढदिवस नाती जपण्याच्या बाबतीत खूप महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात. म्हणूनच वाढदिवस साजरे करताना काही भान बाळगणं गरजेचं आहे.
‘‘आमच्या वेळी नव्हते असले फाजील लाड,’’ असे म्हणणारे आईबाबा आणि आजी- आजोबा असताना एक पिढी वाढदिवस साजरे करत मोठी झाली! घरगुती प्रमाणात, मित्रमैत्रिणींत पण वाढदिवस म्हणजे मज्जा असं समीकरण मनात ठेवणारी.
पुढारी, अभिनेते, उद्योजक यांचेच वाढदिवस आणि जयंत्या व्हायच्या ही जुनी गोष्ट! वाढदिवस हा एक सण झाला, त्याला आता जमाना लोटला. त्याच्याभोवती केवढी मोठी व्यावसायिक उलाढाल वाढली ते आपल्याला माहिती आहेच.
शुभेच्छा देण्या-घेण्यात असलेली मजा, भेटवस्तू, पार्टी इत्यादींचे स्वरूप आर्थिक आणि सामाजिक स्तरानुसार बदलत जाते. पण एक गोष्ट कायम असते ती म्हणजे ‘‘सेलेब्रेशन मंगता है बॉस!’’
आता हे सेलेब्रेशन एखाद्या संस्थेला मदतनिधी देऊन करायचं, बीअरच्या बाटल्या रिचवून की एखाद्या डोंगरावर भटकंतीला जाऊन ही प्रत्येकाची निवड असते. मी मुलांचे वाढदिवस त्यांच्या मित्रांना बोलावून साजरे करते. एखाद्या संस्थेला त्यानिमित्ताने देणगी देते. सध्या राहते तिथे आमचे मित्रमैत्रिणी उत्साही आहेत. मी सुदैवी आहे की, अशी मंडळी माझ्याभोवती आहेत. यंदा नेहमीप्रमाणे त्यांनी मध्यरात्री येऊन आम्हाला शुभेच्छा दिल्या. आपल्याला आवडत्या, हव्या वाटणा-या, जवळच्या माणसाकडून आलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मला खूप खास वाटतात! अनेक मित्रमैत्रिणींना किमान शुभेच्छा संदेश तरी देऊन मी त्यांच्या वाढदिवसाचे स्मरण करते.
लहानपणापासून मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आवडतात. नव्याने ओळख झालेल्या व्यक्तीचा वाढदिवस माझ्या सहज लक्षात राहतो. आता तर इलेक्ट्रॉनिक्सच्या मदतीने या गोष्टी लक्षात ठेवण्याचीही गरज नाही. एकदा नोंद केली की झालं. त्यामुळे ही यादी महिनावार वाढते आहे. ऑगस्ट आणि ऑक्टोबर या महिन्यात माझ्या ओळखीच्या खूप जणांचे वाढदिवस असतात, असंही एकदम जाणवलं.
वाढदिवस म्हटलं की, आनंदच नसतो असं काही, मनाला चटका लावणारे अनुभव गेल्या एक-दोन वर्षात आले. आमच्या मित्रपरिवारातील दोन-तीन जण गेल्या वर्षात अकाली गेले. त्यांचे जन्मदिवस होते, त्या दिवशी ती आठवण अधिकच तीव्रतेनं झाली. त्याहीपेक्षा मनाला यातना झाल्या ते इलेक्ट्रॉनिक रिमायंडर आल्यावर.. व्यक्ती गेली, पण तिचा वाढदिवस कॅलेंडरमध्ये तसाच होता. त्याचे रिमायंडर तसेच ऑटो सेट होते.
It was terrible to see those reminders.
एकमेकांपासून दूर राहणारे, नेहमी एकमेकांच्या संपर्कात नसलेले लोक नेमानं एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. आजचा ट्रेंड आहे तो. अशा एखाद्या व्यक्तीला शुभेच्छा देताना माझ्या मनात धाकधूक असते. त्या व्यक्तीच्या घरची परिस्थिती कशी आहे, कुटुंबीय कसे आहेत, इतर काही मनाविरुद्ध घडलं आहे का, अशा माहिती नसलेल्या अनिश्चित पार्श्वभूमीवर माझ्या शुभेच्छा किंवा भेटवस्तू जातात तेव्हा काय प्रतिक्रिया असेल, अशी शंका अनेकदा मनात येते.
अशा वेळी खरं शुभेच्छा देणा-याची चूक असते, असं नाही पण प्रसंग नेमका वेगळा असू शकतो. तुमच्या जोडीदाराचा वाढदिवस आणि त्याच दिवशी तुमचे आई वा वडील यांचं निधन होणं, अशा घटनाही अनेक व्यक्तींच्या आयुष्यात घडतात. मग त्या सर्वाकरता वाढदिवस तेवढाच असेल का आनंदी? पूर्वीसारखा? अर्थातच नाही. म्हणूनच उत्सव साजरा करताना, सेलेब्रेट करताना जरासं भान असू द्या असं म्हणतात, ते उगाच नाही.
