खेळाडूंच्या मानधनात कपात केल्याच्या मुद्दयावरुन वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू आणि वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळ यांच्यात सुरु असलेल्या वादामुळे विंडीज संघाने भारत दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली – मानधनाच्या कपातीवरून क्रिकेटपटूंनी आक्रमक पवित्रा घेतल्याने भारताचा उर्वरित दौरा रद्द करण्यात आल्याचे वेस्ट इंडिज बोर्डाने (डब्ल्यूआयसीबी) बीसीसीआयला कळवले आहे. दौरा रद्द करण्याचा निर्णय धक्कादायक आणि निराशाजनक असल्याचे सांगतानाच बीसीसीआयने वेस्ट इंडिज बोर्डावर कारवाईसह भरपाईची मागणी केली आहे.
चौथी वनडे झाली तरी उर्वरित लढतींमध्ये खेळण्यास क्रिकेटपटूंनी नकार दिल्याने प्रतिस्पर्धी बोर्डाला दौरा आटोपता घ्यावा लागला. दौरा रद्द झाल्याने पाचव्या आणि अंतिम वनडेसह एकमेव टी-२० आणि तीन लढतींची कसोटी मालिका होणार नाही.
वेस्ट इंडिज बोर्डाने दौरा रद्द केल्याने बीसीसीआयने तीव्र नाराजी व्यक्त करताना कडक पवित्रा घेतला आहे. दौरा अर्धवट सोडल्याबद्दल आयसीसीकडे वेस्ट इंडिज बोर्डावर कारवाईसह भरपाईची मागणी करणार असल्याचे बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी शुक्रवारी सांगितले.
‘‘क्रिकेटपटू आणि क्रिकेट असोसिएशनमधील मानधन कपातीबाबतचा प्रश्न अधिक चिघळला असून उर्वरित दौरा रद्द करत असल्याचे वेस्ट इंडिज बोर्डाने शुक्रवारी आम्हाला कळवले. वेस्ट इंडिज बोर्ड आणि प्लेअर्स असोसिएशन यांच्यातील हा अंतर्गत वाद आहे. मात्र आमच्यासाठी हे सर्व अनपेक्षित आणि धक्कादायक आहे. प्रतिस्पर्धी बोर्डाला आम्ही नेहमीच सहकार्याचा हात दिला आहे.
मात्र त्यांच्या निर्णयाने दोन देशांमधील संबंध बिघडण्याची शक्यता आहे. वास्तविक पाहता क्रिकेटपटूंच्या बहिष्काराच्या धमक्यानंतर बोर्डाने गंभीर दखल घ्यायला हवी होती. मात्र बोर्ड आणि प्लेअर्स असोसिएशनने क्रिकेटपटूंना गंभीरपणे घेतले नाही. दौरा रद्द करताना वेस्ट इंडिज बोर्डाने द्विपक्षीय कराराचा भंग केला आहे. दौरा रद्द झाल्याने आमचे खूप नुकसानही झाले आहे. त्यामुळे वेस्ट इंडिज बोर्डावर कारवाईची मागणी आम्ही आयसीसीकडे करणार आहोत,’’ असे पटेल म्हणाले.
विंडिज क्रिकेटपटूंचा आयपीएल सहभाग धोक्यात?
वेस्ट इंडिज बोर्डाने दौरा अचानक रद्द केल्याचा फटका त्यांच्या क्रिकेटपटूंना बसणार आहे. विंडिज क्रिकेटपटूंच्या आयपीएलमधील सहभागाबाबत बीसीसीआय आढावा घेणार असल्याचे समजते. धडाकेबाज ख्रिस गेलसह कीरॉन पोलार्ड, ड्वेन ब्राव्हो, ड्वायेन स्मिथ, सुनील नारायण अशा वेस्ट इंडिजच्या अनेक क्रिकेटपटूंसाठी आयपीएल फायद्याची ठरली होती.
बीसीसीआयच्या मदतीला शेजारी
बीसीसीआयच्या मदतीला श्रीलंका बोर्ड धावले आहे. भारतात पाच लढतींची वनडे मालिका खेळण्याचे भारताचे आमंत्रण श्रीलंका बोर्डाने स्वीकारले आहे. ‘‘पाच वनडे खेळण्याची बीसीसीआयची विनंती आम्हाला मान्य आहे. वास्तविक पाहता आम्हाला एक टी-२० लढतही खेळायची होती. मात्र वर्ल्डकप काही महिन्यांवर आल्याने वनडे खेळणे उभय संघांच्या अधिक फायद्याचे ठरेल,’’ असे श्रीलंका बोर्डाचे सचिव निशांत रणतुंगा यांनी शुक्रवारी सांगितले. श्रीलंका संघ १ ते १५ नोव्हेंबरदरम्यान भारतात वनडे मालिका खेळेल.
Whar Non Sense ….. such step not expected from west indies cricket board…. thanx to Srilanka