महाराष्ट्राचे ढिगभर प्रश्न पडलेले असताना त्या प्रश्नांबद्दल एका शब्दाने न बोलणारा हा मुख्यमंत्री आणि गुन्ह्याचे समर्थन करणारा हा मुख्यमंत्री! काय पाप केले महाराष्ट्राने की, हे असले टिनपाट लोक महाराष्ट्राच्या वाटय़ाला आले. एकाचे शिक्षण बोगस, एकाची चिक्की बोगस, एकाची माहिती बोगस आणि शेवटी हे सरकार बोगस. अशी या सरकारची आज अवस्था झालेली आहे.
महाराष्ट्राचे राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली आणि कुटुंबाच्या मालमत्तेची खोटी माहिती दिली. मतदारयादीत दोन दोन ठिकाणी नावे ठेवली. पाटील यांच्याकडे असलेल्या जमिनींपैकी मूर्तीजापूर तालुक्यातील जमिनीची माहिती निवडणूक आयोगाला दिलेली नाही, असे अनेक आक्षेप या राज्यमंत्र्यांवर घेण्यात आलेले आहेत.
रणजीत पाटील यांनी चारसोबीसगिरी केली, त्याबद्दल फारसा आक्षेप घेण्याचे कारण नाही. कारण सोवळे नेसलेल्या ज्या भाजपामध्ये ते आहेत त्या भाजपाचे सत्तेत आल्यानंतर ‘वरून कीर्तन-आतून तमाशा’ हे सर्रासपणे सुरू आहे; पण संताप याचा आहे की, रणजीत पाटील यांनी काय शेण खाल्लेय यापेक्षासुद्धा महाराष्ट्राचे चेहरा सोज्वळ असलेले मुख्यमंत्री आपल्या राज्यमंत्र्याचे समर्थन करताहेत.
मतदारयादीत दोन ठिकाणी अनेकांची नावे आहेत, असे राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगून रणजीत पाटलांचे समर्थन केले. या मुख्यमंत्र्यांचे डोके ठिकाणावर आहे की नाही? आपण काय बोलतो आहोत, राज्याचा मुख्यमंत्री म्हणून बसलेल्या व्यक्तीला काय बोलावे, याचे भान राहिलेले नाही. सगळ्या बाजूंनी या सरकारच्या भ्रष्टाचाराचे वाभाडे निघत असल्यामुळे मुख्यमंत्री पार गोंधळून गेलेले आहेत. इतका भंपक मुख्यमंत्री महाराष्ट्राला आजपर्यंत मिळालेला नाही.
गुन्ह्याचे समर्थन करणारे गुन्हेगार असू शकतात. राज्य चालवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते गुन्हेगारांचे आणि गुन्ह्याचे समर्थन करू लागले म्हणजे हे राज्य चोरांचे झालेले आहे. मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर बसण्याची त्यांची लायकी नाही इतक्या टोकाला खाली उतरून गुन्हेगारीचे समर्थन ते करू लागले आहेत.
निवडणुकीपूर्वीचे सोज्वळ चेहरे आणि ती सोवळी ज्यांना आठवत असेल, ते आठ महिन्यांमध्ये चंबळ खो-याचे प्रतिनिधी झाले. अशी या सरकारची भयानक अवस्था झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे ढिगभर प्रश्न पडलेले असताना त्या प्रश्नांबद्दल एका शब्दाने न बोलणारा हा मुख्यमंत्री आणि गुन्ह्याचे समर्थन करणारा हा मुख्यमंत्री! काय पाप केले महाराष्ट्राने की, हे असले टिनपाट लोक महाराष्ट्राच्या वाटय़ाला आले. एकाचे शिक्षण बोगस, एकाची चिक्की बोगस, एकाची माहिती बोगस आणि शेवटी हे सरकार बोगस. अशी या सरकारची आज अवस्था झालेली आहे.
हे सरकार गंभीर नाही, हे महाराष्ट्राला कधीच कळून चुकले आहे; पण केवळ महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्र्याच्याच नावात विनोद नाही तर हे अख्खे सरकार ‘ईनोदी’ आहे. या सरकारने विरोधकांना धमकी दिली आहे की, ‘जर आमच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या फाईली उघडल्यात तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या १९ आमदारांच्या भ्रष्टाचाराच्या फाईली आम्ही उघडू.’ या सरकारला विशेषणे अपुरी पडतील, इतका हा पोरकटपणा सुरू आहे. आठ महिन्यांत महाराष्ट्र पोरळून निघालेला आहे. मुख्यमंत्री ज्या भागातून आले आहेत, तिथे धान आणि कापूस या दोन्ही पिकांची वाट लागलेली आहे. त्यांना भाव देण्याचे कबूल करून भाव दिलेले नाहीत. ४००च्या वर शेतक-यांच्या आत्महत्या आठ महिन्यांत झाल्या. त्यातल्या नव्वद टक्के विदर्भात. महाराष्ट्रभर पावसाचा पत्ता नाही.
