उरी लष्करी तळावर पाक अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या १८ जवानांमध्ये ४ जवान महाराष्ट्रातील आहेत.
उरी- उरी लष्करी तळावर पाक अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या १८ जवानांमध्ये ४ जवान महाराष्ट्रातील आहेत. सातारा, नाशिक, अमरावती आणि यवतमाळ या चार जिल्ह्यांतील जवानांनी देशासाठी आपले बलिदान दिले.
लष्करी इतमामाने होणार अंत्यसंस्कार
विकास जनार्दन कुळमेथे हा जवान यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील पूरड या गावचा असून, दोन महिन्यांपूर्वीच विकास आपल्या गावी येऊन गेला होता. त्याचे लग्न दोन वर्षापूर्वी झाले होते. त्याला आठ महिन्यांपूर्वी मुलगी झाली असून, २००८ साली तो लष्करात भरती झाला.
घरची परिस्थिती अत्यंत सामान्य आहे. तो एकुलता एक मुलगा होता. त्याचे पार्थिव गुरुवारी येथे आणण्यात येत आहे. विकास शहीद झाल्याची बातमी आल्यानंतर सपूंर्ण वणी तालुका सुन्न झाला.
शहीद विकास कुळमेथे
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील खडांगणी या एका खेडेगावातील मूळचा रहिवासी असलेला अरविंद ढोक हा चार वर्षापूर्वी सैन्यात दाखल झालेला जवान असून, त्याचे आई-वडील खडांगणी गावात शेती करून आपली गुजराण करतात.
अरविंद शहीद झाल्याचे आज त्यांना कळवण्यात आल्यानंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली. रात्री उशिरा त्याचे पार्थिव आल्यानंतर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
शहीद अरविंद ढोक
माण तालुक्यातील जाशी गावचे सुपुत्र आणि लष्करातील लान्स नायक चंद्रकांत शंकर गलांडे काश्मीर खो-यात शहीद झाल्याची बातमी येताच संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली.
शहीद चंद्रकांत यांचे इतर दोन भाऊ मंज्या बापू आणि केशव हेही लष्करातच सेवेला आहेत. गावालगतच्या शेतात त्यांची स्वतंत्र वस्ती असून तिथे पत्नी आणि दोन मुलांसह कुटुंब राहते. चार दिवसांपूर्वी चंद्रकांतने आईला केलेला फोन शेवटचाच ठरला. त्यांचे पार्थिव पुण्याहून गावी आणले जाणार आहे.
शहीद चंद्रकांत गलांडे
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील पंजाब (ऊर्फ विकास) उईके हा जवान शहीद झाला आहे. त्याचे वय २७ वर्षे?आहे. २००९ साली आसाम रेजिमेंटमध्ये त्याची नियुक्ती झाली होती.
शहीद विकास उईके याचे वडील जानराव उईके हेही लष्करात होते. सीमा सुरक्षा दलात चौकीदार असलेल्या जानराव उईके सहा महिन्यांपूर्वीच निवृत्त झाले. त्यांनी ३३ वर्षे देशाची सेवा केली होती. विकास हे अविवाहित होते. त्यांच्या पश्चात आई-वडील आणि भावंडे आहेत.
शहीद विकास उईके
शहीद अरविंद ढोक नाही तर शहीद संदीप ढोक हे आहेत कृपा करून हे लक्षात घ्या, आणि आता तरी सरकारने योग्य निर्णय घ्यावा चर्चा नको कारवाई करा. वीर जवान तुझे सलाम.