आज डेटिंग, लव्ह, लिव्ह इन इत्यादी गोष्टी थेट कॉलेजपासून जोरात असतात. दिल मिलते है, दिल बिछडते है! या बिछडलेल्या दिलाचा त्रास मात्र या वाढदिवसाच्या दिवशी जास्त असतो. नातं असलं की, या दिवशी कुणावर तरी अपेक्षांचं ओझं असतं.
नातं संपलं तरी अनेक गोष्टी विसरता येत नाहीत. वाढदिवस ही त्यापैकी एक ठळक बाब. नातं संपलं तरी वाढदिवस मात्र डोक्यात राहतात. अशी लिव्ह इन किंवा अगदी लग्नानंतर विभक्त झालेली जोडपी तुम्ही पाहिली आहेत का, त्यांच्या एकमेकांच्या वाढदिवसाच्या दिवशीच्या प्रतिक्रिया माहिती आहेत तुम्हाला, त्यांचं ते त्या दिवसाचा मागोवा घेणं वा विसरायचा प्रयत्न करणं म्हणजे आपण अतिशय अस्वस्थ होऊ असे विचार असतात.
तुम्हाला जुने सिनेमे आठवतात का? त्यात मोठी पार्टी सुरू आहे आणि हिरो किंवा हिरॉइन पियानोच्या साथीने जे गाणं म्हणत असते त्याची आठवण होते मला. अगदी रडकं, काही वेळा काय कटकट आहे, आवरा असं आपल्या मनात येईल असं गाणं. पण ती त्या प्रत्यक्षातल्या प्रेमीजिवांकरता खरीच परिस्थिती असते.सोशल नेटवìकगमुळे अनेक गोष्टींचं अनावश्यक महत्त्व येऊन उदात्तिकरण झालं आहे. Birthday is not an exception.
आता सोशल नेटवìकग साइटमुळे या माजी जोडीदाराच्या बातम्या कळणं फार सहजशक्य होतं. त्याने होतं काय तर त्रासात अधिकच भरच पडते. ही झाली राजीखुशी वेगळ्या झालेल्या किंवा दोन्हीकडून ब्रेक-अपची गोष्ट. त्यापेक्षा एकतर्फी प्रेमाचा किंवा मैत्रीचा मामला तर अगदीच वेगळा. मला तो जास्त भीतीदायक वाटतो.
सगळं जग तुमच्या त्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा देत असतं, ती व्यक्ती सेलेब्रेशनमध्ये मश्गूल असते, पण तुम्हाला थेट काही बोलता येत नाही, कधी संपर्क नसतो, पण ती आवडती दुसरी व्यक्ती तिच्याच विश्वात असते. वाढदिवस जोरात सुरू असतो. अशा वेळी तुम्ही, आम्ही किंवा एकतर्फी प्रेम करणारे अगदी थेट ‘प्याला’ हातात घेऊन नसलो तरी एक व्यक्ती म्हणून आपण आतून दुखावलेलो असतो. अधिक भावुक झालेलो असतो. या दिवशी हा दुरावा नक्कीच अंगावर येतो. अशा वेळी मैत्री का केली, का प्रेमात पडलो यापासून तर थेट त्या दुस-या व्यक्तीचं अगदी वाईट होऊ दे, असेही विचार मनात येतात.
जिथे प्रेम असतं, तिथं हा आपलेपणा किंवा मालकी हक्कसुद्धा असतो, असं म्हणतात. त्यातून मग मत्सर, द्वेषसुद्धा निर्माण होतो. खरं हे सर्व घडणं अतिशय नसर्गिक आहे, पण त्यावर रागाने काही व्यक्त करणं वा एखादी टोकाची भूमिका घेणं आपल्याला टाळता येतं.आपला जीवलग मित्र-मैत्रिणीचा वा एक्स बॉयफ्रेंड वा गर्लफ्रेंडचा वाढदिवस वा आयुष्यातला इतर कोणताही महत्त्वाचा दिवस आपल्यामुळे वाया जावा वा त्या व्यक्तीला त्रास व्हावा असं मनात येत असेल तर?