पेरण्या होण्याआधी थोडासा पाऊस आला. पेरण्या करपल्या. शेतकरी चारही बाजूंनी हैराण झालेला आहे. दुसरीकडे सामान्य माणसे महागाईने संतप्त आहेत. या स्थितीत लोकांच्या प्रश्नावर कोणताही निर्णय करण्याची या सरकारची मानसिकता नाही. आता हे सरकार धमक्या देऊन चालवण्याची वेळ आलेली आहे; पण हे सरकार जसे विनोदी आहे, तशी या सरकारची वैचारिक समजही पोरकट आहे. तुम्ही धमक्या दिल्याने किंवा काँग्रेस आमदारांच्या फाईली उघड?केल्याने तुमचे पाप, पुण्य कसे काय ठरेल? कोण तुमचा सल्लागार आहे? तसे या सरकारला सल्लागार वगैरे कोणी असेल, असे अजिबात वाटत नाही.
चार टाळकी म्हणजेच हे सरकार. त्यात मुख्यमंत्र्यांची फजिती होताना खडसे खूश, तिकडे तावडेंची फजिती होताना गडकरी गटाचे मुनगंटीवार खूश, इकडे पंकजाची चिक्की घशात अडकली असताना सगळेच खूश; पण चिक्कीवाल्या बाई कमी समजू नका. त्या तर आता असे सांगू लागल्या आहेत की, ‘माझे विरोधक म्हणजे ढेकूण आहेत.’ एका ठिकाणी त्यांनी असा उल्लेख केला की, ‘माझे विरोधक ढेकूणपण आहेत आणि उंदीरपण आहेत.’ त्यामुळे चिक्की घोटाळयात जी काही माती सापडल्याचा आक्षेप आहे, त्या मातीमध्येही हे ढेकूण लपले की काय, याचाही ‘सीबीआय’कडे तपास द्यायला हवा आणि एका लढाऊ नेत्याची ही मुलगी, कोटय़वधी लोकांचा पाठिंबा असलेली आणि अनेकांच्या मनात मुख्यमंत्री म्हणून तिचीच प्रतिमा असलेली पंकजाबाई आता विरोधकांना ढेकूण समजते; पण मग काम सोपे झाले. प्रेस कॉन्फरन्स घेऊन खुलासा करण्याची गरज नाही.
ढेकूण असतील तर साध्या पायातल्या चपलेने हे ढेकूण चिरडून टाकता येतील. उंदीर म्हटले तर सापळा लावता येईल. एकदा का विरोधक ढेकूण झाले, की मग त्यांचा विरोध हा चावण्यापुरताच आहे. हे चावत असताना पंकजा मुंडे यांच्या खात्याचे आणि पंकजा मुंडे यांच्या स्वच्छ कारभाराचे किती रक्त त्या ढेकणांनी काढले, तेही तपासून घ्या. विरोधक ढेकूण असतील तर लंडनहून आल्या आल्या पंकजाबाईंना तातडीने पत्रकार परिषद का घ्यावी लागली?
इकडे पंकजा मुंडे विरोधकांना ढेकूण समजतात आणि तिकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातल्या तमाम पत्रकारांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकायचे म्हणतात. अमेरिकेचा दौरा करून मुख्यमंत्री भारतात परतल्याला आता आठ दिवस होऊन गेले. आधी असे ठरले होते की, आल्या आल्या दावा ठोकायचा. त्या प्रमाणे विसरभोळे प्रवीण परदेशी यांना मुख्यमंत्र्यांनी कोणाकोणावर दावा ठोकायचा याची यादी करायला सांगितली होती, ती यादी अजून झाली नसावी किंवा हा दावा जर शंभर कोटींचा ठोकायचा तर दहा टक्के स्टॅम्प फीसाठी ते दहा कोटी लागतील, ते कुणी भरायचे? मुख्यमंत्र्यांनी भरायचे, प्रवीण परदेशीने भरायचे की ज्या ‘एमआयडीसी’च्या खर्चाने मुख्यमंत्र्यांनी हा दौरा केला, त्या ‘एमआयडीसी’ने भरायचे? हा खर्च ‘एमआयडीसी’ला भरायला सांगण्यात आल्याची माहिती आहे; पण ‘एमआयडीसी’चे मंत्री आहेत शिवसेनेचे. सध्या सेना आणि भाजपाचे फाटलेले आहे. त्यामुळे तूर्तास दावा ठोकण्याचा निर्णय तहकूब केलेला आहे, अशी ‘वर्षा’ची बातमी आहे.
अस्सल पत्रकारिता, अर्थात शब्दाचा मार. ..