औरंगाबाद मध्य आणि भायखळा येथून ‘एमआयएम’ पक्षाचे दोन आमदार निवडून आले आणि जनमानसात याबाबत मोठी चर्चा सुरू झाली. वास्तविक आपल्या जातीच्या, धर्माच्या नेत्यास मतदान केल्यानंतर आपल्या पदरात काही पडेल, अशी मुस्लिम मतदारांची अपेक्षा आहे. आजवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मुसलमानांचा वापर केवळ व्होट बँक म्हणून केला आणि त्या बदल्यात मुसलमानांच्या पदरात काही पडले नाही, असा प्रचार ‘एमआयएम’ने केला आणि त्यात त्यांना यश आले. वास्तविक, दोन जातीयवादी एकमेकांना जगवत असतात. जसे हिंदुत्ववादी प्रवीण तोगडीया, सिंघल, उमा भारती यांना जगवत असतात, तसे मुसलमानांमध्येसुद्धा ओवेसी बंधू, अबु आझमी यांना जगवण्याचा प्रघात पडलेला आहे. एकीकडे मुसलमान एकवटले की, दुसरीकडे हिंदू एकवटतात. अशा पद्धतीने आता या पुढचे राजकारण जात्यांध, धर्माध राजकीय पक्ष चालवतील आणि धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक, लोकशाही यांचे राजकारण कोसळून पडेल, अशी एक मोठी भीती वाटते.
मझलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एमआयएम) हा हैदराबादचा राजकीय पक्ष आहे. त्याचा जन्म निजमशाहीत झाला. कासिम रिझवी या निजामाच्या पंतप्रधानाचे नेतृत्व याला लाभले होते. निजामशाही विरुद्ध जे आंदोलन सुरू झाले होते ते चिरडण्यासाठी त्याने या पक्षाचा भरपूर वापर केला. या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हिंदूंवर अत्यंत अत्याचार केले. त्यामुळे ‘एमआयएम’ हा पक्ष संपूर्ण मराठवाड्यामध्ये निजामशाहीच्या अनुषंगाने परिचित आहे. गेली अनेक वष्रे हैदराबादमध्ये हा पक्ष महापालिकेत सत्तेवर आहे. त्यांचा एक खासदारही संसदेत निवडून गेलेला आहे. या पक्षाचे काही आमदारदेखील आहेत. या व्यतिरिक्त हा पक्ष महाराष्ट्रात किंवा देशात वाढेल, असे वाटले नव्हते. पण तीन वर्षापूर्वी नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीत ११ जागा जिंकून या पक्षाने मराठवाड्यात प्रवेश केला आणि आता औरंगाबादमध्ये विधानसभेची एक जागा जिंकून तो थांबला आहे. त्याचे एक कारण म्हणजे, असाउद्दीन आणि अकबरउद्दीन ओवेसी हे दोन भाऊ अतिशय जोरदार आणि भडक प्रचार करण्यामध्ये वाकबगार आहेत. त्यातील अकबरउद्दीन ओवेसी हे अतिशय भडक, जहाल, बेताल असा प्रचार करण्याबद्दल नावाजलेले आहेत. त्यांच्या भाषणामध्ये काही ताळतंत्र नसते. आपण जणू प्रवीण तोगडिया आहोत, अशा प्रकारे ते प्रचाराचे राजकारण करत असतात. एवढी पार्श्वभूमी असलेला हा पक्ष मुसलमानांनी स्वीकारायचा अर्थ असा की, त्यांना इतिहास माहीत नाही. या पक्षाला जिंकून देऊन मुस्लिम मतदारांनी हैदराबाद मुक्ती संग्रामाचा अवमान केला आहे, असे मला वाटते. ज्या स्वातंत्र्यसनिकांनी हैदराबाद निजामापासून मुक्त केले, त्यांची मानहानीच एक प्रकारे केलेली आहे. पण इतिहास माहीत नसलेला तरुण वर्ग अकबरउद्दीन ओवेसी यांच्या प्रचाराच्या मोहाखाली आला आणि त्याने भरघोस मतदान केले.
