गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात हरिनाम सप्ताहाचा हिशोब मागितला म्हणून चौघांनी विवाहितेवर केलेल्या बलात्काराच्या घटनेवर विरोधकांनी बुधवारी विधान परिषदेत आक्रमक भूमिका घेतली.
मुंबई- मुख्यमंत्र्यांच्या गावातील मध्यवर्ती कारागृहातील पाच कैद्यांनी केलेले पलायन आणि गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात हरिनाम सप्ताहाचा हिशोब मागितला म्हणून चौघांनी विवाहितेवर केलेल्या बलात्काराच्या घटनेवर विरोधकांनी बुधवारी विधान परिषदेत आक्रमक भूमिका घेतली.
पाच कैद्यांचे पलायन झाल्याने राज्यातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागपुरात तडीपार गुंडाकडून मुख्यमंत्र्यांच्याच मतदारसंघात महिलेला नग्न करून मारहाण केली जाते आणि कामठीतून कोठडीतील आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळून जातो तर गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडते.
त्यामुळे राज्यातील कायदा व्यवस्था धोक्यात आली आहे. यामुळे याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी स्वीकारून गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिवसभराचे कामकाज बाजूला सारून सरकारने २८९ अन्वये प्रस्तावावर चर्चा करण्याची मागणी केली होती. मात्र ऐनवेळी सभापतींनी हा प्रस्ताव नाकारल्याने सभागृहात विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे तब्बल पाच वेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.
सुरुवातीला २० मिनिटे आणि दहा-दहा मिनिटानंतरच्या तहकुबीनंतर सभागृह सुरू झाले. मात्र, राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी याविषयीच्या प्रस्तावावर चर्चा करण्याची मागणी केली असता संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी त्यांना मध्येच अडविण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही वेळा गिरीश बापट विरुद्ध सुनील तटकरे यांच्यात बाचाबाची झाली.
या प्रस्तावावर सत्ताधारी पक्षाला बोलता येणार नसल्याचे तटकरे यांनी बापट यांना सुनावले तर बापट यांनी यावर काय भाषण सुरू आहे काय असा सवाल केला. मात्र सभापतींनी काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांना बोलण्याची सूचना केली.
राज्यात भाजपा सरकार आल्यापासून कायदा सुव्यस्थेचे धिंडवडे निघाले असून यावर मुख्यमंत्र्यांचा प्रशासनावर वचकच राहिलेला नाही. त्यामुळेच नागपुरात कारागृहातून कैदी पळून जातात आणि तडीपार गुंडांकडून महिलांना नग्न करून मारले जाते. त्यामुळे या विषयावर चर्चा करू दिली जाणार नसेल तर हे सभागृह चालू देणार नाही, असा इशारा ठाकरे यांनी दिला.
त्यात गिरीष बापट यांनी आजच्या कामकाजात विनियोजन विधेयक आणि लक्षवेधी आदी मुख्य कामकाज असल्याने हे कामकाज आधी करून त्यानंतर विरोधकांनी मागणी केलेल्या विषयावर चर्चा करावी, अशी विनंती सभापतींना केली. त्याच वेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार गोंधळ घातला.
अनेक सदस्य वेलमधे येऊन घोषणाबाजीच्या तयारीत असतानाच सभापतींनी मला निर्णय देऊ द्या, अशी सूचना केली मात्र विरोधी पक्ष सदस्यांकडून जोरदार गदारोळ करण्यात आल्याने सुरुवातीला दहा आणि नंतर दहा मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. त्यानंतर सभापतींनी दिवसभरातील कामकाजाचा हवाला देत नियम ९७ अन्वये विरोधकांना कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रस्तावरील चर्चेला मान्यता दिली. या चर्चेत काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, भाई जगताप, विद्या चव्हाण, हरिभाऊ राठोड आदींनी सरकार विरोधात जोरदार हल्ला चढवत सरकारचे वाभाडे काढले.
मुख्यमंत्र्यांच्या गावातच कायदा सुव्यस्थेचे धिंडवडे
मुख्यमंत्र्यांचे गाव असलेल्या नागपुरातील मध्यवर्ती कारागृहातून गंभीर आरोपाखाली शिक्षा भोगणारे आरोपी पळून जातात, तर तडीपार गुंडाकडून मुख्यमंत्र्यांच्याच मतदारसंघात महिलेला नग्न करून मारहाण केली जाते आणि कामठीतून कस्टडीत असलेला आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळून जातो तर गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात हरिनाम सप्ताहाच्या वर्गणीचा हिशोब मागितला म्हणून महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडते.
या राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली असल्याच्या दावा करणा-या आणि गृह खाते सांभाळणा-या फडणवीस यांच्या नागपूरमध्येच कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचा घणाघाती आरोप विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.
नागपूरमधील तडीपार गुंडाने युवतीला नग्न करून केलेली मारहाण, पोलिसांनी फिर्याद घेण्यास लावलेला दोन दिवसांचा विलंब, मुंबईत पोलिसच गुन्हेगारांना तुरुंगात नेण्याऐवजी त्यांच्यासोबत डान्स बारमध्ये रात्र घालवतात या घटनांची माहिती देत मुंडे यांनी कायदा व सुव्यस्थेचा समाचार घेतला.
नेवासा तालुक्यातील घटना महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना आहे. निव्वळ सप्ताहाचा हिशोब मागितला म्हणून महिलेवर बलात्कार केला. यातील मुख्य आरोपी हा भाजपाचा कार्यकर्ता असल्याचा आरोप करुन गृहराज्यमंत्र्यांच्या या जिल्ह्यात एका महिन्यात ३० अॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल होतात यावरून कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात येते. नगर जिल्ह्यात केवळ नागरिकच नाही तर पोलीसही सुरक्षित नसल्याचे मुंडे यांनी सांगितले.
बरोबर आहे