साधारणपणे मिठामुळे जमीन क्षारपड होण्याची भीती व्यक्त केली जाते. मात्र, दुष्काळी स्थितीचा सामना करणा-या अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर आणि नगर तालुक्यांतील शेतक-यांनी शेतजमिनीत खडी मिठाचा प्रयोग यशस्वी करून उत्पादनात भरघोस वाढ केली आहे. नगर तालुक्यातील निंबळक येथील शेतक-याने आपल्या जिरायती शेतजमिनीत मिठाचा वापर करून दुष्काळी स्थितीतही ज्वारीचे एकरी १२ क्विंटल उत्पादन काढले. शेतजमिनीत योग्य प्रमाणात मिठाचा वापर केल्यास जमीन भुसभुशीत होऊन किडींच्या प्रादुर्भावापासून पिकाचा बचाव होत असून, कीटकनाशकांचा वापर टळतो. यामुळे एक प्रकारे सेंद्रिय पद्धतीनेच ही शेती होत असल्याचा दावा प्रयोगशील शेतक-यांनी केला आहे.
कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष सबाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निंबळक येथील शेतकरी बाळासाहेब खपके व भाऊसाहेब गायकवाड यांनी शेतात मीठ वापरण्याचा प्रयोग केला. गेली दोन वर्षे राज्यात कमी पावसाने भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. वारंवार दुष्काळी स्थिती उद्भवत असल्याने शेतीव्यवसायच संकटात आला आहे. मात्र, या स्थितीवर मात करण्यासाठी गायकवाड यांनी शेतीत सातत्याने संशोधन केले. पावसाचे प्रमाण कमी असले तरी शेतक-यांना चांगले उत्पन्न कसे मिळवता येईल, यादृष्टीने शेतात मिठाचा वापर करण्याचे नवीन तंत्रज्ञान अशाच प्रयोगातून विकसित केल्याचा दावा गायकवाड यांनी केला आहे. या तंत्रज्ञानाचा वापर खपके, गायकवाड तसेच पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळचे सुभाष सुंबे, राघू थोरात (पिंप्री गवळी, ता. पारनेर), गाडेकर (पिंपळनेर, तालुका पारनेर) व पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील अशोक भागवत आदी शेतक-यांनी आपल्या शेतात केला. खपके यांच्या जिरायत शेतात पूर्वी अपार मेहनत करूनही वर्षाला एकरी दोन ते तीन क्विंटलपेक्षा अधिक ज्वारीचे उत्पन्न कधीच मिळाले नव्हते. मात्र, खपके यांनी सबाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार ज्वारीची पेरणी करताना मिठाचा वापर केल्याचे सांगितले. ५० एकर जमिनीवर खपके यांनी ज्वारीची लागवड केली.
राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले रेवती हे ज्वारीचे वाण खपके यांनी पेरणीसाठी वापरले. खपके यांच्या शेतातील हा अभिनव प्रयोग यशस्वी झाला आणि चक्क १० ते ११ फूट उंचीची ज्वारी त्यांच्या शेतात उभी राहिली आहे. तसेच कमी पाऊस होऊनही एकरी १२ क्विंटल ज्वारीचे उत्पन्न मिळण्याचा ठाम विश्वास त्यांना वाटत आहे.
गायकवाड यांनी नगर तालुक्यातील वाळुंज गावातील आपल्या फार्म हाउसमध्ये सातत्याने मिठाच्या वापराचा प्रयोग यशस्वीपणे राबवला आहे. २२ फूट उंचीचा ऊस, फुटबॉलच्या आकाराचा कोबी, सहा ते आठ फूट उंचीची तुरीची झाडे, असे आश्चर्यकारक प्रयोग त्यांच्याकडे पाहावयास मिळतात. गायकवाड आपल्या प्रयोगातून विकसित केलेले हे अभिनव शेती तंत्रज्ञानासंदर्भात राज्याच्या विविध भागांतील शेतक-यांना सातत्याने मार्गदर्शन करतात. गेली दोन वर्षे ज्या शेतक-यांनी आपल्या शेतात खत म्हणून मिठाचा वापर केला. त्यांच्या शेतात व आजूबाजूला चांगला पाऊस झाल्याचे आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. ज्या शेतक-यांकडे पावसाचे पाणी साठवण्यासाठी नाला बायंडिंग, पाझर तलाव उपलब्ध होते, अशा शेतक-यांच्या शेतात आजही मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. कायम दुष्काळी समजल्या जाणा-या पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ येथील सुभाष सुंबे, राघू थोरात, गाडेकर व पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील अशोक भागवत या शेतक-यांच्या शेतात हे पाहायला मिळते.