अकबरउद्दीन ओवेसींचा प्रचार काय होता, हे जाणून घेणे इथे आवश्यक ठरते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मुसलमानांचा वापर केवळ व्होट बँक म्हणून केला आणि त्या बदल्यात मुसलमानांच्या पदरात काही पडले नाही, असे ‘एमआयएम’चे म्हणणे आहे; पण गंमत अशी आहे की, आपल्याकडे जे हिंदुत्ववादी पक्ष आहेत आणि त्यांना जे हिंदू मतदान करतात, पण त्यांच्याही पदरात हिंदू म्हणून काही पडत नसते. कोणतेच धार्मिक पक्ष त्या-त्या धार्मिक मतदाराला त्यांनी केलेल्या मतदानाबद्दल उपकार करत नसतात. पण हिंदूंना बरेच काही मिळते आपल्यालाही आता काही मिळवायचे आहे म्हणून यंदा बहुसंख्य मुसलमानांनी ‘एमआयएम’ या पक्षाला मतदान केले.
औरंगाबाद मध्य या मतदारसंघामध्ये शिवसेना आणि भाजप यांच्या मतदारांमध्ये मोठी विभागणी झाली आणि मुसलमानांनी एकगठ्ठा मतदान केले. त्यामुळे ‘एमआयएम’ जिंकला. अन्यथा या दोन्ही पक्षांच्या मतांची बेरीज ही ‘एमआयएम’पेक्षा कितीतरी जास्त आहे; परंतु याचा फायदा मुस्लिम मतदारांनी घेतला. मतदानाचे गणित वेगळे असले तरी काही सद्धांतिक, वैचारिक आणि राजकीय आराखडे मुस्लिम मतदारांना कळले नाहीत. आपण राष्ट्रीय पक्षांना त्यागून अत्यंत संकुचित आणि क्षुद्र विचारसरणीच्या पक्षाला स्वीकारत आहोत, हे भावनेच्या भरात त्यांना समजले नाही. काँग्रेसने आणि राष्ट्रवादीने त्यांचा वापर केला आणि त्यांना काही मिळाले नाही हे खरे असले तरी त्याचा अर्थ त्यांनी एक जात्यंध, धर्माध पक्ष स्वीकारण्याचा पर्याय निवडावा, असा नाही. त्यांच्यासाठी अन्य धर्मनिरपेक्ष पक्ष, अन्य धर्मनिरपेक्ष व्यक्तीही उपलब्ध होत्या.
दुसरी गोष्टी म्हणजे, दोन जातीयवादी एकमेकांना जगवतात. जसे हिंदुत्ववादी प्रविण तोगडीया, सिंघल, उमा भारती यांना जगवत असतो, तसा मुसलमानांमध्येसुद्धा ओवेसी बंधू, अबु आझमी यांना जगवण्याचा प्रघात पडलेला आहे. एकीकडे मुसलमान एकवटले की दुसरीकडे हिंदू एकवटतात. अशा पद्धतीने आता या पुढचे राजकारण जात्यांध, धर्माध राजकीय पक्ष चालवतील आणि धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक, लोकशाही यांचे राजकारण कोसळून पडेल अशी एक मोठी भीती वाटते. ती भायखळा आणि औरंगाबाद या दोन्ही मतदारसंघांमध्ये या पक्षाने निर्माण करून ठेवली आहे.
‘एमआयएम’चे राजकारण म्हणजे, स्वत: असाउद्दीन ओवेसी हे बॅरिस्टर आहेत. औरंगाबादचा आमदार हादेखील उच्च शिक्षित असून एकेकाळी तो टीव्हीवरील एका वृत्तवाहिनीचा पत्रकार होता. मुंबईतील आमदारदेखील वकील आहे; परंतु बहुसंख्य मुस्लिम मतदार तरुण हा अल्पशिक्षित किंवा अशिक्षित आहे. त्यांना अत्यंत भडक प्रचार करून पेटवले गेले आणि ‘एमआयएम’च्या मागे ताकद उभी केली. पुढच्या वर्षी औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुका आहेत, त्यावेळी किमान २५ मतदारसंघ तरी ‘एमआयएम’ आपल्या कब्जाखाली घेण्याची शक्यता आहे.
