समुद्रकिनारे, चौपाटया, खाडी परिसर, तलाव आदी परिसर सेल्फी काढण्यास बंदी घालून ‘नो सेल्फी झोन’ जाहीर करण्यात यावा,अशी मागणी पुढे आली आहे.
मुंबई- वांद्रे बॅण्डस्टॅण्ड येथे सेल्फी काढण्याच्या नादात तरुणी बुडली आणि तिला वाचवणा-याचाही बुडून मृत्यू झाला. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व समुद्रकिनारे, चौपाटया, खाडी परिसर, तलाव आदी परिसर सेल्फी काढण्यास बंदी घालून ‘नो सेल्फी झोन’ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी पुढे आली आहे. या नो सेल्फी झोनचे फलकच याठिकाणी लावण्यात यावेत. तसेच तिथे सुरक्षा रक्षक तैनात करून सीसीटीव्ही कॅमरे बसवण्यात यावेत, अशी मागणीच नगरसेवकांकडून होत आहे.
सर्व महाविद्यालयीन तरुण-तरुणींसह आबालवृद्धांमध्ये सेल्फी छायाचित्र काढण्याचा कल वाढत चालला आहे. सर्वसामान्यांमध्ये मोठया प्रमाणात सेल्फी छायाचित्र काढण्याची एक प्रकारे आवड निर्माण झालेली आहे. परंतु मोबाईल कॅमेराद्वारे काढण्यात येणारे सेल्फी छायाचित्रच आता जीवावर बेतू लागली आहेत.
अशा प्रकारे सेल्फी छायाचित्र काढताना अनेकदा दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले असून मागील महिन्यातच वांद्रे येथील समुद्रकिनारी महाविद्यालयातील मुली सेल्फी छायाचित्र काढताना बुडाल्या. या बुडालेल्या मुलींपैकी दोन मुलींना वाचवण्यात स्थानिक तरुणाला यश आले. पण एका मुलीला वाचवता वाचवता त्या तरुणाचाही बुडून मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नो सेल्फी झोन बनवण्याची मागणी पुढे येत आहे.
काही पाश्चिमात्य देशांमध्ये तेथील जनतेच्या सुरक्षेच्या कारणास्तव अनेक ठिकाणी सेल्फी छायाचित्र काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच या बंदीनंतरही अशा प्रकारे छायाचित्र काढल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या तसेच जीवितहानी टाळण्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारे उपाययोजना करणे ही काळाची गरज असल्याचे मत शिवसेना नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी व्यक्त केले.
याकरता मुंबईतील समुद्र, चौपाटया, खाडया आदी ठिकाणं धोकादायक घोषित करण्यात यावीत आणि सेल्फी छायाचित्र काढण्यास बंदी घातली जावी,अशी मागणी त्यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे. तसेच उल्लंघन करणा-यांवर दंडात्मक कारवाई करावी. या नो सेल्फी झोनबाबत जनजागृती करण्यासाठी दर्शनी भागांमध्ये फलक लावण्यात यावेत. तसेच त्याठिकाणी सुरक्षका रक्षक आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्या भागांमध्ये विशेष लक्ष पुरवण्यात यावे, अशीही मागणी घोसाळकर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.
अभिषेक घोसाळकर यांच्याबरोबरच काँग्रेसचे रामआशीष गुप्ता यांनी चौपाटया व समुद्रकिना-यांवर नो सेल्फी झोन घोषित करावे, अशी मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या मागणीनुसार मुंबईतील समुद्रकिनारे, चौपाटया,तलावं, खाडया परिसर आदी ठिकाणी नो सेल्फी झोन तयार करून लवकरच घोषणा केली जाण्याची शक्यता महापालिकेच्या अधिका-यांकडून व्यक्त केली जात आहे.
खा प्या मरून जा हि आहे आजची आपली भारतीय संसकृती.आपले मुर्ख राजकारणी यांची निर्मिती.