शेतीत मिठाचा वापर केल्याने जमीन क्षारपड होण्याची भीती अनेक शेतकरी व्यक्त करतात. मात्र, यात तथ्य नसल्याचे सबाजी गायकवाड यांनी सांगितले. उलट शेतीत मिठाचा योग्य प्रमाणात वापर केल्याने शेतजमीन भुसभुशीत होते. तसेच किडींचाही नायनाट होत असल्याने शेतीत रासायनिक कीटकनाशकांशी फारशी आश्यकता भासत नसल्याचे त्यांनी सांगितले.
गायीच्या दुधातही वाढ
शेतजमिनीत मिठाचा वापर करण्याबरोबरच जनावरांच्या खाद्यात मिठाचा वापर केला तर गायीच्या दुधात वाढ होणे, जनावरांचे व कोंबडीचे वजन २५ टक्क्यांनी वाढवणे शक्य असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. गायकवाड यांनी दैठणे गुंजाळ येथील शेतकरी सुभाष सुंबे यांनी आपल्या एका जर्सी गायीला दररोज खाद्य देताना त्यामध्ये मिठाचा वापर केल्याने पाच लिटर दूध देणारी जर्सी गाय चक्क १५ लिटर दूध देऊ लागली असल्याचे सांगितले. तसेच मिठाच्या वापराने दुधातील फॅटचे प्रमाण वाढले. या गायीपासून एका वर्षात सुंबे यांना २२ हजार ९९० रुपयांचे अधिक उत्पन्न मिळाले.
शेतीविषयक केलेल्या प्रयोगांची माहिती राज्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सबाजी गायकवाड प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला एक दिवसांचे प्रशिक्षण देतात. शेतीतील प्रयोग व प्रशिक्षणाबाबत अधिक माहितीसाठी आपल्याशी ९४२३१६१२३४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सबाजी गायकवाड यांनी केले आहे.
कसा होतो मिठाचा फायदा?
मिठाचा वापर शेतीत केल्याने मिठाचे कण सूर्यप्रकाशाबरोबर हवेत उंच जाऊन (सुमारे दोन किलोमीटर) हवेच्या पोकळीत स्थिरावतात. त्यामुळे पावसाचे ढग संबंधित शेतावरून जाताना हवेच्या पोकळीत असलेल्या मिठाच्या कणांबरोबर या ढगातील पाण्याचा संपर्क आल्याने त्या परिसरात पडणा-या पावसाचा थेंब सात ते आठ पट मोठा असतो. त्यामुळेच मिठाचा वापर करणाऱ्या शेतक-यांच्या शेतांत इतरांपेक्षा अधिक पाऊस पडल्याचा दावा गायकवाड यांनी केला. हीच गोष्ट कोकणातही घडते. समुद्राच्या पाण्यातील क्षार हवेद्वारे जमिनीवर पडतात. सूर्याच्या उष्णतेने हे क्षार कण हवेच्या पोकळीत स्थिर होतात. त्यामुळेच कोकणात नेहमीच मोठा पाऊस पडतो, असा दाखलाही त्यांनी दिला. जमिनीतील क्षारांमुळे नैसर्गिकरीत्या हवेतील आद्र्रता शोषून घेतली जाते व झाडांना पाणी उपलब्ध होते. हीच गोष्ट संपूर्ण राज्यभर घडली तर संपूर्ण राज्यातही पावसाचे प्रमाण वाढेल, असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला. तसेच मिठामुळे जमिनीतील जीवजंतू मरत असल्याने कीडरोगाची धास्तीही कमी होते, असे त्यांनी सांगितले.
मिठाचे प्रमाण योग्य राखल्यास जमीन क्षारपड होण्याचा धोका राहत नाही. उलट जमिनीतील अनावश्यक गवत नष्ट होऊन जमीन सुपीक होण्यास मदत होते. तसेच कीटकनाशकांच्या खर्चापासूनही मुक्तता मिळून सेंद्रिय पिकांमुळे जमिनीचा कस टिकून राहतो.– सबाजी गायकवाड, अध्यक्ष, कृषी विकास प्रतिष्ठान
आपन आळीसाठी जर मिठाची फवारणी के ली तर चालेल का