ते तुम्ही तिच्याबरोबर असताना झालेलं चालेल का, असा विचार करा. ती प्रिय व्यक्ती तुमच्याबरोबर आहे, असं मनाला समजवा. म्हणून तिच्या जीवाला धोका होईल, असं आपण वागणार नाही, असे प्रयत्न करा. तसा कायमचा निश्चय करा. प्रेमातून हिंसा जन्माला यायला वेळ लागत नाही. पण तो मार्ग हा कायमचा उपाय नाही. नातं दोघांनाही हवं असेल तर सुखाचं होईल. कुणा एकाला नको असलेलं नातं लादायचा प्रयत्न करू नका. विभक्त झाला असलात, तर एक नवे पर्व सुरू करा. वाढदिवस हा आनंदाचा दिवस. त्या दिशेनं टाकायच्या पावलांकरता पहिला दिवस म्हणून निवडा. मग तो वाढदिवस तुमचा असो की, तुमच्या आवडत्या व्यक्तीचा!
प्रेमामुळे मिळते ती ताकद हीच. वाढदिवस हा दिवस झालेली वाढ दर्शक आहे.. ती फक्त शारीरिक वाढ नाही. मनाने अधिक खंबीर, अधिक प्रगल्भ आणि क्षमाशील होणं, ही शारीरिक वाढीएवढीच महत्त्वाची वाढ आहे. वाढती स्पर्धा, ताण आणि असमाधान यांच्याशी लढताना नुसतं वय वाढणं, यापेक्षा अशी सर्वागीण वाढ जास्त महत्त्वाची आहे. आधीच्या वर्षात आलेले अनेक प्रसंग कदाचित आपल्याला मोठं करतात ते अशाप्रकारे!यानिमित्ताने नातं कसं असावं, त्याचं महत्त्व काय आणि कसं जपावं याकडे बघणं आवश्यक आहे. ते समजून घेता आलं तर वाढदिवस उत्तम साजरा करता येईल. दुरावा, अबोला किंवा दोन दिशांना प्रवास झाले तरी त्याची कटुता कमी करता येईल.
कोणतंही नातं व्यावहारिक नफ्या-तोटयावर फुलत नाही. त्याचा शेवटच होतो. नातं आदर, जिव्हाळा आणि विश्वासाशिवाय कायम राहत नाही. ते रक्ताचं नातं असो, मैत्रीचं नातं असो किंवा अगदी एखाद्या क्षेत्रातला तुम्ही मानलेला गॉडफादर, गॉडमदर, मार्गदर्शक आणि तुमचं नातं असो.
कुठल्याही एका व्यक्तीकडून जर खूप मनापासून नात्यात भावनिक गुंतवणूक झाली असेल तर मग कोणतंच नातं या नियमाला अपवाद नाही, हे तुमच्या ध्यानात येईल. तुमचा अनुभव तसाच असेल. बाकी वरवर दिसणारे संबंध अनेक तयार होतात. ते काळाच्या ओघात नाहीसे होतात. त्याचं दु:खं आपण करत नाही, ते करायचं नसतं, हे सुरुवातीपासूनच आपल्याला माहिती असतं.
मी हा लेख लिहिते आहे, तेव्हा माझ्या मित्र यादीतल्या अनेकांचा वाढदिवस आहे. तुम्ही हा लेख वाचाल तेव्हाही अनेक वाढदिवस असतील. त्यापैकी किमान एक अगदी ‘‘दिल के पास’’ अशा व्यक्तीचा असेल. तुमच्या किंवा माझ्या! त्या व्यक्तीबरोबर हा दिवस साजरा करता आला तर उत्तम. शुभेच्छा तर आपण देऊच. पण त्या देताना त्याचे उत्तर येईल, अशी अपेक्षा ठेवू नका. शुभेच्छा दिलेल्या आवडत नसतील तर देऊ नका. अनेक नात्यात एक स्पेस देणं आवश्यक असतं. स्वत:ची स्पेस. ती आपण देऊ. कुणीतरी आधी समजून घ्यायचं असतं. त्या प्रिय व्यक्तीच्या वाढदिवसाला ती सुरुवात आपणच करूया. अहंकार, उद्धटपणा या सर्व नकारात्मक बाबी आहेत. त्यापासून दूर राहू. चुका केल्या असतील, तर त्याची मनातल्या मनात माफी मागू या. पण आनंदाने पुढे जाऊया. आपल्या प्रिय, सुंदर दिसणा-या, छान बोलणा-या, सुंदर व्यक्तीचं आयुष्य आनंदमय होवो, असं म्हणत. बरोबर आहे ना?
आज ज्यांचा वाढदिवस आहे, अशा सर्वाना माझ्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा!
इन्टरनेटच्या आजच्या युगात वाढ दिवसाच्या शुभेच्छा देणे हा एक सोपस्कार झाला आहे हे सत्य या लेखाने लक्षात आले पण त्यालाहि किती सुंदर कंगोरे आहेत त्याचा आनंद घेत आयुष्य सुंदर सुकर व्हावे- शेखर छत्रे काळाचौकी