भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वकष्टाने एक एक पैसा गोळा करीत समाज कल्याणासाठी उभारलेली दादर येथील ऐतिहासिक आंबेडकर भवनाची वास्तू भाडोत्री गुंडांच्या मदतीने रात्रीच्या अंधारात जमीनदोस्त करण्यात आली आहे. त्यामुळे दुखावलेल्या आंबेडकरी जनतेकडून राज्यभर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मुळात गेल्या काही वर्षापासून फुले-आंबेडकरी आणि त्याचबरोबर परिवर्तनवादी चळवळीचे केंद्रबिंदू झालेली ही वास्तू जमीनदोस्त करण्यामागे हित कोणाचे आहे, हा खरा प्रश्न आहे. शिवाय सत्तेत आल्यापासून आंबेडकरी जनतेचा कळवला दाखवणारे आमचे भाजपाप्रणीत फडणवीस सरकार मात्र एवढय़ा मोठय़ा घटनेनंतरही तोंडावर बोट ठेवून गप्प का? अशा काही प्रश्नांच्या मुळाशी आंबडेकर भवन जमीनदोस्त करणारी कीड पोसली जात आहे.
राज्यातील आंबेडकरी जनतेसाठी दादर परिसर नेहमीच आकर्षणाचा विषय ठरलाय. समुद्राला तग धरून असलेली बाबासाहेबांची चैतन्यदाई चैत्यभूमी, पूर्वेला असलेले हिंदू कॉलनीमधील राजगृह आणि त्यानंतर बाबासाहेबांनी उभारलेली बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस असलेले आंबडेकर भवन या वास्तू तमाम आंबेडकरी जनतेची प्रेरणास्थळे आहेत. साधारण मुंबईतील ९२ची हिंदू-मुस्लीम दंगल आणि पुढे गोध्रा हत्याकांडानंतर आंबडेकर भवनात आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या बैठकीचे प्रमाण वाढले होते. अशातच आंबडेकर जनतेचे प्रश्न हाती घेत थेट ब्राह्मणशाही विरोधात लढा उभारणारे दैनिक सम्राट वृत्तपत्र सुरू झाले. या दैनिक सम्राटचे कार्यालय येथेच आंबडेकर भवन परिसरात होते. त्यामुळे राज्यभरात हे दैनिक वाढत असताना आंबडेकर भवन आंबडेकरी जनतेमध्ये हक्काचे चळवळीचे केंद्र बनले होते. सोबतच्या आंबडेकर भवनात बाबासाहेब आंबेडकरांची बुद्धभूषण प्रिटिंग प्रेस, भारतीय बौद्ध महासभा, भारिप, रिपब्लिकन सेना आणि बाबासाहेबांची दुर्मीळ पुस्तके विक्री केंद्र आहेत. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब आंबडेकर आणि रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबडेकर यांनी नेहमी या वास्तूत आंबेडकरी चळवळ धगधगत ठेवली. अनेक गाजलेल्या परिषदा, साहित्यिक कार्यक्रम, मेळावे यांची ही वास्तू साक्षीदार आहे. त्यामुळे साहजिकच मुंबई-ठाण्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचे हे केंद्रबिंदू झाले होते.
शेडय़ुल कास्ट इम्प्रुमेंट ट्रस्टच्या माध्यमातून इमारत फंड गोळा करून बाबासाहेबांनी १९३० साली ही जमीन विकत घेतली. पुढे बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर या ट्रस्टचे नामांतर ‘दी पीपल इम्प्रुमेंट ट्रस्ट’ असे करण्यात आले आहे. आता या इम्प्रुमेंट ट्रस्टच्या या जागेवर १७ मजली इमारत बांधायची आहे. त्याबाबत दोन गटात वाद सुरू आहेत. मात्र वाद एकत्र बसून सुटण्याजोगा होता, असे असताना या वादात तेल ओतले कोणी आणि ऐतिहासिक आंबडेकर भवनाची वास्तू एका रात्रीत जमीनदोस्त करण्यास दी पीपल इम्प्रुमेंट ट्रस्टच्या काही विश्वस्तांना बळ दिले कोणी? हा खरा कळीचा मुदा आहे.
आता आंबेडकर भवन जमीनदोस्त करण्यामागे राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांचे नाव चर्चेत आहे. गायकवाड यांनी इम्प्रुमेंट ट्रस्टच्या विश्वस्तांशी संगनमत करीत समाजाशी गद्दारी केली, असा जाहीर आरोप होऊ लागला आहे. रत्नाकर गायकवाड हे काही इम्प्रुमेंट ट्रस्टचे विश्वस्त नाहीत. पण १४ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात रत्नाकर गायकवाड यांचा पुढाकार लक्ष वेधणारा होता. त्याचे मूळ या प्रकरणाशी असल्याची जोरदार चर्चा आहे.
इम्प्रुमेंट ट्रस्टला या जागेत १७ मजल्याची भव्य मोठी इमारत बांधायची आहे. त्यासाठी फडणवीस सरकार ३० कोटी रुपये देण्यास इच्छुक आहे. मात्र सरकारच्या काही अटी आहेत. या अटींच्या माध्यमातून रत्नाकर गायकवाड यांना देखील इम्प्रुमेंट ट्रस्टवर जाण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. शिवाय गायकवाड यांना हाती ठेवून आपला डाव साधण्याचा कोणाचा तरी डाव दिसतोय.
आंबेडकर भवन अत्यंत दृष्ट हेतूने पाडल्याची बातमी वा-यासारखी राज्यभर पसरली आहे. त्याचे तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. समाजात या घटनेमुळे वाद निर्माण होऊ नयेत, याची काळजी आंबेडकर भवन पाडण्यापूर्वी किंवा पाडत असताना गृहखात्याची जबाबदारी असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी का घेतली नाही? प्रकरण भावनिक होईपर्यंत सरकारने कोणताही हस्तक्षेप केलेला नाही. माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड हे कोणाच्या सांगण्यावरून नाचत आहेत. अशा प्रश्नाच्या मुळाशीच आंबेडकर भवन पाडणा-यांना पोसणारी शक्ती दडलेली आहे. मुंबईत आंबेडकरी चळवळीची केंद्र बळकट झाल्यास ज्यांना त्रास होईल, अशा शक्ती कोणत्या हे ओळखण्यातच आंबेडकरी कार्यकर्त्यांचे शहाणपण आहे.
जुनी होती तोडली त्यात काय कोणाचे ………