शेळीपालन सर्वच करतात, पण त्यांना पौष्टिक खाद्य म्हणून पुरवण्यात येणा-या चा-याचे काय? अश्विन सावंत या तरुण शेतक-याने याचे उत्तर अत्याधुनिक ‘हायड्रोफोनिक फॉडर सिस्टीम’मध्ये शोधले आहे. दुष्काळाची कायम चिंता भेडसावणा-या भागात गुरांसाठी चा-याची (वैरण) समस्या हायड्रोफोनिक फॉडर तंत्र चुटकीसरशी सोडवू शकते. यातूनच जोड नव्हे, तर मुख्य व्यवसाय म्हणून शेळीपालन अर्थात गोट फार्मिगचा व्यवसाय सावंत यांनी उभा केला आहे.
मुंबई- शेतीला जोडव्यवसाय म्हणून गोट फार्मिग अर्थात शेळीपालनाचा पर्याय आहे. मात्र गोटफार्मिगकडे जोडव्यवसाय नाहीतर मुख्य व्यवसाय म्हणूनच पाहिले पाहिजे, असे आवाहन पुणे जिल्ह्यातील जुन्नरमधील हापूस बाग येथील अश्विन रमेश सावंत या तरुण शेतक-याने केले आहे.
अफ्रिकन बोअर, बोअर क्रॉस, सीरोही, जमुनापारी, तोतापरी, सोजात, बारबेरी या देशीविदेशी जातीच्या बंदिस्त शेळीपालनातून त्याने महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील तमाम शेतक-यांपुढे रोजगारासाठी सक्षम पर्याय उभा केला आहे. शेळीपालन सर्वच करतात, पण त्यांना पौष्टिक खाद्य म्हणून पुरवण्यात येणा-या चा-याचे काय? हा प्रश्न या व्यवसायात पडलेल्या प्रत्येकाला भेडसावतो. याचे उत्तर अत्याधुनिक ‘हायड्रोफोनिक फॉडर सिस्टीम’ने (पाण्यावर तयार होणारा चारा) दिला आहे. हा चारा तयार करण्यासाठी लागणारे तंत्र अवगत करून ‘हायड्रोफोनिक’चा मळा फुलवण्यात अश्विनने यश मिळवले आहे.
दुष्काळाची कायम चिंता भेडसावणा-या महाष्ट्रात गुरांसाठी चारा (वैरण) हा कायमच भेडसावणारा प्रश्न. हा प्रश्न हायड्रोफोनिक फॉडर तंत्र चुटकीसरशी सोडवू शकते, हे अश्विन सावंत या तरुणाने प्रत्यक्षात करून दाखवले आहे. आगामी काळात याच ‘हायड्रोफोनिक सिस्टीम’वर काकडी, टोमॅटो, कांदा इतकेच काय सर्वच भाजीपाला पिकवणारी ‘कृषिक्रांती’ निर्माण करण्याचा संकल्प त्याने सोडला आहे.
अस्सल मुंबईकर अश्विन सावंत हा सँडहर्स्ट रोड, डोंगरी, बीआयटी चाळीतील सर्वसामान्य कुटुंबातील एक सदस्य आहे. वडील गोदी कामगार, आई गृहिणी, पत्नी, मुलगी असे त्याचे कुटुंब. बीई (मॅकेनिकल)पर्यंत शिक्षण झाल्यानंतर नोकरीसाठी त्याने दुबई गाठली. तेथे दीड लाख रुपये पगारावर जवळपास दोन वर्षे तो नोकरी करत होता. मात्र या नोकरीत त्याचे मन रमत नव्हते.
दोन वर्षानंतर नोकरीचे कंत्राटही वाढवणार होते. पण या कंत्राटावर स्वाक्षरी न करता सरळ मायदेशी परतण्याचा निर्णय अश्विनने घेतला. दुबईतील एका प्लांटवर हायड्रोफोनिक फॉडर सिस्टीम (पाण्यावर तरंगणारा चारा) हे तंत्र त्याने पाहिले होते. कोणत्याही प्रशिक्षणाविना त्याने हे तंत्र महाराष्ट्रात राबवण्याचा निश्चय केला.
आपल्याकडील हवामानात हा चारा पिकवण्यासाठी त्याच्यापुढे मोठे आव्हान होते. मात्र इच्छाशक्तीच्या बळावर त्याने हे यश मिळवल्याचे तो सांगतो. हे सर्व शक्य होण्यामागे कुटुंबाची साथही महत्त्वाची ठरल्याचे अश्विन सांगतो. काहीतरी वेगळे करण्याची उमेदच नवे आपल्यातील खरी ऊर्जा असल्याचे अश्विन तरुण शेतक-यांना सांगत आहे.