पण प्रश्न हाच उभा राहतो की, शिवसेना आणि भाजपची सत्ता औरंगाबादमध्ये गेल्या २५ वर्षापासून असतानासुद्धा विकास, प्रगती, औद्योगिकीकरण या पद्धतीने काहीही सुधारणा झाल्या नाहीत. म्हणजेच हिंदुत्ववादी पक्षांना मतदान केल्यावर हिंदुंनाही काही मिळत नसते. तसे याही ‘एमआयएम’च्या मतदारांना काही दिवसांनी कळून चुकेल की, आपण जात आणि धर्म पाहून मतदान केल्यावरही आपल्या पदरात काहीही पडले नाही. उलट त्यामुळे कटुता, कडवटपणा आणि जातीयता यांच्यामध्ये दोन्ही बाजूने वाढ होते. म्हणून हे घटक घटनांतर्गत लोकशाहीच्या व्यवस्थेमध्ये असले तरीसुद्धा लोकशाहीच्या प्रचाराला, धर्मनिरपेक्ष आधाराला धोका पोहोचवण्याचीही कामगिरी या मतदानामुळे झालेली आहे. मुस्लिम मतदारांनी वेळीच सावध होऊन पुन्हा एकदा भावनेच्या भरात न जाता, धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी या पक्षांनाच मतदान केले तर त्यांना काही तरी या राजकीय चौकटीमधील अधिकार मिळवण्यासाठी नतिक अधिकार, ताकद मिळू शकते.
अर्थात ‘एमआयएम’ हा पक्ष आणि हा मतदार एकदम टोकाची भूमिका घेऊ शकणार नाहीत. १९४८ साली भारतीय लष्कराने निजामाला हटवले त्या काळात २५-३० हजार मुसलमानांची कत्तल हिंदूंनी केली, असा एक आरोप अकबरउद्दीन ओवेसी यांनी केलेला आहे. त्यासाठी त्यांनी एका अहवालाचाही आधार दिलेला आहे. पण तो अहवाल सोडला तर लोकमानसामध्ये आणि अन्य इतिहासामध्ये या कत्तलीबद्दल काहीही आढळत नाही. याचा अर्थ थोडासा अपप्रचार, इतिहासाचा विपर्यास आणि मुसलमानांच्या दारिद्रय़ाविषयी भडक विवेचन या आधारावर ‘एमआयएम’ने विजय मिळवलेला दिसतो. पण अशा पक्षांच्या मागे जाण्यात काही अर्थ नसतो. शिवसेनेच्या काळातही काही सुधारणा होत नाहीत, हे जसे हिंदूंना समजले आहे तसेच ‘एमआयएम’च्या अखत्यारीतही काही सुधारणा होणार नाही, हे त्यांच्या मतदारांना समजेल.
राजकीय लोकशाहीत धर्माचे काही काम नसते. या लोकशाहीत सेक्युलर आणि प्रजासत्ताक विचारांवरच आपली विकासाची पायरी गाठायची असते, हे देखील त्यांना कळून चुकेल. या पक्षाच्या मागे उभे राहून काही दहशतवादी संघटना फायदा उठवतील, अशी भीती काही जणांच्या मनात असते; पण ती बाळगण्याचे कारण नाही. कारण या पक्षाचे वैशिष्टय़ म्हणजे, राज्यघटनेच्या चौकटीत उभे राहून हे काम करतात. राज्यघटनेच्या विरोधात किंवा तत्त्वांच्या विरोधात ते काम करत नाहीत. ‘एमआयएम’ मुसलमानांचे राजकारण करू इच्छितो आहे. तो तितकासा धर्माचा आधार घेऊन किंवा राष्ट्रविरोधी काही करून आपले राजकारण करण्याची अजिबात शक्यता नाही. ते त्यांना परवडणारेही नाही. त्यामुळे या पक्षाकडून थेट राष्ट्रविरोधी काही कारवाया होण्याची काही शक्यता नाही. फक्त कडवटपणा वाढेल, कटूता वाढेल आणि किरकोळ धुसफूस, किरकोळ हाणामा-या वाढून दोन समाज वेगळे पडण्याची शक्यता जास्त दिसते. एवढेच भय वाटते.
काही कामाचे नाही हे कट्टर पंथ.!!!!