‘भाजपने इंग्रजांना हटविले, आता गरिबी हटविणार’ असे वक्तव्य करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यासाठी रक्त सांडणा-या क्रांतीकारकांचा अपमान केला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी खडसावले.
मुंबई- ‘भाजपने इंग्रजांना हटविले, आता गरिबी हटविणार’ असे वक्तव्य करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यासाठी रक्त सांडणा-या क्रांतीकारकांचा अपमान केला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी खडसावले. तर देश स्वतंत्र्य झाला तेव्हा नरेंद्र मोदींचा जन्म तरी झाला होता का, असा खडा सवाल काँग्रेसच्या प्रचारसमितीचे प्रमुख नारायण राणे यांनी विचारला. निवडणुकी अगोदर आश्वासने देऊन नंतर त्याच्या उलट निर्णय घेत नरेंद्र मोदी यांनी दिशाभूल केल्याचे लोकांच्या लक्षात आल्याने यापुढे महाराष्ट्रातील मतदार काँग्रेसलाच मतदान करतील आणि पुन्हा आमचा विजय होईल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा समितीच्या वतीने तयार केलेल्या ‘मोदींनी केली जनतेची फसवणूक’ आणि ‘जिंकणारच’ या दोन पुस्तिकांचे प्रकाशन रविवारी गांधीभवन येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रचार समितीचे प्रमुख तथा उद्योगमंत्री नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, समन्वय समितीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, नागपूर येथे झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘भाजपने अगोदर इंग्रजांना हटवले, आता गरिबी हटवणार’ स्वातंत्र्य लढय़ात कुठे होता भाजप, कुठे होता संघ परिवार. त्यांच्या त्या वेळच्या भूमिका काय होत्या हे सर्वाना माहीत आहे. भाजपने इंग्रजांना हटवले असे म्हणणे म्हणजे स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्या तमाम क्रांतिकारकांचा अपमान आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, नरेंद्र मोदी फक्त भाषणे करून जनतेची दिशाभूल करत आहेत.
लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी या देशातील जनतेला अनेक आश्वासने दिली. महागाई कमी करणार, राम मंदिर बांधणार, अच्छे दिन आणणार, आयकराची मर्यादा वाढवणार, शंभर दिवसांत काळा पैसा परत आणणार. प्रत्यक्षात शंभर दिवसांत एकही काळा पैसा परत आणता आलेला नाही. पाकिस्तानला धडा शिकवू अशा वल्गना केल्या होत्या. सीमेवर रोज गोळीबार सुरू आहे. महागाई कमी झाली नाही, तर ती अधिक वाढली आहे. सामान्य जनतेच्या हिताचा एकही निर्णय न घेता यूपीए सरकारने देशहितासाठी नियोजन आयोगासारख्या ज्या संस्था उभ्या केल्या होत्या त्या बरखास्त करणे एवढेच काम मोदी सध्या करत आहेत. देशहितासाठी हे अत्यंत घातक आहे.
देशामध्ये सध्या विजेचे मोठे संकट निर्माण झाले आहे. त्याबद्दल काही सकारात्मक पावले उचलली जात नाही. वीजटंचाई हे राष्ट्रीय संकट होऊ पाहात आहे. त्यावर चिंतन करण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवावी, अशी मागणी आपण पंतप्रधानांकडे केली होती. वीजटंचाईचे गांभीर्य आपण पंतप्रधानांच्या लक्षात आणून दिले. मात्र देशाच्या हितासाठी सकारात्मक पावले टाकण्यापेक्षा सवंग प्रसिद्धीसाठी त्यांची भाषणबाजी सुरू आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, मोदी सरकारने जी जनतेची फसवणूक केली आहे, ती या पुस्तिकेच्या माध्यमातून आम्ही लोकांसमोर मांडणार आहोत. झालेली फसवणूक लक्षात आल्यामुळे लोक पुन्हा काँग्रेसलाच निवडून देतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्तकेला.
अशोक चव्हांनाच तोंड बघा , निवडणुकीचा निकाल कळेल…