बंदिस्त शेळीपालनाकडे वळणा-यांसाठी!
‘पायाने चालणारी माणसं अंतर कापतात. डोक्याने चालणारी माणसं धेय्य गाठतात’. ही उक्ती सार्थ ठरवत परदेशातील आधुनिक तंत्र आणि मंत्रातून आपल्या देशात कृषिक्रांती घडवण्यासाठी अश्विन सावंत हा तरुण शेतकरी सज्ज झाला आहे. त्याने केलेली ही क्रांती प्रत्यक्षात पाहण्यासाठी व बंदिस्त शेळीपालनातील नफ्या-तोटयाचे गणित समजावून घेण्यासाठी अश्विनने उभारलेल्या पुणे जिल्हा, मु. हापूस बाग, जुन्नर गोट फार्मला एकदा तरी भेट द्यायला हवी.
संपर्क : अश्विन सावंत : ९७७३५६७९०४, ९८५०९८०३१७.
काय आहे हायड्रोफोनिक चारा?
गहू, बार्ली, जव, मका, बाजरीपासून तयार झालेला प्रोटिनयुक्त चारा शेळीच्या वाढीसाठी पौष्टिक खाद्य आहे. अगदी मुळापासून वाढ झालेला हा चारा जनावरांसाठी पोषक ठरून वजन वाढण्यासही मोठी मदत होते.
हायड्रोफोनिक चा-यासाठी यंत्रणा कशी उभारायची, त्यासाठी आवश्यक तापमान कसे राखायचे आदी अनेक गोष्टी अश्विन सावंत यांच्या ‘जुन्नर गोट फार्मिग’मध्ये प्रात्यक्षिकांसह पाहायला मिळतात. पारंपरिक पद्धतीने प्रत्येक ऋतुचक्रात वर्षाचे ३६५ दिवस हिरवा आणि पौष्टिक चारा निर्माण करता येऊ शकतो, ही किमया अश्विन सावंत या तरुण शेतक-याने साधली आहे.
शेळीपालनापेक्षा चारा हाच सर्वाधिक भेडसावणारा प्रश्न आहे. त्याला ‘हायड्रोफोनिक’ चारा हेच येत्या काळातील प्रभावी उत्तर अश्विन सावंत या तरुण शेतक-याच्या रूपाने मिळाले आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.
मागणी आहे, पण पुरवठा नाही!
धष्टपुष्ट शेळीला महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या कानाकोप-यातून प्रचंड मागणी आहे. मात्र ‘मागणी अधिक आणि पुरवठा कमी’ अशी परिस्थिती आहे. ईद हेच शेळीपालन करणा-यांसाठी मुख्य मार्केट आहे. ईदीच्या काळात राजस्थानमधून ट्रकच्या ट्रक मुंबईत दाखल होत असतात.
अगदी ५० ते ६० हजार आणि त्याहीपुढे लाखांपर्यंत शेळी व बोकडांसाठी बोली लागते. महाराष्ट्र, गुजरात, हैदराबाद, कर्नाटक आदी राज्यांत शेळी खरेदीसाठी मोठी बाजारपेठ आहे. ही बाजारपेठ काबीज करण्यासाठी दोन वर्षे विनानफा आणि मेहनत हाच पर्याय असल्याचे अश्विन सावंत सांगतो.
आर्थिक गणिताची जुळवाजुळव ही अनेकांसाठी अडचण असली तरी सुरुवातीला कमीत कमी २५ ते ३० आणि उत्तम नफा मिळवण्यासाठी १००च्या जवळपास शेळीपालन करण्याची गरज आहे, हे अनुभवातून अश्विन सांगतो.
शेतीकडे वळणा-या तरुणांनी शेळीपालन हा जोड नव्हे, तर मुख्य व्यवसाय म्हणूनच त्याकडे गांभीर्याने बघावे, हे महाराष्ट्रातील तमाम शेतक-यांना अश्विन सावंत हा तरुण शेतकरी मोठया तळमळीने सांगत आहे.
मी एक मध्यम वर्गीय घरातून आहे शिक्षण १२ वि आहे मला नोकरी मध्ये इंत्रेस्त नाहीये मला व्यवसाय करायचा आहे म्हण्य्न मी बंदिस्त शेळीपालन निवडला आहे मला यातली जास्त माहिती नाही ..
मला पण शेली पालन करायचे आहे तर प्ल्झ मला संपूर्ण माहिती द्यावी ..